08 November, 2019

कोण आवडे अधिक तुला

सध्या आमच्याकडे कथाकथन व गायन हे दोन प्रकार सतत सुरू असतात. त्यात आता अबीरला शिंगं फुटायला लागल्यामुळे हे गाणं नको ते म्हण किंवा ही गोष्ट नको ती सांग असल्या फर्माईशी पण चालतात. 

हल्ली तर त्याने काढलेली नवीन थीम म्हणजे- मामाचं गाणं म्हण, दादाचं गाणं म्हण, हम्माचं गाणं म्हण... वगैरे

तर मग जरा डोक्याला ताण देऊन व गुगलची मदत घेऊन त्याला हव्या त्या थीमवर आधारित गाणी आठवली जातात. त्यामुळे परवाच त्याने "बाबाचं गाणं म्हण" अशी फर्माईश केल्यावर "आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला" हे गाणं आठवलं. ते पूर्ण येत नव्हतं म्हणून गुगल करून शोधून काढलं.

लहानपणी आईने म्हटलेलं हे गाणं ऐकलेलं आहे, पण तेव्हा त्यातले संदर्भ नीट कळत नव्हते. आताही ह्या गाण्याची चाल, शब्द, गोडवा हे सगळं खासच आहे, ज्या काळात ग दि माडगूळकरांनी हे गाणं लिहिलं त्या काळाचा विचार करता त्यातील वर्णन सुद्धा कमालीचे चपखल आहे. पण तरीही आता स्वतःच्या मुलाला हे गाणं म्हणून दाखवताना वाटतं की आजच्या काळात किती बदललेत सगळे संदर्भ. 

आणि नेमका ह्याच मुद्द्याला धरून एक लेख फेसबुकवर नुकताच वाचनात आला की, घटस्फोटाच्या वाटेवर असलेल्या आईवडिलांच्या मुलाला वकील विचारतायत की तुला आई आवडते का बाबा... हे अगदीच गलबलवून टाकणारं चित्र!

तरीही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुटुंबात- जिथे आईवडील नीट एकत्र राहातायत, अश्या कुटुंबात चित्र किती आमूलाग्र बदललंय! 

आणि विचार करता करता झटकन लक्षात आलं की चित्रातले आई बाबा दोघेही बदललेत हे खरं, पण बाबा लोकांना अजून बराच वाव आहे बदलायला..

म्हणजे गंमत बघा- ह्या गाण्यात बाबांचे जे प्लस पॉइंट्स सांगितलेत ते आता उरलेच नाहीयेत. कारण ते सगळं आयासुद्धा करू लागल्यात. आता आई भित्री भागूबाई नाही, आता आई सुद्धा मुलांना खाऊ विकत घेऊन देऊ शकते. रिबिनीलाच काय ऍडमिशनला सुद्धा पुरतील इतके पैसे आईही कमावते, आणि घरात बसल्या आईला पैसा दिडकी कुणी देत नाही असं राहिलेलं नाही..  वयाने जरा मोठा असला तरी बाबाला काही आई नमस्कार करत नाही, आणि बाबा घरात आल्यावर भिऊन पदर(?) सावरायला आधी पदर नसतोच उलट, "आलास का? ह्याला घे आता जरा.. मस्ती करून पाय आणि बोलून तोंड दुखतंय माझं." असं म्हणून आया जरा रिलॅक्स होऊ शकतात!!

बाबा लोक सुद्धा पूर्वीपेक्षा खूपच खूप बदलत चाललेत ह्यात वाद नाही. पण सुंदर गाणी गाणारे बाबा घरोघरी असायला लागले तरी बाबा लोकांना तऱ्हेतऱ्हेचे खाऊ सहज बनवता येणं जरा दुर्मिळ आहे अजून.. सुंदर कपडे अमेझॉनवरून मागवताना बाबा लोक साईजच्या अंदाजात तरबेज झालेत हे नक्की.. पण पावडर तिट्टी आणि रिबीन बांधून वेण्या घालणे बाबांना जमते का हा संशोधनाचा विषय आहे😁😁😁 

बाकी "आईचे मऊ साईचे हात" आणि "बाबाच्या मिश्या चिमुकल्या करती गुदगुल्या" ह्यातल्या भूमिकांची अदलाबदल अशक्य आहे🤣 त्यासाठी काहीतरी उत्क्रांती वगैरे झाली तरच, ते जाऊंदे!

