30 December, 2015

"अग्निहोत्र"च्या आठवणी!

(दोन वर्षांपूर्वी, 2013 संपताना- स्टार प्रवाहवर अग्निहोत्र सिरीयल दुसऱ्यांदा दाखवायला लागले होते,,दुपारची 2ची वेळ गैरसोयीची होती पण तरी वेळात वेळ काढून बघितल्याशिवाय राहवत नव्हतं! त्यावेळी पहिल्यांदा अग्निहोत्र लागायचं तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या आणि फेसबुकवर पोस्ट लिहिली होती, त्या rerun ला पण आता दोन वर्ष झाली, तरी अजून अग्निहोत्र आठवणीत आहे! दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या आठवणींची हि आठवण!)

30-12-2013
स्टार प्रवाह वर पुन्हा एकदा अग्निहोत्र सिरीयल सुरु झाली आहे. ‘कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ..’ असे टायटल सॉंग परत एकदा दिसले आणि मन झर्रकन ४-५ वर्षापूर्वीच्या काळात जाऊन पोचले. रटाळ टी व्ही सिरीयलच्या जंजाळात आवर्जून बघावी अशी हि एकमेव होती.
तेव्हा होस्टेलमध्ये राहत असल्यामुळे सगळे एपिसोड बघता आले नाहीत, पण अमृताकडे राहायला गेल्यावर हमखास बघणं व्हायचं. त्यात परीक्षा सुरु असेल तर आम्ही दिवसभर हातात वही घेऊन चिक्कार गप्पा मारलेल्या असायच्या, आणि मग मात्र अधिकृतपणे अभ्यास बाजूला ठेऊन सिरीयल बघायची म्हणजे अपराधी वाटायचं. मग नेमका त्या वेळेत अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आल्यावर जेवता जेवता बघायचो. तेही जमल नसेल, तर अपूर्वा म्हणायची “काल अग्निहोत्र कसल भारी होत माहित्येय,,(रोजच भारीच होतं म्हणा!) तुम्ही उगाच मिस केलत..” आणि मग स्टोरी सांगायची.. (त्यात अगदी डायलॉग,बॅकग्राउंड म्युझिक आणि सगळ्या पात्रांच्या हावभाव आणि कपड्यांपर्यंत तपशील आम्हाला कळायला हवे असायचे!😉)

रोजच्या जगण्यात एखादा माणूस अत्यंत पाताळयंत्री आहे असं म्हणायचं असेल तर “तनाने काळा मनाने काळा” असं म्हणणे, कुणाला फोन न वाजताच वाजल्यासारखा वाटला तर “भासेस” होतायत तुला असं म्हणणे असल्या सवयी लागल्या होत्या. एवढच कशाला, गावोगावी असलेल्या नातेवाईकांना आवर्जून शोधायची, भेटायची जुनी सवय असल्यामुळे माझ्या बाबांना ‘आमच्या कुटुंबातला हा निळ्या आहे’ असा किताब घरातल्या आज्यांकडून मिळायला लागला!

नील, वैदू, सई, मंदिरा, अभिमन्यू, मंजुळा, उमा बंड, सगळे लोक जाम भारी वाटायचे. महादेव काका तर सगळ्यात बेस्ट. त्याच्या त्या भाडेकरू बाई आणि त्यांचा पोरगा, ‘तनाने काळा, मनाने काळा’ कृष्णा, बाप्पा आणि त्याची बायको, सगळे एकाहून एक नग होते.
रोज काय घडतंय ह्याची उत्सुकता असायची. फक्त चित्रपटात घडू शकतात अश्याच घटना, पण संवाद आणि वातावरण ह्यामुळे सगळ काही अगदी तुमच्या आमच्या घरातलं वाटायचं.

खर तर, दोन मैत्रिणींची नातवंड ओळख देख नसताना भेटणं आणि त्यांच्या दोघांच्या बाबांचं आपसात हाडवैर, परागंदा होऊन सिनेमात काम करायला गेलेला काका, नाचणाऱ्या बायकांच्यात लहानाची मोठी झालेली चुलत बहिण, नक्षलवाद्याबरोबर राहणारी आत्या हे असलं काहीही तुमच्या आमच्या घरात घडत नसत.

पण वर्षानुवर्ष वाड्यात राहून सगळ्या इतिहासाचा सक्षिदार झालेला महादेव काका, सगळ्या कुटुंबियांना एकत्र आणण्यासाठी आणि गणपतींचा शोध लावण्यासाठी धडपड करणारा निळ्या, शून्यातून विश्व उभं केलेले चिंतामणी आणि सदानंदराव, तुमच्या आमच्या आयांसारख्या सोज्वळ मृणाल आणि रोहिणी सगळे एकदम वास्तवातले वाटायचे. प्रभा आणि लक्ष्मीची मैत्री पण सॉलिड आणि त्या काळात त्यांना सपोर्ट करणारे आप्पा तर ग्रेट!

पूर्वजांच्या इतिहासाच्या मुळापर्यंत जाण्याची कोकणस्थी हौस(खाज खरं तर😉) आणि त्याच वेळी काळाच्या पुढचे विचार, बंडखोरपणा, व्यवहारी- काटकोनी- सणकीपणा आणि कोकण सोडून कितीही पिढ्या गेल्या तरी जीन्समधून वहात आलेली ध्येयवेडी वृत्ती हे सगळे गुणविशेष सर्वदूर आहेच पण ते मालिकेत बघणं खूपच मोहक, भुरळ घालणारं होतं! आप्पांसारखे द्रष्टे, धीरोदात्त कुटुंबप्रमुख, मोरूकाकासारखा आधारवड आणि धर्मा गुरवांसारखा हितचिंतक प्रत्येकाच्या घराला असावा...

शेवट गोड झाला- सगळ्या भावंडांचा शोध लागला, सगळ्यांची गोडी झाली, दिनेशचा राग निवळल्यामुळे नील-सई, अभि-मंदिराचं मार्गी लागलं हे एक खूप छान झालं.

डे1 पासून अदृश्य असूनही, प्रत्येक एपिसोडमध्ये सतत दिसत राहिलेले दिग्दर्शक सतीश राजवाडे इन्सपेक्टर दुष्यंत बनून दिसले तेव्हा म्हणजे... विक्रांत भोसलेच्या अचानक एक्झिटमुळे झालेल्या आमच्या निराशेवर उतारा झाला होता...  फक्त,, फक्त शेवटी मोरू काकाचा आशीर्वाद घ्यायला, उमा बंडबरोबर अग्निहोत्रींचा भाचेजावई म्हणून दुष्यंत वाड्यावर असला असता तर खूपच जास्त आवडलं असतं!

12 December, 2015

किती टाकू?

एक जुनीपुराणी वयस्कर एक्टिवा, काळ्या रंगाची की जेणेकरून मळलेली पटकन कळायची नाही.. घर वापराचे सामान, भाजी अश्या बऱ्याच पिशव्या अड़कवलेली.गॉगल डायरी वॉलेट पेन मोबाईल फायली कागदपत्रे ह्या आणि अश्या असंख्य प्रकारच्या उपयुक्त आणि कामाच्या वस्तुनी ठासुन भरलेली एक सॅक अंगावर वागवणारी.

एक ब्रॅन्डन्यू करकरीत शाइन. कसकसले असंख्य भडक रंगीत स्टिकर चिकटवुन अजुनच लक्षवेधी करायचा प्रयत्न केलेली. नंबर प्लेटीवर नंबरातुन काहीतरी दादागिरी टाइप अक्षरे चितारलेली. फॅन्सी सिटकव्हर, फॅशनेबल आरसे, असा सगळा थाट केलेली.

दोन्ही गाड्या एकाच रस्त्याने एकाच दिशेला निघालेल्या.. काम संपवून आपापल्या घरी जायची संध्याकाळची वेळ. करकरीत तिन्हीसांजा.. कामाच्या शहरापासून राहायच्या गावाकडे जाणारा रस्ता,,अक्टिवाच्या डोक्यात घाई लवकर घरी पोचायची. शाइनच्या डोक्यात गती धूम सारखी शायनिंग मारायची.

शाइन एक्टिवाच्या खुप पुढे जाते. आणि शाइनच्या लक्ष्यात येतं एक्टिवा मागे राहिल्याचं. एक्टिवाच्या मात्र वशिवर्गी सुद्धा नाही त्या शाइनचं अस्तित्व. मग शाइनचा वेग कमी होतो. तिला एक्टिवा गाठते. शाइन एक्टिवाला पुढे जाऊन देते. काही वेळाने सुसाट वेगाने येऊन शाइन एक्टिवाला ओव्हरटेक करुन पुढे जाते. पुन्हा  एक्टिवा मागे पड़ते. पुन्हा शाइनचा वेग कमी होतो. पुन्हा एक्टिवा शाइनला ओव्हरटेक करते.

आता शाइनचं अस्तित्व एक्टिवाने मनात नोंद केलं आहे. पण एक्टिवा आपल्या ठरलेल्या वेगाने पुढे जात राहिली आहे. आणि शाइनचा हाच उद्योग सुरु -पुढे जाण्याचा.. मागे पडण्याचा..

एका वळणावर शाइन सुसाट पुढे जाते. आणि मग एक्टिवा मागून येईल म्हणून स्लो होते. कितीतरी वेळ झाला तरी एक्टिवा मागून येत नाही म्हणून शाइन यू टर्न घेऊन वळून मागे येते. थोड्याच् अंतरावर समोरून ती एक्टिवा येते. तिच्या मागच्या सिटवर आता दोन दप्तरे आणि त्या दप्तरांचे दोन मालक बसलेत. शाइन पुन्हा यू टर्न घेते आणि पुन्हा पकडापकडीचा मुर्खपणाचा खेळ सुरु होतो.

आता एक्टिवा पुढे आहे. चिंचोळया रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घनदाट वस्तीत वहानं खोळंबलेली. वस्तीतले लोक उत्साहाने कसलीतरी मिरवणूक नाचवतायत. मागून आलेली शाइन नेमकी अक्टिवाच्या शेजारी उभी रहाते. एक्टिवाची चिड़चिड उशीर होतोय म्हणून.. शाइनचं शायनिंग मारणं त्या वहातुक कोंडीत पण सुरूच. इंच इंच लढवत एकेक वाहन रस्ता मिळवत मार्गस्थ होताय.

तेवढ्यात एक्टिवाने कुणालातरी फोनवरून "प्लीज कुकर लावायची" सूचना केली आहे. शाइनची कुणालातरी फोन लावून रात्री अमुकअमुक बिच रिसॉर्टला "बसुया का?" म्हणून चौकशी चालल्ये.

तेवढ्यात गर्दी मोकळी होते. एक्टिवा पुढे जाते. शाइन भूम भूम आवाज करत अक्टिवाला गाठते. दोन्ही गाड्या पेट्रोल पंपात येतात.
एक्टिवाला पंपावरचा माणूस विचारतो "किती टाकू?" उत्तर मिळतं-"फुल्ल करा दादा."
पेट्रोल भरून, पैसे देऊन, होइस्तो शाइनच्या टाकीचं झाकण उघडून झालय. पंपवाला विचारतोय "किती टाकू?"
उत्तर मिळताय-"50 चं टाक रे!"

