30 March, 2016

रंगून काजू भरले त्यांनी गिरीडोंगर दुर्गम!

"आता कसले हे कातकरी जागेवर भेटतायत, आता बिया झाल्या ना?? आता ते एका जागी भेटणं अशक्य"
हा संवाद पांढरपेशा घरात कानावर पडला कि समजावं, काजूंचा सीझन आला.

शहरी लोकांना काजू म्हटल्यावर जे डोळ्यासमोर येतं, त्या म्हणजे काजूच्या बियाच असतात, आणि बहुतेक कोणत्याच फळाच्या बी ला इतका रुबाब मिळत नसल्यामुळे ह्या काजूच्या बियांचा उल्लेख आम्ही फक्त "बिया" असाच करतो, बस 'बिया' इतनाच नाम काफी है! कसल्या ते बोलायचं कामच नाही!

ह्या बियांवर आधारलेलं प्रचंड अर्थशास्त्र ह्या दिवसात सर्वत्र गाजत असतं.
ज्यांची स्वतःच्या मालकीची काजूची झाडं आहेत, ती कातकऱ्यांना कराराने देणे - त्यात पण अमुक रोख रक्कम ह्याच्या बरोबर "मुंबईचे दादा येतील तेव्हा, ताई माहेरपणाला येईल तेव्हा, वहिनींच्या माहेरी पाठवायला...... असे इतक्या वेळा अमुक अमुक बियांचे वाटे द्यायचेस" असं एक कलम त्या करारात असतंच! मग तेवढ्या बिया आणि ठरलेली रोख रक्कम झाडांच्या मालकाला देऊन उरलेल्या बियांचं त्यांनी काय वाटेल ते करावं..

करार बिरार न करता स्वतः बिया काढायचा पराक्रम करणारे काही थोडेजण असतात. कडेकपारीत, काट्याकुट्यात हिंडून बारीकबारीक बिया पातेऱ्यात शोधून जमवणं, झाडांवरून काढणं म्हणजे काय खायचं काम नाही. चोरांची कटकट सुद्धा भरपूर..  काही काही गुणविशेष निसर्ग जीन्समधूनच माणसाना देतो, त्यामुळे चोरीची टीप जरी गुप्तहेरांनी दिली, तरी मध्यरात्री मिट्ट काळोखातून रानात चोरांचा पाठलाग करणं हे सगळ्या लोकांना जमण्यासारखं नाही.. अर्थात अश्या बिकट वाटेवर चोरी करणं सुद्धा येऱ्यागबाळ्याचं काम नाही. त्यामुळे बिया चोरीची एकतरी चटपटीत ष्टोरी दरवर्षी चवीने चर्चिली जाते, त्या ष्टोरीत जर चोर रंगेहाथ पकडला गेला असेल तर मग ती ष्टोरी अजूनच रोमहर्षक!!

ज्यांची स्वतःची झाडं नसतील ते कातकऱ्यांकडून बिया विकत घेणार, त्यात पण 10 रुपयाला 4 बिया असल्या तरी हजारो रुपयांच्या ओल्या बिया विकत घेणारे हौशी कलाकार कमी नाहीत. कातकऱ्यांची लगबग अगदीच प्रेक्षणीय!

खास पाहुण्यांचं अगत्य करायला बियांची उसळ, बियांची आमटी, तंद्री लाऊन- एकाग्रचित्ताने सोलून खायला मीठ घालून उकडलेल्या बिया, धुरीच्या शेगडीत भाजून- हात काळे करून- फोडून खायला बिया, कसकसल्या भाजीत व्यंजन म्हणून बिया असले लाड यथेच्छ होतात. प्रोफेशनल काजुवाले तर त्यांच्याकडच्या शेरंडावलेल्या(शेरंडावणे=फाजील लाड) बियांना मसाला, चॉकलेट, मँगो, स्ट्रॉबेरी असले फ्लेवर लावतात.. शिवाय मग ऑफ सीझनसाठी सुख्या बिया, हे सगळे जास्तीचे सोपस्कार!
******************************

हे सगळे कौतुकसोहोळे वाट्याला येतात ते बियांच्या.. काय करणार ना, फिरते रुपयाभोवती दुनिया....

पण हि बी ज्या फळातून निघते -म्हणजे त्याला आम्ही बोंडं म्हणतो - त्यांच्याकडे मात्र लाल गुलाबी शेंदरी पिवळे असं विविधरंगी मोहक रूप आणि रसदार अंतरंग असूनसुद्धा सर्रास दुर्लक्ष झालेलं असतं.

नाही म्हणायला कोकणवर्णन ह्या जुन्या कवितेत मात्र बियांनी नाही तर बोंडांनीच जागा पटकावली आहे,
"लज्जारंजित नवयुवतींच्या कोमल गालांसम..
रंगुनी काजू भरले त्यांनी गिरीडोंगर दुर्गम!"
ह्याच्या व्यतिरिक्त कुठे त्या बोंडांची कुणी दखल तरी घेतल्येय का शंकाच आहे...

अगदी तुरळक कुणीतरी त्याचा स्क्वॅश/सिरप वगैरे करून विकतात, आणि 'म्हणे' कुणीकुणी त्याची दारू बनवितात वाटतं!