तर पॉईंटाचा मुद्दा काये- 
धडा शिक रे तू बैलोबा-- आई जसं मल्टीटास्किंग करून सगळंच जमवते तसंच भविष्यात बाबालोकांना पण जमायला हवंय.. तरच आया तयार होतील बाबासंगे लग्नाला!!!

म्हणजे थोडक्यात काय तर आत्ता ज्यांना लहान मुलगे आहेत त्यांनी आपापल्या मुलांना घरकाम, स्वयंपाक, वगैरे निगुतीने करायच्या गोष्टींमध्ये तरबेज करून ठेवायला हवंय.. म्हणजे ही मुलं बाबा होतील तेव्हा पुढच्या पिढीत तरी आई व बाबा दोघांनाही गाण्यातील प्रत्येक कडवं अवगत झालेलं बघायला मिळेल.. आणि आपण म्हातारपणी जमेल तितकी मदत करूच नातवंड सांभाळायला🤣🤣🤣

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

सांग मला रे सांग मला (ग दि माडगुुुळकर)

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !

27 September, 2019

वाघ

कधी कधी आपल्या हातून इतक्या विनोदी घटना घडतात की स्वतःच्या फजितीवर राहून राहून हसू येत राहतं! आणि ह्या घडामोडीला कुणी साक्षीदार असेल तर बघायलाच नको🤦

इकडे आमच्या परिसरात वर्षातल्या ठराविक काळात बिबट्याचा संचार असतो.  हा पट्टेरी वाघ नसतोच, पण त्याला इमानदारीत त्याच्या "बिबट्या" ह्या खऱ्या नावाने न संबोधता बहुतेक लोक त्याला वाघ म्हणतात😁 तर गोष्टींच्या सोयीसाठी आपण पण त्याला वाघ म्हणू!

मुर्डी-आंजर्ले-सुकोंडी परिसरात देवदिवाळीच्या दरम्यान कुणी ना कुणी सांगतोच की- अमुक ठिकाणी वाघ बघितला. इथे पंचनदी परिसरात पितृपक्ष- नवरात्र ह्या दरम्यान वाघ फिरतो. कुणाला त्याचा वास येतो तर कुणाला त्याच्या पावलांचे ठसे दिसतात. कुणाचा कुत्रा नेलन म्हणून बातमी येते तर कुणाला याची देही याची डोळा दर्शन घडते.

तर सालाबादप्रमाणे यंदाही वाघ फिरायला लागल्याची चर्चा असमंतात सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी अशीच चर्चा सुरू होती, तेव्हा नुकतेच लग्न झाल्यामुळे मी नवीन होते पंचनदी गावात. घरात वाघाबद्दल गप्पा रंगात आलेल्या- सगळे पडवीत बसून.

अजयचे काका सांगायला लागले- "असाच मी नुकताच कसलीशी मिटिंग संपून रात्री घरात येऊन इथे आडवा झालेला! एकदम कुत्र्यांचा आरडाओरडा ऐकायला आला, म्हणून दार उघडून तुळशी अंगणात आलो तर असा तुळशीच्या समोरून वाघ धावता बागेत गेला!"

मुर्डीला साप, विंचू, काळमांजर, मुंगूस, कोल्हा वगैरे घराच्या आजूबाजूला वावरण्याची सवय असली तरी वाघ नक्कीच आवाक्याबाहेरचा वाटला. कारण मुर्डीला घराला घर खेटून असल्यामुळे तशी काहीच भीती नसते.   माझी तर मनातल्या मनात घाबरघाबर झाली ही ष्टोरी ऐकून, एकतर इथे संडास-बाथरूम घराच्या बाहेर, म्हणून ठरवून टाकलं की एकदा रात्री नऊच्या दरम्यान बाथरूमला जाऊन यायचं ते परत पहाटेशिवाय बाहेर पडायचं नाही घराच्या🤦पण हा निश्चय फार काही टिकला नाही. लेकरू झाल्यावर त्याला रात्री बेरात्री शी-शु होणं किंवा उत्सवाच्या काळात खूप उशिरा देवळातून घरी येणं ह्या निमित्ताने वाघ प्रकरण जरा मनातून मागे पडलं.

