02 September, 2018

सुंदर बोअर श्रावण आला⛅️⛈️🌦️☔️🌈🤽

पावसाळा व त्यातल्यात्यात श्रावण हा सगळ्या कवी लोकांचा, भाविक लोकांचा, उत्सवप्रिय लोकांचा, भटकंतीप्रिय लोकांचा, आणि नुसताच पाऊस आवडणाऱ्यालोकांचा आवडीचा काळ..

वरील वर्गवारीत कवी आणि भाविक नसले तरी भटके आणि नुसताच पाऊस आवडणारे असल्यामुळे अस्मादिकांस गेल्या वर्षीपर्यंत पाऊस व श्रावण परमप्रियच होते..

तुफान पावसात हेडलाईट सुरू ठेवून भिजत भिजत गाडी चालवत उंडारणे..
तुडुंब भरलेल्या तळ्यात मनसोक्त पोहोणे...
एकदा भिजलेली जीन्स वाळायला किती आठवडे लागतील ह्याची पर्वा न करता- रेनकोटचा फक्त कोट जीन्सवर घालून सायकल दामटवणे...
धुव्वाधार पावसात एकामागून एक चहा पिणे, चिखल तुडवत कंपोंडात(आमच्या आंब्याच्या बागेत) फिरणे... ढोपरभर चिखलात भात लावायला जाणे...
नदीला हौर आला की भिजत भिजत पाणी बघायला जाणे...
रात्रीच्या वेळी पत्र्यावर ताड ताड वाजणारा पावसाचा ताशा ऐकत पुस्तक वाचण्यात गढून जाऊन पहाटे ते पुस्तक संपवूनच झोपणे...
ताया, वहिन्या, मैत्रिणी यांच्या मंगळागौरीत फक्त धटिंगण खेळांचा का होईना पण धुडगूस घालणे... आणि गोपाळकाल्याला त्या ढाकुमाकूम ढाकुमाकूम आवाजाने नादावून जाणे....

असा अगदी मस्त फकिरी पावसाळा होता गेल्या वर्षीपर्यंत... पण यंदा अबीरबाबूचे आगमन काय झाले आणि पाऊस अगदी नकोसा वाटायला लागला. 50 लंगोटांची चळत घड्या करून कपाटात ठेवली तरी एक क्षण असा यावा की एकही सुख्खा लंगोट उपलब्ध नाही.. मग इस्त्री करा... ह्याच्यात 50%पावसाळा संपला आणि श्रावण आल्यावर जरा जरासं उन्ह दिसू लागल्यावर किंचित हायसं वाटलं. उन्ह आलं म्हणून जरा कुठे कपड्यांचा स्टँड उन्हात सरकवावा तोच आला पाऊस सणसण करत!
जल्लामेला तो काय तो " क्षणात येते सरसर शिरवे.."

"च्यायला त्या पावसाच्या" असं म्हणत धावत जाऊन स्टँड पागोळीच्या आत ओढला, तर नवरा म्हणायला लागला, "च्यायला काय त्यात? पावसाळ्यात पाऊस तर येणारच.. तू आणि काकू (म्हणजे माझी चुलत सासू) नॉर्वेला जा बघू राहायला.. मनसोक्त कपडे वाळवा, वाळवण सुद्धा करा हवं तरी!"😂

अबीरला घेऊन फिरायला जावे तरीही वेळीअवेळी येणारा पाऊस आता पूर्वीसारखा एन्जॉय करता येत नाही हे लक्षात आलं.. अशीच आमची मंगळागौर पण यंदा पावसाने त्रस्त असल्यामुळे कुणी बोलावलं तरीही तेव्हा पाऊस किती असेल? त्या दिवशी अबीर किती वाजता उठेल? त्याचा मूड कसा असेल? असे प्रश्न पडायला लागलेत..

त्यामुळे आज घरातल्या घरात मंगळागौर पूजा 10 मिनिटात- ट्रॅकपॅन्ट व विटका टीशर्ट घालून साग्रसंगीत पार पडली😂 माझ्या ट्रॅकपॅन्टला सासूबाई म्हणाल्या, " छानच आहे तुझी ही कोमोफ्लाज डिझाईनची साडी😜😜😜.. आणि आमची देवी पण बघा कशी मॉडर्न झाली आहे.. उगाच भारंभार फुलांचा पसारा नाही. एकच जास्वंदीचं फुल आणि एकच बेलाचं पान. डिसेंट एकदम😂😂😂😃😃😃"

एकदम मला पूर्वीच्या बायकांची सर्वार्थाने कमालच वाटायला लागली. एकतर त्यांना भरपूर मुलं. वीज नाही, वीज आल्यावर सुद्धा वॉशिंग मशीन नाही- एवढया पोरांचे कपडे हाताने धुवा, पिळा, तव्यावर वगैरे वाळवा... चारीठाव स्वयंपाक करा, लोकांना वाढा, आवराआवर करा, भरीला सगळे सणवार, व्रतवैकल्ये करा, उपास करा, आणि हे सगळं करून वर बालसंगोपन करा. हे सगळं करताना सासुरवास असणं हे तसं सामान्यच असेल, साडीशिवाय दुसऱ्या पोशाखाचा पर्याय उपलब्ध नसेल आणि त्याकाळचे बाबालोक तान्ह्या बाळाच्या संगोपनात काय मदत करत असतील हा एक वेगळाच विषय....

तरीही त्या सगळे सणवार भयंकर उत्साहाने करत होत्या.. किंवा उत्साहाने करतोय असं दाखवत होत्या,  किंवा कदाचित त्याकाळी व्रतवैकल्ये ही बाळांच्या लसीकरणाईतकी आत्यावश्यक मानत असतील... कितीही पाऊस असला तरी ठराविक महिन्यात करायचीच असतात अशी...  किंवा त्याकाळी पोरांच्या मूडला विशेष महत्व देत नसतील.. किंवा दर दोन वर्षांनी पुन्हापुन्हा नवीन पोर होणारच तर मग किती वर्षं   त्यातच जात असतील आणि मग त्यातलं नावीन्य स्वारस्य वगैरे काय म्हणतात ते उरतच नसेल😓

काय असेल ते असो.. पुढच्या पावसाळ्यात मी माझ्या सगळ्या वेड्या हौसा- भिजणे, सायकल चालवणे, पोहोणे, पुस्तकं वाचणे वगैरे वगैरे सगळं पूर्वीसारखच करत राहणारे. नवरा आणि मुलगा बरोबर आले, तर त्यांना घेऊन नाहीतर त्यांना टुकटुक करून!😜😜😜

©ऐश्वर्या पेंडसे-जोशी