12 February, 2023

विद्यारंभ संस्कार

मुलं शाळेत जायला लागल्यावर, प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे आम्ही सतत ज्या प्रश्नाला सामोरे जात असतो ते म्हणजे- मराठी माध्यमच आहे, ssc बोर्डच आहे तरी एवढा मोठा प्रवास करून दापोलीच्या शाळेत नेऊन हाल का करताय मुलांचे. हाल वगैरे तर नाहीच, पण हा निर्णय घेतल्याबद्दल पावलोपावली समाधान मात्र वाटत राहते, त्यापैकीच एक अतिशय महत्वाचा दिवस नुकताच आमच्या मुलांच्या विद्याभारती शाळेत पार पडला- तो म्हणजे विद्यारंभ संस्कार. 

अगदी लहान वयात कोवळ्या बोटांना लिहायला द्यायचे नाही हा आमच्या शाळेचा विचार. तोपर्यंत, निरीक्षण, पाठांतर, गाणी गोष्टी खेळ यांची लयलूट! मुलांना पाच वर्षे पूर्ण झाली की शाळेत विद्यारंभ संस्कार होईल, आणि मग लेखन शिकायला सुरुवात होईल, असं सांगितलं गेलं होतं. (पाच वर्षे पूर्ण झाल्यावर??? मग लेखनाला सुरुवात???- असं वाचून दचकले असतील खुपजण)

प्रत्यक्षात तो सोहोळा 26 जानेवारीला ठरला. साधारण 15 दिवस आधी शाळेच्या ग्रुपवर बाईंकडून तशी सूचना आली. ह्या कार्यक्रमासाठी 'माता पालकांची' उपस्थिती आवश्यक आहे. आई येऊ शकत नसेलच, तर मग आजी, मावशी, काकू, आत्या, मामी असं कोणीही चालेल! असाही निरोप आला. पालकांनी पांढरे किंवा फिक्क्या रंगाचे कपडे आणि मुलांनी गणवेश घालायचा आहे, असं सांगितलं गेलं तरीही एखादा फिकट रंगाचा ड्रेस अडकवून जाऊ अश्याच विचारात मी होते. 

मग एक दिवस अबीर व अर्णव सांगू लागले, "सगळ्या आयांनी साडी नेसून यायचंय शाळेत. लक्षात आहे ना? आणि मुळात तुझ्याकडे आहे तरी का पांढरी साडी, किंवा फिक्कट रंगाची? नाहीतर आजीची मागून घे एखादी!😁" इथपर्यंत पोरांची डोकी धावली. 

शिवाय अगदी पळी-पंचपात्रीपासून सगळं पूजेचे साहित्य, पाटी पेन्सिल, आणि जपमाळ घरून आणायला सांगितली होती, तरीही शाळेतल्या एखाद्या नेहेमीच्या कार्यक्रमापेक्षा जास्तीचं महत्व ह्या कार्यक्रमाला असणार आहे ह्याची आम्हाला कल्पना नव्हती.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी, प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजवंदनानंतर सुटी असते तरीही सर्व शिक्षक मंडळी उत्साहाने कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होती. एका चिमुकल्या पालखीत मोठमोठे ग्रंथ ठेवून ती पालखी खांद्यावर घेऊन मुलांनी शाळेच्या आवारातच दिंडी काढली.

नंतर मग प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या आईबरोबर वर्गात बोलावलं गेलं. त्या वर्गातील तयारी बघून आम्ही थक्कच झालो. घरी शुभकार्य असलं की कसे मातीच्या विटांचे चौकोनी यज्ञकुंड करतात, तसे 7-8 यज्ञकुंड तयार केले होते. एका कुंडाभोवती चार मुलं व त्यांच्या आया अश्या आठ जणांच्या बसण्याची व्यवस्था. बाकी सर्व तयारी- धूप, कापूर, गोवऱ्या, समिधा, तीळ, जव, तूप, निरांजन- अशी जय्यत मांडलेली होती. 