02 December, 2015

सोमनाथाचं मंदीर आणि सड्यावरची रहाटी

सोमनाथाच मंदिर. अत्यंत ऐश्वर्यसंपन्न श्रीमंत देवस्थान. किती संपन्न? गझनीच्या महंमदाने १७ वेळा लुटून नेलं तरीही रिकामं न झालेलं. एक तर त्यात मुळचा खजिनाच तितका प्रचंड असणार, किंवा दोन लुटीच्या मधल्या काळात तो खजिना परत नव्याने भरत असणार. शब्दशः सुवर्णभूमी होता आपला देश त्या काळातली ती गोष्ट, पण महत्वाचा मुद्दा हा, कि १७ वेळा लुटलं जाऊन पण तो खजिना पुन्हा पुन्हा भरायची क्षमता असणाऱ्या त्या भक्तांना, त्या महंमदाला धडा शिकवायची इच्छा का नाही झाली?
हि गोष्ट आत्ता आठवायचं कारण म्हणजे सड्यावरची रहाटी.. रहाटी म्हणजे ना ना तऱ्हेची झाडं झुडूप वृक्ष वेली ह्याचं एकत्र नांदणार साम्राज्य. सोमनाथाच्या मंदिरा सारखंच ऐश्वर्यसंपन्न आणि श्रीमंत. अर्थात निसर्ग-संपन्न!
ह्या सड्यावरच्या रहाटीशी तसा आमचा काडीचाही संबंध नव्हता- नाही, अगदी आत्ता काही वर्षापूर्वी ह्या राहाटी मध्ये पाउल टाकायला दिवसा ढवळ्या भीती वाटावी इतकं घनदाट रान होतं. गीतरामायणातले भिल्लातक फलभारे लवले,, ना कधी त्यांना मानव शिवले,, ना कुठे लतांची सैल मिठी.. ह्या काव्याचे प्रत्यक्षातले दर्शन.. पावसाळ्यात त्यात भर म्हणून पाण्याचा घोंगावणारा प्रवाह. वर उभं राहून बघितलं तर खाली खोलवर पसरलेलं निसर्गच रौद्र-भीषण पण नितांत सुंदर रूप डोळ्यात न मावणारं. धो धो पावसात.. म्हातारा पाऊस पडतो त्यावेळेला त्या पर्ह्याचा आवाज आणि पाण्याच्या धारांनी तुषारांनी धुरकट झालेला आसमंत बघून सगळेजण म्हणायचे, “म्हातारा चिलीम ओढतोय खाली, त्याचा हा धूर..”
ह्या राहाटीचे मालक कित्येक वर्षापूर्वी गाव सोडून मुंबईला स्थायिक झालेले. त्यांना ना त्या राहाटीबद्दल जिव्हाळा, ना त्यात लक्ष घालून ते राखण्याचा उरक. साहजिकच, राहाटीतले आंबे, कोकम, सुखलेल्या फांद्या,कुटक्या ह्या चोरापोरीच जाण्यासाठी जन्माला येत होत्या. पण अनंतहस्ते देण्याचं निसर्गाचं काम सुरूच होत. त्याच्या आधाराने वांदर,कोल्हे,ससे,रानडुक्कर,बाउळ,मोर, आणि कित्येक प्रकारचे पक्षी सुखेनैव राहत होते.
आणि मध्येच कधीतरी ते परचक्र आलं. जमिनींना सोन्याचे भाव आलेले बघून भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. राहटी च्या मालकांनी रहाटी विकायचा निर्णय घेतला, पण पहिल्यांदा काय केल तर जमीन विकण्यापूर्वी त्याच्यावरची सगळी झाडं एका लाकूडतोड्याला विकली. त्याने इमाने इतबारे आपलं काम सुरु केलं, तेव्हा लौकिकार्थाने काहीही संबंध नसलेल्या आमच्या सारख्या स्थानिकांच्या मनाचा एक कोपरा दुखावला, पण उपयोग काय?
रहाटी साफ भुंडी करून झाल्यावर जमीन मालकांनी जमिनीसाठी गिऱ्हाईक शोधायला सुरुवात केली. ते काही लवकर मिळालं नाही, आणि त्यात पावसाचे चार महिने निघून गेले. नवरात्राचे दिवस संपले, तोपर्यंत निसर्गाने हे सोमनाथाच मंदिर पुन्हा भरून टाकलेलं होतं. रहाटी पुनश्च हिरवीगार झाली, तरी तिचा पहिला रुबाब परत यायला अजून काही पावसाळे जायला हवेत.
पण ह्या वर्षीचा पावसाळा बघायचं काही रहाटीच्या नशिबात नव्हतच. आता बारीकसारीक लुटपाट नाही, हा गझनीचा महम्मद. ल्यांड डेव्हलपर, इस्टेट एजंट, अश्या नावाने वावरणारा गझनीचा महम्मद. आता झाडं तोडली नाहीत,तर जेसीबीने उपटून टाकली. जिथे जेसीबी जाऊ शकत नव्हता तिथे उभ्या जिवंत जंगलाला आग लाऊन टाकली. पर्ह्या पर्यंत उतरत गेलेल्या उताराचे सपाटीकरण करून झाले. आता ४-५ गुंठे आकाराचे लंगोटी एवढाले प्लॉट पडून त्यात बंगले बांधायला घेतायत. त्यात हाय फाय लोक राहणार त्यान एसी तर हवेच. त्यांच्या आलिशान गाड्यांना डांबराचे रस्ते हवेत. आणि तोंड वरती करून ह्याला डेव्हलपमेंट म्हणायला मोकळे. आता सोमनाथाच हे मंदिर परत भरेल का? आणि कधी? का त्याच्या आधीच निसर्ग आपला हिसका दाखवणार?
जुनी लोकं म्हणतात, तुमच्याकडे नीट नेटक आवरलेल घर आहे, त्यात टीव्ही, फ्रीज, एसी, गाडी, किंवा तत्सम सगळं काही आहे, तर ती झाली संपत्ती.
पण तुमच्याकडे गुरं आहेत, पडवीत सुपारीची पोती आहेत, अंगण भरून कडधान्यांच्या राशी वाळत आहेत, मळणी काढून झाल्यावर लावलेली पेंढ्याची उडवी आहे. निसलेल्या नारळांच्या चोडांचा ढीग झालाय, आमसूल,साठ वाळतायत, आंबे फणसाचा तैगार आहे, आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्यात प्रत्येक पिढीचे लोक दोन्ही हातानी राबतायत. तर हे ऐश्वर्य आहे.
ह्यात फरक असा कि तुमच्याकडे पैसे असतील तर, किंवा नसल्यास कर्ज काढून- संपत्ती एका दिवसात निर्माण होऊ शकते. ऐश्वर्य हे फक्त पैशांनी बनत नाही, आणि पैसे असतील तरी एका दिवसात बनत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष काही वेळेला पिढ्यांपिढ्या खर्ची पडलेल्या असतात.

सड्यावरच्या रहाटीचं ऐश्वर्य, संपत्तीमध्ये रुपांतरीत होतं आहे.. चहुबाजूला सुरु झालेले संपदेचे थेर बघून सड्यावरच्या रहाटीचे माहेर जळत आहे.

