27 May, 2021

आम्ही आंबेवाल्यांच्या लेकीसुना

आपल्या आडनावापुढे ब्रदर्स, बंधू, सन्स असं लिहिलेले कित्येक उद्योग आपण बघतो- चितळे बंधू, देसाई बंधू, जोशी अँड सन्स वगैरे.. मुली सासरी जाणार आणि सासरच्यांना आवडेल ते करणार (नोकरी, व्यवसाय, गृहिणी) ही मानसिकता व वस्तुस्थिती दोन्ही आहेच. त्यामुळे पेंडसे भगिनी, (किंवा बंधूभगिनी) जोशी अँड डॉटर्स असं कुठे ऐकलंय का हो कुणी??? मी तरी अपवाद म्हणून सुद्धा असं उदाहरण बघितलेलं नाही.

वास्तविक आम्हा आंबेवाल्यांच्या घराघरातून अगदी तीनचार वर्षांचे झाल्यापासूनच मुलामुलींना व्यावसायिक कामात सहभागी केलं जातं. यथावकाश लुडबुडीचं रूपांतर वाकबगार सफाईदार काम करणाऱ्या व करवून घेणाऱ्या जबाबदार व्यक्तीत कधी होतं ते घरात कुणाला कळतही नाही. शाळा कॉलेजच्या सुटीच्या काळातच आंब्याच्या कामांची धामधूम असल्यामुळे बरोबर कामाच्या वेळेत घरातली मुलं कामाला उपलब्ध होतात. मे महिन्याच्या सुटीत उशिरा उठणे, फिरायला जाणे, पत्ते खेळणे हे आंबेवाल्यांच्या पोरांना कधी जन्मात ठाऊक नाही!

काळ पुढे सरकत जातो.. मुलंमुली हळूहळू एकेक जबाबदाऱ्या घ्यायला शिकतात. आणि अचानक लग्नाची वयं येऊन ठेपतात. 20 किलोचा आंब्याने भरलेला क्रेट डोक्यावर घेण्यापासून ते समोरच्या पार्टीबरोबर/ ट्रान्सपोर्टवाल्याबरोबर फोनाफोनी करण्यापर्यंत.. आणि लादी पुसण्यापासून बँकेची कामे करण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या समान उचलणाऱ्या मुलगे व मुलींच्या वाटा इथे बदलायला लागतात.

मुलगे जर वडिलोपार्जित आंबा व्यवसायात येणार असं ठरलं, तर ह्या सगळ्या कष्टमय आयुष्यात साथ देणारी बायको भेटणार का, आणि भेटली तर ग्रामीण किंवा निमशहरी ठिकाणी टिकणार का... 

मुलींपुढे प्रश्न असतो- दुसऱ्या कोणत्या आंबेवाल्यांच्या मुलाशी लग्न करावं की हे कष्टमय आयुष्य आता ह्यापुढे आपल्या वाटेला येणार नाही असा महानगरातील मुलगा निवडावा.. ऑप्शन्स दोन्ही उपलब्ध असतात😄😄😄

कोणता ऑप्शन निवडावा हे मुलींच्या स्वभावावर आणि लहानपणापासून आपल्या आईला घरात मिळणाऱ्या वागणुकीवर आवलंबून असते. ऐन आंबा सिझन मध्ये नेहेमीची घरकामे, आलागेला, गडीमाणसे, पाहुणे, चहापाणी, स्वयंपाक हे सगळं सांभाळत दिवसभर व्यवसायात कष्ट करून वेळ पडली तर संध्याकाळी कामगार घरी निघून गेल्यावर आलेला आंब्याचा ट्रक लोड किंवा अनलोड करायलाही मागेपुढे न बघणारी आई- आणि ह्यावेळेच्या माहेरपणात वहिनीने सांदण काही करून घातले नाहीत आणि ताटावर पाटावर केलं नाही... म्हणून बोल लावणारी आत्या ज्यांना आहे त्या मुली करतील का आंबेवाल्या मुलाशी लग्न?

