22 April, 2015

भाग २
मी केलेली हापूसची कलमे
गेल्या वर्षी एकदा आंबे काढणीच्या दिवसात, संध्याकाळी, वाड्याच्या भिंतीला टेकून उभं राहून खाली बघितलं, आडवे तिडवे हात पसरून वर्षानुवर्ष उन पाऊस झेलत असलेली हि अजस्त्र कलम. लांब सावल्या पडल्यामुळे अजूनच मोठमोठी दिसत होती. कुणी लावली असतील? आजोबांच्या पण आठवणीच्या अगोदर. ह्या झाडांकडे आठवणी आहेत तेवढ्या आजघडीला दुसऱ्या कुणाकडे नाहीत, पण त्या आपल्याला कळणार नाहीत कधीच. तिसरी पिढी इथे आल्याच बघून ह्या कलमांना काय वाटत असेल? कौतुक वाटत असेल कि आयते आंबे न्यायला आले असं वाटत असेल? एक एक विचार मनात येत गेले. काळोख पडत चाललेला आणि समोर शतकभराची साक्षीदार असलेली कलम. सर्रकन काटाच आला एकदम. आपणही जमतील तशी कलम लावायला हवीत असा विचार पण चमकून गेला मनात.
आणि मग पावसाळा सुरु झाल्यावर कलमं भरायची मोहीम सुरु केली. लहानपणी गावातले काकालोक प्रचंड प्रमाणावर कलमं भरायचे ते आठवल, पण ताडपत्रीची शेड आणि त्यात ठेवलेली कलमं ह्याशिवाय डोळ्यासमोर काही येईना. म्हणजे कलमं भरायचं तंत्र आणि पद्धत आठवेना. तेव्हा अगदीच शाळकरी वयात ते काही एवढ बारकाईने बघितलेलं पण नव्हतं.
आंब्याची बाठ मातीत टाकून दिल्यावर त्यातून रोप रुजत, त्याला मोठेपणी जे आंबे येतात, ते मुळच्या जातीचे नसतात. ते सगळे रायवळ. वेगवेगळ्या चवींचे. विशिष्ठ जातीच्या आंब्याचे झाड बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक पद्धतींपैकी एक म्हणजे स्टोन ग्राफटिंग. त्याला बोलीभाषेत कलमे भरणे असे म्हटले जाते. आंब्याच्या रोपावर(माड्यावर) हव्या त्या जातीच्या आंब्याची फांदी(खुंटी) जोडली कि त्या झाडाला येणारे आंबे हे खुंटी ज्या झाडाची आहे तसेच होतात.
आंब्यांचा अख्खा सिझनभर टाकलेल्या बाठा पाऊस पडल्यावर रुजायला लागल्या. कोवळे आणि मऊ तांबूस रंगाचे कोंब बाठीतून वर डोकावले आणि बघता बघता वितभर उंचीचे माडे दिसायला लागले. जून जाड आणि टरटरीत डोळे असलेल्या चांगल्या खुंट्या. धारदार सुरी, ब्लेड, कोरी प्लास्टिकची पिशवी असं सगळ साहित्य जमा केलं. आणि सुरुवात केली. दुसऱ्याला कलम भरताना बघताना ते जितक सोप वाटत तितकं ते सोप नाही ह्याची जाणीव पहिल्या दोन तीन प्रयत्नात झाली. कधी चीर तिरकी पडून माडा फुकट जायचा तर कधी तासून तासून खुंटी संपूनच जायची. कधी गाठ सैल पडून कलम ताठच राहीना.
हि सगळी धडपड बघून दीपकदादाला दया आली बहुतेक, आणि म्हणाला मी दाखवतो ते बघ नीट एकदा. कमीतकमी हालचाल करत आणि माडा, खुंटीला कमीतकमी हाताळत त्याने सफाईने कलम भरले ते इतके झटकन कि काही कळायच्या आत! अमुक नंबरला अमक्याचा नंबर मेसेजने पाठवायचा कसा ते दाखव असं बाबांनी म्हटल्यावर, मी फटाफट बटण दाबून तो मेसेज पाठवून पण दिला, तेव्हा बाबा वैतागून म्हणाले, “अगो जरा सावकाश दाखवा हा. भरभर बटण दाबून काय करता ते कळतसुद्धा नाही” तेव्हा त्यांना कस वाटत असेल ते मला आत्ता कळल.