27 November, 2015

मुंबई-पुणे-मुंबई-1-2-3

मुंबई पुणे मुंबई- माझ्या अत्यंत आवडीचा पिक्चर! 2010 च्या दरम्यान हा सिनेमा आला तेव्हा "थिएटरला सिनेमा बघणे" हे आमच्यासाठी खुप दुर्मिळ होतं. कारण आमच्या गावाच्या आसपास तेव्हा सिनेमागृह नव्हतं. आताही आमच्यासाठी सर्वात जवळचं थिएटर 50 किमीवर आहे. पण तेव्हा तर तेही नव्हतं.
तर हा पहिला mpm आम्ही खुप उशिरा dvd वर बघितला, आणि आमच्या घरातले सग्गळे जण अक्षरशः ह्या सिनेमाच्या प्रेमात पडलो. ह्या सिनेमातले डायलॉग येता जाता विविध संदर्भात बोलले जाऊ लागले, "अभिमान हवा" "संस्कार आहेत हां" "हिरवळ" असं येताजाता बोलून मनमुराद हसू येत राहिलं. त्यातली गाणी आमच्या मोबाईलचा आणि गुणगुणण्याचा अविभाज्य भाग झाली. एवढंच कशाला आमच्या खेड़ेगावातल्या, जुन्या वळणाच्या -पारंपारिक घराघरांत ह्या सिनेमाने एक मोठ्ठा बदल घडवला.. एखादं 'स्थळ' सांगून आलं आणि त्यात कितपत अर्थ आहे अशी साशंकता असेल तेव्हा, पारंपारिक 'बघणे-दाखवणे-कांदेपोहे' कार्यक्रमावर पुढच्या पिढीने नाराजी दर्शवली, की चक्क मोठ्या पिढीचे लोक म्हणू लागले- "जा नाहीतर, त्या मुक्ता बर्वे सारखी तू एकटीच जाऊन भेटून ये त्या मुलाला, तुला पटलं तर मग बघू पुढे!" (अर्थात,, त्याचा शेवट ह्या सिनेमासारखाच- "आईशी बोलून मग काय ते सांगते!" -ह्या एटिट्यूडने होणं हेच त्यांना अपेक्षित!!)
टीव्हीवर हा सिनेमा जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा तो बघावासा वाटतोच आणि मी बघतेच्! कितीही कामाचे ताणतणाव असोत, mpm बघता बघता खळखळून हसू येतंच येतं. सतीश राजवाडेंनी एका मुलाखतीत “A film should have the ability to spread happiness” असं सांगितल्याच वाचलंय. ते त्यांनी अक्षरशः खरं करुन दाखवलंय!! ह्या सिनेमात ठाई ठाई भरलेला आनंद, गंमत, निखळ हास्य - हे सगळं बघता बघता आपल्या डोळ्यात,कानात, मनात, झिरपत जातं,, प्रत्येकवेळी बघताना तितक्याच् उत्कटपणे!
प्रत्येकवेळी पिक्चर संपताना वाटायचं की ही गोष्ट पुढे अजुन दाखवायला हवी होती. आणि अगदी मनातली इच्छा पूर्ण व्हावी तसा ह्या सिनेमाचा दुसरा भाग खरोखरच आला!!
ह्या दरम्यान सतीश राजवाडेंचे अजुन पण सिनेमे, मालिका बघुन झाल्या. मालिका मी यूटयूब वर बघितल्या, अजुनही बघते. (कारण सध्या टीव्हीवर एकही बघण्यासारखी सीरियल नाही.) असंभव, अग्निहोत्र, गुंतता ह्रदय हे, ए.ल.दु.गो.- हे सगळं अगदी मनात घर करून राहिलं. "प्रेमाची गोष्ट" हा सिनेमा तर मी असंख्य वेळा बघते. त्यात "गोष्ट बनते कशी" हे इतकं सुंदर दाखवलंय, की मी जे काही अधूनमधून लेखन करत असते, त्यासाठी हा सिनेमा बघणं हा एक आनंददायक अभ्यास असतो! थोडक्यात mpm ते mpm2 ह्या काळात सतीश राजवाडे ह्या माणसाचा मी मनःपूर्वक पंखा झालेले होते!
अर्थात.. mpm2 हा रिलीज झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात मुद्दाम चिपळूणला जाऊन थिएटरमध्ये बघितला. पहिल्या mpm इतकाच् हा mpm2 पण आवडला हे वेगळं सांगायला नकोच.
पहिल्या भागाच्या पुढे गोष्ट सरकणार, म्हणजे अर्थातच ह्या दोघांचं लग्न, पोस्टर पण तशीच दिसत होती. कितीतरी सासु-सुन सीरियल मध्ये किंवा अनेक सिनेमांमध्ये जे अगदी तपशीलवारपणे कंटाळा येईल इतके लग्नाचे विधि दाखवतात. ते इथे चक्क सिनेमा संपून आपण घरी जायला उठतो तेव्हा दाखवले, आणि आधी संपूर्ण वेळ अनिश्चिततेचे ट्विस्ट!! अर्थात "सतीश राजवाडे आणि सरधोपट गोष्ट" असं होणार नाहीच हे गृहीत होतं! पण तरीही ती गोष्ट अगदी आपलीच, आपल्यातल्याच कोणाची तरी, वाटत राहिली. "प्रेमाची गोष्ट" मध्ये उल्लेख झालेले "चांगल्या गोष्टीचे" सग्गळे निकष इथे एकवटलेले होते.
गोष्ट म्हटलं तर साधी सोपी, असं सगळं तुमच्या आमच्या बाबतीत सहज घडू शकतं.. पण ती बघतानाचा थरार आपली उत्कण्ठा वाढवत नेतो. त्याच वेळी "हे असं आपल्या बाबतीत घडलं तर किती छान होईल" हे फिलिंग आपली पाठ सोडत नाही. प्रत्येकजण जेन्युइन वाटतो, कुणी टोकाचे त्यागमूर्ति आणि कुणी टोकाचे दुष्ट असं नाही..
आई-मुलीचे भावनिक करून टाकणारे संवाद, बहिणींची दंगामस्ती, मावशीचा सपोर्ट, गौरीच्या मनातलं कन्फ्यूजन, शेवटी सोक्षमोक्ष लावताना चिडलेला गौतम..  त्याचे समजूतदार आईबाबा आजी, प्रत्येक गोष्ट आपण आपल्याशी आणि आपल्या भोवतीच्या माणसांशी रिलेट करत राहतो,आणि त्यात गुंतत जातो. आणि सर्वात क्लासिक कळस् म्हणजे "कितीही चुकीची वागली तरी ती माझी मुलगी आहे, त्यामुळे मी प्रत्येक निर्णयात तिला सपोर्ट करणार" हा तिच्या बाबांचा डायलॉग आणि तो प्रसंग! आजवर इमोशनल सिनेमे बघताना रडारड करणाऱ्या बायकांना मी टिंगल करून हसत आले, पण हा बाप-मुलीचा प्रसंग बघताना खरोखर काही क्षण- फ़क्त काही क्षणांसाठी- स्क्रीन धूसर झाली. पण लगेचच सगळं काही all well होऊन मनात हसू झिरपायला सुरुवातही झाली!
पहिल्या भागाप्रमाणेच हा भागही टीव्ही वर लागेल तितक्यांदा बघायचा हे तर ठरलंच आता.
आणि आजच वाचलं की आता mpm 3 येतोय! तोही बघणारच, अर्थात, पण बातमी वाचून किंचित भीति पण वाटली.. आपण तर ह्या गोष्टीचे- ह्या टिमचे फॅन आहोत, पण सगळ्याच लोकांना अजुन पुढे ही गोष्ट आवडेल ना.. अर्थात "सतीश राजवाडयांची गोष्ट" ही आवडण्याला पर्याय असुच शकत नाही,, पण "अतिपरिचयात अवद्न्या" म्हणतात तसं होऊ नये. कारण mpm किंवा सतीश राजवाडयांचा कोणताच प्रकल्प फ्लॉप हे ऐकायला नक्कीच आवडणार नाही, रादर सहन होणार नाही..
अत्ताही फेसबुक किंवा प्रत्यक्षात बोलताना कोणी थोडी जरी निगेटिव्ह प्रतिक्रया दिली, किंवा ओढुनताणुन loopholes शोधायचा प्रयत्न केला, तर ते आपल्याला त्रासदायक वाटते. आपल्या ओळखीच्या काही काही लोकांना, ह्यातली काही acting ही over किंवा loud वाटते, हे ऐकून आपल्याला त्रास होतो. (कदाचित 'असंभव' मध्ये अत्यंत कमी शब्दात,अत्यंत कमी हातवारे करून,, पण डोळ्यांची किंचित हालचाल किंवा चेहऱ्यावरचे बोलके भाव ह्यातुन खुप काही बोलणाऱ्या विक्रांत भोसलेची 'शांत acting' आठवत असेल!)
पण लगेच लक्षात येतं,, की ही भीती अनाठाई आहे.. 1 आणि 2 गाजले म्हणून 3 येतोय इतकं साधं प्रकरण नसणार हे! त्यामागे नक्कीच काहीतरी मजबूत संकल्पना असणार.. आपण विचारही करू शकलो नसू अश्या शक्यता असणार.. नक्कीच काहीतरी ख़ास असणार.. कारण content is king हे तर राजवाडे सिनेमांचं बेसिक सूत्र. आणि entertainment is responsibility हे तत्व!! तेव्हा आता वाट बघुया तिसऱ्या भागाची!
पाचवर फिरणाऱ्या 'पंख्या'च्या रेग्युलेटरला 10 खटके असायला हवेत असं वाटायला लागलय आता..☺☺

14 November, 2015

दिवली


कालचा दिवाळीचा शेवटचा दिवस. संध्याकाळी काळोख होयला लागल्यावर बाहेर गडग्यावर दिवल्या नेऊन रांगेत लावुन ठेवल्या आणि तिथेच जरावेळ बसून राहिले. दिवलीच्या जळत्या ज्योतिकडे बघताबघता तंद्री लावून.

टेराकोटाच्या 6 पणत्या.. चांदणीच्या आकाराच्या.. ह्या आमच्याकडे गेली सुमारे 12-15 वर्ष तरी आहेत. तेव्हा ह्या फॅशनेबल पणत्यांचं लोण जरा जरा नुकतंच यायला लागलेलं. तोपर्यंत आमच्याकडे फक्त स्थानिक कुंभारांनी केलेल्या साध्या मातीच्या दिवल्या असायच्या. दरवर्षी 2 तरी नविन घ्यायच्याच् असं असे. अजुनही ही पद्धत आहे. त्यामुळे रोवळीभर त्या पारंपारिक दिवल्या घरात आहेत. कितीतरी प्रकारच्या नवनवीन पणत्या असल्यामुळे ह्या जुन्या दिवल्यांची वर्णी आता अंगणात गडग्यावर न लागता वाडयात, जिन्यात, विहिरीवर अशी लागते. आणि फॅशनेबल पणत्या दर्शनी भागात पुढच्या अंगणात..

खरं म्हणजे ह्या रंगीत चमकीवाल्या पणत्यांमध्ये गोडंतेल घालत असणार लोक.. पण खायची वस्तू जळायला वापरायची म्हणजे कोकणस्थी बाणा आड़ येतोच. शिवाय "कडुतेलाच्या दिवल्या हवा शुद्ध करतात" हे ऐकीव नॉलेज आहेच! कडुतेल वर्षानुवर्ष वापरत आलोय तेच बरं! पण त्यामुळे ह्या देखण्या पणत्या काळ्या होतात, कायमच्या. जुन्या दिवल्या कश्या, काळ्या होतातच.. मग एक घमेलंभर शेणखळा करून त्यात भिजत घातल्या की झाल्या पूर्ववत्..

उगीच मनात आलं, सालं ह्या कडुतेलानी काळ्या झालेल्या आधुनिक पणत्यांसारखं झालंय आपलं! जग बदलत चाललाय तसे आपण पण  बाह्यतः बदलतोय- पण कडुतेलाची काहीकाही काळी पुटं आपल्याला सोडत नाहीयेत आणि आपल्याला ती सुटावी असं वाटत पण नाहीये.

म्हणजे इथल्या अनेक परंपरा टोकाला जाउन जपणाऱ्याना आम्ही फुकट जाण्याइतके वहावलेले वाटतोय,, आणि आत्याधुनिक शहरी लोकांना आम्ही परकोटीचे मागास वाटतोय..
आंघोळ न करता पोळ्या केल्या म्हणून पण आम्ही फुकट गेलोय,,, आणि अभक्ष्यभक्षण - अपेयपान नाही म्हणून बॅकवर्ड पण ठरवले जातोय!..
साध्या बोलण्यात एखाद्याचा केलेला " माझा मित्र" असा उल्लेख ऐकून लोक आम्हाला अगोचर ठरवून टाकतायत,,, आणि पहिल्यांदा ओळख करुन दिली जात असलेल्या मुलाला शेकहॅंड न करता नमस्कार म्हणाल्याबद्दल लोक आम्हाला मॅनरलेस ठरवून टाकतायत!
आधुनिक पणती गोडयातेलाचीच आणि मातीची दिवाली कडुतेलाचीच असायला हवी असं घट्ट समीकरण! टेराकोटाच्या पणतीत कडुतेल हे काय पटत नाही कोणाला!

जाउंदे.. शेवटी काय दिवली मुख्यतः उजेड पाडण्यासाठी असते, एकंदरीत "उजेड पाडणे" हे खुपच कठीण काम.. तेव्हा जास्त विचार न करता यथाशक्ति उजेड पाडायला जमला तरी चिक्कार झालं..
नाहीतरी कुणी तरी थोरमोठ्यांनी व्हॉट्सऍपवर म्हणून ठेवलंच आहे की, "लोक काय म्हणतील ह्याचा विचार पण आपणच केला तर मग लोकांना काम काय?"󾰀󾰀󾰀

-ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे@मुर्डी.

13 October, 2015

गेले ते दिन गेले..

भसाभस बऱ्याच ऑर्डरी एकत्र आल्या आणि  आता रात्रीचा दिवस करायला लागेल असं रम्य चित्र डोळ्यांना दिसलं,, मन मात्र कॉलेज च्या दिवसात जाऊन पोचलं..
तेव्हा भावंडं आणि मित्रमैत्रिणी यांच्यातले भावी इंजिनियर लोक जे होते त्यांची ती सबमिशन, त्यांचे ते कष्ट आणि त्यांचे ते "नाइट मारणे" हे म्हणजे अगदी "प्रतिष्ठेची प्रतिके" असायची. आमची त्यामानाने सुमार डिग्री असाच सुर आजुबाजुला असायचा.. अर्थात ते खरंही असेल.. बोलूनचालून ढ आणि अभ्यास सोडून सर्व काही आवडणारी मी.. पहिलीत गेल्यापासून पुढे 17 वर्ष शिकत राहिले हेच आश्चर्य!! असो.
तर कॉलेजमध्ये अमृता आणि मी भेटलो मात्र.. आणि आमच्या ढ पणाला आणि अभ्यास सोडून सर्व काही आवडण्याला आमचा आम्हीच एक आनंददायी रंग मिळवून दिला..
डिग्रीसाठी टेक्सटाइल हा विषय आम्ही कसा काय निवडला कोण जाणे. पण आमच्या आनंदयात्रेला तिथून सुरुवात झाली. तांत्रिक विषयांचा अभ्यास, परीक्षा ह्यात ती अभ्यासाची नावड़ उफाळून यायची. पण क्रीएटिव्ह विषयांची प्रॅक्टिकल, असाइनमेंट ह्यात खरोखर रमून जातानाच् हा "नाइट मारणे" प्रकार सुरु झाला.
अमृताच्या शुक्रवार पेठेतल्या जुन्या घरी रात्री 9 वाजत आले की आमची पहाट सुरु व्हायची. आखणे,कापणे,चिकटवणे,कोरणे, रंगवणे,शिवणे..असे उद्योग सुरु झाले की आम्ही बुडालोच त्यात. फॅब्रिक ग्लू संपलाय म्हणताच 'सम्राट' बंद व्हायच्या आधी घरातल्या टी शर्टवर तिथे धावण्यात काहीच फिकिर वाटत नव्हती तेव्हा.. पूर्ण रात्रभर हे उद्योग करताना संदीप खरेची गाणी आणि आमच्या गप्पा..

