11 March, 2020

शिमगोत्सव

संकासूराची बायको मेली,
सायाच्या पानात गुंडलून नेली,
सायाच्या पान फाटला,
म्हातारीचा डोस्का आपाटला!!!

आमच्या लहानपणी शिमग्याचे दिवस आले की हे 'अभिजात काव्य'😉 दिवसातून कित्येकवेळा ऐकायला यायचे! ते ऐकायला आले की "संकासूर आला, संकासूर आला असं ओरडत आम्ही तो संकासूर बघायला धावायचो. चित्रविचित्र- चिवटेबावटे कपडे घालून तोंडावर मुखवटा (मास्क) लावून येणारे संकासुर वरील गाणं म्हणत म्हणत घरोघरी नाचायचे.. मग लोक त्यांना काय ते पैसे वगैरे द्यायचे.

आमची आजी त्यांना म्हणायची की "दरवर्षी एकच कसलं रे तुमचं गाणं.. आणि प्रत्येकवेळी बायकोला मारता रे कश्याला??"😂... मग दुसरं काव्य यायचं..
पॅकपॅकपॅकपॅक बदक वराडतो
कोनाच्या घरी जातो...😃

आता हे सगळं अगदी पोरकट वाटतं.. वाढत्या आर्थिक सुबत्तेचा परिणाम म्हणून त्याचप्रमाणे ह्या पोराटकी संकासुरांना काही धार्मिक अधिष्ठान नसल्यामुळे हे संकासुर यायचं प्रमाण आता खूपच कमी झालं. पण त्या वयात व त्या काळात हा प्रकार खूपच मनोरंजक वाटायचा!

ह्याच दिवसात येणाऱ्या पालख्या मात्र अजूनही येतात.. त्यापैकी रेवली नावाच्या गावाची पालखी येते तिच्याबरोबर संकासुर असतो. विशेष म्हणजे हा संकासुर कुणी लहान पोरगा नसून अगदी मोठ्ठा बाप्या माणूस असतो.. त्याचे ते काळे काळे कपडे, उंचच उंच काळी टोपी.. सगळंच आम्हाला तेव्हा अद्भुतरम्य व किंचित भीतीदायक पण वाटायचं, तरी संकासुर बघण्यातली गंमत कधी कमी नाही झाली...

इथे पंचनदीला फक्त 40 किलोमीटर अंतराचा फरक, पण शिमग्याची पद्धत प्रथा थोडीफार वेगळी..इकडे  ह्या संकासुरसदृश सोंग घेऊन येणाऱ्यांना 'नकटा' म्हणतात.. तो बघायचा यंदा प्रथमच योग्य आला. तो नकटा म्हणजे अगदी भीतीदायक प्राणी.. लोकांना, लहान मुलांना घाबरवून सोडतो.. त्याला बघून लोक जोरजोरात किंचाळत पळत सुटतात आणि क्वचित तो नकटा पण लोकांच्या मागून पळत सुटतो, अशी एकूण सगळी गंमत.

नकट्याबरोबर नाच्या असतोच. म्हणजे नऊवारी साडी नेसलेला सालंकृत पुरुष. टीव्ही वर असले चाळे फार झाल्यामुळे ते अगदी डोक्यात जातात पण इथे तसं नसतं. लोकगीते म्हणत त्यावर नाच करणाऱ्या नाच्यांमध्ये लोक साक्षात देवाचं रूप बघतात. हळदीकुंकू लावून, आरती ओवाळून त्याचा सन्मान करतात. मागच्या वर्षी आमचं व नणंदेचं अशी दोन्ही मुलं लहान होती तर सा बा नी नाच्याची ओटी भरलेली- दोघींची बाळंतपणे सुखरूप झाली ह्याबद्दल देवाची कृतज्ञता व लेकरांचं सगळं व्यवस्थित होउदे म्हणून प्रार्थना अश्या अर्थाने. खरं तर नाच्या म्हणजे रोज तुमच्या आमच्यात वावरणारा, नॉर्मल नोकरी व्यवसाय करणारा, बायकोमुलं असलेला संसारी पुरुष. पण शिमग्यात हौसेनी व भक्तभावानी नाच्या म्हणून जातात.

भैरीचा झेंडा येऊन गेला, खेळ्यांचा नाच वगैरे झाले की वेध लागतात पालखीचे. मुर्डीसारखं इथे खूप खूप पालख्यांचे प्रस्थ नाहीये. एकमेव पालखी येते- तीही घरी नव्हे. घराच्या मागे सुपारीचे आगर, त्याच्यामागे नदी, नदीपलीकडे डोंगर चढून गेलं की कलमांची बाग, त्या बागेत असलेल्या वाड्यासमोर पालखी येते. ही आडी गावच्या सातमाय न्हावनकरीण देवीची पालखी.