नंतर प्रयत्न आणि निरीक्षणाने हळूहळू जमायला लागल. वितभर उंच माडा, बाठीसकट, बऱ्यापैकी जाड झालेला, पण कोवळा, तांबूस रंगाची जागा हिरवा रंग घेण्याच्या आधी, असा निवडून धारदार ब्लेडनी सपकन अर्ध्यात कापला कि हातावर चिकाची बारीकशी चिळकांडी उडते. पालवीचा भाग टाकून देऊन बाठीकडच्या भागाला बरोबर मध्यावर उभा छेद देताना सुरुवातीला भयंकर तारांबळ उडायची. नंतर खुंटीला खालच्या बाजूने सुरीने तासून निमुळता पण चपटा आणि टोकेरी आकार दिला कि शाळेतल्या सवयीप्रमाणे पेन्सिल तासल्यावर जस हातावर टोचून टोक तपासायचो, तसा तासलेल्या खुंटीला हात लावायचा हटकून मोह व्हायचा. तो टाळायचा. कारण आपल्या हाताने इन्फेक्शन झाल तर कलम जगत नाही. तासलेली खुंटी उभ्या चिरलेल्या माड्यात अलगद अडकवून प्लास्टिकच्या पिशवीची पट्टी कापून घट्ट बांधून टाकायची. पिशवीत माती भरून त्यात कलम लावायचं. सांधा होतो त्याला पाणी लागू न देता फुलपात्राने  अलगद पाणी घालायचं. आडोश्याला, उन पाऊस लागणार नाही असं ठेवायचं.
एकदा तंत्र जमल आणि मग वेडच लागलं. सारखा तोच उद्योग. पण खरी चिंता पुढेच होती. हि कलम जगतात का नाही हे बघण्याची. रोज सकाळी उठल कि दात घासता घासताच कलमांच निरिक्षण. पहिले चार पाच दिवस झाले तरी काही ढिम्म लक्षण दिसेना तेव्हा निराशाच वाटायला लागली, पण अजून एक दोन दिवसांनी बघितलं तर खुंटीच्या डोळ्यातून एक पोपटी रंगाचा थेंब दिसायला लागला होता, पूर्णविराम असतो तितका बारीक. आश्चर्य, आनंद, उत्सुकता, काळजी, असं सगळ एकदमच वाटायला लागलं. परवापर्यंत हा माडा आगरात होता, आणि खुंटी ४ किमीवर असलेल्या एका प्रचंड मोठ्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर. नुसतं प्लास्टिकच्या पिशवीने त्यांना एकत्र बांधायला आपण निमित्त झालो, आणि आता एक नवीन हापूसच झाड तयार होतंय. मातीतून मिळणारा जीवनरस त्या माड्यामार्फत खुंटीच्या टोकापर्यंत पोचला होता. पुढच्या २-३ दिवसात त्या पूर्णविरामाएवढ्या पोपटी थेंबाची जागा लुसलुशीत पानांनी घेतली. बघता बघता त्या पानांचा रंग गुलाबी, तांबूस, मातकट, पोपटी, हिरवा, कळपट हिरवा असा बदलत गेला. दोन तीन आठवड्यात उंची आणि पानांची संख्या वाढली.
आता त्या कलमांना मोकळ्या आकाशाखाली, उन पाऊस दिसायला पाहिजे, त्यामुळे सगळ्याची रवानगी अंगणात झाली. रांगेने ५०-६०  कलम मांडून ठेवल्यावर, शेजारची मेघनाकाकू कौतुकाने म्हणाली,”ऐश्वर्या कपौंड झकास झालाय हो तुझ” तेव्हा जाम म्हणजे जामच भारी वाटल!