यंदा लेकरू थोडं मोठं झालं, आजीजवळ राहू शकण्याइतकं- त्यामुळे मी व अजयने थोडे थोडे शेतीचे प्रयोग, आंबा काजू लागवड वगैरे सुरू केली. पहाटे लवकर उठून तासभर शेतात काम करून यायचं असं रुटीन सुरू केलं. पाऊस उताराला लागला तसं सड्यावर भरभर गवत वाढायला लागलं नि गवताने सुंदर पिवळा रंग धारण केला. नवरात्र व पाठोपाठ दिवाळीच्या आगमनाची चाहुलच ती!  बघता बघता आमच्या डोक्याच्या वर उंच गवत वाढलं. प्रत्येकवेळी शेतात निघालो की काका बजावायला लागले- "दोघांच्याही हातात प्रत्येकी एक काठी नि एक कोयती घेऊन जा! एवढाल्या गवतात बसलेला असला तर अगदी जवळ पोचेपर्यंत वाघ दिसायचाही नाही!"

त्यातच इथे गावात राहून रोज दापोली येऊन जाऊन करणाऱ्या एका काकांना परवाच रात्री दापोलीहून परत येताना अगदी डांबरी रस्त्यावर वाघ दिसला असं ऐकलं. आणि मनातून पुसलं गेलेलं वाघ प्रकरण परत थोडंस जागृत झालं कदाचित.

झालं असं की मी आणि अजय प्लेजरवरून जात असताना एका पुलावरून जात होतो. पूल म्हणजे काय, पर्ह्यावर साकव असावा तसाच! त्या पर्ह्यावर पाणी अडवण्यासाठी एक बंधारा आहे, सध्या त्या बंधाऱ्यावरून ओसंडून पाणी वाहत आहे. त्याचा सभोवार गर्द हिरवी झाडी. गाडीवरून जाताना सहज लक्ष गेलं तर तिथे बंधाऱ्यात पाणी अडून झालेल्या जलाशयात काठावर काहीतरी पिवळं पिवळं दिसलं!

"अजय थांबव गाडी, तो बघ वाघ पाणी पितोय!" आता वाघ दिसतोय म्हटल्यावर तर्राट गाडी मारून लांब जावं की नाही? पण अस्मादिकांची हायपर होऊन दिलेली सूचना वजा ऑर्डर शिरसावंद्य मानून नवऱ्याने तात्काळ गाडी उभी केली आणि गाडीवरून उतरून आम्ही भरभर चालत पुलावर आलो- वाघ बघायला😁 एवढे जिम कॉर्बेटच्या जंगलातही वाघ दिसणं नशिबात नव्हतं , तो आता इथे दिसतोय की काय!! आणि बघतो तर काय🤦 पिवळ्या रंगाचा चिवटाबावटा टीशर्ट घातलेले एक सद्गृहस्थ तिथे ढोपरभर खोल पाण्यात उभे राहून - ओणवे होऊन मासे पकडायचा खटाटोप करत होते! चेहेरा जवळपास पाण्याच्या पृष्ठभागाला टेकलेलाच🤣🤣🤣

स्वतःच्याच फजितीवर खोखो हसत आम्ही परत गाडीकडे गेलो आणि ही सगळी गंमत बघत उभे असलेले दुसरे एक सद्गृहस्थ आम्हाला सांगायला लागले, "आरं, तो गरवायला(मासे पकडायला) गेलाय तिथे पाण्यात"

"अजय ते रस्त्यात भेटलेले आजोबा हसत असतील आपल्याला, कायतरी चर्चा पण होईल त्यांची" असं मी म्हणत होते तितक्यात अजय म्हणला, "श्या, पण वाघ दिसायला हवा होता आपल्याला, म्हणजे जंगलात वाघांच्या गावात पण चर्चा झाली असती की ,"आज आम्हाला माणसं दिसली!"

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

25 August, 2019

हरितालिकेची कहाणी

.ऐका हरितालिके तुमची कहाणी
एक आटपाट नगर होतं, तिथे गणेशोत्सव ऐन तोंडावर आला होता व लोक त्याच तयारीत लगबगीत होते. बाल गणेश आपल्या उंदरावर बसून प्रवासाला मार्गस्थ झाल्यावर इकडे कैलास पर्वतावर शंकर व पार्वती माता यांना घर ओकेबोके वाटू लागले. त्यांनी कलियुगात पृथ्वीतलावर कायकाय सुरू आहे हे पहाण्यास जाण्याचा निर्णय घेतला व तेही प्रवासाला मार्गस्थ झाले.

पृथ्वीतलावरील प्रवासाचा योग भगवान शंकर व पर्वतीमातेचा बऱ्याच कालावधीनंतर येत असल्याने त्यांना इथे फार फार बदल झाल्याचे जाणवत होते, व त्याबद्दलक चर्चा करत उभयतांच्या प्रवास मोठ्या मजेत सुरू होता.