फारच झालं, तर "ह्या झाडाखाली बोंडांचा खच पडलाय, आणि वर बिया दिसत नाहीत त्याअर्थी चोरी झालेली आहे" इतपत सीआयडी गिरी करायपुरताच बोंडांचा उपयोग.. नाहीतर मातीत मिसळून जाणे हेच त्यांचे प्रारब्ध!

आपल्याला तर बोंडं खायला जाम म्हणजे जामच आवडतात. ह्या दिवसात कामानिमित्त रानात भरपूर फिरणं होतं, आमच्या आणि आमच्या आजूबाजूच्यांच्या बागेतल्या कातकऱ्यांच्या लहान पोरांशी माझी खास दोस्ती.. आमच्याच झाडांपैकी कुठल्या झाडांची बोंडं जास्त खास लागतात, कुठल्या झाडांची बोंडं खाजरी आहेत, हे ती पोरंच मला शिकवतात! सरसर झाडाच्या शेंड्यात जाऊन, अलगद यथेच्छ बोंडं काढून मोकळे! चालताचालता त्यातला चविष्ट रस हातांवर, तोंडावर पाघळत पाघळत ती कचाकच फस्त करायचं माझं प्रशिक्षण तिथलंच. वर "ताई, घरी जातेवेलीं काकींना खायाला न्हे बोंडां" हा हुकूम.

पण खरोखरच वर खाली फेऱ्या घालून, उन्हात तळपुन, काट्याकुट्यात फिरून स्वतःला ओरबाडून घेऊन, घाम गाळून झाल्यानंतर ह्या पोरांशी गप्पा मारतमारत, रानातला गार गार वारा खात, काजूची बोंडं खाणं म्हणजे ह्या जगातली एक नंबरची रिफ्रेशमेंट आहे.

त्याच्यात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असतं म्हणून उद्या ती कोणी दुकानात विकायला ठेवील(कदाचित कुठे महानगरात सुरुवात झाली पण असेल) तर त्यात हि अशी  वातावरण निर्मिती नसेल. सफरचंद-बीफरचंद असल्या ऐदी कॅटेग्रीत बोंडं नाहीतच. ती कापून, बशीत घेऊन, टुथपिकला टोचून खायचा कुणी विचारच मनात आणू नये. ती वाईल्ड आहेत, त्याच पद्धतीने ती खायला पाहिजेत, कचाकचा...

28 March, 2016

MyBicycle 3 मुर्डी-नानटे-मुर्डी

मुर्डी-नानटे-मुर्डी
24 मार्च 2016

बारावीत असताना, परीक्षा संपली कि काय काय करायचं ह्याची चर्चा अभ्यासापेक्षा जास्त चालायची. तेव्हा अमृता आणि मी पुण्याहून गोव्याला सायकलने जाण्याचा घाऊक आराखडा अत्यंत डिटेलवार, तोपण लेखी, तयार केला होता. पुढे पालकांनी असहकार चळवळ उभारली आणि आमचे बेत धुळीस मिळविले. पण नंतर कॉलेज संपेपर्यंतच्या वर्षात मी आणि अमृताने अश्या कित्येक भन्नाट कल्पना शोधून ठेवलेल्या, त्यातल्या काही प्रत्यक्षातही आणल्या. गोवा नाही तर नाही, पण गेला बाजार खडकवासल्यापर्यंत सायकलींनी अनेकदा जाऊन आलो.
अशी सायकल हि आमच्या दोघींची तेव्हापासूनच बेस्ट फ्रेंड!

योगायोग असा कि आत्ता मी नवीन सायकल घेतली त्यानंतर लगेच अमृता & कंपनीचा नानटे दौरा ठरला. ह्यावेळी मी तिच्याकडे जायचं असं ठरल्यावर मी हेही ठरवून टाकलं कि ह्यावेळी सायकलनेच जायचं,म्हणजे माझ्या दोन्ही बेस्ट फ्रेंड एकमेकींना भेटतील!

सणसणीत उन्हाळा सुरु झालाय आता, त्यामुळे जास्तीत जास्त लवकर निघून उन्ह होयच्या आत पोचवं असं ठरवलं होतं, तरी निघेपर्यंत पावणेसात झालेच. हवेचा पंप, लिंबू सरबत, वगैरे जामानिमा घेतला.

देवळाजवळचा सुप्रसिद्ध चढ अर्थातच खाली उतरून सायकल ढकलत पार केला, आणि मुर्डीफाट्यापासून खरी सफर सुरु झाली.

आसुदघाटात फोन वाजला तो घ्यायचं निमित्त करून थांबले. मोजून 5 मिनिटं दम टाकून आणि एका घोटात अर्धा लिटर लिंबू सरबत ढोसून पुढे निघाले तर मागून आदित गाडीवरून आला.
"काये??" ह्या माझ्या प्रश्नावर त्याने कायतरी थातुरमातुर उत्तर दिलं, पण खरं त्याला बाबानीच पाठवला असणार एस्कॉर्ट म्हणून, असा माझा डाऊटखाऊ विचार! रिकामी झालेली सरबताची बाटली त्याच्याकडे दिली आणि कुणाकडूनतरी पाणी भरून आणायला सांगितलं. दापोलीत भेटायचं ठरवून तो पुढे गेला.
दापोलीत पोचायला पावणेनऊ वाजले(20किमी-2तास)
घरी फोन केला, आदितला घरी जायला सांगितलं आणि 9 वाजता दाभोळ रोड पकडला. सूर्य पटपट वर येत होता आणि वाजले किती तेच कळत नव्हतं,मोबाईल सॅकमध्ये होता, म्हणून दापोलीत आदितच रिस्टवॉच मागून घेतलं.