नंतर अमृताकडचे लोक प्रभात रोडला राहायला गेल्यावर,, कॉलेज मध्ये शिकवायच्या आधीच पुस्तकात वाचून त्यांच्या नव्या कोऱ्या घरात केलेले डाइंगचे, बाटिक, बांधणीचे प्रयोग.. मेण आणि रंगाचे राडे.. कॉलेजमध्ये शिकवायच्या आधीच आपले ड्रेस आपण शिवायचा खटाटोप.. ते जमायला लागल्यावर ओळखीच्या लोकांचे ड्रेस शिवून, पैसे मिळवून त्या स्वतःच्या पैश्याने घेतलेल्या एकसारख्या जीन्स..

परीक्षेत अभ्यास करताना हातात नोट्स धरून मारलेल्या अखंड गप्पा.. हा थिअरी प्रकार किती निरर्थक आहे ह्यावर शिक्कामोर्तब.. हातातोंडाशी आलेली मास्टर्स डिग्री थोडक्यात सोडून देण्याचा जवळ जवळ फायनल केलेला विचार.. उद्याची परीक्षा न देता कोणता व्यवसाय करावा ह्यावर रात्रभर चर्चा करून सकाळी जाऊन गपचुप दिलेला पेपर..
डेडलाइनच्या गाळात आम्ही रुतलेलो असताना, खिड़कीत बसून कविता लिहिणाऱ्या अपूर्वाचा आम्ही केलेला हेवा.. आमच्या अचाट,आचरट आणि अव्यवहार्य कल्पनाना तिने दिलेलं प्रोत्साहन.. वरदने मध्यरात्री प्रेमाने करून दिलेली कोल्ड कॉफी..
गणपतीत रात्री केलेली भटकंती.. सायकलने केलेल्या खड़कवासल्याच्या ट्रिपा.. सुजाता आइस्क्रीम.. कपड़यांची, बॅगांची डिझाइन बघत रस्त्याने तासंतास फिरणे,
शेवटची परीक्षा संपत आलेली असताना "कॉलेजमध्ये शिकवायला याल का दोघीहि" असं आमच्या मॅडम विचारत असताना नाही म्हणायचा निर्णय,
सारेगमप, अग्निहोत्र बघताना हसून आणि गोंधळ घालून डोक्यावर घेतलेलं घर.. वरद आणि त्याच्या मित्राचं ट्रुथ अँड डेअर.. आम्हाला सहन करणारे काका काकू आणि आजी..कोणालाही न कळू देण्याची, फ़क्त एकमेकींनाच सांगण्याची, तेव्हा अति महत्वाची असलेली सीक्रेट्स.. ऑरकुट..आणि खुप काही..

एक दिवस अचानक आम्ही m.sc झालो आणि हे सगळं संपल.. त्या वेड्या दिवसांमध्ये ठरवलं होतं तसे दोघीनी आपापले व्यवसाय सुरु केले..आपापल्या व्यापात बुडालो. बॅक गेटची भेळ दिवसेंदिवस महाग होत चाललेली तेव्हा आम्ही ठरवलं होतं की ही भेळ जेव्हा 200 रुपये प्लेट होईल तेव्हा पण ती आपल्याला परवडायला हवी.. आता ती भेळ केवढ़याला आहे कोण जाणें,, पण ह्या निश्चयाला जागण्यासाठी का होईना ती परवडवता येईल इथपत आलो आम्ही..

 सुरुवातीला "आज केस कापले किंवा नविन चपला घेतल्या" इथपर्यंत सगळं सांगायला रोज होणारे फोन आणि चॅटींग कमी होत गेलं.. तरी मैत्री तशीच राहिली..
तेव्हा महत्वाची असणारी माणसं विस्मरणात गेली, नविन माणसं महत्वाची झाली.. पण सगळ्या महत्वाच्या घडामोडी आणि निर्णय एकमेकीना सांगण्याची प्रथा कायम सुरु राहिली..

ही पोस्ट लिहून झाली की मी ऑर्डरी पूर्ण करायच्या मागे लागेन..च्याप्टुगोडू सावनीला झोपवण्याच्या मोहिमेवर अमृता असेल..कवितेच्या जगात अपूर्वा हरवलेली असेल.. वरद खरोखरच असाइनमेंटला घेऊन नाइट मारत असेल...