विविध गावे शहरे न्याहाळत मार्गक्रमण करीत असता  शंकर म्हणाले, "पार्वती देवी!, आज हरितालिका तृतीया.. तुम्ही वस्तुपाठ घालून दिल्याप्रमाणे कुमारिकांनी करण्याच्या व्रताचा दिवस. पण इथे कुठे त्याचा काही मागमूस दिसेना! लग्न झालेल्या मोठाल्या स्त्रियाच तुमची पूजा करून हे व्रत आचरीत आहेत! आणि उपवर मुली मात्र घराबाहेर फिरताना दिसताहेत"

"अहो! असं काय म्हणता, उपवर मुली बाहेर फिरताहेत म्हणे! त्यांना त्यांची शाळा-महाविद्यालये, शिकवणी वर्ग, नोकरी- व्यवसाय, हे सर्व बघावे लागते आजकाल. अर्थात हे सर्व लग्न झालेल्या स्त्रियांनाही लागतेच हो बघावे, पण जबाबदारी पडली की त्या नेतात सर्व निभावून असे दिसते!"- पार्वती माता

"पार्वती देवी, हे सर्व आपणास कसे माहिती? आणि हे सर्व पुरुषी उद्योग ह्या स्त्रिया कशाकरिता करीत आहेत?"

"अहो काळ बदलतो आहे! आता आपल्या काळात आम्हीही हाच पती असावा म्हणून आपणासाठी हट्ट धरला होताच की! अगदी तपश्चर्या ही केली होती! पण आजकालच्या मुलींसाठी ही तपश्चर्या सुद्धा निराळी आहे बरं. मुलगी उत्तम शिकली आहे ना, स्वतःच्या पायावर उभी आहे ना, अर्थार्जन उत्तम करते ना, सुसंस्कारित आहे ना, तिचे चारित्र्य उत्तम आहे ना, तिला स्वयंपाक येतो ना, घरकाम येते ना, शिवाय दिसण्यात सुंदर व वागण्यात चटपटीत आहे ना .... ह्या सगळ्या प्रश्नावलीत उत्तीर्ण व्हावयाचे म्हणजे अपार कष्ट आलेच- एक प्रकारे तपश्चर्याच की! आता हे सर्व करण्याच्या नादात जर ह्या लेकी-बाळींनी जर नाही केला हरतालिकेचा निर्जली उपवास तर आम्ही काही त्यांच्यावर रागावणार नाही हो!"

"खरं आहे तुमचं म्हणणं पार्वती देवी! पण ह्या अश्या बदलत्या काळात हल्ली इथे लग्न न टिकण्याचे प्रमाण किती वाढले आहे, ह्याची कल्पना आहे का आपणास?

"होय तर.. खरी गोष्ट आहे. पण पूर्वीही स्त्रिया कठोर उपासतापास करूनही मनासारखा नवरा मिळेलच असे नव्हते बरं, आहे तोच चांगला मानून घेत असत त्याकाळी! हल्ली मुली सहन करणाऱ्यातल्या नाहीत!"

"पण मग आत्ताच्या ह्या लेकीबाळीना काय सांगाल तुम्ही?"

हे व्रत फक्त मुलींनीच नव्हे तर मुलांनीही आचारावे असे आहे.

हे काय भलतंच? पार्वतीदेवी! असं कुठे झालं होतं का? म्हणजे तुम्ही काय म्हणताय की चांगली बायको मिळावी म्हणून पुरुषांनीही व्रते करावीत?"

अर्थात! आजकाल मुलींचे लग्न जमणे ही समस्या नाही बरं..  मुलग्यांचे लग्न जमणे ही मोठी समस्या आहे! वर्षानुवर्षांची मानसिकता मुलग्यांनी व त्यांच्या मातापित्यांनी सोडायला हवी.. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण हल्ली लग्न जमवताना वरपिते विचारणा करतात की, " काय हो तुमची मुलगी निर्व्यसनी आहे ना?"--- आता बोला!

काय सांगता काय पार्वती देवी? पण मग ह्या मुलामुलींना तुम्ही व्रत म्हणून सांगाल तरी काय?

ऐका सांगते आजच्या काळात हे व्रत कसं करावं-
हे व्रत एकच दिवस करण्याचे नसून आयुष्यभराचे आहे हे प्रथम लक्षात घ्यावे!

मुलामुलींना बालवयात आईवडील सांगतात ते आपल्या भल्याचे आहे मनात ठसवावे. उत्तम अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे, स्वावलंबनाने स्वतःच्या पायावर उभे राहावे. जमतील तितकी जीवनोपयोगी कौशल्ये शिकून घ्यावीत.