आता हा रस्ता रोजच्या पायाखालच्या वहिवाटीचा नाही, त्यामुळे खड्डे, चढउतार, स्पीडब्रेकर ह्यांच्या जागा पाठ नाहीत. उतार आला कि झुमकन तरंगत जातानाचा आनंद लगेच ओसरत होता, कारण ह्याच रस्त्याने संध्याकाळी परत यायचाय हि जाणीव होत होती, उलट चढच जास्त दिलासा देत होते कि परतताना इथे मज्जा येईल!!

पुढे जाताजाता सायकल एकेक धडे देत होती, चढात एकदम समोर रस्त्याकडे बघून धीर खचवून घेण्यापेक्षा पायाखाली बघत हळूहळू पुढे सरकत राहायची आयडिया मिळाली. तसेच दमश्वास नीट व्हायला श्वासावर लक्ष ठेवायचं आपोआपच सुचलं, म्हणजे डावा पाय मारताना श्वास, उजवा पाय मारताना उच्छवास..अशी लय तयार झाली.

उंबर्ले टाकून पुढे जाऊन थांबून अर्धा लिटर पाणी ढोसलं. नानट्याला दाभोळ रोड सोडून मातीच्या कच्च्या रस्त्याला वळले, तेव्हा 50%मोहीम पार पडल्याचं समाधान होत होतं. (दापोली-नानटे 13 किमी, सव्वा तास) सव्वादहा वाजता अमृताच्या घरी पोचले, तेव्हा समस्त कुंटे फॅमिली दरवाज्यात स्वागत करत उभे होते..

खाखा नाष्टा झाला, मग कधीपासून साठवून ठेवलेल्या गप्पा, साग्रसंगीत जेवण, सावनीबरोबर दंगा मस्ती करत वेळ भरभर पुढे सरकत होता. सावनीची मस्ती थांबून तिने दुपारी झोपावं,म्हणून अमृताने मला सांगितलं कि "तू झोपेचं नाटक कर म्हणजेच ती झोपेल." तर काय, तिच्या आधी मला झोप लागली.

खाडकन जाग आली तेव्हा चार वाजत आलेले. मस्त गारगार करवंद सरबत पिऊन, पावणेपाचला निघाले.

आता उताराचा आनंद खरोखर अनुभवता येत होता. परतीच्या वाटेवर बैल जसे वेगात चालतात, तसाच येताना दापोलीला यायला एक तासच लागला.

कृषी विद्यापीठातला उसाचा रस 2 ग्लास भरून पिऊन दापोली सोडली, बरोबर 6 वाजता. इथेही परतीच्या वाटेवर उताराची मजा होती..

व्यवस्थित बनवलेले स्टेट हायवे किंवा ऑफिशियल रस्ते असतील तिथे सायकल चढ चढताना कुरकुरत नाही. 1 फूट उंच जायला 10 फुटाचा वळसा का असं कायतरी जे रस्ते बांधणीचं परिमाण आहे ते तिथे अंमलात आणलेलं असत. पण " नाय तं काय बोल्लो, बोल्लो आमच्या वाडीवर रस्ता होया हवा" हे परिमाण वापरून, जिथे पाखाड्या बुजवून वर डांबर ओतून त्यांना रस्ते असं संबोधण्यात येत, तिथे सायकल कुथते! हे आपलं माझं निरीक्षण...

लॉन्ग विकेन्डमुळे, समुद्रावर पर्यटकांच्या अंगात आलेलं होत. असं वाटलं कि लोक लांबून लांबून जीव टाकत इथे येतात, पण आपल्याला ह्या समुद्राकडे ढुंकून बघायला वेळ नसतो. आज सायकलच्या निमित्ताने तोही अनुभव घ्यायला मिळाला.

हर्णै गाव येईपर्यंत काळोख पडायला लागलेला, घरून फोन येत होता, पण फोनची बॅटरी संपली होती. मिलिंदकाकाच्या दुकानात शिरून त्याला घरी फोन करून कळवायला सांगितलं कि मी इथून निघाले आहे.

आता सफरीचा शेवटचा टप्पा. हत्ती सहज गेला होता, पण शेपूट जड वाटायला लागलं होतं. घामाच्या धारा आणि संध्याकाळचा गार वारा असा विरोधाभास तयार झालेला. काळोख पण वाढत होता. समोरून पर्यटकांच्या आलिशान गाड्या भयंकर प्रखर हेडलाईट घेऊन येत होत्या. समोरून आलेली गाडी पास होऊन निघून गेली कि काही क्षण काहीच दिसेनासं होत होतं.
ओव्हरटेक करताना, समोरून पास होताना लोक सायकलीला रस्त्यावरचा घटक म्हणून खिजगणतीतच धरत नाहीत ह्याची खूप जाणीव होत होती. 3-4 वेळा तरी ट्रॅफिकमध्ये वापरण्याचे खास अस्खलित शब्द वापरायची वेळ आली.

घरी पोचले तेव्हा साडेसात वाजत होते. एकूण दिवसभरात येऊन जाऊन 66 किमी अंतर झाले, सगळा मिळून वेळ सव्वापाच तास इतका लागला.
बाबांनी बंबात विस्तव पेटवून पाणी तापवून ठेवलं होतं. आईने स्वयंपाक तयार ठेवला होता. मुंबईचे काका काकू आले होते, सगळ्यांना दिवसभराच्या हकिगती सांगता सांगता लहान बाळासारखी अलगद झोप लागली.. पाय दुखले अजिबात नाहीत, पण झोपेत सुद्धा दिवसभराचा प्रवास दिसत राहिला!

