08 June, 2023

घाल घाल पिंगा

महाशिवरात्रीचा उत्सव संपला, आणि आंबा काजूच्या मोहोराच्या वासाने आसमंत भरून जायला लागला. शिमगा झाला, आणि पाडव्यापासून कोकणचा निसर्ग हळूहळू रंग बदलायला लागला. चैत्रपालवी गुलाबी-पोपटी-हिरवी... असं करत करत रंगांची आणि बरोबरीने सुगंधाची उधळण सुरू झाली.

पोरांच्या परीक्षा, बायकांच्या चैत्रगौरी आटोपल्या आणि जो तो कोकणी entrepreneur आपापल्या घरातील उद्योगात बुडून गेला. दिवस मोठे आणि रात्री लहान झाल्या, तरीही कामाला दिवस पुरा पडेनासा झाला. काजूच्या बिया जमवायला कातकऱ्यांची लगबग उडाली. सुटीत रिकामी उंडारणारी पोरंपोरी जमेल झेपेल ते काम मिळवून कमावायला लागली.

कच्ची करवंद मिठात पडली, आमसुलं वाळत पडली. चकचकीत गुलाबी रंगाचा पाक पाघळवत कोकमसिरपची पिंप सजली. एकसारखे चिरलेले गरे चुर्रर्र आवाज करत तेलात उतरले. स्वयंपाकसुद्धा करायच्या आधी फणसरसाचे मिक्सर घरघरु लागले आणि उन्हाच्या पहिल्या कवडश्याबरोबर साठांचे ट्रे मांडवभर पसरले. स्वच्छ दादरे बांधलेली छुनद्याची पातेली उन्हात जाऊन बसली. आंबोशीच्या तुकड्यांची रांगोळी पसरली.

ह्या प्रॉडक्टिव्ह गडबडीत सवड काढून , वेळेचं भान राखत राब, पातेरी, माती लावणे, भाजवणी,  तसेच अक्षय्यतृतीयेला भाजीपाल्याच्या बिया रुजत घालणे ही क्रिएटिव्ह कर्मकांडे पार पडली..

भविष्याची तरतूद म्हणतात तशी पावसाळ्यासाठी फाटी, चौडं, गोवरी भरून झाली. डाळी कडधान्य वाळवून भरून झाली. मीठ- मिरच्या- मसाले- कांडण नुसती धूम उसळली.

एकीकडे माहेरवासिनी आणि पोराबाळांनी घरे गजबजली, पर्यटकांनी हॉटेल्स गजबजली. माणसांच्या उत्साहाबरोबर निसर्गाचा उत्सवही चढत्या भाजणीत बहरू लागला. 

आणि अचानक एकदिवस चकचकत्या सोनेरी आभाळात एक काळपट किनार दिसली. सरड्याची तोंडं लाल झाली, कावळे काड्या शोधत फिरू लागले, मुंग्यांना पंख फुटले, तिन्हीसांजेला पडवीतल्या पिवळ्या बल्ब
भोवती वाळवीची पाखरं पिंगा घालू लागली, पाणकोंबड्या तुरुतुरु धावायला लागल्या, बेडूक मंत्र म्हणायला लागले... रानहळदीला फुलं आली, संध्याकाळच्या वेळी गार वाऱ्याबरोबर कुठेतरी पाऊस पडला की काय अशी शंका यायला लागली आणि कामधंद्यात गर्क झालेल्या माणसांना जून महिना उजाडल्याचा साक्षात्कार झाला!

दिवस रात्रीच्या मधला असो किंवा दोन ऋतूंच्या मधला असो.. संधिकाल कायमच भावनिक करून टाकतो आपल्याला, तसंच झालं. इतकेदिवस कामाच्या व्यापात पार्श्वसंगीतासारख्या मनात वाजत असलेल्या माहेरच्या आठवणी एकदम जोरात यायला लागल्या. 

आजूबाजूच्या झाडांवर पूर्ण तयार असलेले आंबे, आता हलकेच लागलेल्या धक्क्यानेही पटापट गळून पडतात आणि सत्तरी गाठलेली एखादी माहेरवाशीण वय विसरून लगबग करत ते गोळा करायला धावते, तश्या आठवणी धावत सुटतात..

कॅनिंग अंतिम टप्प्यात आलं असेल, आंबा खरेदी बंद केली, म्हणजे आता आंब्याच्या आढ्या पूर्ण क्षमतेने लावल्या असतील, संध्याकाळी सगळेजण दमून भागून चहा-कॉफी घेत गप्पा मारत असतील.. आंबेकाढणीच्या दिवसातलं चित्र डोळ्यासमोर तरळून जातं.. आता पावशी उतरवला असेल, सरव्यातील रायवळखाली खच पडला असेल.. एका अव्वल प्रकारच्या रायवळला बाबांनी कौतुकाने दिलेलं आपलंच नाव.. गोवई, पायरी, फर्नांडिस सगळे घरी दाखल झाले असतील. रोज संध्याकाळी काम संपल्यावर कामगारांच्या हातात खायला दिलेले आंबे, दिवसभर रसात काम करूनही परत रात्री जेवणानंतर घरी गोलाकार बसून घेतलेला आंब्यांचा आस्वाद...