आठवणीतला एक प्रवास


एखादा दिवस काही चांगल घडल्यामुळे लक्षात राहतो, पण हा दिवस आमच्या लक्षात राहिला त्याच कारण काही लौकिकार्थाने चांगल नव्हतं, तरी अनुभवांची श्रीमंती देणारा तो दिवस होता.
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत एक वेगळ्या प्रकारच्या कामाची संधी मिळाली. मी आणि आमच्या गावातली श्रुती काकू अश्या दोघींना एका ngo ने बोलावलं होत, लहान मुलांना क्राफ्ट, आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड वगेरे शिकवायला.
तसा तर शिकवणे हा आमच्या दोघींचाही प्रांत नव्हे, पण ह्या सगळ्या गोष्टींची हौस, आमचा दोघींचा व्यवसाय एकाच प्रकारचा, आणि चित्रकला, क्राफ्ट, भटकंती, सायकलिंग, पोहोणे, अश्या आमच्या कितीतरी आवडी सारख्या.. एवढाच नव्हे तर आमच्या दोघींची उंची, वजन, रास, ब्लड ग्रुप, गाडीचं मॉडेल सुद्धा सारखं! एकंदरीत आमच जाम पटतं. १२ – १४ वर्षांनी ती मोठी आहे माझ्याहून म्हणून फक्त काकू, नाहीतर मैत्रीणच ती! त्यामुळे हि कल्पना पण आम्हाला खूप आवडली. काहीतरी नवीन काम करायला मिळेल असा विचार केला. आमची मैत्रीण डॉ ललिता गोंधळेकरच्या एक  नातेवाईक त्या ngo चे काम करतात असे समजले, म्हणजे “चला आता नक्की जायला हरकत नाही, हे लोक ख्रिश्चनीकरण वाले नक्कीच नाहीत” अश्या विचाराने बेत पक्का केला.
हि संस्था दाभोळ गावात आहे. आम्हाला सलग ५ दिवस दाभोळ पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गावात जाऊन शिकवायचं होत. गरीब किंवा पालक नसलेली अशी ती मुलं होती. दाभोळ आमच्या मुर्डी पासून ५० किमी वर आहे. दोघींनी एक आड एक दिवस एकेकीची गाडी घेऊन जायचं ठरवलं. आम्ही जय्यत तयारी करून निघालो, हो.. शिकवणे हा प्रकार कधीही केलेला नाही, आणि शिक्षक मंडळीना काय सहन कराव लागत ते मात्र नीटच माहिती..त्यामुळे कोणी काय शिकवायच, जर त्या मुलांनी पटापट सगळ शिकून टाकल, आणि वेळ उरला तर अजून काय काय शिकवायचं ह्याचा भरपूर अभ्यास करून, शिवाय त्यांना दाखवायला आणखी काही कलाकृती बरोबर घेऊन आम्ही निघालो. पहिला दिवस तर मस्त गेला, तिथल्या सगळ्या लोकांशी ओळख झाली, आम्ही जे काय शिकवलं ते त्या लोकांना आणि मुलांना पण आवडलं ह्या आनंदात संध्याकाळी परत आलो. दुसऱ्या दिवशी आमचा आत्मविश्वास वाढला होता, आणि तिसऱ्या दिवशी तर आम्ही सगळ टेन्शन सोडून ट्रीपच्या मूड मध्येच पोचलो होतो.
त्या दिवशी श्रुतीकाकूची गाडी घेतली होती, आणि दाभोळ जवळच्या ओणनवसे ह्या गावात आम्हाला जायचा होत. तिथे ९ वाजता शिकवायला सुरुवात करायची असल्याने आम्ही सकाळी ७ च्या आधीच निघालो. आपल्याच तालुक्यातलं गाव असलं तरी आम्ही तिकडे पहिल्यांदाच जाणार होतो, आणि रस्ता अतिदिव्य असल्याचे आम्हाला कालच सांगण्यात आलं होत. बरोब्बर ३५ मिनिटात दापोली सोडून आम्ही दाभोळ रस्ता धरला, वारेबुवा तीठ्ठा आल्यावर डावीकडे वळलो आणि त्या अतिदिव्य रस्त्याची प्रतीची यायला लागली. आदल्या दिवशी संस्थेतल्या लोकांनी सांगितलेल्या खाणखुणा बघत आम्ही आगरवायंगणी गावावरून पुढे गेलो, आणि मग रस्त्यात कुठेही पाट्या, फलक दिसेनासे झाले. जाडे जाडे दगड सर्वत्र सारखे पसरून ठेवलेल्या त्या रस्त्यावरून अक्षरशः रांगत होती आमची गाडी. मग एका ठिकाणे दोन रस्ते फुटले तेव्हा आता कुठे वळाव ह्या विचारात आम्ही थांबलो. आगरवायंगणी सोडल्यापासून आम्हाला कुठेही मनुष्यप्राणी दिसला नव्हता, मोबाईल बघितला तर नेटवर्क होतं मग ngo मधल्या लोकांना फोन करून सांगितल कि आम्ही अश्या अश्या ठिकाणी आलो आहोत आता कुठे वळायच? त्यांनी सांगितला कि उजवीकडे वळां. तेवढयात ४-५ शाळकरी मुलं.. हातात बेचकी आणि मारलेला पक्षी अश्या अवतारात एका दाट जाळीतून बाहेर येताना दिसली. “ए बाबू.. ओणनवसे?” अस विचारल्यावर त्यांनी डाव्या बाजूच्या रस्त्याकडे मान उडवली. दोन जणांनी दोन रस्ते सांगितल्यावर जरा गोंधळ झाला, पण आम्ही त्या मुलाचं ऐकायचं ठरवलं, कारण प्रत्यक्ष कुठे वळायच ते बघून त्यांनी सांगितला होत, फोन वर बोलताना गैरसमज होऊ शकतो.
आम्ही गाडी काढून निघणार तेवढ्यात लक्षात आल कि मागचा टायर झकासपैकी पंक्चर झालेला दिसतोय. गाडी श्रुतीकाकुची असल्यामुळे तिच्या डिकीत सगळी आयुध तयार होती, हेच काल घडल असत तर माझी गाडी कुठली एवढी टकाटक असणार.. डिकीतून पंप बाहेर काढून हवा भरली आणि आता निदान पंक्चर वाल्यापर्यंत तरी जाऊया असा विचार करून निघालो खरे, पण काही फुटावरच टायर महाराज पुन्हा बसले. आता चाक काढून घेणे आणि मग पंक्चरवाला शोधणे आले. पण मग वाटल चाक काढून घेतलं तरी गाडी इथेच कशी ठेवायची? अनोळखी गावात?  आणि शिवाय किती अंतर अजून बाकी आहे त्याची काहीच कल्पना येत नव्हती. नकोच ते. मग गाडी ढकलत चालायची मोहीम सुरु झाली. अतिशय वाईट रस्ता, ज्याच्यावर कोणे एके काळी डांबर असावं असं वाटत होत. वेडीवाकडी वळणे आणि तीव्र चढ उतार ह्यातून सर्कस करत निघालो. उन वाढायला लागल, दगड आणि लाल माती तुडवत गाडी ढकलताना सकाळी ऐटीत चढवलेल्या स्वेटर आणि स्कार्फची आता अडगळ व्हायला लागली. एका वळणावर वळून समोर बघितला तर खोलवर दाभोळ खाडी, बंदरातल्या बोटी, उसगाव, खाडीच्या पुढे समुद्र असं सगळ दिसायला लागल! तिसरीच्या भूगोलाच्या पुस्तकात वाचून तालासुरात केलेलं पाठांतर.. वासिष्ठी नदीsssss.. दाभोळची खाडीsssss असं अचानकपणे समोर आल. त्या पाठांतराच्या चाली इतकच सुंदर! पण ते सगळ बघत बसायची हि वेळ नव्हती. आता सारख घड्याळाकडे लक्ष जायला लागल, कारण दिलेली वेळ पाळण्याची वाईट खोड! ते ओणनवसे गाव अजून कुठे नजरेच्या टप्प्यात पण नव्हत आणि पावणे नऊ वाजत आले होते. मग आम्ही चालता चालताच त्या लोकांना फोन करून सगळा प्रकार सांगितला. दिलगिरी व्यक्त करून उशीर होत असल्याच सांगितलं आणि आम्ही येई पर्यंत सगळ्या मुलांना कागद वाटून चौरसाकार तुकडे करून ठेवायला सांगा म्हणजे आल्या आल्या लगेच ओरिगामी सुरु होईल असं सुचवलं. जास्तीत जास्त वेगाने गाडी ढकलत आम्ही अजून अर्धा तास चाललो असू. तिथे एका गुर चरवत बसलेल्या आजीला बघून गाव जवळ आल्याच लक्षात आल. तिच्याकडून दोन बहुमूल्य बातम्या मिळाल्या. एक म्हणजे ओणनवसे शाळा जिथे आम्हाला जायचं होत ती आता अगदी जवळ आली आहे. आणि दुसर म्हणजे इथून सगळ्यात जवळचा पंक्चरवाला दाभोळला आहे. म्हणजे ८ किमी! हरे राम म्हणत आम्ही शाळेत पोचलो, आणि बघितलं तर कुलुपबंद शाळेभोवती हुंदडत असलेली मुलं सोडली तर तिथे कुणीच नव्हत. मग मात्र आम्ही ठरवलं कि आता चाक काढून एकीने  मिळेल ते वाहन पकडून दाभोळला जायचं आणि पंक्चर काढून परत यायचं तोपर्यंत शिकवण्याच काम आज एकटीनेच करायचं. त्या निर्मनुष्य रस्त्यावर वाहन मिळेल कि नाही शंकाच होती. नाहीतर ८ किमी चालायची मानसिक तयारी झालीच होती. आता एवढ गाडी ढकलत आल्यावर नुसतंच चालणं किती सोपं वाटायला लागल होत!
प्लेजरच चाक काढण काही अतिकठीण नाही, पण श्रुतीकाकुच्या गाडीची हि पंक्चर व्हायची आणि चाक काढायची पहिलीच वेळ होती, त्यात आमचे हात घामाने आणि धुळीने ओलेचिंब झालेले. काही केल्या नट हलेनात. आमचा हा खटाटोप सुरु असताना युनिकोर्न किंवा तत्सम भली मोठी बाईक घेऊन तिकडे एक हिरो साहेब दाखल झाले. सगळ्या हत्यारांची तपासणी करून त्याने जेव्हा चाकाच्या मध्याबिंदुवर असणारा जाडा नट काढायला घेतला तेव्हा अक्षरशः घाबरून आम्ही त्याच्या हातातून हत्यार काढून घेतली. आता चाक निघालेलं असत तर ह्या मनुष्याच्या गाडीवरून दाभोळ गाठता आल असतं. पण तस काही व्हायचं नव्हत.
तेवढयात एका सिक्स सीटर मधून एक मध्यमवयीन काका डोकावत विचारायला लागले कि काय झालाय? सगळा प्रकार कळल्यावर त्यांनी तातडीने खाली उतरून चाक काढाल! त्याचबरोबर कळल कि ते जातिवंत मेकानिक आहेत. मग त्यांनी सगळी चौकशी केली, आम्ही कुठून कुठे कशासाठी चाललो आहोत त्याची. डॉ गोंधळेकरांच नाव ऐकल्यावर तर त्यांच्या दृष्टीने विषय संपला होता “अरे वा. ते तर आमच्या भाजपचे, म्हणजे तुम्ही आमच्या घरचीच माणस काळजी सोडा तुम्ही  ४ वाजता संपणार ना तुमचा क्लास, त्याच्या आत चाक पाठवतो” असं म्हणून त्यांच्या गाडीत बसून चाक घेऊन गेले पण.
सगळेच प्रश्न एकदम निकालात निघाल्यामुळे आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि हे ngo वाले अजून आले कसे नाहीत असा प्रश्न आत्ता आम्हाला पडला. त्यांना फोन केला तेव्हा कळल कि त्यांची पण गाडी पंक्चर झाली आहे! चला म्हणजे आम्हाला उशीर झाल्याच गिल्ट पण संपल.
आत्ता कुठे आम्ही शांतपणे एकमेकींच्या अवताराकडे बघितलं, तर सकाळच्या इस्त्रीच्या कपडयांची अवस्था आता अशी झाली होती कि किती वर्ष कपडे धुतले नसावेत. टाचेखाली अडकून अडकून फाटलेली माझी सलवार तिथेच दगडावर बसल्या बसल्या हातशिलाईने शिवायला मी सुरुवात केली (सुईदोरा हि श्रुतीकाकुच्या पर्सची कृपा) आणि आम्ही दोघीही प्रचंड हसत सुटलो! तेवढयात बोलेरो मधून ngo वाली मंडळी उतरली ती चिंतातूर चेहेऱ्याने. घाईघाईने शिवणकाम आटपून आम्ही उठलो तेव्हा आम्हाला हसताना बघून ते सगळे अवाकच झाले. मग रोजच्याप्रमाणे आमचा क्लास पार पडला.
आमचं शिकवण झाल कि त्या मुलांना जादूचे प्रयोग दाखवले जाणार होते. जादुगार दाभोळ हून आले ते आमच्या गाडीच चाक घेऊनच. आम्ही शिकवणी संपवून बाहेर आलो तेव्हा गाडी चाक जोडून तयार होती! आमच्यासाठी एवढे कष्ट घेतल्याबद्दल सगळ्या मंडळींचे परत परत आभार मानले. मगाचच्या मेकानिक काकांना द्यायला पैसे देऊन आम्ही गाडीजवळ आलो. “ चल बायो.. निघायचं ना?” गाडीच्या सीट वर थाप मारून श्रुतीकाकू लाडाने गाडीला म्हणाली. गाडी सुद्धा मनातल्या मनात माय प्लेजर असं म्हणाली असेल! मग त्याच दिव्य रस्त्याने ५० किमी अंतर कापून आम्ही घरी पोचलो, संध्याकाळचा निरश्या दुधाच्या चहाचा कप हातात देत आईने विचारलंन “कसा गेला आजचा दिवस?” मी आणि श्रुतीकाकू एकमेकीना टाळी देत एका सुरात ओरडलो,, “मस्त!”

08 October, 2015

गणपती उत्सव 2015

गावभर हिंडून फिरून झाड़ून सगळे गणपती बघुन घरी परत आल्यावरची संध्याकाळ.. मित्रमंडळी.. गणगोतांची वर्दळ.. चहा कॉफी चे एकावरएक राउंड...
धुपाचे खड़े घालून सुगंधित झालेली धुरी..माजघरभरून पसरलेली सतरंजी. संध्याकाळची पूजा. पेटीतबले टाळ घेऊन यंगष्टर्सचे आगमन. पेटीचे सुरेल सूर आणि पाठोपाठ उंच आवाजात सुरु झालेलं "सुखकर्ता..."
1..2..3..करत एकामागुन एक आरत्या.. सगळ्या देवांबरोबर भगवद्गीता,शिवजीमहाराज यांच्या आरत्या.. तालासूरात घुमवलेलं येई हो विठ्ठले..वाढत जाणाऱ्या आरत्यांच्या संख्येबरोबर चढत जाणारे आवाज.. खणखणीत वाजणाऱ्या टाळांच्या लयीबरोबर तल्लीन होऊन डुलणारी पोरं आणि दादा लोक्स... 5वर पंखा असताना पण कपाळावर चमकलेले घामाचे थेंब.. अच्युतम केशवम् झाल्यावर मोरया हो बाप्पा मोरया हो चा गजर...
एकीकडे आईने केलेल्या चहाचा दरवळ.. धिरगंभीर आवजातले देवे.. सुरु असतानाच मनात दाटून येणारं गांभीर्य.. आपोआप जोडले गेलेले हात.. सुखकर्त्या विघ्नहर्त्याची मनात केलेली आर्त प्रार्थना.... मंत्रपुष्पांजली झाल्यावर चहा आणि प्रसाद... गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला हा क्षण..1894 च्या सुमारास सुरु झालेली ही परंपरा.. पूर्वजांनी दिलेला ठेवा...

पटापट सगळी वाद्य घेऊन मूलं पुढच्या घरी पोचली सुद्धा.. चहाचे कप विसळताना मनात साठलेले विचार.. शेजारच्या घरात चाललेलं भजन आमच्या पडवीत बसून ऐकताऐकता टाइप केलेत. तिथल्या वाद्यांचा ठेका इथे कीपॅडवर आपटणाऱ्या बोटांना पण जाणवतोय... "पावन झाली चंद्रभागा झाला कृतार्थ पांडुरंग" सुरु झालं आणि पाठीमागून म्हणणारे बाल तरुण आवाज ऐकताना खरोखर असंच मनात येताय .. कळसावरती नवी पताका..तेज नवे आले..

ह्या परंपरा चिरंतन ठेवण्याची शक्ति-बुद्धि दे आम्हाला रे बाप्पा.,,  मोरया...