22 March, 2016

#shimgotsav साताई

ढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुम
होळी जवळ आली कि हा असा आवाज चारी दिशांना निनादायला सुरुवात होते.. गावोगावी घनदाट रानातल्या देवळांमध्ये असलेल्या ग्रामदेवता पालखीतून भक्तांच्या भेटीला घरोघरी जाण्याचा सोहळा. ढोल ताशे आणि सनईच्या गजरात गावोगावी सुरु होतो कोकणातला शिमगोत्सव !
पूर्वी लहानपणी तर होळीच्या अगोदर ४-५ दिवसात सुमारे २५-३० पालख्या यायच्या. ह्या पालख्यांच्या पुजेची तयारी असलेलं एक ताट आई, आजीने कायम तयारच ठेवलेलं असायचं. रात्रंदिवस गर्जत असलेला हा ढाकुमाकुम आवाज जवळ जवळ येतोयसं वाटलं कि धावत रस्त्यात जाऊन बघायचं, आणि एखादी पालखी आपल्या घराकडे वळलेली असेल तर घरात तशी वर्दी द्यायची. मग सगळेजण बाहेर येऊन पालखीतल्या देवतेची पूजा, आपलं आडनाव सांगितलं कि पालखीबरोबरचा मुख्य माणूस प्रार्थना करून सगळ्यांसाठी सुख समृद्धी मागणार. मग पालखी पुढच्या घराच्या कवाडीत.
आता काळपरत्वे हि पालख्यांची संख्या ७-८ वर आल्येय, पण उत्साह अजून तसाच ! काल संध्याकाळी अंगण सारवताना हाच विचार मनात येत होता, वाढत्या वयाबरोबर आनंदाच्या-उत्साहाच्या कल्पना बदलतात, पण पालखी म्हटलं कि निर्माण होणारे भाव वर्षानुवर्ष,, पिढ्यानपिढ्या तसेच.
आजचा होळीचा आदला दिवस म्हणजे साताईची पालखी. सातांबा गावाची देवता म्हणून साताई. हि पालखी सर्वांत हायप्रोफाइल! ह्या पालखीला इतर पालख्यांपेक्षा जास्त मान. जास्त श्रद्धा, स्वागताची लगबग, भीती, दरारा, प्रोटोकॉलमधला काटेकोरपणा सगळच जास्त. साताई येणार म्हणून आज शाळेला, शेती-बागायती कामांना, फॅक्टऱ्यांना सगळ्यांना सुट्टी!
सकाळी जाग आल्यापासूनच ढाकुमाकुम ऐकू येत असत. इतर सगळ्या पालख्यांच्या वाद्यांपेक्षा साताईचा वैशिष्ठ्यपूर्ण बाजा सवयीनी वेगळा समजतो. साताई पहाटे अडीच तीनला सातांब्याहून निघून वर्षानुवर्ष ठरलेल्याच मार्गाने ठरलेल्याच क्रमाने एकेक गाव एकेक वाडी घेत मजल दरमजल करत आमच्या मुर्डी ब्राह्मणवाडीत येईपर्यंत साडेनऊ दहा होतात. घराचा, अंगणाचा, रस्त्याचा लखलखीत केर काढून, पाणी मारून, शेणाने सारवून चकाचक करून त्याच्यावर रांगोळी, घरच्या देवांची पूजा, सगळ्या लोकांच्या आंघोळ्या, साताईच्या पुजेची आणि ओटीची तयारी होईपर्यंत रस्त्यावर एक एक करून साताईचे खेळी दिसायला लागतात.
खेळी म्हणजे पालखी खांद्यावर घेऊन येणारे सातांबा आणि कोंगळे गावाचे ग्रामस्थ. स्वच्छ पांढरे शर्ट/झब्बे, डोक्यात पांढऱ्या टोप्या, धोतर/लेंगा/पाटलोण/जीन्स/हाफ चड्डी अश्या सगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधी,,  एकुण एक सगळ्यांचे अनवाणी पाय. आता डांबरी रस्ते झाले असले तरी ठरलेला मार्ग बदलायचा नाही ह्या कडक संकेतामुळे आडरानातून काट्याकुट्यातून पालखी घेऊन सलग पंचवीस तीस तास चालतात.
क्षणोक्षणी जवळ येणारा साताईच्या ढोलाचा आवाज, आली का? आली का? अशा उत्कंठेनी प्रत्येक कवाडीत उभे असलेले आम्ही सगळे, असं एकदम भक्तीभावानी भारलेल वातावरण पार करत करत साताईची पालखी आमच्या सगळ्यांच्या घरांवरून, भरभर चालत साताईचा बाजा पुढे सरकतो. पाठोपाठ प्रत्यक्ष पालखी वेगात आणि दिमाखात पुढे जाते!
टोकातल्या घरापासून सुरुवात करून एकेका घरापुढे थांबून पूजा घेत घेत येते. वेळेचं काटेकोर गणित, आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होण्यापूर्वी देवळात परत पोचण्याचा कडक नियम ह्याची सांगड घालताना सुद्धा प्रत्येक घरी थोड्याच वेळात, तरी मनाच समाधान होईल अशी पूजा प्रत्येकाला करायला मिळते. बाबांनी पूजा केली, आईने ओटी भरली, आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला, कि आडनाव विचारून
