30-12-2013
स्टार प्रवाह वर पुन्हा एकदा अग्निहोत्र सिरीयल सुरु झाली आहे. ‘कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ..’ असे टायटल सॉंग परत एकदा दिसले आणि मन झर्रकन ४-५ वर्षापूर्वीच्या काळात जाऊन पोचले. रटाळ टी व्ही सिरीयलच्या जंजाळात आवर्जून बघावी अशी हि एकमेव होती.
तेव्हा होस्टेलमध्ये राहत असल्यामुळे सगळे एपिसोड बघता आले नाहीत, पण अमृताकडे राहायला गेल्यावर हमखास बघणं व्हायचं. त्यात परीक्षा सुरु असेल तर आम्ही दिवसभर हातात वही घेऊन चिक्कार गप्पा मारलेल्या असायच्या, आणि मग मात्र अधिकृतपणे अभ्यास बाजूला ठेऊन सिरीयल बघायची म्हणजे अपराधी वाटायचं. मग नेमका त्या वेळेत अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आल्यावर जेवता जेवता बघायचो. तेही जमल नसेल, तर अपूर्वा म्हणायची “काल अग्निहोत्र कसल भारी होत माहित्येय,,(रोजच भारीच होतं म्हणा!) तुम्ही उगाच मिस केलत..” आणि मग स्टोरी सांगायची.. (त्यात अगदी डायलॉग,बॅकग्राउंड म्युझिक आणि सगळ्या पात्रांच्या हावभाव आणि कपड्यांपर्यंत तपशील आम्हाला कळायला हवे असायचे!😉)
रोजच्या जगण्यात एखादा माणूस अत्यंत पाताळयंत्री आहे असं म्हणायचं असेल तर “तनाने काळा मनाने काळा” असं म्हणणे, कुणाला फोन न वाजताच वाजल्यासारखा वाटला तर “भासेस” होतायत तुला असं म्हणणे असल्या सवयी लागल्या होत्या. एवढच कशाला, गावोगावी असलेल्या नातेवाईकांना आवर्जून शोधायची, भेटायची जुनी सवय असल्यामुळे माझ्या बाबांना ‘आमच्या कुटुंबातला हा निळ्या आहे’ असा किताब घरातल्या आज्यांकडून मिळायला लागला!
नील, वैदू, सई, मंदिरा, अभिमन्यू, मंजुळा, उमा बंड, सगळे लोक जाम भारी वाटायचे. महादेव काका तर सगळ्यात बेस्ट. त्याच्या त्या भाडेकरू बाई आणि त्यांचा पोरगा, ‘तनाने काळा, मनाने काळा’ कृष्णा, बाप्पा आणि त्याची बायको, सगळे एकाहून एक नग होते.
रोज काय घडतंय ह्याची उत्सुकता असायची. फक्त चित्रपटात घडू शकतात अश्याच घटना, पण संवाद आणि वातावरण ह्यामुळे सगळ काही अगदी तुमच्या आमच्या घरातलं वाटायचं.
खर तर, दोन मैत्रिणींची नातवंड ओळख देख नसताना भेटणं आणि त्यांच्या दोघांच्या बाबांचं आपसात हाडवैर, परागंदा होऊन सिनेमात काम करायला गेलेला काका, नाचणाऱ्या बायकांच्यात लहानाची मोठी झालेली चुलत बहिण, नक्षलवाद्याबरोबर राहणारी आत्या हे असलं काहीही तुमच्या आमच्या घरात घडत नसत.
पण वर्षानुवर्ष वाड्यात राहून सगळ्या इतिहासाचा सक्षिदार झालेला महादेव काका, सगळ्या कुटुंबियांना एकत्र आणण्यासाठी आणि गणपतींचा शोध लावण्यासाठी धडपड करणारा निळ्या, शून्यातून विश्व उभं केलेले चिंतामणी आणि सदानंदराव, तुमच्या आमच्या आयांसारख्या सोज्वळ मृणाल आणि रोहिणी सगळे एकदम वास्तवातले वाटायचे. प्रभा आणि लक्ष्मीची मैत्री पण सॉलिड आणि त्या काळात त्यांना सपोर्ट करणारे आप्पा तर ग्रेट!
पूर्वजांच्या इतिहासाच्या मुळापर्यंत जाण्याची कोकणस्थी हौस(खाज खरं तर😉) आणि त्याच वेळी काळाच्या पुढचे विचार, बंडखोरपणा, व्यवहारी- काटकोनी- सणकीपणा आणि कोकण सोडून कितीही पिढ्या गेल्या तरी जीन्समधून वहात आलेली ध्येयवेडी वृत्ती हे सगळे गुणविशेष सर्वदूर आहेच पण ते मालिकेत बघणं खूपच मोहक, भुरळ घालणारं होतं! आप्पांसारखे द्रष्टे, धीरोदात्त कुटुंबप्रमुख, मोरूकाकासारखा आधारवड आणि धर्मा गुरवांसारखा हितचिंतक प्रत्येकाच्या घराला असावा...
शेवट गोड झाला- सगळ्या भावंडांचा शोध लागला, सगळ्यांची गोडी झाली, दिनेशचा राग निवळल्यामुळे नील-सई, अभि-मंदिराचं मार्गी लागलं हे एक खूप छान झालं.
डे1 पासून अदृश्य असूनही, प्रत्येक एपिसोडमध्ये सतत दिसत राहिलेले दिग्दर्शक सतीश राजवाडे इन्सपेक्टर दुष्यंत बनून दिसले तेव्हा म्हणजे... विक्रांत भोसलेच्या अचानक एक्झिटमुळे झालेल्या आमच्या निराशेवर उतारा झाला होता... फक्त,, फक्त शेवटी मोरू काकाचा आशीर्वाद घ्यायला, उमा बंडबरोबर अग्निहोत्रींचा भाचेजावई म्हणून दुष्यंत वाड्यावर असला असता तर खूपच जास्त आवडलं असतं!