तरुणपणी जोडीदार निवडताना तारतम्य बाळगावे, आईवडिलांना विश्वासात घ्यावे. स्वप्नरंजनापेक्षा वास्तविकतेवर भर द्यावा. नीट विचार करून, एकमेकांना वेळ देऊन आयुष्यभराचा निर्णय घ्यावा. एकदा आपले म्हटल्यावर गुणदोषांसहित स्वीकार करावा. एकमेकांसाठी स्वभावाचे टोकदार कंगोरे दोघांनीही बोथट करावे. एकमेकांच्या कुटुंबियांना दोघानीही आपले म्हणावे, सुखदुःखात सोबत असावे.

एकमेकांचे आरोग्य, एकमेकांचे मनःस्वास्थ्य उत्तम राहावे ह्यासाठी प्रयत्नशील असावे. आपापल्या जोडीदाराच्या वैद्यकीय तपासण्या वेळेवर होतात ना हे पाहावे. जोडीदाराला व्यसनांपासून दूर ठेवावे व स्वतः दूर राहावे. आधुनिकतेच्या नावाखाली वाढीस लागलेला स्वैराचार आपल्या जवळपास फिरकू देऊ नये. एकमेकांना सन्मानाने तसेच मित्रत्वाने वागावे

मनाला प्रसन्नता वाटणार असेल तर पारंपरिक पद्धतीने व्रत जरूर करावे, पण त्याची सक्ती नसावी. आजच्या दिवशी बायकांनी जरी काही खाल्लं तरी त्यांच्या आयुष्यात काही वाईट घडणार नाही... उलट वेळच्यावेळी पोषक व उत्तम आहार घेणाऱ्या स्त्रियाच उत्तम आरोग्य मिळवतील, घरादाराची जबाबदारी सक्षमपणे पेलतील व त्यांची मुलेबाळेसुद्धा तोच वारसा चालवतील. सर्वांची आयुष्य सुखासमाधानाने भरून राहतील.

व्रतानिमित्त एक दिवस वाण द्यायचे तर यथाशक्ती द्या, पण त्याहून महत्वाचे म्हणजे कायमच माणसांशी माणुसकीने वागावे. केवळ सवाष्णच नव्हे तर सर्वच स्त्रियांशी सन्मानाची वागणूक ठेवावी. हे व्रत कधीही विसर्जन न करता आयुष्यभर सुरू ठेवावं  ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

04 July, 2019

सुमारे 12-15 वर्षे लोटली असतील, आमच्या ओळखीत एकांच्या घरी नवजात बालकाचे आगमन झाले व बायाबापड्या निघाल्या बाळांतविडे व ओट्या घेऊन. जनरीतच ती, जाणारच. पण नव्या बाबाचे मित्र, समवयीन परिचित पुरुष मंडळीही हौसेनी 'बाळ बघायला' जाणं हे खेडेगावात तरी जरा नवीन होतं तेव्हा.

काही बुजुर्ग मंडळींची सहज प्रतिक्रिया होती-"त्यात काय बघायला जायचाय, पाय फुटले की ते पोर का घरात बसणारे? दिसेलच की मग इकडे तिकडे धावताना!😄"

बाळ आणि आई एकमेकांबरोबर रुळण्याच्या कार्यात पुरुष व्हिजिटर्स अडचणीचे ठरू शकतात म्हणून पुरुषांनी बाळ बघायला जाण्याची पूर्वी पद्धत नसावी हा एक मुद्दा रास्त वाटतो खरा, पण एकंदरीत बाळ आणि हगोली-मुतोली हे बायकी काम, त्यात लक्ष घालणं हे पुरुषीपणात बसणारं नाही, हाही दृष्टिकोन भरपूर असे.

अर्थात ह्या प्रवृत्तीला खणखणीत अपवाद आमच्या घरातच आहे. माझ्या बाबांनी आम्हा भावंडांचे दात घासणे, जेवण भरवणे, खांद्याशी घेऊन ओव्या/अंगाई म्हणत झोपवणे, पुढे आंघोळ घालून तयाऱ्या करून शाळेत पाठवणे असे सगळे उद्योग हौसेनी केले. पण असे बाबा त्यावेळी अपवाद असत. आमच्या बाबांनाही डॉक्टर किंवा कपडे दुकानदार यांना स्वतःच्या मुलांबद्दल तब्येतीचे, कपड्याच्या मापाचे तपशील  देताना आईला विचारावे लागे ते एक सोडून द्या🤣

बघता बघता एवढी वर्षं निघून गेली. तेव्हा शाळा कॉलेजात असणाऱ्या आमच्यासारख्याना आता मुलं झाली, आणि जाणवलं की पुलाखालून किती पाणी वाहून गेलंय आणि काळ किती बदललाय!

