झालं असं, नुकत्याच अनुभवलेल्या- उपभोगलेल्या आजोळच्या रहिवासाचा अंमल अबीरच्या मनावर अजून कायम आहे.मुर्डीला- अर्णव आणि अबीरने "आबा! एक काम होतं! एक गोष्ट सांगता?" असं विचारून शिवचरित्राचा रतीब रात्रंदिवस लावून घेतलेला. त्यात भर म्हणजे एक दिवस मामाने "शेरशिवराज" सिनेमा बघायला लावून दिला. इतके दिवस आबांच्या कथाकथनातून आणि "दुन्दूभी निनादल्या" ह्या पद्यातून ऐकलेला अफजलखान प्रत्यक्षात बघायला मिळाला😃
एरवी बेडक्या, चिचुंद्रया, पाली ह्यांना मारू नका असे म्हणणारी मोठी माणसं अफजलखानाच्या बाबतीत एवढं दयाळू धोरण ठेवून नाहीत हे पोरांनी ओळखलं. मग जसं शाळा शाळा खेळूया, दुकानदुकान खेळूया असं चालतं, त्यात युद्ध युद्ध खेळूया अशी भर पडली🤦🏼♀️ पण शाळा शाळा खेळताना कसं- एकजण गुरुजी, बाकीचे विद्यार्थी, तसं युद्ध युद्ध खेळात अफजलखान व्हायला कुणी तयार नाही😃
मग मुंबईची प्राचीआजी आलेली, तर स्पंदनबरोबरच तिलापण खेळायला घेतलं गेलं, मग प्राची आजी अफजलखान.. आणि पोरांनी - महाराज, जिवा महाला, आणि सय्यद बंडा अश्या भूमिका वाटून घेतल्या.. कोथळा काढला जाऊन "दगा दगा" ओरडत मरण्याचं नाटक वगैरे तिच्याकडून व्यवस्थित करून घेतलीन पोरांनी🤣
मग आम्ही पंचनदीला आलो. आता एकट्याने युद्ध युद्ध खेळायचा कार्यक्रम सुरू झाला. पडवीतून वर चढण्याच्या तीन पायऱ्या हा प्रतापगड, त्याच्या पायथ्याशी युद्ध😃 त्यात घरातील अर्धीअधिक उश्या- पांघरुणे गनीम म्हणून धारातीर्थी पाडून झाली. हातात लाकडी पट्टी घेऊन तलवारीसारखी फिरवत उड्या मारणं सुरू होतं.
इकडे मी माझ्याच व्यापात- संध्याकाळी डास येतात म्हणून धुरी करायला जमिनीवर बसले होते, तर तलवार फिरवत येऊन हा मावळा पाठीत धडकला.
"अरेss.. काय चाललंय? मी विस्तवाशी काम करत्येय ना? मला भाजायला व्हावं असं वाटतंय का तुला?" असा आरडाओरडा मी केला.
मग मावळा माझ्या बडबडीकडे सपशेल दुर्लक्ष करून जरा पुढे सरकून लढण्यात मग्न झाला. एकीकडे अफजलखान, फाजलखान, नेताजी, पंताजीकाका अश्या हाकाट्या सुरूच होत्या.
थोड्या वेळाने बाबा घरी आल्यावर बाबाला इतिहासातील नवीन ज्ञान देण्यात आलं- "तुला सांगतो, अफजलखान आंघोळीचं पाणी तापवायला विस्तव पेटवत होता, तिथे जाऊन आमच्या महाराजांनी त्याचा कोथळा काढला"
🤣🤣🤣🤦🏼♀️🤦🏼♀️🤦🏼♀️
©ऐश्वर्या पेंडसे जोशी