05 October, 2015

शांतता

सकाळी 11 च्या सुमारास मुंबईचे काका काकू घरी येऊन पोचतात. या या वगेरे होतं, पाणी बिणी पिउन काकू मागच्या पडवीतल्या झोपाळ्यावर ऐसपैस बसते आणि म्हणते "अहाहा किती शांतता आहे ना इथे! व्वा!"
आणि मी विचित्र नजरेनी तिच्याकडे बघते. हा नेहेमीचा कार्यक्रम. कारण मला त्या वेळी कुठल्याही प्रकारे शांतता वाटत नसते. झोपाळ्याची कुरकुर, एखादा ओरडणारा पक्षी, आई ताक करत असेल तर तो घुसळण्याचा आवाज, वॉशिंग मशीन सुरु असेल तर त्याचा घुर्रर्र आवाज, कुत्री मांजरं वासरं असले आवाज ह्यात हिला काय शांतता वाटत्ये असा मला कायम प्रश्न पडतो. तसं बोलून दाखवल्यावर काकूच म्हणणं असं की मुंबईच्या तुलनेत तिला इथे शांतता वाटते.
असेल ब्वॉ..
मध्यंतरी आजोळी "निवांतपणे" जाण्याचा खुप वर्षानी योग आला. पूर्वी 9वी पर्यन्त नेहमीच निवांत राहायला जायचो तेव्हा आयुष्यात कसलाच स्ट्रेस नसयचा. ते काय असतं तेहि माहिती नसण्याचे रम्य दिवस होते ते. तेव्हा त्याची किंमत कळायचा प्रश्नच नव्हता. ह्यावेळी दोन दिवस तिथे मजेत घालवून झाले. गप्पा टप्पा आणि भावंडांशी दंगा मस्ती करुन झाली. रामाच्या देवळात दर्शन घेऊन तिथल्या कट्टयावर बसल्यावर अचानक मला पण साक्षात्कार झाला "आहाहा किती शांत वाटतंय.." वास्तविक तिथे पण आमच्या घरासारखेच विविध आवाज येत होते मग ही शांतता कुठली?
तिथे काही आवाज पूर्ण बंद झालेले होते काही काळासाठी तरी.. आज किती काम झाल, त्याचे किती पैसे मिळतील, ह्या बॅगला किती कापड लागताय, कुणाची ऑर्डर कधी संपवायची आहे, कुणाला कुठलं डिझाइन हवं आहे, आणि एवढं करून ह्या स्ट्रगलमधून काहीतरी चांगली पोझिशन आपली कधीतरी येणार आहे का..हे सगळ कशासाठी करतोय आपण... हे  सगळे मनातले आवाज.. पूर्ण थांबलेले..
मग कळलं शांतता ही कधीकधी आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते.. काकूला पण मुंबईहुन मुर्डीला आल्यावर असंच होत असणार.
रारंगढांगात त्या विश्वनाथला जसा हिमालयात "शांततेचा आवाज" ऐकायला आला तसंच काहीतरी. मुंबई-पुणे-मुंबई मध्ये सिंहगडावर मुक्ता बर्वे म्हणते "अश्या ठिकाणी आपण स्वतःविषयी जरा निवांत विचार करतो" तसच काहीतरी..

22 April, 2015

भाग २
मी केलेली हापूसची कलमे
गेल्या वर्षी एकदा आंबे काढणीच्या दिवसात, संध्याकाळी, वाड्याच्या भिंतीला टेकून उभं राहून खाली बघितलं, आडवे तिडवे हात पसरून वर्षानुवर्ष उन पाऊस झेलत असलेली हि अजस्त्र कलम. लांब सावल्या पडल्यामुळे अजूनच मोठमोठी दिसत होती. कुणी लावली असतील? आजोबांच्या पण आठवणीच्या अगोदर. ह्या झाडांकडे आठवणी आहेत तेवढ्या आजघडीला दुसऱ्या कुणाकडे नाहीत, पण त्या आपल्याला कळणार नाहीत कधीच. तिसरी पिढी इथे आल्याच बघून ह्या कलमांना काय वाटत असेल? कौतुक वाटत असेल कि आयते आंबे न्यायला आले असं वाटत असेल? एक एक विचार मनात येत गेले. काळोख पडत चाललेला आणि समोर शतकभराची साक्षीदार असलेली कलम. सर्रकन काटाच आला एकदम. आपणही जमतील तशी कलम लावायला हवीत असा विचार पण चमकून गेला मनात.
आणि मग पावसाळा सुरु झाल्यावर कलमं भरायची मोहीम सुरु केली. लहानपणी गावातले काकालोक प्रचंड प्रमाणावर कलमं भरायचे ते आठवल, पण ताडपत्रीची शेड आणि त्यात ठेवलेली कलमं ह्याशिवाय डोळ्यासमोर काही येईना. म्हणजे कलमं भरायचं तंत्र आणि पद्धत आठवेना. तेव्हा अगदीच शाळकरी वयात ते काही एवढ बारकाईने बघितलेलं पण नव्हतं.
आंब्याची बाठ मातीत टाकून दिल्यावर त्यातून रोप रुजत, त्याला मोठेपणी जे आंबे येतात, ते मुळच्या जातीचे नसतात. ते सगळे रायवळ. वेगवेगळ्या चवींचे. विशिष्ठ जातीच्या आंब्याचे झाड बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक पद्धतींपैकी एक म्हणजे स्टोन ग्राफटिंग. त्याला बोलीभाषेत कलमे भरणे असे म्हटले जाते. आंब्याच्या रोपावर(माड्यावर) हव्या त्या जातीच्या आंब्याची फांदी(खुंटी) जोडली कि त्या झाडाला येणारे आंबे हे खुंटी ज्या झाडाची आहे तसेच होतात.
आंब्यांचा अख्खा सिझनभर टाकलेल्या बाठा पाऊस पडल्यावर रुजायला लागल्या. कोवळे आणि मऊ तांबूस रंगाचे कोंब बाठीतून वर डोकावले आणि बघता बघता वितभर उंचीचे माडे दिसायला लागले. जून जाड आणि टरटरीत डोळे असलेल्या चांगल्या खुंट्या. धारदार सुरी, ब्लेड, कोरी प्लास्टिकची पिशवी असं सगळ साहित्य जमा केलं. आणि सुरुवात केली. दुसऱ्याला कलम भरताना बघताना ते जितक सोप वाटत तितकं ते सोप नाही ह्याची जाणीव पहिल्या दोन तीन प्रयत्नात झाली. कधी चीर तिरकी पडून माडा फुकट जायचा तर कधी तासून तासून खुंटी संपूनच जायची. कधी गाठ सैल पडून कलम ताठच राहीना.
हि सगळी धडपड बघून दीपकदादाला दया आली बहुतेक, आणि म्हणाला मी दाखवतो ते बघ नीट एकदा. कमीतकमी हालचाल करत आणि माडा, खुंटीला कमीतकमी हाताळत त्याने सफाईने कलम भरले ते इतके झटकन कि काही कळायच्या आत! अमुक नंबरला अमक्याचा नंबर मेसेजने पाठवायचा कसा ते दाखव असं बाबांनी म्हटल्यावर, मी फटाफट बटण दाबून तो मेसेज पाठवून पण दिला, तेव्हा बाबा वैतागून म्हणाले, “अगो जरा सावकाश दाखवा हा. भरभर बटण दाबून काय करता ते कळतसुद्धा नाही” तेव्हा त्यांना कस वाटत असेल ते मला आत्ता कळल.
नंतर प्रयत्न आणि निरीक्षणाने हळूहळू जमायला लागल. वितभर उंच माडा, बाठीसकट, बऱ्यापैकी जाड झालेला, पण कोवळा, तांबूस रंगाची जागा हिरवा रंग घेण्याच्या आधी, असा निवडून धारदार ब्लेडनी सपकन अर्ध्यात कापला कि हातावर चिकाची बारीकशी चिळकांडी उडते. पालवीचा भाग टाकून देऊन बाठीकडच्या भागाला बरोबर मध्यावर उभा छेद देताना सुरुवातीला भयंकर तारांबळ उडायची. नंतर खुंटीला खालच्या बाजूने सुरीने तासून निमुळता पण चपटा आणि टोकेरी आकार दिला कि शाळेतल्या सवयीप्रमाणे पेन्सिल तासल्यावर जस हातावर टोचून टोक तपासायचो, तसा तासलेल्या खुंटीला हात लावायचा हटकून मोह व्हायचा. तो टाळायचा. कारण आपल्या हाताने इन्फेक्शन झाल तर कलम जगत नाही. तासलेली खुंटी उभ्या चिरलेल्या माड्यात अलगद अडकवून प्लास्टिकच्या पिशवीची पट्टी कापून घट्ट बांधून टाकायची. पिशवीत माती भरून त्यात कलम लावायचं. सांधा होतो त्याला पाणी लागू न देता फुलपात्राने  अलगद पाणी घालायचं. आडोश्याला, उन पाऊस लागणार नाही असं ठेवायचं.
एकदा तंत्र जमल आणि मग वेडच लागलं. सारखा तोच उद्योग. पण खरी चिंता पुढेच होती. हि कलम जगतात का नाही हे बघण्याची. रोज सकाळी उठल कि दात घासता घासताच कलमांच निरिक्षण. पहिले चार पाच दिवस झाले तरी काही ढिम्म लक्षण दिसेना तेव्हा निराशाच वाटायला लागली, पण अजून एक दोन दिवसांनी बघितलं तर खुंटीच्या डोळ्यातून एक पोपटी रंगाचा थेंब दिसायला लागला होता, पूर्णविराम असतो तितका बारीक. आश्चर्य, आनंद, उत्सुकता, काळजी, असं सगळ एकदमच वाटायला लागलं. परवापर्यंत हा माडा आगरात होता, आणि खुंटी ४ किमीवर असलेल्या एका प्रचंड मोठ्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर. नुसतं प्लास्टिकच्या पिशवीने त्यांना एकत्र बांधायला आपण निमित्त झालो, आणि आता एक नवीन हापूसच झाड तयार होतंय. मातीतून मिळणारा जीवनरस त्या माड्यामार्फत खुंटीच्या टोकापर्यंत पोचला होता. पुढच्या २-३ दिवसात त्या पूर्णविरामाएवढ्या पोपटी थेंबाची जागा लुसलुशीत पानांनी घेतली. बघता बघता त्या पानांचा रंग गुलाबी, तांबूस, मातकट, पोपटी, हिरवा, कळपट हिरवा असा बदलत गेला. दोन तीन आठवड्यात उंची आणि पानांची संख्या वाढली.
आता त्या कलमांना मोकळ्या आकाशाखाली, उन पाऊस दिसायला पाहिजे, त्यामुळे सगळ्याची रवानगी अंगणात झाली. रांगेने ५०-६०  कलम मांडून ठेवल्यावर, शेजारची मेघनाकाकू कौतुकाने म्हणाली,”ऐश्वर्या कपौंड झकास झालाय हो तुझ” तेव्हा जाम म्हणजे जामच भारी वाटल!

धो धो पावसाच्या धारा झेलताना, जी दुर्बल होती त्यांनी तिथेच राम म्हटला. बाकीची जोरात वाढायला लागली. पूर्ण एक वर्ष त्यांना पाणी लागेल असं बघून पुढचा पाऊस आला (यंदाचा) तेव्हा काही कलम तर कंबरभर उंचीची झालेली. लगेच त्यातली काही प्लेजरवर घेतली, कमपोंडात नेली, आणि खड्डे खणून लागवड झाली सुद्धा! आजोबांच्या कलमांसमोर हि कलम म्हणजे अगदी आजोबांचं बोट धरून चालायला शिकणारी मीच वाटत होते मलाच. ह्या कलमांकडे बघताना अगदी वाकून बघायला लागतंय, काही वर्षांनी मान उंच करून बघव लागेल, आजोबांच्या कलमांसारखीच हि पण कलम मोठी मोठी होतील. त्यांच्यावर चढायला पण कसबी मनुष्य लागतील. मग तेव्हा मी ह्या जगात असेन किंवा नसेन, पण इतकी वर्ष जे भरमसाठ आंबे खाल्ले त्याची परतफेड निसर्गाला आपण काही अंशी तरी करत आहोत ह्याच समाधान झाल. बुंध्यात हाताने माती चेपताना मनात म्हटलं, लवकर आणि भरपूर लागायला लागा रे बाबानो.