आजच आमच्या दुकानात एक आजोबा आले होते- त्यांच्या नातीसाठी डायपर विकत घ्यायला. हाही एक चांगला बदल. (हे मी खेडेगावाच्या दृष्टींतून लिहीत आहे.) साईज कुठला लागेल हे मात्र त्या आजोबांना माहिती नव्हतं. सूनबाईंना फोन करून विचारायचं तर त्या आजोबांना मोबाईल नंबर पाठ नव्हता. नातीचं वजन किती ते माहिती नव्हतं.

आता हगोली मुतोली ह्या विषयात एक्सपर्ट झाल्यामुळे अजयने पटकन हिशोब करून, ह्या मनुष्याची नात चार महिन्याची आहे म्हणजे 4 ते 8 किलो वजनासाठी असलेला डायपर लागेल हे ओळखून त्यांना दिले.

आमचं पोरगं अगदी बारकं - 2 दिवसाचं-असताना माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये आम्हाला भेटायला आला. तेव्हा तिथे मी, बाळ आणि काकू(सासूबाई) एवढेच होतो. पोग्गुने शी शू चा सगळा रबरबाट करून ठेवलेला तो काकू निस्तरत होत्या. लगेच आमचे बंधुराज पुढे सरसावले, आणि भराभर काकूंना लागेल ती मदत करू लागले. त्या हात धुवायला गेल्यावर ह्याने लगेच कापडाची त्रिकोणी घडी करून त्यात ते गोड गाठोडं पुडी करून बांधलं नि बोबड्या गप्पा सुरु झाल्या मामाभाच्याच्या😍 त्याचं पोरगं तेव्हा 23 दिवसाचं झालेलं आणि हा तब्बल 21 दिवसांचा अनुभव त्याला सिनियर करून मोकळा झाला होता!

पुढे माझी नणंद तिचं बाळ घेऊन 'बाळंतपणा'साठी आली तेव्हा अनुभवी मामा आणि त्याचा भाचा अशी अजून एक जोडी आम्हाला बघायला मिळाली😍 माझा मामा पण मला चमच्याने दूध पाजण्यापासून ते स्वतः माझ्यासाठी दुपट शिवण्यापर्यंत खूप काय काय करत असायचा😍

ह्या सगळ्या बदलाचे चांगले परिणाम ही दिसतायतच- की पूर्वी लोक वडिलांसमोर चळचळ कापत असत म्हणे🙄, मग पुढच्या काळात जरा धाक उरला, आता तर बाबांशी मैत्री आमचीही आहेच, आणि आमच्या पोरांना तर त्यांचा बाबा कुल ड्युड का काय तो असणारे हे नक्की😄

त्याचबरोबर आधी कश्या, "मूल झालं नि सगळं हिंडणेफिरणं, छंद, मित्रमैत्रिणी मागेच पडले" हा सर्रास बायकांचा अनुभव असे. तोही काही प्रमाणात मागे पडतोय. सुरुवातीचे काही महिने पार पडले की पोरं आणि बाबा एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घेतात (ज्यांच्याकडे आजी आजोबा मदतीला- मार्गदर्शनाला  असतात त्यांना तर फारच बरं.) आणि आया त्यांची कामं, उनाडक्या, छंद, पब्लिक रिलेशन्स वगैरे अगदी नीट पार पाडून येतात- हा माझ्यासकट बऱ्याच मैत्रिणी-बहिणी यांचा अनुभव आहे. त्याने जरा बदल मिळतो त्यामुळे मेंदू तरतरीत झाला की बरं वाटतच, शिवाय पोरगं जरावेळ लांब राहून परत भेटलं की नंतर जास्त दर्जेदार वेळ पोरांना दिला जातो हे एक निरीक्षण.

'नवबाबा' असलेले दोन मित्र एकमेकांना भेटले की, क्रिकेट/ राजकारण ह्यांच्या बरोबरीने "तुमचा सोनू काय काय खायला लागला आता? आमचा बाळू अमुक अमुक खातो" किंवा "तुमचा सोनू किती शब्द बोलतो रे? आमचा अजून बाबा काका ह्याच्यापुढे काहीच बोलत नाही" असे संवाद होतात.

