08 June, 2023

घाल घाल पिंगा

महाशिवरात्रीचा उत्सव संपला, आणि आंबा काजूच्या मोहोराच्या वासाने आसमंत भरून जायला लागला. शिमगा झाला, आणि पाडव्यापासून कोकणचा निसर्ग हळूहळू रंग बदलायला लागला. चैत्रपालवी गुलाबी-पोपटी-हिरवी... असं करत करत रंगांची आणि बरोबरीने सुगंधाची उधळण सुरू झाली.

पोरांच्या परीक्षा, बायकांच्या चैत्रगौरी आटोपल्या आणि जो तो कोकणी entrepreneur आपापल्या घरातील उद्योगात बुडून गेला. दिवस मोठे आणि रात्री लहान झाल्या, तरीही कामाला दिवस पुरा पडेनासा झाला. काजूच्या बिया जमवायला कातकऱ्यांची लगबग उडाली. सुटीत रिकामी उंडारणारी पोरंपोरी जमेल झेपेल ते काम मिळवून कमावायला लागली.

कच्ची करवंद मिठात पडली, आमसुलं वाळत पडली. चकचकीत गुलाबी रंगाचा पाक पाघळवत कोकमसिरपची पिंप सजली. एकसारखे चिरलेले गरे चुर्रर्र आवाज करत तेलात उतरले. स्वयंपाकसुद्धा करायच्या आधी फणसरसाचे मिक्सर घरघरु लागले आणि उन्हाच्या पहिल्या कवडश्याबरोबर साठांचे ट्रे मांडवभर पसरले. स्वच्छ दादरे बांधलेली छुनद्याची पातेली उन्हात जाऊन बसली. आंबोशीच्या तुकड्यांची रांगोळी पसरली.

ह्या प्रॉडक्टिव्ह गडबडीत सवड काढून , वेळेचं भान राखत राब, पातेरी, माती लावणे, भाजवणी,  तसेच अक्षय्यतृतीयेला भाजीपाल्याच्या बिया रुजत घालणे ही क्रिएटिव्ह कर्मकांडे पार पडली..

भविष्याची तरतूद म्हणतात तशी पावसाळ्यासाठी फाटी, चौडं, गोवरी भरून झाली. डाळी कडधान्य वाळवून भरून झाली. मीठ- मिरच्या- मसाले- कांडण नुसती धूम उसळली.

एकीकडे माहेरवासिनी आणि पोराबाळांनी घरे गजबजली, पर्यटकांनी हॉटेल्स गजबजली. माणसांच्या उत्साहाबरोबर निसर्गाचा उत्सवही चढत्या भाजणीत बहरू लागला. 

आणि अचानक एकदिवस चकचकत्या सोनेरी आभाळात एक काळपट किनार दिसली. सरड्याची तोंडं लाल झाली, कावळे काड्या शोधत फिरू लागले, मुंग्यांना पंख फुटले, तिन्हीसांजेला पडवीतल्या पिवळ्या बल्ब
भोवती वाळवीची पाखरं पिंगा घालू लागली, पाणकोंबड्या तुरुतुरु धावायला लागल्या, बेडूक मंत्र म्हणायला लागले... रानहळदीला फुलं आली, संध्याकाळच्या वेळी गार वाऱ्याबरोबर कुठेतरी पाऊस पडला की काय अशी शंका यायला लागली आणि कामधंद्यात गर्क झालेल्या माणसांना जून महिना उजाडल्याचा साक्षात्कार झाला!

दिवस रात्रीच्या मधला असो किंवा दोन ऋतूंच्या मधला असो.. संधिकाल कायमच भावनिक करून टाकतो आपल्याला, तसंच झालं. इतकेदिवस कामाच्या व्यापात पार्श्वसंगीतासारख्या मनात वाजत असलेल्या माहेरच्या आठवणी एकदम जोरात यायला लागल्या. 

आजूबाजूच्या झाडांवर पूर्ण तयार असलेले आंबे, आता हलकेच लागलेल्या धक्क्यानेही पटापट गळून पडतात आणि सत्तरी गाठलेली एखादी माहेरवाशीण वय विसरून लगबग करत ते गोळा करायला धावते, तश्या आठवणी धावत सुटतात..

कॅनिंग अंतिम टप्प्यात आलं असेल, आंबा खरेदी बंद केली, म्हणजे आता आंब्याच्या आढ्या पूर्ण क्षमतेने लावल्या असतील, संध्याकाळी सगळेजण दमून भागून चहा-कॉफी घेत गप्पा मारत असतील.. आंबेकाढणीच्या दिवसातलं चित्र डोळ्यासमोर तरळून जातं.. आता पावशी उतरवला असेल, सरव्यातील रायवळखाली खच पडला असेल.. एका अव्वल प्रकारच्या रायवळला बाबांनी कौतुकाने दिलेलं आपलंच नाव.. गोवई, पायरी, फर्नांडिस सगळे घरी दाखल झाले असतील. रोज संध्याकाळी काम संपल्यावर कामगारांच्या हातात खायला दिलेले आंबे, दिवसभर रसात काम करूनही परत रात्री जेवणानंतर घरी गोलाकार बसून घेतलेला आंब्यांचा आस्वाद...

मुलांना झोपाळ्यावर घेऊन रामरक्षा म्हणता म्हणता मन मात्र नुसतं सैरावैरा धावत सुटतं..
"अगं!! प्रत्येक काढणीनंतर क्रेट भरून प्रत्येक प्रकारचे आंबे आले की माहेरचे.. आणि एकदा डोळे मिटून ते खायला लागलीस की तुला हाक सुद्धा मारलेली ऐकू येत होती का?" 

"तुला नाही ते कळणार!! मंगलकार्याच्या मांडवाला कितीही भारी सजावट केली तरी दारावर आंब्याचा टाळाच लागतो की नाही, तसंच आहे हे.. कितीही काहीही झालं तरी आंबा तो आंबाच! त्यातही हापूस हा सर्वांचा बापूस! आणि त्यातून तो माहेरचा म्हणजे काय विचारतोस! एकदा तरी कपड्यांवर ते तेजस्वी केशरी डाग पडल्याशिवाय काही अर्थ नाही कशालाच!"

"चला मग, उद्या लवकरच निघू! सासूबाईंना फोन करून ठेवा, की मऊभात वाढवा सकाळचा."

पावसाची पूर्वसूचना द्यायला आलेला वारा फोनच्याही आधी निरोप सांगायला पुढे जातो😊

©ऐश्वर्या पेंडसे जोशी