धो धो पावसाच्या धारा झेलताना, जी दुर्बल होती त्यांनी तिथेच राम म्हटला. बाकीची जोरात वाढायला लागली. पूर्ण एक वर्ष त्यांना पाणी लागेल असं बघून पुढचा पाऊस आला (यंदाचा) तेव्हा काही कलम तर कंबरभर उंचीची झालेली. लगेच त्यातली काही प्लेजरवर घेतली, कमपोंडात नेली, आणि खड्डे खणून लागवड झाली सुद्धा! आजोबांच्या कलमांसमोर हि कलम म्हणजे अगदी आजोबांचं बोट धरून चालायला शिकणारी मीच वाटत होते मलाच. ह्या कलमांकडे बघताना अगदी वाकून बघायला लागतंय, काही वर्षांनी मान उंच करून बघव लागेल, आजोबांच्या कलमांसारखीच हि पण कलम मोठी मोठी होतील. त्यांच्यावर चढायला पण कसबी मनुष्य लागतील. मग तेव्हा मी ह्या जगात असेन किंवा नसेन, पण इतकी वर्ष जे भरमसाठ आंबे खाल्ले त्याची परतफेड निसर्गाला आपण काही अंशी तरी करत आहोत ह्याच समाधान झाल. बुंध्यात हाताने माती चेपताना मनात म्हटलं, लवकर आणि भरपूर लागायला लागा रे बाबानो.

19 April, 2015

भाग १ 
आमच्या कलामांच्या बागेशी निगडीत असलेल्या माझ्या आठवणी तीन वर्षे वयापासुनच्या आहेत. तेव्हा घरापासून तिथपर्यंत जायचं तर तीन चार किमी. चालत जाणे हा एकच मार्ग होता. घरातून बाहेर पडल कि लगेचच जी चढण सुरु व्हायची ती शेवटपर्यंत. त्यामुळे चालताना दम लागला कि बाबा कडेवर बसवून घेऊन जायचे. एखाद्या सहलीला निघाल्यासारखा खाऊचा डबा बरोबर घेतलेला असायचा. वरती पोचल कि आधी तो खाऊ खाणे. मग ‘कोल्ह्याच्या पाण्यावर’ जाऊन पाणी पिणे असा कार्यक्रम असायचा. मग बाबांना सगळीकडे फिरून कलमांकडे लक्ष द्यायचं असायचं, आणि आमचं त्राण आधीच संपलेलं असल्यामुळे तिथे वाड्यातच देवजी नानाच्या इथे मला आणि आदितला बसवून बाबा त्यांची काम करायला जायचे. परत येताना बोरं, चिंचा, आवळे, बिया, कोकम, फणस, बिब्बे, हरडे, उंड्या, लिंब, रामफळ ह्यातील ज्याच सिझन असेल ते घरी घेऊन जायचं. आंबे काढणी हा एक स्वतंत्र सोहळा!
हि कलमांची बाग आजोबांच्या अति जिव्हाळ्याची, कारण त्यांनी स्वतः ती घेतलेली. पहिल्यापासूनच त्या जागेला कमपोंड असं नाव पडल! म्हणजे कम्पाउंड. घेतली तेव्हाच त्यातील काही कलमे ५०-६० वर्षाची होती म्हणतात. म्हणजे आज त्याचं वय नक्कीच १०० च्या वर आहे. शिवाय प्रत्यक्ष ज्यापासून काही आर्थिक फायदा होत नाही पण उपयुक्त अशी वड, कळकी, आईन, यासारखी झाडं चिक्कार असल्याने दिवसासुद्धा घनदाटपणा असतो. त्याकाळी झाडं तोडणे म्हणजे डेव्हलपमेंट हि संकल्पना उगवलेली नव्हती. जमीन एका लेव्हलची नाही तर सतत चढ उतार असल्यामुळे सगळा भाग नजरेच्या टप्प्यात येत नाही आणि जास्तच गूढ वाटत. रात्रीच्या वेळी बाऊळ, रानडुक्कर ह्यांचा नेहेमी आणि क्वचित बिबट्याचा वावर चालतो. काळाबरोबर काहीकाही बदल झाले, बऱ्यापैकी अंतरापर्यंत कशीबशी तरी गाडी जाईल असा रस्ता झाला. मोठे झाल्यामुळे कुणाच्याही सोबतीशिवाय एकटच तिथे जाणं हि नेहेमीची गोष्ट झाली.