सुट्टीच्या दिवशी ही नवबाबा जमात तंगड्या पसरून लोळण्याऐवजी पोराचं कपाट आवरून लहान होणारे कपडे बाहेर काढणे, "चड्ड्या संपत आल्यायत ग पोरग्याच्या आणायला हव्यात, अजून काही कपडे लागतील का आत्ता घ्यायला त्याला" असे सर्व्हे करतात. ट्रीमरने पोरांचे केस कापतात,बेबी नेलकटरने नखं काढतात.. तेवढाच आत्ताच्या आयांना पूर्वीच्या आयांपेक्षा रिलीफ मिळतो. तो रिलीफ आपण घ्यावा आणि बाबा-मुलांना एकमेकांची कंपनी साजरी करायला संधीही द्यावी.

आता हे सगळं चित्र खरं तर घरोघरी दिसत असेल. पण अलीकडेच एक मैत्रीण भेटली, रात्रीबेरात्री बाळ रडताना, बाळाची दुपटी बदलताना नवऱ्याची झोपमोड होते म्हणून गिल्ट घेऊन वावरत असलेली. "अजूनही असं का वाटावं?" असं मनात आलं आणि त्यामुळे हे सगळं लिहावंसं वाटलं.. मी लिहीत असतानाच लेकरू पेंगुळलं आहेच. त्याचा बाबा त्याला खांद्याशी घेऊन झोपाळ्यावर बसलाय- लेकरू त्याला "कोकिळेचा गाना" म्हण म्हणून हट्ट करतंय, आणि बाबा गातोय😍

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

12 May, 2019

नेमेची येतो मग उन्हाळा

"प्रत्येकाला प्यायला फ्रिजमधलं पाणी हवाय, पण रिकाम्या बाटल्या परत भरून फ्रीजमध्ये ठेवायची तसदी कुणी घेईल तर, जणू कुळाला बट्टा लागेल जसा काही!!!"

उन्हाळा सुरू झाला की घरोघरीच्या माताभगिनींच्या तोंडून ही घोषणा हमखास ऐकायला येते! खरं तर इतकी माफक अपेक्षा पूर्ण करणं कितीसे अवघड आहे? पण घरोघरी ही बोंब असतेच असते.

अमृतकोकमच्या कॅनमधून सिरप घेऊन त्याचे सरबत करणे ही पाककृती नुकतीच शिकलेली आमची दोन चिमुकली भाचरे- एका उन्हाळ्यात नादावल्यागत सारखेच फ्रीज उघडून कोकम सरबत करून पीत सुटलेली बघितल्यावर, त्यांच्या पिताश्रीनी खास कोकणस्पेशल विशेषणांनी युक्त अश्या ओव्या गायलेल्या आठवतात- "*****नोss प्या सरबत, नि मग बसा खोकत!"

तर ह्या सगळ्या वादसंवादात अजून एक मोठा घटक असतो तो म्हणजे पंखा😷🤕🤦 मला खरं तर पंख्याशिवाय उन्हाळा सुखाचा असतो खरं तर. किंवा अगदीच घामाच्या धारा लागल्या तर एकवर पंखा- हलकी झुळूक येईल इतपतच! पण काही लोक अगदी पाचावर पंखा लावलेला असतानाही गरम्याने हायहुय करत त्रासलेले असतात.

"देवा देवा, काय पंखा फिरतोय का नाही तेही जळ्ळ कळत नाहीये"- सतत कामात व्यग्र असलेल्या व घामाने निथळत असलेल्या मातोश्री

"आई, तुझ्यासाठी ना आपण दहा खटके असलेला रेग्युलेटर बसवायचा का पंख्याला?"- चुलतभाऊ काकूला

"दीदी! नाटकं नको तुझी, फुल्ल स्पीडवर पंखा लाव आणि तू पडवीत जाऊन बस झोपाळ्यावर"- बंधुराज

"एक खटका वाढवू का गं पंख्याचा प्लिज?" नवरा

"अरेss गरमा काय प्रचंड, आणि पंखा न लावता कसे काय जेवायला बसलेले तुम्ही मला समजत नाही"- धाकटा दीर

असे सगळे जण गरम्याने पछाडलेले पंखाग्रस्त लोक अवतीभवती असताना तुमचं फारसं काही चालत नाही.

"एss इथे पंखा नको हो आत्ता, गॅस फडफडतो आणि धग म्हणून लागत नाहीये"- सासूबाई. हे वाक्य बरेचदा माझा जीव भांड्यात पाडवतं.

