15 June, 2016

अश्या म्हणी..असे भाऊ...😂😂

म्हणी, वाक्प्रचार, शब्दप्रयोग म्हणजे "थोडक्या शब्दात भरपूर आशय" हे तर झालंच.. पण ते कोण वापरताय ह्याच्यावर पण त्यांची परिणीती ठरते कधीकधी.. 

पारंपरिक म्हणी आजी-आजोबांच्याच तोंडी जास्त शोभून दिसतात. आजीच्या सावलीत वाढलेल्या नाती, आजीचे डायलॉग मारतात ते अगदीच विनोदी किंवा वयाला न शोभणारं, वैगेरे वाटतं..
उदा. एकदा माझी आई कुठून तरी कुठे तरी एसटीचा प्रवास करत असताना, एक ओळखीची मुलगी-कॉलेजमध्ये जाणारी- गाडीत होती, तर आईने तिचं तिकीट काढलं. ती तिकिटाचे पैसे द्यायला लागली तर आई म्हणाली कि नको गं पैसे द्यायला.. राहुदेत.
ती ऐकेच ना, म्हणून आई तिला म्हणाली कि, "परतच्या वेळी कधी आपण एकत्र प्रवास करू ना, तेव्हा तू माझं तिकीट काढ, मग तर झालं?"
ह्यावर ती मुलगी-"अग्गोबाई, परत आपण एकत्र प्रवास केव्हा करणार..  म्हणजे कपिलाषष्ठीचा योगच यायला हवा.."
एरवी अजिबात वापरात नसलेला कपिलाषष्ठीचा योग हा शब्द अगदी आमच्या कायमचा लक्षात ठेऊन दिलन तिने😃
नाहीतर विस्मयचकित घटनेवर प्रतिक्रिया देताना आजीने, "अग्गोssबाई माझे!!" म्हणायचं.. आणि आपण त्याच घटनेवर, "आवराss" अशी प्रतिक्रिया द्यायची हा कायदाच आहे जणू काय! तरीही जसे लोणची,मसाले,भाजण्या हे वयाच्या चाळीशीनंतर करण्याचे उद्योग आहेत, त्याचप्रमाणे विशिष्ठ वयानंतर बायका आणि मुली म्हणी वापरू लागल्या तर खपून जातं. 
पोरांच्या दंगामस्तीने हैराण होऊन एक ताई वैतागून, करवादून पोराला ओरडत होती,"आर्य!! गप्प बस, आता लिमिटच्या बाहेर जातायस. अति सर्वत्र वर्ज्ययेत!" हे अगदी सहज स्वाभाविक वाटतं. पण मुलगे अश्या जडजंबाळ म्हणी वापरू लागले तर लईच दचकायला होतं.
असेच दोन लेटेष्ट किस्से-- म्हणींच्या विचित्र वापराचे--
****१****
संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान कॅनिंग संपलं, झाकपाक, आवराआवर झाली. सगळे मदतनीस घरी गेले, एकदोघांचं हातपाय धुणं चालू होतं, ते झालं कि कुलूप लावून निघायचंच..
संध्याकाळचा गारगार वारा खात मी कारखान्याच्या दरवाज्यात फतकल मारून निवांत बसलेले. तर आदित म्हणाला,"अगं ए दीदी! सssरssबरीत.. घरी जा आता, आई एकटी आहे घरी. बाबा आणि मी येतो सगळं आवरून"
हे ऐकून मी ताडकन उठले आणि गाडी काढता काढता म्हटलं, "हो ना, तिची सकाळी साडेपाचपासून जी धावाधाव सुरु होते, ती अजून कामं संपलेली नसणार.. आपण तर घरी जाऊन "घरात आलो" ह्या जाणिवेने रिलॅक्स होतो, तसपण तिचं होत नाही... आणि आपल्या चहा जेवणाच्या वेळा सांभाळून अजून धावपळ करून घेते वर आपल्याला म्हणते कि तुम्ही दमलात!"
त्याच्यावर आदितचं उत्तर-- "ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!!"

*****२*****
दोघे मावसभाऊ राहायला आले होते. गप्पाटप्पा करत आम्ही भावंड एकत्र जेवत होतो. कणादने चिपळूणच्या क्वालिटी बेकरीचा केक, आणि गौरवने मुंबईच्या पणशीकर दुकानातला खाऊ आणलेला, त्याचा दोन्हीचा एकेक तुकडा प्रत्येकाच्या ताटात वाढला होता. कोणीतरी म्हणालं, "हे सगळं भयंकर हेवी होताय.. ह्या दोन्हीत जबरदस्त कॅलऱ्या असणार नक्की!"
मी म्हणाले- "मरुंदेत त्या कॅलऱ्या.. सध्या आपण(आपण म्हणजे अस्मादिक) भरपूर कष्ट करून जळवतोय त्या सगळ्या कॅलऱ्या.. काही विचार नको करायला एवढा."
कणाद महर्षी उवाच-- "हम्म!! बरोबर आहे... ज्याचं जळतं, त्यालाच कळतं!"

No comments:

Post a Comment