धुळवडीच्या दिवशी संध्याकाळी तिन्हीसांजेला पालखीचे आगमन. मुर्डीला जसे ढाकुमाकूम ढाकुमाकूम असा साताईचा बाजा वाजतो, ताडीलचा भैरी धाताडधाडधाड  धाताडधाडधाड असा वाजतो, तशी ही सातमाय न्हावनकरीण येते तिच्या बरोबरच्या वाद्यांचे बोल असतात, "ढगाशी बसलाय" 😂😂😂

ते ढगाशी बसलाय ऐकू यायला लागलं की सर्व सरंजाम- ओट्या, पुजेचं साहित्य, प्रसाद, सतरंज्या, सोलर कंदील, पिण्याचे पाणी वगैरे घेऊन नदी ओलांडून डोंगर चढून कलमात जायचं. हळूहळू गावातील आबालवृद्ध स्त्रीपुरुष तिथे यायला लागतात. ज्येष्ठ मंडळी, प्रौढ महिला मंडळ सतरंजीवर बसून घेतं आणि तरुण मंडळी  अजून डोंगर चढून रस्त्यापर्यंत जातात --- पालखीत बसून आपल्याला भेटायला येणाऱ्या देवतेला आणायला म्हणून. आपण पाहुण्यांना आणायला कसे कौतुकाने, प्रेमाने स्टेशनवर जातो, तसेच!

कालही असेच आम्ही पालखीच्या स्वागताला म्हणून डोंगर चढून गेलो. हळूहळू काळोख व्हायला लागला, आणि 'ढगाशी बसलाय' असा आवाज करत, बॅटरीच्या उजेडात पालखी आलीच. झटकन पुढे होऊन अजय- पुष्करने (नवरा आणि दिर) पालखी खांद्यावर घेतली व आम्ही चालत बरोबर निघालो. बिनचप्पलानी काळोखातून दगडधोंड्यातून चालायच्या ह्या प्रथा- माणसाचा कणखरपणा टिकवण्यासाठी आजही तितक्याच उपयोगाच्या वाटतात मला.

दुतर्फा असलेल्या आम्रवृक्षांच्या कमानीतून पालखीने वाड्याच्या आवारात प्रवेश केला. "जय बोला डबुल्या"- असं म्हणतात तिथे😀 बहुतेक पालखी उचलणाऱ्यांना जोर यावा म्हणून वापरला जाणारा शब्दप्रयोग असावा. पालखीच्या खुरांवर दूध पाणी घालून प्रसादकाकांनी पालखीचे स्वागत केलं. सतरंजीवर पालखी विराजमान झाली. मग सासऱ्यानी, प्रसादकाकांनी पूजा केली. घरातील महिलामंडळीनी(म्हणजे आम्हीच) देवतेची ओटी भरून झाली. घरातील सर्वांचे दर्शन घेऊन झाले. मग जमलेल्या सर्व पुरुष मंडळींनी रांगेत दर्शन घेतले आणि महिला वर्गाने तसेच रांगेत येऊन ओट्या भरल्या.

सर्व मंडळींचे दर्शन होईपर्यंत सुरू झाला परत नाचाचा कार्यक्रम. तिथेही नाच्ये आले होते. देवादिकांच्या भक्तीगीतांपासून ते काही वात्रट म्हणावे असे आशय असलेली ती गाणी आजच्या काळातही जमलेल्या गर्दीचे मनोरंजन करत होती. ती कुणी रचली असावीत हा एक कुतूहलाचा विषय आहे. एक नवविवाहित मनुष्य तिथे आल्यावर सुरू झालेल्या गाण्याचे शब्द होते -'" घेऊन चला पतीराज मजला चौपाटीला"😂😂😂  तर "मुंबईची बायको, कोकणचा नवरा, हिला पसंत येईल काय" ह्यात काय ते सामाजिक वास्तव का कायसं दाखवलं असावं🤣🤣🤣 "फ्याशनवाला पती मिळाला फ्याशन मी करते" - असली इंग्रजीप्रचुर गाणी पण त्यात होती..फक्त त्यात नॉयलॉनची साडी हा लेटेस्ट ट्रेंड उल्लेखिला असल्याने त्या गाण्याचा काळ सहज कळून येत होता🤣🤣🤣 एकूण हसून हसून लोकांची भरपूर करमणूक चालली होती. एरव्ही शर्ट-पॅन्ट ची सवय असलेले ते नर्तक नऊवारीसाडी सारखा बोजड प्रकार अंगात असताना जे काय भयंकर चपळ नाचतात की त्यांची पावले जमिनीवर कमी नि अधांतरी जास्त असावीत!

सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर नाचाचा कार्यक्रम संपला. मग खेळ्यांमधील मुख्य असलेल्या एकांनी सर्व भक्तांच्या भल्यासाठी प्रार्थना केली, कुणाचे नवस होते ते देवीला सांगितले. प्रसाद वाटप झाले. पालखीतील नारळ तांदूळ वगैरे नीट आवरून ठेवले गेले.