पावसाळ्यात अनावश्यक रान भयंकर माजत आणि धो धो धो पडणाऱ्या पावसाच्या घनघोर आवाजात सगळ कमपोंड किर्रर्र झालेलं असतं. आधीच पावसाची काळोखी, त्यात वाढलेलं रान. माजत चाललेल्या वेली आणि झुडपं कलमांना वेढून टाकतात, आणि मग सुरु होतो रान तोडणीचा कार्यक्रम. कोल्ह्याच पाणी धोधो वाहायला लागतं. सगळीकडे बारीक बारीक प्रवाह असतात त्यांना ओलांडत कमपोंडात शिरलं, कि कुठल्या भागात काम सुरु आहे हे कळण्यासाठी हुऊऊउ अश्यासारखा आवाज करायचा, प्रत्युत्तर आल कि त्या रोखानी जायचं. आईबरोबर गेल असेल तर काम करणाऱ्या सगळ्यांसाठी आई गोळ्या, किंवा काहीतरी खाऊ देते.
ह्या आमच्या कमपोंडाला लागुनच ग्रामदेवतेच देऊळ आहे. दगडांनी बांधलेल्या सुबक पाखाडीवरून चढून गेल कि घनदाट झाडीत कौलारू दगडी देऊळ दिसत. रायवळ आंबे, कोकम, बकुळ, सुरंगी, अश्यांच्या अजस्त्र वृक्षानी अक्षरशः वेढलेलं. यायच्या जायच्या वाटेला अगदी लागून असलेल भुवन. म्हणजे नागाच वारूळ. रान तोडणी, गवत काढणी, आंबे काढणी ह्या सगळ्याला सुरुवात करताना, ग्रामदेवतेला नारळ न चुकता देणे ह्याच्यावर सगळ्याचा कटाक्ष असतो.
उन्हाळा जवळ आला कि सगळ्या वातावरणाला कायमचाच एक सुगंध व्यापून टाकतो. आठवणीतल्या कवितांमधल्या कवी माधव यांच्या ‘कोकणवर्णन’ ह्या कवितेच्या ओळी प्रत्यक्षात दिसायला लागतात. आंब्याने चिंचेवर सावली धरली म्हणून कोपलेली रातांबी(कोकम), नवयुवतींच्या कोमल गालांसारखे काजू, रानोरानी पिकलेली करवंदे-तोरणे, भुळूभूळू फळे गाळणाऱ्या जांभळी, आणि पोटात साखरगोटे आणि बाहेरून कंटक घेऊन झुलणारा पुरातन रहिवासी फणस. ह्या सगळ्याच्या लोभाने सगळ्याच झाडावर झोके घेणारे वांदर.
हाच उन्हाळा माणसांना निरुत्साही बनवतो म्हणतात, पण इथे घरोघरी सगळ्यांच्याच कार्यक्षमतेत अचानक इतकी वाढ होते कशी हे एक कोडंच आहे. दिवस उगवतो केव्हा आणि भरभर काम उरकताना संपतो केव्हा ते काळातच नाही. बारीक बारीक कैऱ्या दिसायला लागल्यापासूनच कमपोंडातल्या खेपा वाढतात. चोर, माकडं, नैसर्गिक अडचणी ह्यातून पार पडून आंबे उतरवून झाले पाहिजेत हाच विचार. गेल्या वर्षी एकदा आंबे काढणीच्या दिवसात, संध्याकाळी, वाड्याच्या भिंतीला टेकून उभं राहून खाली बघितलं, आडवे तिडवे हात पसरून वर्षानुवर्ष उन पाऊस झेलत असलेली हि अजस्त्र कलम. लांब सावल्या पडल्यामुळे अजूनच मोठमोठी दिसत होती. कुणी लावली असतील? आजोबांच्या पण आठवणीच्या अगोदर. ह्या झाडांकडे आठवणी आहेत तेवढ्या आजघडीला दुसऱ्या कुणाकडे नाहीत, पण त्या आपल्याला कळणार नाहीत कधीच. आत्ता तिसरी पिढी इथे आल्याच बघून ह्या कलमांना काय वाटत असेल? कौतुक वाटत असेल कि आयते आंबे न्यायला आले असं वाटत असेल? एक एक विचार मनात येत गेले. काळोख पडत चाललेला आणि समोर शतकभराची साक्षीदार असलेली कलम. सर्रकन काटाच आला एकदम. आपणही जमतील तशी कलम लावायला हवीत असा विचार पण चमकून गेला मनात.