“ह्या पेंडश्यांच्या घरादारा, मुलामाणसा, येण्याजाण्या, गुराढोरा, शेतीवाडी, सगळ्यांचा सांभाळ कर, तोटा आला तर पार कर, ह्या आर्जवाला मान दे” अशी प्रार्थना करून, झाल ना मनासारखं दर्शन असं विचारून मग पुढच्या कवाडीकडे निघतात. पूजेच्या ताटात अंगारा देतात. त्याची पुडी घरोघरच्या देवघरात वर्षभर असते. आजारी असलेली गुरं, कारणाशिवाय रडणारी लहान पोरं ह्या सगळ्यावर त्या अंगाऱ्याचा उतारा ठरलेला.
विशेष मानकरी असलेल्यांच्या घरी अंगणात चटई घालून त्याच्यावर पालखी खाली बसवून पूजा केली जाते, बाकी सगळ्यांकडे रस्त्यातच कवाडीसमोर उभे राहून पूजा घेतात.
आजच्या पहाटेपासून सुरु झालेला हा पालखीचा प्रवास आजचा संपूर्ण दिवस, आजची संपूर्ण रात्र सुरूच असतो. मध्यरात्रीनंतर साडेतीन चार च्या सुमारास सगळी ठरलेली घरं ठरलेल्या क्रमाने घेऊन झाली कि पालखीचा परतीचा प्रवास सुरु होतो, तेव्हाचा स्पीड अगदी अभूतपूर्व असतो. पहाटे उजाडायच्या अगोदर, पेट्रोम्याक्स बत्त्यांच्या उजेडात, वाद्यांच्या आता  अतिद्रुतगतीत वाजवलेल्या निनादात जवळपास धावत म्हणावे इतक्या जास्त वेगाने पालखी देवळाकडे निघते.
ह्या प्रथेमागे एक मजेदार दंतकथा ऐकली आहे. परतीच्या प्रवासात खाडीच्या किनाऱ्याने पालखी सातांब्याला जाते, त्याचप्रमाणे खाडीच्या पलीकडच्या किनाऱ्यावरच्या गावात असलेल्या 'खेम' नावाच्या देवाची पालखी सुद्धा परतीला लागलेली असते. जर खाडीच्या ह्या किनाऱ्यावर साताई आणि त्या किनाऱ्यावर खेम अश्या पालख्या एकावेळी समोरासमोर आल्या तर मग साताई आणि खेमाचे लग्न होईल, मग जर सासरी गेली तर आपली साताई आपल्याकडे कशी येऊ शकणार? म्हणून मग त्या खेमाच्या पालखीची वेळ टाळायची! कोणत्याही परिस्थितीत साताई सूर्योदयाच्या आत देवळात पोचलीच पाहिजे हा कडक संकेत ह्यासाठीच!
आता विचार करताना वाटतं कि हि दंतकथा म्हणजे हुशार पूर्वजांची टाईम मॅनेजमेंट आहे! नाहीतर पोरंटोरं इकडम् तिकडम् करत टाईमपास करत राहतील, होळीच्या सणाला घरची मुलं घरी पोचायला हवीत ना? म्हणून मग हा दंतकथेच्या मार्गाने नेमून दिलेला प्रोटोकॉल!! असंच असणार!
आता ह्या परतीच्या मार्गावर पहाटेच्या वेळेला मात्र खेळ्यांचा अवतार अगदी बदललेला असतो. सलग २५-३० तास न थांबता चालून दमलेले चेहेरे, घामानी, धुळीनी, आणि गुलालाच्या उधळणीने मळलेले कपडे, सूर्योदय होण्यापूर्वी देवतेला देवळात नेण्याच्या उद्दिष्टाने धावणारे, अडखळायला लागलेले अनवाणी पाय... भरीला सगळीकडे जमा झालेल्या नारळ, तांदुळाचे खांद्यावर घेतलेले बोजे...पण त्यांच्या आगमनाने वातावरणात भरलेली प्रसन्नता, आदल्या दिवसापेक्षा जराही कमी नसते...
हा परतीचा रस्ता आमच्या घरावरूनच जातो, त्यामुळे पुन्हा ते सुपरफास्ट ढाकुमाकुम ऐकू आलं कि कुणीही न उठवता आपोआपच साखरझोपेतून जाग येतेच येते. पुन्हा कवाडीत येऊन समोरून जाणाऱ्या पालखीला मनापासून हात जोडले जातात.  आणि तिठ्ठ्यावर पालखी वळून दिसेनाशी होईपर्यंत... दूरवर काळोखात दिसणारे पेट्रोमॅक्सचे तेजस्वी ठिपके दिसेनासे होईपर्यंत... परह्याच्या पुढे आमच्या होळीच्या पुढपर्यंत ऐकायला येणारा सुपरफास्ट ढाकुमाकूम आवाज बारीक बारीक होत ऐकू यायचा थांबेपर्यंत.... पाय जागचे हलत नाहीत...