एव्हाना तरुण मंडळींचे हातपाय सज्ज व्हायला लागलेच होते.. तसेच वादकही सज्ज झाले होते. परत अजय-पुष्कर दोघांनी पालखी उचलली आणि पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग आळीपाळीने एकेकानी पुढे येत बऱ्याच मंडळींनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. अबीरच्या दोन आजोबांनी एका कडेवर अबीर आणि एका खांद्यावर पालखी असे घेऊन नाचवले तेव्हा अबीर तर कमालीचा खुश झाला😍 

बघणारे व नाचणारे ह्या दोघांसाठी हा कार्यक्रम संपूच नये असे वाटणारा! पण वेळेची मर्यादा देवालाही आहेच. त्यामुळे वादन बंद होताच जड मनाने नाचणे थांबले. पालखीला निरोप द्यायला अजय-पुष्कर पालखी खांद्यावर घेऊन काही अंतर चालून गेले व मग पालखी मार्गस्थ झाली.

एव्हाना रात्र बरीच झाली होती. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रप्रकाशात घनदाट झाडीतून परतीच्या वाटेला लागलेल्या पालखीकडे वळून वळून बघत आम्हीही परत फिरलो. पुन्हा पाण्यातून नदी ओलांडून घराच्या दिशेनी निघालो ,तेव्हा अगदी उदास होऊन अबीर मला विचारू लागला, "आई ग, बाप्पा कुठे गेला?" बाकीच्यांच्या मनाची अवस्था मुळीच वेगळी नव्हती

©ऐश्वर्या पेंडसे जोशी




01 February, 2020

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच एका देवळात जाऊन आलो. देऊळ म्हटलं की चकचकीत किंवा बकाल आवार, भाविकांची गर्दी, पूजा साहित्याची दुकाने, प्रसाद-अभिषेक वगैरेंच्या पावत्या, तासन्तास रांगेत उभे राहिलेले भाविक(?) हा असा सगळा माहोल उभा राहतो- तो मला आणि सुदैवाने अजयला सुद्धा नको वाटतो.

पंचनदीच्या जवळच असलेल्या दुमदेव नावाच्या गावात एक गणपतीचं देऊळ आहे. माघातील पहिल्या चतुर्थीला तिथला छोटासा उत्सव. आमचं लग्न झालं त्यानंतर तीनच दिवसांनी हा उत्सव होता, पण तेव्हा घरात पाहुणे पूजा वगैरे असल्यामुळे गेलो नव्हतो. नंतर मग दरवर्षी अजय तिथे आवर्तने करायला जातो. पण माझी वेळ आली नव्हती देवळात जाण्याची. म्हणून मग यंदा लग्नाच्या वाढदिवशी दुमदेव गणपतीला जाण्याचं ठरवलं. तसंही दोघांचीही व्यवसायिक कामं आणि तोंडावर आलेलं दिराचं लग्न यामुळे फिरायला जाण्यासाठी जेमतेम 2-3 तासांचा वेळ हातात होता मोकळा.

मुळात गावच मुख्य रस्ता सोडून आड बाजूला. गावात काही बंद असलेली किंवा काही मोजकी माणसे राहत असलेली घरं आहेत. घरं संपली की गर्द रानातून उतरत जाणारी पाखाडी आणि पाखाडी संपली की छोटंसं कौलारू देऊळ. देवळाच्या गाभाऱ्यात मिट्ट काळोखच होता त्यामुळे गणपती काही दिसला नाही स्पष्ट, पण तिथे असलेली गर्द झाडी, खालच्या बाजूला नदीपर्यंत पसरलेले आगर आणि निरव शांतता ह्यातच खरा देव भेटल्यासारखा वाटला.

परतीच्या वाटेवर एका भग्न घराकडे लक्ष वेधलं गेलं. ऐकीव माहितीनुसार हे त्या गावातील एकमेव ब्राह्मणाचे घर असावे. भिंती, दरवाजे पडझडीला लागलेल्या अवस्थेत, पण त्यामुळे घराच्या आतील रचना स्पष्ट दिसू शकत होती. लाकडी गज, माजघरातून वर जाणारा जिना, मागच्या-पुढच्या पडव्या, कौलारू छप्पर...
अशी घरं बघितलं की नेहेमीच पोटात काहीतरी ढवळून निघतं. कोणे एके काळी हेच घर कदाचित नांदतं जागतं असेल, झोपाळ्यावर ओव्या, अंगाई, पाढे म्हटले जात असतील.. गणपतीत आरत्यानी माजघर दुमदुमत असेल, दारात शिमग्याची पालखी बसत असेल. लग्नकार्ये, बाळंतपणे झाली असतील... 
जर शाळेतल्या निबंधासारखं निर्जीव वास्तूंना मन असेल, तर आपल्याला बघून त्या घराला त्यांच्या मुला-लेकरांची आठवण येत असेल...असा विचार नेहेमी मनात चमकून जातो..परंतु आपण गलबलतोय तेवढे त्या घराचे मालक घराबद्दल विचार तरी करत असतील की नाही कोण जाणे... 
त्यामुळे हे विचार झटकून टाकायचे आणि आपण आपल्या पूर्वजांनी जुनी घरं जतन करता येतील इतकंच बघायचं, बास! 

परतीच्या प्रवासात तिथे भेटलेला देव तेवढा मनात धरून मुख्य रस्त्याला लागलो!
©ऐश्वर्या पेंडसे जोशी