सिझन संपत असताना झाडबाकी झाली, आणि शेवटचे आंबे घरी आणायचे होते. योगायोगाने आत्या आलेली होती. मी निघाल्यावर म्हणाली चल ग मी पण येते, मग तिच्याच गाडीने आम्ही आंबे आणायला गेलो. क्रेट गाडीत ठेवले आणि देवळात जायला म्हणून पाखाडी चढून वर गेलो. गणपती विसर्जनाच्या नंतर जसं उदास वाटत, तसच वाटत होत, देवळाजवळ पोचलो आणि दाराची कडी काढून आता शिरणार तोच आत कसली तरी चाहूल लागली. देवतांच्या दगडी मूर्तींच्या मागून एक लांबलचक जनावर देवळाची भिंत चढून देवळाबाहेर गेलं. तिथे बाजूला काढून ठेवलेल्या घंटांना त्याचा धक्का लागला आणि एक बारीकसा नाद काही क्षण जाणवत राहिला. जागेवरच थांबून आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो होतो, ते पुढे जाऊन देवाला नमस्कार केला आणि शांतपणे पाखाडी उतरलो. पुढच्या सिझन पर्यंत आणि कायमच दरवर्षीच हा राखण्या आपल्या कंपोडाची राखण करील, असा शांत विचार मनात घेऊन घरी येण्यासाठी गाडीत बसलो.
©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे@मुर्डी

02 April, 2015

कोकडकोंबडा आणि मुंगुस


लहानपणापासून कायम ऐकलेलं कि मुंगुस किंवा कोकडकोंबडा (म्हणजे ज्याला छापील भाषेत भारद्वाज म्हणतात तो) दिसण हे अगदी चांगल. म्हणजे तो दिवस आता अगदी मस्त असणार. काहीही संबंध नाही, पण मला खरोखरच बऱ्याच वेळा ह्या दोन्ही प्राण्याच्या बाबतीत असा अनुभव आलाय. अर्थात मुंगुस किंवा कोकडकोंबडा दिसल्यानंतर पूर्ण दिवस चांगला जाणे किंवा काहीतरी चांगले घडणे, ह्यातील ‘चांगले’ हि संकल्पना वयोपरत्वे बदलत असते.
घरचा अभ्यास पूर्ण झालेला नसताना, आता वर्गात काय होईल हि भीती मनात घेऊन शाळेत निघावं, रस्त्यात अगदी आपल्याकडे बघतच असलेल मुंगुस दिसावं, आणि नेमका तो घरच्या अभ्यासाच्या विषयाचा तास ऑफ मिळावा, कि झालाच तो दिवस अगदी चांगला. इथून सुरुवात झाली. दिवसभर मरमर कष्ट करून पण किती कमी पैसे मिळतात, कसा आणि कधी वाढेल आपला उद्योग हा विचार घेऊन नैराश्याच्या गर्तेत जायला निघावं, त्या विचारात असतानाच माडाच्या झापावर ऐटीत बसलेला कोकडकोंबडा आवाज करून लक्ष वेधून घ्यावा, काही वेळातच ४-५ बायकांचं एक टोळकं घरात प्रवेश कराव आणि “वारली पेंटिंगवाली ड्रेस मटेरियल तुमच्याकडेच मिळतात ना? आम्हाला ती अमकी तमकी म्हणाली, तिने परवा ड्रेस घातलेला तुमच्याकडचा इतका आवडला आम्हाला” वगेरे म्हणत फटाफट खरेदी करून टाकावी. इथपर्यंत ह्या काहीतरी चांगलं घडण्याचा प्रवास होत आलाय.