मुलांना झोपाळ्यावर घेऊन रामरक्षा म्हणता म्हणता मन मात्र नुसतं सैरावैरा धावत सुटतं..
"अगं!! प्रत्येक काढणीनंतर क्रेट भरून प्रत्येक प्रकारचे आंबे आले की माहेरचे.. आणि एकदा डोळे मिटून ते खायला लागलीस की तुला हाक सुद्धा मारलेली ऐकू येत होती का?" 

"तुला नाही ते कळणार!! मंगलकार्याच्या मांडवाला कितीही भारी सजावट केली तरी दारावर आंब्याचा टाळाच लागतो की नाही, तसंच आहे हे.. कितीही काहीही झालं तरी आंबा तो आंबाच! त्यातही हापूस हा सर्वांचा बापूस! आणि त्यातून तो माहेरचा म्हणजे काय विचारतोस! एकदा तरी कपड्यांवर ते तेजस्वी केशरी डाग पडल्याशिवाय काही अर्थ नाही कशालाच!"

"चला मग, उद्या लवकरच निघू! सासूबाईंना फोन करून ठेवा, की मऊभात वाढवा सकाळचा."

पावसाची पूर्वसूचना द्यायला आलेला वारा फोनच्याही आधी निरोप सांगायला पुढे जातो😊

©ऐश्वर्या पेंडसे जोशी


12 February, 2023

विद्यारंभ संस्कार

मुलं शाळेत जायला लागल्यावर, प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे आम्ही सतत ज्या प्रश्नाला सामोरे जात असतो ते म्हणजे- मराठी माध्यमच आहे, ssc बोर्डच आहे तरी एवढा मोठा प्रवास करून दापोलीच्या शाळेत नेऊन हाल का करताय मुलांचे. हाल वगैरे तर नाहीच, पण हा निर्णय घेतल्याबद्दल पावलोपावली समाधान मात्र वाटत राहते, त्यापैकीच एक अतिशय महत्वाचा दिवस नुकताच आमच्या मुलांच्या विद्याभारती शाळेत पार पडला- तो म्हणजे विद्यारंभ संस्कार. 

अगदी लहान वयात कोवळ्या बोटांना लिहायला द्यायचे नाही हा आमच्या शाळेचा विचार. तोपर्यंत, निरीक्षण, पाठांतर, गाणी गोष्टी खेळ यांची लयलूट! मुलांना पाच वर्षे पूर्ण झाली की शाळेत विद्यारंभ संस्कार होईल, आणि मग लेखन शिकायला सुरुवात होईल, असं सांगितलं गेलं होतं. (पाच वर्षे पूर्ण झाल्यावर??? मग लेखनाला सुरुवात???- असं वाचून दचकले असतील खुपजण)

प्रत्यक्षात तो सोहोळा 26 जानेवारीला ठरला. साधारण 15 दिवस आधी शाळेच्या ग्रुपवर बाईंकडून तशी सूचना आली. ह्या कार्यक्रमासाठी 'माता पालकांची' उपस्थिती आवश्यक आहे. आई येऊ शकत नसेलच, तर मग आजी, मावशी, काकू, आत्या, मामी असं कोणीही चालेल! असाही निरोप आला. पालकांनी पांढरे किंवा फिक्क्या रंगाचे कपडे आणि मुलांनी गणवेश घालायचा आहे, असं सांगितलं गेलं तरीही एखादा फिकट रंगाचा ड्रेस अडकवून जाऊ अश्याच विचारात मी होते. 

मग एक दिवस अबीर व अर्णव सांगू लागले, "सगळ्या आयांनी साडी नेसून यायचंय शाळेत. लक्षात आहे ना? आणि मुळात तुझ्याकडे आहे तरी का पांढरी साडी, किंवा फिक्कट रंगाची? नाहीतर आजीची मागून घे एखादी!😁" इथपर्यंत पोरांची डोकी धावली. 

शिवाय अगदी पळी-पंचपात्रीपासून सगळं पूजेचे साहित्य, पाटी पेन्सिल, आणि जपमाळ घरून आणायला सांगितली होती, तरीही शाळेतल्या एखाद्या नेहेमीच्या कार्यक्रमापेक्षा जास्तीचं महत्व ह्या कार्यक्रमाला असणार आहे ह्याची आम्हाला कल्पना नव्हती.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी, प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजवंदनानंतर सुटी असते तरीही सर्व शिक्षक मंडळी उत्साहाने कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होती. एका चिमुकल्या पालखीत मोठमोठे ग्रंथ ठेवून ती पालखी खांद्यावर घेऊन मुलांनी शाळेच्या आवारातच दिंडी काढली.