"पांडोबा, आत्ता पंख्याची गरज नाही, अगदी प्लेजंट वाटताय इथे. आणि तो खोगीरासारखा जाडा शर्ट घातलायस तो काढून आधी उघडा बस, म्हणजे गरमा व्हायचा नाही"- असं भावाला सांगणारे पिताश्री पण ह्या बाबतीत कधी कधी माझ्या बाजूचे असतात.

"पंख्याचा वाऱ्याने अंगात वात शिरतो, चरबी वाढते- असं आम्हाला वाडवडील सांगत आलेत"- असं म्हणणारी मंगलताई- म्हणजे चुलतसासू ही माझ्या पार्टीतली बाई😄 पण तिच्या ह्या विधानाची चेष्टा करून पंखाग्रस्त वादळी व्यक्तिमत्वे पंख्याचं चक्रीवादळ सोडणार म्हणजे सोडणार! मग आमचे संवाद अगदी ऐकण्यासारखे-

पंखा पार्टी बाहेर पडून गेल्यावर तातडीने मी पंखा बंद केला की, "बरं झालं बाई, अगदी उत्तम काम केलंस" काय तो भणभणाट, काय तो आवाज, देवा रामा!
माझं तर बाई डोकंचं सुन्न होतं रात्रभर, पण ह्यांचं मुळी पंख्याशिवाय जर्रा चालत नाही"- मंगलताई

"अजय पण तसलाच आहे, एकदा माणूस मुंबईकर झाला ना, -तात्पुरता किंवा कायमचा- की गरमा असो वा थंडी- पंख्याचा आवाजच त्यांना झोप लागण्यासाठी मानसिक आधार देतो बहुतेक😓 आणि ह्याला तर सिलिंग फॅन पाचावर असला तरी कमीच वाटतो म्हणून आता तीन खटक्यांचा स्टँड फॅन लावतो.. म्हणजे पाच अधिक तीन असा आठवर पंखा" - मी

कुणी जिवाच्या आकांतानी हाका मारल्या बाहेरून तरी ऐकू यायचं नाही इतका आवाज ह्या पंख्याचा"- मंगलताई

"खरं म्हणजे ना, पुढच्या येणाऱ्या काळात कोणतंही लग्न ठरवताना बाकी सगळ्या माहित्या बोलून घेतानाच 'पंखा कितीवर लागतो' हे विचारून घ्यायला हवं मुलामुलींनी एकमेकांना!" - मी

असे आमचे संवाद ऐकणाऱ्यांचं फक्त मनोरंजन करतात, परिस्थिती बदलत अजिबात नाही.
तरी बरं, जुन्या पारंपरिक कोकणी घरांना एसी बसवायची शक्यता शून्य आहे, नाहीतर माझं काही खरं नव्हतं.

नुकत्याच जन्मलेल्या अबीरला नर्सने ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणला आणि माझ्या आईच्या हातात दिला. पुढचे दोन दिवस हॉस्पिटलच्या ज्या खोलीत आम्ही राहणार होतो त्या खोलीत आई, सासूबाई, अजय, अबीर यांनी प्रवेश केला. पाठोपाठ डॉक्टर आले, त्यांनी खोलीभर सगळे दिवे सूरु केले आणि पाचावर पंखा सोडला. कोंदट वातावरण करू नका असं बजावून ठेवलं. बाळ पण दमून जातं वाटतं जन्माला येण्याचं काम करून🤣

मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात बाळंतपण एन्जॉय करत असताना मला पंख्याची सवय लागली होती- हार्मोनल बदलांमुळे ज्या अनेक गोष्टी बदलतात त्यात हे पण असतं की काय माहिती नाही, कुठल्या पुस्तकात वाचलेलं तरी नाही. पण माझं रुटीन पूर्वपदावर आलं तशी पुन्हा पंखा नको हीच प्रकृती परत आली🤣 तेव्हा कदाचित पोरगं रडायला लागलं की घाम फुटायचा का काय कोण जाणे🤔

आणि आता सगळ्यात कहर हा झालाय- "चला जो जो कलायला" असं म्हणून अबीरला झोपवायला खांद्याशी घेतलं की तो पंख्याकडे बोट दाखवत उंच उचललेला हात गोलाकार फिरवून दाखवायला लागलाय🤦❤️ अजून बोलायला शिकायचा पत्ता नाही तर आत्ताच पोरगं बाबाच्या पार्टीत जाऊन बसलंय🤣

©ऐश्वर्या पेंडसे जोशी