योगायोग अंधश्रद्धा काय असेल ते असो, पण एक मात्र नक्की, कि मुंगुस किंवा कोकडकोंबडा दिसलेल्या प्रत्येक दिवशी काही चांगल घडेल किंवा नाही, तरी ह्या दोघांपैकी कुणी दर्शन दिल कि त्या क्षणी तरी अगदी मस्तच वाटतं. गंमत म्हणजे जेव्हा अगदी कंटाळवाणा, निराश, उदास, भकास, इत्यादी प्रकारचा काळ असतो तेव्हा नेमकी सगळी मुंगस आणि कोकडकोंबडे कुठे गायब झालेले असतात कोण जाणे! एकंदरीत काय तर वैतागलेल्या मनस्थितीतून बाहेर पडायला काहीतरी कारण म्हणजे कोकडकोंबडा किंवा मुंगुस.
असा विचार करता करता अचानक लक्षात आल असे कोकडकोंबडे आणि मुंगस बरीच असतात. ज्यांच्या आगमनाने किंवा चाहुलीने जाम भारी वाटत किंवा निदान नैराश्य मरगळ ह्याचा तात्पुरता तरी विसर पडतो.
कॉलेजला असताना एकदा फेब्रुवारी मध्ये पुणे दापोली एसटी पकडली रात्री १० नंतर पुण्याबाहेर पडल्यावर थंडीने कुडकुडून सगळ्या लोकांनी काचा बंद केलेल्या. मध्येच जाग आल्यावर कुठे आलोय ते बघाव म्हणून काच उघडली आणि आंब्याच्या मोहोराचा बेफाट वास नाकात शिरला, तेव्हा कळल दापोली जवळ आली, घर जवळ आल, आणि आंब्याचा सीझन पण जवळ आला. एकदम तरतरीत! तेव्हा खाडीवर पूल नव्हता. मी येणार हे घरी माहिती नव्हत. तरीने(होडी) खाडी ओलांडून आल्यावर आता ब्यागा घेऊन घरापर्यंत दीड दोन किमी चालायचं हा विचार करतानाच संदीप दिसला कोकडकोंबड्यासारखा! पहाटे पहिली एसटी पकडून पहिल्या लेक्चरला पोचायला निघालेला, म्हणाला माझी सायकल ने, दुपारपर्यंत आणून ठेव परत.
असे कितीतरी कोकडकोंबडे लोक आणि क्षण. रात्रभर धोधो पाऊस पडल्यावर सकाळी धारोधार भरलेली विहीर, आणि तासंतास पोहोणं.. कित्येक दिवस प्रयत्न केल्यानंतर सायकल दामटत न थांबता चढलेला सावण्याच्या पुळणीजवळचा चढ.. स्वतः तयार केलेल्या आकाशकंदिलाच्या वाऱ्याबरोबर हलणाऱ्या झिरमिळ्या.. शिवरात्रीच्या उत्सवात जीव खाऊन फुंकलेल्या शंखांचा नाद.. होळीच्या पहाटे परतीच्या प्रवासाला लागलेली साताई देवीची पालखी.. मनात चाललेल्या विचाराच तंतोतंत वर्णन करणारं आवडीच गाणं.. लाईट गेल्यावर मिट्ट काळोखात झोपाळयावर बसून म्हटलेल्या कविता.. पावसाळ्याच्या सुरुवातीला काजव्यांनी भरून गेलेली झाडं.. हि सगळी माझी मुंगस.. !