18 March, 2016

MyBicycle 2

कालचा सायकल घेतल्याचा दुसरा दिवस, संध्याकाळी आसपासच एक चक्कर मारून यावी असं ठरवलं.
आमच्या इकडे सपाट रस्ता सलग असा एखादा किलोमीटर सुद्धा  सापडणे कठीण. त्यातल्या त्यात हळूहळू वाढत गेलेल्या चढाचा रस्ता निवडला. सुमारे 4 किमीवर असलेल्या आमच्या सड्यावर जायचा बेत ठरवलेला. एका किमीमध्येच फे फे झाली आणि दहा मिनिटं थांबून जरा दम टाकला. सायकलबरोबर सेल्फी वगैरे काढून झाले!

मग मजल दरमजल करत एकूण 3 वेळा थांबून संपूर्ण चढ असलेला रस्ता संपवला. सड्यावर झाडांना पाणी घालायचं रोजचं काम केलं, तोपर्यंत आदित पण त्याची कामं संपवून घरी निघतच होता.

आल्यापासून सायकल त्याच्या वाट्याला आलीच नव्हती, म्हणून तो म्हणाला कि मी जरा बघतो चालवून, सायकल घेतलंन आणि काय तर म्हणे मी जातो आता घरापर्यंत सायकलनेच! आता पूर्ण उतारच होता, सुटलाच तो सुसाट.. त्याच्या युनिकॉर्नचं ते धूड मागे राहिलेलं त्याचं मी काय आता लोणचं घालू असं झालं अक्षरशः.

काळोख पडायला लागलेला म्हणून जास्त टाईमपास करण्यात अर्थ नाही असं लक्षात घेऊन जीव मुठीत धरून मारला स्टार्टर युनिकॉर्नला. एकतर जीराफासारखी कायतरीच उंच, जळ्ळे मेले ते गियर सुद्धा विचित्र किती आहेत ना, सरळ एकापुढे एक खटाखट् पुढच्या बाजूला टाकत जावे कि नाही, ते नाही. फर्स्ट पुढे साधा, मग काय तर सेकंडला येताना डाव्या पायाच्या बोटांनी- नखांच्या बाजूनी खालून वर उचलायचा गियर.. कश्याला ना असले द्राविडी प्राणायाम!
पण पिकअप काय तो मस्तच अगदी, जमलं एकदाचं! मग जोरात जाऊन आदितला गाठला आणि हळूहळू चालवत आणली एकदाची घरापर्यंत. बरी वाटली एकूण, पण नीटपणे पाय टेकले असते जमिनीला तर अजून जरा मजा आली असती, जेमतेम पायाच्या अंगठ्याची टोकं फक्त जमिनीला टेकत असल्यामुळे होतं काय कि उतरात समोरून वाहन आलं कि वाट लागते.. आधीची स्प्लेंडर कशी, अगदीच गोड, सुबक ठेंगणी! कशेडी घाटात सुद्धा आरामात चालवलेली मी, पण ती विकून हि आल्यापासून मला मनसोक्त बाईक चालवायला मिळालीच नव्हती.
पण सायकलच्या निमित्ताने युनिकॉर्न चालवायचा योग आला आणि उगाचच भारी वाटलं!

17 March, 2016

MyBicycle

#MyBicycle 1

किती दिवस घेऊ घेऊ म्हणत असलेली गियरवाली सायकल काल फायनली आमच्या घरी दाखल झाली. ह्यात विशेष असं काहीच नाही, पुण्यामुंबईकडे तर शाळेतली चिंटुकली पोरंपोरी सुद्धा अठरा गियरच्या सायकली सहजगत्या क्लासला जायला वगैरे वापरत असतात. पण कुणाला कशाचं कौतुक असावं ह्याला काय माप नसतं ना, तर मला बापडं आहे जरा सायकलींचं (आणि चालवणाऱ्यांचं) कौतुक, म्हणून आमचे तमाम बंधूवर्ग आणि मित्रगण जसे त्या हार्लीडेव्हिडसन का काय ते - तिच्याकडे बघून लाळ गाळत असतात तशी आपली अवस्था होते ब्वॉ छानशा गियरवाल्या सायकली बघून!

तर कण कण बचत करून करून पैसे साठवणे सुरूच होते आणि एकीकडे पालकांना पटवायची मोहीम पण सुरु होती.  गावातल्या गावात फिरायला साधी सायकल आहे हे उघड बोलायचं कारण, आणि एकदा का ती चढ चढू शकणारी सायकल घेतली कि मग कुठे कुठे उनाडक्या सुरु होतील ह्याची धास्ती हे खरं मनातलं कारण!

 दापोलीत सायकलच्या दुकानात आधीच मी  चौकश्या करून ठेवलेल्या, ट्रायल घेऊन वगैरे झालेली होती. अगदी बेसिक, सर्वात स्वस्त, साधा प्रकार निवडला, कारण झेपत नाही म्हणून किंवा वेळ मिळत नाही म्हणून जर सायकलिंगचा उत्साह बारगळला तर फार जास्त पैसे अडकून राहायला नकोत.
माझ्याकडे पुरेसे पैसे साठल्यावर मग घरात जाहीर करून टाकलं कि, "मी आज सायकल घेऊन येत्येय!"