नंतर मग प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या आईबरोबर वर्गात बोलावलं गेलं. त्या वर्गातील तयारी बघून आम्ही थक्कच झालो. घरी शुभकार्य असलं की कसे मातीच्या विटांचे चौकोनी यज्ञकुंड करतात, तसे 7-8 यज्ञकुंड तयार केले होते. एका कुंडाभोवती चार मुलं व त्यांच्या आया अश्या आठ जणांच्या बसण्याची व्यवस्था. बाकी सर्व तयारी- धूप, कापूर, गोवऱ्या, समिधा, तीळ, जव, तूप, निरांजन- अशी जय्यत मांडलेली होती. 

आमच्या मुलांची विद्याभ्यासात उत्तम प्रगती व्हावी अश्या संकल्पाने विधीची सुरुवात झाली. यज्ञात अग्नी प्रज्वलित करून त्यात पंचमहाभुतांसाठी आहुत्या दिल्या गेल्या. सुस्पष्ट व सुश्राव्य मंत्रांचा घोष शिक्षकवृंदाकडून केला गेला. शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या कल्याणासाठी करण्याची बुद्धी मुलांना मिळावी अश्यासाठी- "राष्ट्राय स्वाहा, इदं न मम" अशी आहुती घातली गेली.

आहुती देणे, नैवैद्य दाखवणे, ह्या कृती कश्या करायच्या,  कुठल्या बोटांनी करायच्या हे सर्व शिक्षकांनी नीट समजावून सांगितलं.

नंतर सर्व मातांना जपमाळ घेऊन सरस्वती देवीचा जप करायला सांगीतला. आईने आपल्यासाठी जप केला, आता मुलांनी आईच्या पायावर डोकं टेकवून नमस्कार करायचा, असं सांगितलं गेलं.

आता विद्याभ्यासाला सुरुवात करायची, आई म्हणजे पहिला गुरू, म्हणून आईने मुलांकडून पाटीवर श्री अक्षर गिरवून घेतले. सर्वात शेवटी प्रसाद देण्यात आला- तो म्हणजे खारीक, खोबरं, खडीसाखर, वंशलोचन अश्या पदार्थांची एकत्र केलेली पूड- कारण हे सर्व पदार्थ बुद्धिवर्धक सांगितले आहेत! 

पवित्र सुगंधी धुराने भरून आणि मंत्रोच्चाराने भारून गेलेलं ते वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं, की चपखल वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. अतिशय विचारपूर्वक आखणी केलेला हा कार्यक्रम इतका हृद्य झाला की निघताना सर्व शिक्षिका, गुरुजी व ताई यांना नमस्कार करायला मुलांना सांगावं लागलेच नाही.

बाहेर सर्वत्र पाश्चात्य संस्कृतीचं अतिशय जास्त आक्रमण आपल्या प्रत्येक गोष्टीवर होत असताना, शाळांमधून सुद्धा कितीतरी गोष्टी अश्या घडताना आढळतात. त्यावेळी विद्याभारतीचे वेगळेपण डोळ्यात भरल्याशिवाय राहत नाही.

 आम्हाला तर अगदी जणू मुलांची मुंज झाल्यावर वाटावे तितके समाधान वाटले. आता मुलं मोठी होतायत ह्याची एक न सांगता येणारी हुरहूर, आणि नवीन नवीन अनुभव त्यांच्या भावविश्वाला समृद्ध करतील ह्यासाठी शाळा प्रयत्न करत आहे ह्याचं मन भरून समाधान घेऊन घरी निघालो!



 (विशेष टीप- 'हा कार्यक्रम म्हणजे मुंजीला पर्याय' असं कुठेही मी म्हटलेलं नाही- याची संस्कृती रक्षकांनी नोंद घ्यावी)

आणि शेवटी अतिमहत्वाचे- आता आमच्या मुलांचा हा कार्यक्रम शाळेने केला- म्हणजे अगदी सगळीच मुलं डॉक्टर इंजिनियर होणार नाहीयेत. हे आम्हालाही माहिती आहे. मुलं आमच्याइतपत जेमतेम शिकून आमच्या इतपत साधे उद्योजक किंवा शेतकरीसुद्धा होतील, त्यामुळे, "हंss इतके सोहोळे करून हेच का दिवे लावले, असे अजून 25 वर्षांनी तारे तोडणाऱ्यांना आधीच नमस्कार!😁 
(कारण-  10 महिन्याच्या लेकराला एका जागी बसवून जेवण भरवायला सोपं जावं म्हणून चित्रांची पुस्तकं दाखवायला घेतली असताना- "अग काय हे, आत्तापासून अभ्यासाची कटकट करतेस!!!" हे ऐकलेलं आहे मी)