काय कराव आता अश्या विवंचनेत असताना नेमका आलेला अमृताचा फोन.. खऱ्या मैत्रीला जगणारे मित्र मैत्रिणी, फेसबुकमुळे वेव्ह्लेग्थ जुळून मारलेल्या गप्पा आणि मिळालेली मैत्री.. माझीसुद्धा मुलगीच आहेस तू असं म्हणणारी मावशी.. “गावात आता लोक मला तुझी आत्या म्हणून ओळखायला लागले” असं म्हणताना खुश होणारी आत्या.. जावायाची पोरं आल्येत त्यांना करा काहीतरी खाऊ असं म्हणणारे भाऊ(आजोबा), एवढ मोठ झाल्यावर पण लहानपणीसारखेच लाड करणारे मामा.. भरपूर काम केल्यावर दमलीस बाळा असं म्हणून स्वतः चहा करून देणारे बाबा.. काही न सांगता मनातले विचार ओळखणारी आई.. आणि भांडण आणि अबोला झाल्यावर मी सोर्री बिट्टू म्हणायच्या क्षणालाच सोर्री दिदू म्हणणारा भाऊ..
हे माझे सगळे कोकडकोंबडे!..काही सहज भेटणारे,, काही वाट बघायला लावून मग भेटणारे..

माझं एकमेव व्यसन

एक वर्ष बंद केलेला चहा प्यायला सुरुवात केली, आणि चहाबद्दलच्या आठवणी आठवल्या. असं म्हणतात कि आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर अशी एखादी गोष्ट वर्ज्य करावी कि ज्यामुळे त्या व्यक्तीची रोज आठवण होईल. काही जण असं पण म्हणतात कि त्या व्यक्तीला आवडणारी गोष्ट आपण वर्ज्य करायची. गुरुजी जन्मशताब्दीच्या वेळी संघाचे कुणीतरी काका म्हणत होते कि गुरुजीना आवडायचा म्हणून मी चहा सोडलाय, त्यावर एक मित्र “चहा”टळ पणे म्हणाला होता “गुरुजीना आवडायची म्हणून मी शाखा सोडली आहे”
जे काय असेल ते असो, मी आजोबांसाठी चहा सोडला होता. त्यांना आवडणारा हे तर आहेच, पण मला हे बघायचं होत कि मी चहा शिवाय राहू शकते का? म्हणजे चहा पिणे टाळायचे म्हणजे आजोबांची आठवण रोज आलीच.
कोणे एके काळी तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचा भाग म्हणून चहा पिणे हे देशद्रोहाचे लक्षण मानले जायचे. त्याच काळात बहुतेक चहाला “व्यसन” म्हणजे पर्यायाने वाईट गोष्ट समजले जात असणार. नंतर ह्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरीही लहान मुलांनी चहा पिऊ नये हा कायदा होताच. एकंदरीत चहा वाईट असतो हे पटवून देण्यासाठी; चहा पिऊन पिऊन माणूस काळा होतो, एकदा चहाच्या आहारी गेलं कि मग चहा शिवाय पान हलत नाही, आणि वेळेवर चहा मिळाला नाही तर लोकांची डोकी दुखतात इथपर्यंत वाट्टेल ती विधाने मोठी माणसे करत असायची! म्हणूनच कि काय कोण जाणे पण माझी आई आणि मावशी ह्यांनी अजून चहाची चव सुद्धा घेतलेली नाही. त्या दोघी कॉफी टीम मध्ये! साहजिकच मी चहा पिऊ नये असेच माझ्या आईचे पूर्वी मत होते, आणि इयत्ता सहावीपर्यंत मीही चहाला स्पर्श केला नव्हता.