मग काय, बाबा माझ्याबरोबर स्वतः येऊन सायकल बघून, घेऊन, वर," माहित्येय मोठी पैसे साठवणारी!" असं म्हणून स्वतःच पैसे देऊन मोकळे झाले!
मग नवी सायकल दापोलीहून घरी चालवत आणायला बाबांनी परवानगी दिली तेव्हा पहिला गड फत्ते झाला. माझ्यामागून अर्ध्या तासाने प्लेजरवरून निघून बाबांनी मला हर्णै गावात गाठलं. आणि म्हणाले "बघू गो मला जरा! गियर कसे बदलायचे?" वाहनांची अदलाबदल करून पाजेपर्यंत आलो. पाजेत शाळेजवळच्या मोठ्या चढाच्या आधी थांबलो.

आमच्या इथे बदलत्या काळाबरोबर, वाढत्या आर्थिक प्रगतीबरोबर इतर सगळ्या आधुनिक सुविधा आणि चैनीच्या वस्तू सर्व थरातल्या समाजात आल्या, पण सायकलींची क्रेझ मात्र मुळीच आली नाही हि जाणीव रस्त्यात खूपच होत होती, इतके लोक्स विचित्र हावभाव करत होते. पाजेत उभं राहून बाबा घाम पुसत असताना तर एक अनोळखी मुलगा अगदी मनापासून म्हणाला, "एसटीवर टाकून नाही का आणायची सायकल!"
बाबा: "अरे, असं बघ, सायकल एसटीवर टाकून आणणं, म्हणजे पवनचक्की विजेवर चालवण्यातला प्रकार आहे!"
तो मनुष्य(विथ चमत्कारिक हावभाव): "...."
मी: "बाबा, चला आता! मी चालवते"
मग परत वाहनांची अदलाबदली करून निघालो. पुलाच्या अगोदर रिक्षास्टँड जवळ उजवीकडे वळल्यावरचा चढ किती महाभयंकर आहे ते सायकल असल्याशिवाय कळत नाही. तिथे मात्र सायकल हातातूनच न्यावी लागली, बायपासच्या टोकाजवळ पुन्हा बसून- उतार आणि मग पुलावरून तर अक्षरशः तरंगल्याचा अनुभव घेतला! 

मुर्डी गावाची सीमा लागताच बाबा पुन्हा "दे मला जरा आता!" म्हणून तयार!
विमलेश्वराच्या देवळाजवलचा सुप्रसिद्ध उतार उतरून देवळात जाऊन, मोरया करून घरी पोचलो.
आईने सायकलवरून तांदूळ ओवाळून टाकले, आणि आमची नवी सायकल आमच्या कुटुंबाचा घटक झाली!

आई तिच्या रोजच्या संध्याकाळच्या चालण्याला बाहेर पडली तेव्हा, "ऑऑ! अनिलकाका सायकल चालवत आला!" म्हणून कौतुकयुक्त आश्चर्योद्गार तिला ऐकायला मिळाले. (टचवूड)
बाबा म्हणाले, "आता सांगतोच ह्या पोरांना, हि गाडी ब्याटरीवर चालणारी आहे, पण ब्याटरी आपापल्या ढोपरात बसवून घ्यायची!"

11 March, 2016

लळित

कशाचेही शेवटचे क्षण अगदी चुटपुट लावतात, आज महाशिवरात्र उत्सवाचे लळित झाले. रात्रीचे 9 वाजले कि देवळात लाऊड स्पीकरवर भजने, भक्तिगीते, नाट्यगीते सुरु झाली कि पटापट जेवणे उरकून देवळात जायची लगबग सुरु होते. तबला ठाकठीक केल्याचे आवाज आणि ऑर्गन चे वर्षानुवर्षे ऐकत आलेले ठराविक सूर म्हणजे अगदी ह्या वातावरणाचा अविभाज्य भाग!
10 ला कीर्तन 'उभे राहिले' कि उत्सवाचा शेवटचा कार्यक्रम सुरु झाला. आधीच्या 3-4 दिवसांच्या किर्तनांपेक्षा लळित जरा वेगळे.

"ऐश्या दात्या विसरावे, तोंड कवणा पसरावे,
तुका म्हणे सारी राहे, नुरोनिया पाहे.."

हळूहळू आसमंतात ते एक ठराविक वातावरण भरून जायला लागतं, लहानपणापासून आज पर्यंत अगदी सारखंच! पूर्वरंगातला पद्य भाग, उत्तररंगातली कथा, साकी,दिंडी,आर्या,अभंग... मध्यंतरातली भक्तिगीते... हे सगळं मनापासून एन्जॉय करणारे वादक आणि त्यांचं एक्मेकांच्यात ट्युनिंग.

हे लिहिताना खूप खंत वाटत्येय कि संगीत विषयक अज्ञान असल्यामुळे योग्य परिभाषा वापरून मी त्या माहोलाच वर्णन नाही करू शकत! पण विमलेश्वराच्या कृपेने हा आनंद अनुभवण्याची संधी लहानपणापासून मिळत आली, ह्याबद्दल खूप बरं वाटतं.
दान,दाता,दातृत्व ह्याचे विविध पैलू उलगडत उलगडत कीर्तन पुढे सरकत राहातं, आणि विमलेश्वर(कोणताही देव) एवढा मागू ते देणारा असताना इतर कुणाकडे काही मागायची वेळ कशाला येईल? तोच एक सगळ्यांना देऊन देऊन पुरून उरेल..ह्या मुद्याकडे पोहोचतं.