19 April, 2015

भाग १ 
आमच्या कलामांच्या बागेशी निगडीत असलेल्या माझ्या आठवणी तीन वर्षे वयापासुनच्या आहेत. तेव्हा घरापासून तिथपर्यंत जायचं तर तीन चार किमी. चालत जाणे हा एकच मार्ग होता. घरातून बाहेर पडल कि लगेचच जी चढण सुरु व्हायची ती शेवटपर्यंत. त्यामुळे चालताना दम लागला कि बाबा कडेवर बसवून घेऊन जायचे. एखाद्या सहलीला निघाल्यासारखा खाऊचा डबा बरोबर घेतलेला असायचा. वरती पोचल कि आधी तो खाऊ खाणे. मग ‘कोल्ह्याच्या पाण्यावर’ जाऊन पाणी पिणे असा कार्यक्रम असायचा. मग बाबांना सगळीकडे फिरून कलमांकडे लक्ष द्यायचं असायचं, आणि आमचं त्राण आधीच संपलेलं असल्यामुळे तिथे वाड्यातच देवजी नानाच्या इथे मला आणि आदितला बसवून बाबा त्यांची काम करायला जायचे. परत येताना बोरं, चिंचा, आवळे, बिया, कोकम, फणस, बिब्बे, हरडे, उंड्या, लिंब, रामफळ ह्यातील ज्याच सिझन असेल ते घरी घेऊन जायचं. आंबे काढणी हा एक स्वतंत्र सोहळा!
हि कलमांची बाग आजोबांच्या अति जिव्हाळ्याची, कारण त्यांनी स्वतः ती घेतलेली. पहिल्यापासूनच त्या जागेला कमपोंड असं नाव पडल! म्हणजे कम्पाउंड. घेतली तेव्हाच त्यातील काही कलमे ५०-६० वर्षाची होती म्हणतात. म्हणजे आज त्याचं वय नक्कीच १०० च्या वर आहे. शिवाय प्रत्यक्ष ज्यापासून काही आर्थिक फायदा होत नाही पण उपयुक्त अशी वड, कळकी, आईन, यासारखी झाडं चिक्कार असल्याने दिवसासुद्धा घनदाटपणा असतो. त्याकाळी झाडं तोडणे म्हणजे डेव्हलपमेंट हि संकल्पना उगवलेली नव्हती. जमीन एका लेव्हलची नाही तर सतत चढ उतार असल्यामुळे सगळा भाग नजरेच्या टप्प्यात येत नाही आणि जास्तच गूढ वाटत. रात्रीच्या वेळी बाऊळ, रानडुक्कर ह्यांचा नेहेमी आणि क्वचित बिबट्याचा वावर चालतो. काळाबरोबर काहीकाही बदल झाले, बऱ्यापैकी अंतरापर्यंत कशीबशी तरी गाडी जाईल असा रस्ता झाला. मोठे झाल्यामुळे कुणाच्याही सोबतीशिवाय एकटच तिथे जाणं हि नेहेमीची गोष्ट झाली.
पावसाळ्यात अनावश्यक रान भयंकर माजत आणि धो धो धो पडणाऱ्या पावसाच्या घनघोर आवाजात सगळ कमपोंड किर्रर्र झालेलं असतं. आधीच पावसाची काळोखी, त्यात वाढलेलं रान. माजत चाललेल्या वेली आणि झुडपं कलमांना वेढून टाकतात, आणि मग सुरु होतो रान तोडणीचा कार्यक्रम. कोल्ह्याच पाणी धोधो वाहायला लागतं. सगळीकडे बारीक बारीक प्रवाह असतात त्यांना ओलांडत कमपोंडात शिरलं, कि कुठल्या भागात काम सुरु आहे हे कळण्यासाठी हुऊऊउ अश्यासारखा आवाज करायचा, प्रत्युत्तर आल कि त्या रोखानी जायचं. आईबरोबर गेल असेल तर काम करणाऱ्या सगळ्यांसाठी आई गोळ्या, किंवा काहीतरी खाऊ देते.
ह्या आमच्या कमपोंडाला लागुनच ग्रामदेवतेच देऊळ आहे. दगडांनी बांधलेल्या सुबक पाखाडीवरून चढून गेल कि घनदाट झाडीत कौलारू दगडी देऊळ दिसत. रायवळ आंबे, कोकम, बकुळ, सुरंगी, अश्यांच्या अजस्त्र वृक्षानी अक्षरशः वेढलेलं. यायच्या जायच्या वाटेला अगदी लागून असलेल भुवन. म्हणजे नागाच वारूळ. रान तोडणी, गवत काढणी, आंबे काढणी ह्या सगळ्याला सुरुवात करताना, ग्रामदेवतेला नारळ न चुकता देणे ह्याच्यावर सगळ्याचा कटाक्ष असतो.
उन्हाळा जवळ आला कि सगळ्या वातावरणाला कायमचाच एक सुगंध व्यापून टाकतो. आठवणीतल्या कवितांमधल्या कवी माधव यांच्या ‘कोकणवर्णन’ ह्या कवितेच्या ओळी प्रत्यक्षात दिसायला लागतात. आंब्याने चिंचेवर सावली धरली म्हणून कोपलेली रातांबी(कोकम), नवयुवतींच्या कोमल गालांसारखे काजू, रानोरानी पिकलेली करवंदे-तोरणे, भुळूभूळू फळे गाळणाऱ्या जांभळी, आणि पोटात साखरगोटे आणि बाहेरून कंटक घेऊन झुलणारा पुरातन रहिवासी फणस. ह्या सगळ्याच्या लोभाने सगळ्याच झाडावर झोके घेणारे वांदर.
हाच उन्हाळा माणसांना निरुत्साही बनवतो म्हणतात, पण इथे घरोघरी सगळ्यांच्याच कार्यक्षमतेत अचानक इतकी वाढ होते कशी हे एक कोडंच आहे. दिवस उगवतो केव्हा आणि भरभर काम उरकताना संपतो केव्हा ते काळातच नाही. बारीक बारीक कैऱ्या दिसायला लागल्यापासूनच कमपोंडातल्या खेपा वाढतात. चोर, माकडं, नैसर्गिक अडचणी ह्यातून पार पडून आंबे उतरवून झाले पाहिजेत हाच विचार. गेल्या वर्षी एकदा आंबे काढणीच्या दिवसात, संध्याकाळी, वाड्याच्या भिंतीला टेकून उभं राहून खाली बघितलं, आडवे तिडवे हात पसरून वर्षानुवर्ष उन पाऊस झेलत असलेली हि अजस्त्र कलम. लांब सावल्या पडल्यामुळे अजूनच मोठमोठी दिसत होती. कुणी लावली असतील? आजोबांच्या पण आठवणीच्या अगोदर. ह्या झाडांकडे आठवणी आहेत तेवढ्या आजघडीला दुसऱ्या कुणाकडे नाहीत, पण त्या आपल्याला कळणार नाहीत कधीच. आत्ता तिसरी पिढी इथे आल्याच बघून ह्या कलमांना काय वाटत असेल? कौतुक वाटत असेल कि आयते आंबे न्यायला आले असं वाटत असेल? एक एक विचार मनात येत गेले. काळोख पडत चाललेला आणि समोर शतकभराची साक्षीदार असलेली कलम. सर्रकन काटाच आला एकदम. आपणही जमतील तशी कलम लावायला हवीत असा विचार पण चमकून गेला मनात.

सिझन संपत असताना झाडबाकी झाली, आणि शेवटचे आंबे घरी आणायचे होते. योगायोगाने आत्या आलेली होती. मी निघाल्यावर म्हणाली चल ग मी पण येते, मग तिच्याच गाडीने आम्ही आंबे आणायला गेलो. क्रेट गाडीत ठेवले आणि देवळात जायला म्हणून पाखाडी चढून वर गेलो. गणपती विसर्जनाच्या नंतर जसं उदास वाटत, तसच वाटत होत, देवळाजवळ पोचलो आणि दाराची कडी काढून आता शिरणार तोच आत कसली तरी चाहूल लागली. देवतांच्या दगडी मूर्तींच्या मागून एक लांबलचक जनावर देवळाची भिंत चढून देवळाबाहेर गेलं. तिथे बाजूला काढून ठेवलेल्या घंटांना त्याचा धक्का लागला आणि एक बारीकसा नाद काही क्षण जाणवत राहिला. जागेवरच थांबून आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो होतो, ते पुढे जाऊन देवाला नमस्कार केला आणि शांतपणे पाखाडी उतरलो. पुढच्या सिझन पर्यंत आणि कायमच दरवर्षीच हा राखण्या आपल्या कंपोडाची राखण करील, असा शांत विचार मनात घेऊन घरी येण्यासाठी गाडीत बसलो.
©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे@मुर्डी