ह्याच्या अगदी उलट म्हणजे बाबा दिवसाला असंख्य कप चहा पीत असतात. आजी तर रागारागाने बाबांना म्हणायची “उद्यापासून मी एक कळशीभर चहा करून ठेवणारे.. त्यात कप बुचकळून भरून घ्यायचा आणि प्यायचा. माझ्या कामात लुडबुड करून एकसारखा चहा करायला सांगत जाऊ नकोस”
आजोबा सांगायचे, चहा प्यायला हवा, कारण आपण कोणाच्या घरी गेलो तर चहा हे सगळ्या थरातल्या लोकांचे पेय आहे, त्यामुळे तेच आपण पीत असू तर आपले आतिथ्य करणे समोरच्याला अडचणीचे वाटत नाही. हीच गोष्ट प्रत्यक्षात घडली आणि माझी चहाशी पहिली ओळख झाली. सहावीत असताना एका मैत्रिणीच्या घरी तिची आई चहा पिण्याचा अतिआग्रह करत होती, आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन असणं शक्य नाही हे तेव्हाही मला स्पष्ट कळत होतं. शिवाय जर अट्टहासाने नको म्हटलं तर मी ब्राह्मण असल्याने तिच्या घरी काही घेत नाहीये असा गैरसमज सहजगत्या तेव्हा तरी नक्कीच झाला असता, आणि ते मला कुठल्याही परीस्थित नको होतं. त्यामुळे “पण अगदी अर्धा कपच दे काय” असं म्हणत कबुल झाले. मनात हजारो वेळा आईला सॉरी म्हटलं, आणि अर्धा कप कोरा गोड चहा नॉर्मल हावभाव करत पिऊन टाकला. घरी आईला भीत भीत सगळ सांगितलं पण मला वाटल होतं तशी आई रागावली वगेरे मुळीच नाही.
त्यानंतर फक्त अश्याच प्रसंगात चहा प्यायला काही वाटेनासं झालं.
अकरावीला पुण्याला गेल्यावर रोज सकाळी चहा प्यायची सवय लागली ती मात्र कायमची. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना चहाची खरी किंमत कळली. दिवसभर कॉलेजमध्ये राब राब राबून झाल्यावर मग रूमवर जायच्या आधी टपरीवरच्या चहाच्या एकेका घोटाबरोबर दमलेला मेंदू तरतरीत होताना जाणवला कि कळायचं कि चहाला उत्तेजक पेय म्हणतात म्हणजे नक्की काय ते.
अश्याप्रकारे पुणे सोडून परत घरी येईपर्यंत मी पूर्ण चहाबाज झालेली होते. बाहेर राहत असताना साहजिकच घरासारखे खाण्यापिण्याचे नखरे चालत नाहीत, आणि मग ज्या ज्या खाद्य वस्तू आहेत त्या न कुरकुरता खाण्याची सवय लागून जाते, खास आवडी निवडी अश्या उरतच नाहीत. पण घरी परत आल्यावर निराश्या दुधाचा चहा हा मात्र अगदी विकपॉइंट बनला. संध्याकाळी सगळी काम आटपली, घरचे सगळेजण घरी आले, कि निराश्या दुधाचा फेसाळ गोड चहा सगळ्यांनी एकत्र पिणे, त्याबरोबर दिवसभराच्या घडामोडी एकमेकांना सांगणे, आणि त्यावेळेला देवासमोरचे निरांजन, उदबत्तीचा वास, घरभर पसरलेला धुपयुक्त धूर हा संपूर्ण दिवसात माझ्या अगदी आवडीचा क्षण.. रोज अनुभवण्याचा..
आमच्या मुर्डीमध्ये तर जणू काही आपले अधिकृत राष्ट्रीय पेय असल्याच्या भक्तिभावाने सगळेजण चहा पितात, आणि लोकांना पाजतात.
ह्या सगळ्या चित्रात आता आजोबा नाहीत, तेव्हा चहा सोडायचा प्रयोग केला, आणि खरोखरच वर्षभरात एकदाही चहा प्यायला नाही. डोकेदुखी, रेस्टलेसपणा असल्या काहीही प्रकारांशिवाय निश्चय पार पडला. ज्यासाठी मुळात चहा प्यायला सुरुवात केली त्याच्यासारखे सामाजिक अडचणीचे प्रसंग क्वचित आले, पण आजोबांसाठी चहा पीत नाही हे कारण पुरेसं संयुक्तिक वाटल्याने कुणी फोर्स केला नाही. एका वर्षानंतर मी पुन्हा चहावाल्यांच्या गोटात प्रवेश केला आहे, माझ हे एकमेव व्यसन पूर्णपणे माझ्या ताब्यात आहे ह्या खात्रीसह!