पण माहेरपणाला येऊन राहिल्यावर "वहिनी, घर व स्वयंपाक मी बघते- तू जा गडीमाणसांच्या पाठीवर बिनधास्त" असं आईला म्हणणारी आत्या ज्या मुलींना मिळते.. त्यांच्यासाठी हा आम्रमहोत्सव कष्टमय न वाटता खरोखर उत्सवच बनून जातो. त्यांना चालतो मग आंबेवाला नवरा😄 अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पिढीसाठी - की ज्यांना पालक विचारतात की कश्या प्रकारचा नवरा हवा तुला म्हणून! 

पूर्वी मुलींना चॉईस नव्हता, किंवा चॉईस विचारला तरी अति अटी घालायची परवानगी नव्हती तेव्हच्याही आंबेवाल्यांच्या लेकी- शहरात सासरी राहून माहेरच्या आंब्यांची विक्री करताना दिसतात.. गिरगावातील चाळीतल्या चिमुकल्या घरात माहेरहून आलेले गाडीभर आंबे विकणं ही काय गंमत नव्हे.. मुलांची सुट्टी संपण्यापूर्वी एकदा माहेरी जाऊन येऊ म्हणून पहाटे निघून दुपारला घरी पोचलेली माहेरवाशीण- घरामागच्या कारखान्यात ऐन रंगात आलेलं कॅनिंग आणि त्यात रंगलेले दादा वहिनी बघून हातपाय धुवून ताबडतोब गॅसच्या शेगडीचा ताबा घेते ती ह्याच संस्कारातून..

आताच्या काळात आम्ही 'हल्लीच्या मुलींमधून'- (बरेचदा शिवीसारखा वापरला जाणारा शब्द) एखादी मुलगी लग्न करताना जवळच्या शहरातील, नोकरी करणारा, आखीवरेखीव रुटीन असलेला, फ्लॅटमधला नवरा निवडते, त्यामागचं- आपला लहान भाऊ जाणता होऊन वडिलांच्या हाताशी येईपर्यंत दरवर्षी आंब्याच्या दिवसात माहेरी मदतीला जाता येईल- नवरा आला तिकडे मदतीला तर त्याच्यासह नाहीतर त्याच्याशिवाय😄 -  हे कारण असू शकतं. खरं वाटेल का हो कुणाला?

लग्न करून महानगरात गेलेल्या आंबेवाल्यांच्या लेकी- आंबे विकतात हे तर अगदी कॉमन.. पण परत जाणाऱ्या रिकाम्या ट्रकमधून काय काय परत पाठवलं जातं माहेरी? रिकाम्या बॉक्समधील उरलेला पेंढा- पुन्हा वापरायला होईल, आंबे संपले की तो पेंढा गुरं खातील, अगदीच काही नाही तर बंब पेटवायला होईल.. तीच गत नारळाच्या करवंट्या व शेंड्यांची! 

एकदा सरसकट झाले की फणसाला कुणी विचारत नाही कोकणात. "असतील तितके फणस पाठवा बाबा" असं आत्मविश्वासाने सांगणाऱ्या मुलीच्या अंगात कामाचा उरक किती असेल हे गरे विकत घेणाऱ्याना कळणार नाही. पहाटे साडेचारला उठून घरादाराचा चहा-नाष्टा, स्वयंपाक करून ही पुण्याच्या फ्लॅटमध्ये विळी मांडून फणस फोडायला बसते, आणि आठ वाजेपर्यंत काप्या गऱ्यांच्या 200 ग्रामच्या सुबक पिशव्या भरून तयार ठेवते.. कच्चे गरे चिरून उकडगऱ्याच्या भाजीसाठी विकते... उरल्या सुरल्या आंब्याचा मुरांबा, मावा, करून एकही आंबा फुकट जाऊ द्यायचा नाही हे सगळं सोपं नाही. हे कष्ट आणि वेळ व्यवस्थापन एकत्र आणायला कारणीभूत होतं आंबेवाल्यांच्या घरातले बालपण.