कथानकाच्या शेवटी देवाच्या दरबारात, रत्नजडित सिंहसनावरचा देव प्रसाद देतो आहे, तिथे कोण कोण आले- बाळसंतोष, भजन म्हणणारे, प्रवचन करणारे, कीर्तनकार, भाट,वासुदेव आणि असे कोण कोण आले. त्यांनी देवाकडे जे जे मागितलं ते ते देवाने दिलं, शेवटी देव दमून झोपला तर भूपाळी म्हणून त्याला ह्या सगळ्यांनी उठवलं.. कारण तूच झोपलास देवा तर आमचं काय!

हे लळित, म्हणजे उत्सवाचा एक्सट्रॅक्ट जणू काही. जसा उत्सव पार पडायला सर्व प्रकारच्या लोकांचा हातभार लागला! तसेच कथानकात विविध लोक येतात, ते प्रसाद मागतात तसाच आम्ही मागतो! उद्यापासून रुटीनचं रहाटगाडगं सुरु होईल तेव्हा देवा तू जागा राहा, आणि आमच्या अडीअडचणीत  पाठीशी अस!

खरंच, एरवी देवदेव आणि कर्मकांड करण्यात अभाव असूनही मला विमलेश्वर आणि त्याचा उत्सव म्हणजे ऊर्जेचा आणि आशीर्वादाचा कायमचा स्रोत वाटतो. उत्सवाने चार्ज झालेली आमची बॅटरी वर्षभर टिकते. गावापासून लांब असताना कसोटीच्या क्षणी विमलेश्वर आठवतो. उत्सव संपताना लळिताच्या वेळेला मागणं मागितल्याप्रमाणे तोच काय काय ते देत असणार आम्हाला. मग वेळोवेळी भेटणारी दुःख 'फॉर अ चेंज' म्हणावीशी वाटावीत असे!

ह्या विमलेश्वराने किती काय काय दिलं?? आयुष्यभर पुरतील असे आनंद अनुभवायला दिले..

*आपल्याही पिढीला इंटरेस्टिंग वाटावा असा कीर्तन हा प्रकार असू शकतो हे जाणवून दिलं...
*'कीर्तन जुगलबंदी' ह्या शब्दाच्या नाविन्यामुळे कीर्तनाला खचाखच गर्दी कशी होते हे दाखवलं...
*राणा प्रतापच्या घराण्याच्या इतिहासाचं आख्यान कीर्तनातून ऐकताना डोळे भरून आले तो अनुभव दिला...
*भगतसिंग-राजगुरू-सुखदेव आख्यानाचं कीर्तन 3 तास चाललं, तेव्हा तुडुंब भरलेल्या सभामंडपातून बारीक पोर सुद्धा, बाथरूमला जायला सुद्धा जागचं हललं नव्हतं ..
*भजनात तल्लीन झालेले दादा- काका लोक आणि काकू लोक, मोठ्यांच्या तालमीत तयार होणारे छोटे गायक,वादक..
*कित्येक वर्षांच्या -दशकांच्या अंतरानंतर, बालपणीच्या मैत्रिणींची स्नेहभेट घडवणारे माहेरवासिनी मेळावे आणि तो नॉस्टॅल्जीया!!
*महाशिवरात्रीला मध्यरात्री होणारी 'निशिथकाल पूजा' , सामुदायिक जप- ओमनमःशिवाय- नंतर जोरदार आरत्या,
*गावातल्याच लोकांनी बसवलेली नाटकं, संगीत नाटकं..
*रथाची सजावट आणि मिरवणूक.. शंखांचा घोष,
*कुठलंही काम न लाजता करायचं शिक्षण, न बोलता कृतीतून देणाऱ्या - महाप्रसादाच्या पंक्तीत खरकटी उचलून शेण लावणाऱ्या- आईच्या पिढीच्या काकवा.... शेवटच्या पंक्तीत त्यांना आग्रहाने वाढणारे सगळे दादा आणि काका
*लळिताच्या कीर्तनाच्या मध्यंतरात झालेल्या 'क्षणभर उघड नयन देवा' ह्या गाण्यातली कमाल आर्तता डोळ्यातून खळ्ळकन बाहेर आलेली...

खरोखर जगण्याची ऊर्जा हा उत्सव देत आला. आणखी एक उत्सव पार पडला,
प्रत्येकाने आपापल्या परीने उत्सवाला हातभार लावला, विमलेश्वराची सेवा केली, त्याचा प्रसाद लळिताच्या वेळी.. समाप्तीची हुरहुर दाटून आली..
लळीत ऐकलं तरच पुण्य मिळतं हा धाक ह्यासाठीच असावा, कि गर्दी जास्त असेल तर हि हुरहुर जरा सुसह्य होईल!!
सालाबादप्रमाणे विमलेश्वराची प्रार्थना करून, सुरुवातीचाच अभंग भैरवीच्या चालीत सुरु झाला, तेव्हाच पोटात कालवाकालव सुरु झाली.. सालाबादप्रमाणे! हेचि दान देगा देवा म्हणताना घशात काहीतरी टोचायला लागलं..सालाबादप्रमाणे!
अजून एक वर्षांनी परत येण्यासाठी उत्सव संपला, आणि "भलाक्को भाई" म्हणत बालगोपाल रथयात्रेच्या तयारीला लागले.
लुटुपुटूचा छोटासा रथ, त्यात छोटासा विमलेश्वर!! त्याची रथयात्रा मिरवणारे लिंबूटींबू- काही वर्षानंतरच्या उत्सवाचे आधारस्तंभ..
त्यांना तुझा विसर पडू नको देऊ!! हेचि दान देगा देवा!