02 April, 2015

कोकडकोंबडा आणि मुंगुस


लहानपणापासून कायम ऐकलेलं कि मुंगुस किंवा कोकडकोंबडा (म्हणजे ज्याला छापील भाषेत भारद्वाज म्हणतात तो) दिसण हे अगदी चांगल. म्हणजे तो दिवस आता अगदी मस्त असणार. काहीही संबंध नाही, पण मला खरोखरच बऱ्याच वेळा ह्या दोन्ही प्राण्याच्या बाबतीत असा अनुभव आलाय. अर्थात मुंगुस किंवा कोकडकोंबडा दिसल्यानंतर पूर्ण दिवस चांगला जाणे किंवा काहीतरी चांगले घडणे, ह्यातील ‘चांगले’ हि संकल्पना वयोपरत्वे बदलत असते.
घरचा अभ्यास पूर्ण झालेला नसताना, आता वर्गात काय होईल हि भीती मनात घेऊन शाळेत निघावं, रस्त्यात अगदी आपल्याकडे बघतच असलेल मुंगुस दिसावं, आणि नेमका तो घरच्या अभ्यासाच्या विषयाचा तास ऑफ मिळावा, कि झालाच तो दिवस अगदी चांगला. इथून सुरुवात झाली. दिवसभर मरमर कष्ट करून पण किती कमी पैसे मिळतात, कसा आणि कधी वाढेल आपला उद्योग हा विचार घेऊन नैराश्याच्या गर्तेत जायला निघावं, त्या विचारात असतानाच माडाच्या झापावर ऐटीत बसलेला कोकडकोंबडा आवाज करून लक्ष वेधून घ्यावा, काही वेळातच ४-५ बायकांचं एक टोळकं घरात प्रवेश कराव आणि “वारली पेंटिंगवाली ड्रेस मटेरियल तुमच्याकडेच मिळतात ना? आम्हाला ती अमकी तमकी म्हणाली, तिने परवा ड्रेस घातलेला तुमच्याकडचा इतका आवडला आम्हाला” वगेरे म्हणत फटाफट खरेदी करून टाकावी. इथपर्यंत ह्या काहीतरी चांगलं घडण्याचा प्रवास होत आलाय.
योगायोग अंधश्रद्धा काय असेल ते असो, पण एक मात्र नक्की, कि मुंगुस किंवा कोकडकोंबडा दिसलेल्या प्रत्येक दिवशी काही चांगल घडेल किंवा नाही, तरी ह्या दोघांपैकी कुणी दर्शन दिल कि त्या क्षणी तरी अगदी मस्तच वाटतं. गंमत म्हणजे जेव्हा अगदी कंटाळवाणा, निराश, उदास, भकास, इत्यादी प्रकारचा काळ असतो तेव्हा नेमकी सगळी मुंगस आणि कोकडकोंबडे कुठे गायब झालेले असतात कोण जाणे! एकंदरीत काय तर वैतागलेल्या मनस्थितीतून बाहेर पडायला काहीतरी कारण म्हणजे कोकडकोंबडा किंवा मुंगुस.
असा विचार करता करता अचानक लक्षात आल असे कोकडकोंबडे आणि मुंगस बरीच असतात. ज्यांच्या आगमनाने किंवा चाहुलीने जाम भारी वाटत किंवा निदान नैराश्य मरगळ ह्याचा तात्पुरता तरी विसर पडतो.
कॉलेजला असताना एकदा फेब्रुवारी मध्ये पुणे दापोली एसटी पकडली रात्री १० नंतर पुण्याबाहेर पडल्यावर थंडीने कुडकुडून सगळ्या लोकांनी काचा बंद केलेल्या. मध्येच जाग आल्यावर कुठे आलोय ते बघाव म्हणून काच उघडली आणि आंब्याच्या मोहोराचा बेफाट वास नाकात शिरला, तेव्हा कळल दापोली जवळ आली, घर जवळ आल, आणि आंब्याचा सीझन पण जवळ आला. एकदम तरतरीत! तेव्हा खाडीवर पूल नव्हता. मी येणार हे घरी माहिती नव्हत. तरीने(होडी) खाडी ओलांडून आल्यावर आता ब्यागा घेऊन घरापर्यंत दीड दोन किमी चालायचं हा विचार करतानाच संदीप दिसला कोकडकोंबड्यासारखा! पहाटे पहिली एसटी पकडून पहिल्या लेक्चरला पोचायला निघालेला, म्हणाला माझी सायकल ने, दुपारपर्यंत आणून ठेव परत.
असे कितीतरी कोकडकोंबडे लोक आणि क्षण. रात्रभर धोधो पाऊस पडल्यावर सकाळी धारोधार भरलेली विहीर, आणि तासंतास पोहोणं.. कित्येक दिवस प्रयत्न केल्यानंतर सायकल दामटत न थांबता चढलेला सावण्याच्या पुळणीजवळचा चढ.. स्वतः तयार केलेल्या आकाशकंदिलाच्या वाऱ्याबरोबर हलणाऱ्या झिरमिळ्या.. शिवरात्रीच्या उत्सवात जीव खाऊन फुंकलेल्या शंखांचा नाद.. होळीच्या पहाटे परतीच्या प्रवासाला लागलेली साताई देवीची पालखी.. मनात चाललेल्या विचाराच तंतोतंत वर्णन करणारं आवडीच गाणं.. लाईट गेल्यावर मिट्ट काळोखात झोपाळयावर बसून म्हटलेल्या कविता.. पावसाळ्याच्या सुरुवातीला काजव्यांनी भरून गेलेली झाडं.. हि सगळी माझी मुंगस.. !
काय कराव आता अश्या विवंचनेत असताना नेमका आलेला अमृताचा फोन.. खऱ्या मैत्रीला जगणारे मित्र मैत्रिणी, फेसबुकमुळे वेव्ह्लेग्थ जुळून मारलेल्या गप्पा आणि मिळालेली मैत्री.. माझीसुद्धा मुलगीच आहेस तू असं म्हणणारी मावशी.. “गावात आता लोक मला तुझी आत्या म्हणून ओळखायला लागले” असं म्हणताना खुश होणारी आत्या.. जावायाची पोरं आल्येत त्यांना करा काहीतरी खाऊ असं म्हणणारे भाऊ(आजोबा), एवढ मोठ झाल्यावर पण लहानपणीसारखेच लाड करणारे मामा.. भरपूर काम केल्यावर दमलीस बाळा असं म्हणून स्वतः चहा करून देणारे बाबा.. काही न सांगता मनातले विचार ओळखणारी आई.. आणि भांडण आणि अबोला झाल्यावर मी सोर्री बिट्टू म्हणायच्या क्षणालाच सोर्री दिदू म्हणणारा भाऊ..
हे माझे सगळे कोकडकोंबडे!..काही सहज भेटणारे,, काही वाट बघायला लावून मग भेटणारे..

माझं एकमेव व्यसन

एक वर्ष बंद केलेला चहा प्यायला सुरुवात केली, आणि चहाबद्दलच्या आठवणी आठवल्या. असं म्हणतात कि आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर अशी एखादी गोष्ट वर्ज्य करावी कि ज्यामुळे त्या व्यक्तीची रोज आठवण होईल. काही जण असं पण म्हणतात कि त्या व्यक्तीला आवडणारी गोष्ट आपण वर्ज्य करायची. गुरुजी जन्मशताब्दीच्या वेळी संघाचे कुणीतरी काका म्हणत होते कि गुरुजीना आवडायचा म्हणून मी चहा सोडलाय, त्यावर एक मित्र “चहा”टळ पणे म्हणाला होता “गुरुजीना आवडायची म्हणून मी शाखा सोडली आहे”
जे काय असेल ते असो, मी आजोबांसाठी चहा सोडला होता. त्यांना आवडणारा हे तर आहेच, पण मला हे बघायचं होत कि मी चहा शिवाय राहू शकते का? म्हणजे चहा पिणे टाळायचे म्हणजे आजोबांची आठवण रोज आलीच.
कोणे एके काळी तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचा भाग म्हणून चहा पिणे हे देशद्रोहाचे लक्षण मानले जायचे. त्याच काळात बहुतेक चहाला “व्यसन” म्हणजे पर्यायाने वाईट गोष्ट समजले जात असणार. नंतर ह्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरीही लहान मुलांनी चहा पिऊ नये हा कायदा होताच. एकंदरीत चहा वाईट असतो हे पटवून देण्यासाठी; चहा पिऊन पिऊन माणूस काळा होतो, एकदा चहाच्या आहारी गेलं कि मग चहा शिवाय पान हलत नाही, आणि वेळेवर चहा मिळाला नाही तर लोकांची डोकी दुखतात इथपर्यंत वाट्टेल ती विधाने मोठी माणसे करत असायची! म्हणूनच कि काय कोण जाणे पण माझी आई आणि मावशी ह्यांनी अजून चहाची चव सुद्धा घेतलेली नाही. त्या दोघी कॉफी टीम मध्ये! साहजिकच मी चहा पिऊ नये असेच माझ्या आईचे पूर्वी मत होते, आणि इयत्ता सहावीपर्यंत मीही चहाला स्पर्श केला नव्हता.
ह्याच्या अगदी उलट म्हणजे बाबा दिवसाला असंख्य कप चहा पीत असतात. आजी तर रागारागाने बाबांना म्हणायची “उद्यापासून मी एक कळशीभर चहा करून ठेवणारे.. त्यात कप बुचकळून भरून घ्यायचा आणि प्यायचा. माझ्या कामात लुडबुड करून एकसारखा चहा करायला सांगत जाऊ नकोस”
आजोबा सांगायचे, चहा प्यायला हवा, कारण आपण कोणाच्या घरी गेलो तर चहा हे सगळ्या थरातल्या लोकांचे पेय आहे, त्यामुळे तेच आपण पीत असू तर आपले आतिथ्य करणे समोरच्याला अडचणीचे वाटत नाही. हीच गोष्ट प्रत्यक्षात घडली आणि माझी चहाशी पहिली ओळख झाली. सहावीत असताना एका मैत्रिणीच्या घरी तिची आई चहा पिण्याचा अतिआग्रह करत होती, आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन असणं शक्य नाही हे तेव्हाही मला स्पष्ट कळत होतं. शिवाय जर अट्टहासाने नको म्हटलं तर मी ब्राह्मण असल्याने तिच्या घरी काही घेत नाहीये असा गैरसमज सहजगत्या तेव्हा तरी नक्कीच झाला असता, आणि ते मला कुठल्याही परीस्थित नको होतं. त्यामुळे “पण अगदी अर्धा कपच दे काय” असं म्हणत कबुल झाले. मनात हजारो वेळा आईला सॉरी म्हटलं, आणि अर्धा कप कोरा गोड चहा नॉर्मल हावभाव करत पिऊन टाकला. घरी आईला भीत भीत सगळ सांगितलं पण मला वाटल होतं तशी आई रागावली वगेरे मुळीच नाही.
त्यानंतर फक्त अश्याच प्रसंगात चहा प्यायला काही वाटेनासं झालं.
अकरावीला पुण्याला गेल्यावर रोज सकाळी चहा प्यायची सवय लागली ती मात्र कायमची. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना चहाची खरी किंमत कळली. दिवसभर कॉलेजमध्ये राब राब राबून झाल्यावर मग रूमवर जायच्या आधी टपरीवरच्या चहाच्या एकेका घोटाबरोबर दमलेला मेंदू तरतरीत होताना जाणवला कि कळायचं कि चहाला उत्तेजक पेय म्हणतात म्हणजे नक्की काय ते.
अश्याप्रकारे पुणे सोडून परत घरी येईपर्यंत मी पूर्ण चहाबाज झालेली होते. बाहेर राहत असताना साहजिकच घरासारखे खाण्यापिण्याचे नखरे चालत नाहीत, आणि मग ज्या ज्या खाद्य वस्तू आहेत त्या न कुरकुरता खाण्याची सवय लागून जाते, खास आवडी निवडी अश्या उरतच नाहीत. पण घरी परत आल्यावर निराश्या दुधाचा चहा हा मात्र अगदी विकपॉइंट बनला. संध्याकाळी सगळी काम आटपली, घरचे सगळेजण घरी आले, कि निराश्या दुधाचा फेसाळ गोड चहा सगळ्यांनी एकत्र पिणे, त्याबरोबर दिवसभराच्या घडामोडी एकमेकांना सांगणे, आणि त्यावेळेला देवासमोरचे निरांजन, उदबत्तीचा वास, घरभर पसरलेला धुपयुक्त धूर हा संपूर्ण दिवसात माझ्या अगदी आवडीचा क्षण.. रोज अनुभवण्याचा..
आमच्या मुर्डीमध्ये तर जणू काही आपले अधिकृत राष्ट्रीय पेय असल्याच्या भक्तिभावाने सगळेजण चहा पितात, आणि लोकांना पाजतात.
ह्या सगळ्या चित्रात आता आजोबा नाहीत, तेव्हा चहा सोडायचा प्रयोग केला, आणि खरोखरच वर्षभरात एकदाही चहा प्यायला नाही. डोकेदुखी, रेस्टलेसपणा असल्या काहीही प्रकारांशिवाय निश्चय पार पडला. ज्यासाठी मुळात चहा प्यायला सुरुवात केली त्याच्यासारखे सामाजिक अडचणीचे प्रसंग क्वचित आले, पण आजोबांसाठी चहा पीत नाही हे कारण पुरेसं संयुक्तिक वाटल्याने कुणी फोर्स केला नाही. एका वर्षानंतर मी पुन्हा चहावाल्यांच्या गोटात प्रवेश केला आहे, माझ हे एकमेव व्यसन पूर्णपणे माझ्या ताब्यात आहे ह्या खात्रीसह!