हल्ली रिसेलिंगचे पेव फुटलेले आहे.. जो तो उठून whatsapp स्टेट्सला असंख्य फोटो चिकटवून ऑर्डर घेतात व वस्तू परस्पर पाठवायला सांगतात.. ते वाईट आहे असं मुळीच नव्हे.. पण एक साधारण निरीक्षण असं की नवरा भरपूर पगार कमवत असेल तर हे रिसेलिंग प्रकरण फार काळ टिकत नाही.. पण इथून कोकण प्रॉडक्टस st पार्सलने मागवा, स्कुटरवर लादून, हमाली करत घरी आणा, प्रत्येकाची चव घ्या, वैशिष्ट्ये सांगा.. लोकांची वर्दळ किंवा होम डिलिव्हरी पोचवणे.. लोकसंपर्क आलाच आहे तर अश्या काही सेवा ह्या मुली पुरवतात की जे शहरात वाढलेल्या मैत्रिणींना कठीण आहे, पण असमच्यासाठी हाताचा मळ आहे- जसे नारळ खरवडणे, नारळाचे दूध काढून सोलकढी, तांदुळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकऱ्या आणि उकडीचे मोदक😋...हे सगळं करत असताना घरातील ज्येष्ठ, लहान मुलं, आणि वर्क फ्रॉम होम वाला नवरा सांभाळणे हे सगळं ह्या लीलया जमवून आणतात. अर्थात ह्यासाठी घरभर जो काय देखावा बनतो तो फ्लॅटमध्ये सहन करणाऱ्या ह्या तायांच्या सासूसासऱ्यांना अभिवादन!

माहेरचे आंबे उशिरा आले, तोपर्यंत दर कोसळले.. प्रक्रिया करण्यासाठी मनुष्यबळ नाही.. अश्या स्थितीत एक मुलगी आपल्या इंजिनियर होऊन mba करत असलेल्या मुलाला कामाला लावते- आणि शहरातील मध्यवर्ती चौकात - जिथे खेडेगावातील लोक भाजीपाला फळे विकायला रस्त्यावर बसतात.. त्यांच्या रांगेत बसून हा सुशिक्षित हँडसम पोरगा आजोळचे आंबे विकून मोकळा होतो!  आता सोशल मीडिया हा विक्रीचे ठिकाण झाल्यावर इथे घेतलेल्या ऑर्डरी जरी बटणं दाबून मिळवल्या तरी कुरियर ऑफिसपर्यंत आंब्याची स्वतः हमाली करायला ही आंबेवाल्यांची नातवंडं लाजत नाहीत.

आंब्याच्या दिवसातील कामं हे कष्ट नसून उत्सव आहे असं मत असूनही कॅनिंगवाला नवरा नको ही अट सुद्धा ह्या कॅनिंगवाल्यांच्या पोरी घालतात ह्याला काय म्हणावं🤣🤣🤣 आता भलावण कुठल्या रसाची करावी मग अश्या  परिस्थितीत सांगा.. रायव्हलरी नावाचा प्रकार असतोच की हो. त्यापेक्षा ती भानगडच नको. माहेरचा ब्रँड जे पदार्थ बनवत नाही तेच पदार्थ सासरच्या ब्रँडमध्ये बनवायचे.. हा एक फंडा. सासर माहेर जवळच्या अंतरात असल्यामुळे  मुरंब्याची पूर्वतयारी सासरी करून माहेरी पाठवायची- मुरंबा तिकडे करतील.. सासरी पिंप/क्रेट/ट्रे कमी पडतायत- माहेरहून आणायचे-- हे ही प्रकार आंब्यांच्या लगीनघाईमध्ये होऊन जातात.