आमच्या मुलांची विद्याभ्यासात उत्तम प्रगती व्हावी अश्या संकल्पाने विधीची सुरुवात झाली. यज्ञात अग्नी प्रज्वलित करून त्यात पंचमहाभुतांसाठी आहुत्या दिल्या गेल्या. सुस्पष्ट व सुश्राव्य मंत्रांचा घोष शिक्षकवृंदाकडून केला गेला. शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या कल्याणासाठी करण्याची बुद्धी मुलांना मिळावी अश्यासाठी- "राष्ट्राय स्वाहा, इदं न मम" अशी आहुती घातली गेली.

आहुती देणे, नैवैद्य दाखवणे, ह्या कृती कश्या करायच्या,  कुठल्या बोटांनी करायच्या हे सर्व शिक्षकांनी नीट समजावून सांगितलं.

नंतर सर्व मातांना जपमाळ घेऊन सरस्वती देवीचा जप करायला सांगीतला. आईने आपल्यासाठी जप केला, आता मुलांनी आईच्या पायावर डोकं टेकवून नमस्कार करायचा, असं सांगितलं गेलं.

आता विद्याभ्यासाला सुरुवात करायची, आई म्हणजे पहिला गुरू, म्हणून आईने मुलांकडून पाटीवर श्री अक्षर गिरवून घेतले. सर्वात शेवटी प्रसाद देण्यात आला- तो म्हणजे खारीक, खोबरं, खडीसाखर, वंशलोचन अश्या पदार्थांची एकत्र केलेली पूड- कारण हे सर्व पदार्थ बुद्धिवर्धक सांगितले आहेत! 

पवित्र सुगंधी धुराने भरून आणि मंत्रोच्चाराने भारून गेलेलं ते वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं, की चपखल वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. अतिशय विचारपूर्वक आखणी केलेला हा कार्यक्रम इतका हृद्य झाला की निघताना सर्व शिक्षिका, गुरुजी व ताई यांना नमस्कार करायला मुलांना सांगावं लागलेच नाही.

बाहेर सर्वत्र पाश्चात्य संस्कृतीचं अतिशय जास्त आक्रमण आपल्या प्रत्येक गोष्टीवर होत असताना, शाळांमधून सुद्धा कितीतरी गोष्टी अश्या घडताना आढळतात. त्यावेळी विद्याभारतीचे वेगळेपण डोळ्यात भरल्याशिवाय राहत नाही.

 आम्हाला तर अगदी जणू मुलांची मुंज झाल्यावर वाटावे तितके समाधान वाटले. आता मुलं मोठी होतायत ह्याची एक न सांगता येणारी हुरहूर, आणि नवीन नवीन अनुभव त्यांच्या भावविश्वाला समृद्ध करतील ह्यासाठी शाळा प्रयत्न करत आहे ह्याचं मन भरून समाधान घेऊन घरी निघालो!



 (विशेष टीप- 'हा कार्यक्रम म्हणजे मुंजीला पर्याय' असं कुठेही मी म्हटलेलं नाही- याची संस्कृती रक्षकांनी नोंद घ्यावी)

आणि शेवटी अतिमहत्वाचे- आता आमच्या मुलांचा हा कार्यक्रम शाळेने केला- म्हणजे अगदी सगळीच मुलं डॉक्टर इंजिनियर होणार नाहीयेत. हे आम्हालाही माहिती आहे. मुलं आमच्याइतपत जेमतेम शिकून आमच्या इतपत साधे उद्योजक किंवा शेतकरीसुद्धा होतील, त्यामुळे, "हंss इतके सोहोळे करून हेच का दिवे लावले, असे अजून 25 वर्षांनी तारे तोडणाऱ्यांना आधीच नमस्कार!😁 
(कारण-  10 महिन्याच्या लेकराला एका जागी बसवून जेवण भरवायला सोपं जावं म्हणून चित्रांची पुस्तकं दाखवायला घेतली असताना- "अग काय हे, आत्तापासून अभ्यासाची कटकट करतेस!!!" हे ऐकलेलं आहे मी)