आंबेवाल्यांच्या सुना हेही असंच अजब रसायन असतं.. ह्या आंबेवाल्यांचा लेकीसुद्धा असतील तर ठीक, पण ह्या इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या पूर्वाश्रमीच्या शिक्षिका, काउन्सेलर, चित्रकार, विशेष मुलांच्या ट्रेनर अश्या विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या असतात.. कित्येकदा माहेरी संपूर्ण नोकरीपेशाचं वातावरण असतं. कित्येकीचं बालपण महानगरात गेलेलं असतं आणि इथे 12-14 तासांची अव्याहत ड्युटी करत असतात. 

कामगार मंडळींशी खेळीमेळीचे संबंध ठेवतानाच, "वैनी बघतायत" ह्या एवढ्या धाकाने पटापट कामे करवून घेतात. बरोबरीच्या मैत्रिणी उन्हाळा आला म्हणून नवरा आणि पोरांबरोबर थंड हवेच्या ठिकाणी जात असतात, आणि ह्या मात्र धगधगत्या चुलीजवळ रस आटवत नाहीतर गरे तळत उभ्या असतात नाहीतर कडक उन्हात साठं वाळत घालत असतात.. 

आता कोरोना आहे म्हणून सोडा, पण लग्नकार्याचे दिवस असताना लोक नटूनथटून समारंभाला जात असतात तेव्हा ह्या धुवट कॉटनचे कपडे घालून, केसांच्या बुचड्यावर कॅप चढवून कपड्यांवर आमरसाचे डाग मिरवत असतात.

मे महिन्यात माहेरी जाणे ही जनतेची कॉमन गोष्ट असताना- आंबेवाल्यांच्या सुना मात्र माहेरी तर राहोच, दीड महिना घराबाहेर सुद्धा पडू शकत नाहीत.. पार्लर, शॉपिंग हे तर कोसो दूर राहिलं.

 तरुणपणी हेच सगळं अनुभवलेल्या, आता घराची आघाडी व नातवंडं सांभाळणाऱ्या आणि संध्याकाळी दमून घरी आलेल्या मुलगासुनेला चहाचा कप देणाऱ्या सासूबाई सुद्धा मुळात आंबेवाल्यांची सूनच पण त्यांना ह्यात मुरून आता बराच काळ झालाय. पण आत्ताच्या पिढीतील जोडप्यालाही आंब्याच्या दिवसात संध्याकाळी एकत्र फिरायला बाहेर पडणे परवडत नाही.. आंबेवाल्यांच्या सुना हे चालवून घेतात.  कारण ह्या दिवसात सासूसासऱ्यांबरोबर बसून दिवसभराचा आढावा, लिखाण,गप्पा व उद्याचं नियोजन ह्यावर चर्चा करणं अतिशय गरजेचं असतं.. हे त्यांना पटलेलं असतं!

 ज्यांच्याकडे ह्या एवढ्या धामधुमीत सुद्धा रोजचा सोवळ्यात स्वयंपाक, नैवैद्य असतो त्यांचे तर आपण पाय धरावेत फक्त.. आणि ज्यांच्याकडे मे महिन्यात पाहुण्यांचा पाऊस पडतो, आणि सासुरवाशिणीने त्यांची बडदास्त ठेवावी अशी अपेक्षा असते त्यांच्यासाठी- "आता तरी सुधारा रे प्लिज!"

तुम्ही म्हणाल, काय मोठं कौतुक आलंय ह्यात.. स्वतःच्या चरितार्थासाठी तर कावळे चिमण्या पण कष्ट करतात.. खरं आहेच ते. पण- 
तुळशीचं आणि सब्जाचं बी मिक्स झालंय काय करू ?..
उपासाला वांग्याचे काप चालतील का ?..
उजव्या डोळ्याची पापणी दुखते,घरगुती उपाय सांगा...
अश्या गहन विचारात फेसबुकावर वेळ घालवणाऱ्या किंवा महागाई झाली आहे बेरोजगारी वाढली आहे असं आळवणाऱ्या लोकांना दुसरीही बाजू कळवी म्हणून हे लिहावंसं वाटलं..

©ऐश्वर्या पेंडसे जोशी