कालचीच गोष्ट-- दिवसभर 12-14 तास ड्युटी करून, कॅनिंग संपवून संध्याकाळी घरी आल्यावर अक्षरशः तंगड्या गळ्यात आलेल्या.. तहान, भूक 'लागते' तशी- त्याहून जास्त - आंघोळ 'लागलेली', तरीही तश्याच आमरसात बरबटलेल्या कपड्यानीच एक चहा मारून मग आंघोळया आवरून आम्ही जरासे माणसात येतो.. टीव्ही,पेपर वगैरे कशातही जीव रमत नाही, अर्धमेला मोबाईल चार्जिंगला लावून मग, दिवसभराचे धावते अहवाल-आढावे, गमती जमती एकमेकांच्या कानावर घालत घालत दोन घास आमटीभात ओरपुन वर आंबे हाणून झाले कि जरासा मोबाईल घेऊन नेटवर एक फेरफटका मारावा म्हणून निघावं, तर केव्हाच मोबाईल हातातून गळून पडतो तेही समजत नाही...
पुन्हा जाग येते, तेव्हा असं वाटत असतं कि काही मिनिटचं झोप झाली फक्त, पण प्रत्यक्षात दुसरा दिवस सुरु झालेला असतो..
आजचा दिवसपण असाच सुरु झाला, पण उठून बाहेर बघितलं तेव्हा, कधीतरी पहाटे पाऊस पडून गेल्याचा शोध लागला..
"ऑ!! पाऊस??"
असं म्हटल्यावर "आत्ता का कळलं??" अशी आईची प्रतिक्रिया मिळाली..
पहिल्या पावसाचं स्वागत आम्हाला कधीच, "ऑसम,कूल,वॉव" वगैरे म्हणून करता येतच नाही.. लगेच भजी,ट्रिप,ट्रेक हा तर विचार पण नाही..
"आगोटची कामे" संपल्याशिवाय पावसाने येऊ नये असंच वाटत राहत.. परीक्षेत जस शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास पूर्ण झालाय असं कधीच वाटत नाही, तस हि आगोटची कामं पण कधीच संपत नाहीत.. तरीही परीक्षा जशी ठरल्या वेळी येतेच तसाच पाऊस पण एखाद्या कर्तव्यकठोर तरीही विद्यार्थीप्रिय शिक्षकासारखा हजर होतोच...
उनाड विद्यार्थी परीक्षेच्या वेळी "देवा मला पास कर" म्हणतात, तसे लवकर आलेल्या पावसाला दहीभाताचा नैवैद्य दाखवून सांगतात,"थांब रे बावा जरा, एवढी आमची आगोटची कामं होऊंदेत, मग लावणीच्या वेळी भरपूर पड हो!!"
पावसाच्या आधी आंबे उतरवून झाले पाहिजेत, हा परीक्षेतील सर्वात जास्त imp.. गवत-पेंढा-फाटी-गोवरी भरणे, छपराच्या कौलांची डागडुजी, पावसाचे पाणी घराच्या भिंतींवर येऊ नये म्हणून बाहेरच्या बाजूनी झड्या काढणे(छपराला एक्स्टेंशन) अजूनही रखडलेल्या असल्यास शेताच्या भाजावणी एक ना अनेक..
स्कॉलर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासारखे काही लोकांचे हे उद्योग वेळच्यावेळी पूर्ण होतातही, पण ऐन वेळेची धावपळ हि होणारच!!
आमच्याकडे तर परीक्षा तोंडावर आली तरी खेळात रंगलेल्या उनाड पोरासारखं, आम्ही कॅनिंगमध्ये रमलेलो असतानाच कधीतरी अकस्मात हा पाहूणा हजर होतो.. रात्रीचा आला तर मुक्कामाला थांबतो, आणि मग "अरे जनरेटरवर प्लॅस्टिक पांघरलंय का रे?" "मोटारी (यंत्रं फिरवणाऱ्या विजेच्या मोटारी)कोणत्या उघड्या नाहीत ना रे?" अश्या चौकश्या आणि धावपळी सुरु होतात..
यंदा ह्या सगळ्या खबरदाऱ्या आधीच घेऊन झालेल्या असल्यामुळे, पावसाच्या येण्याने काहीच हलचल माजली नाही.. गाढ झोपेत मातीचा सुगंध पण जाणवला नाही आणि पत्र्यावर ताडताड वाजलेला ताशा सुद्धा ऐकायला आला नाही..
पहाटे आलेला पाहुणा मुक्कामाला राहिला नाही, सकाळ होताच निघून गेला, आणि आज सकाळी ओल्या चिप्प रस्त्यावरून, ओलसर-हिरवट वास नाकात भरून घेत, धुतल्या गेलेल्या स्वच्छ झाडांकडे बघतबघत आम्ही रोजच्याप्रमाणे ड्युटीवर पोचलो..
दिवसभर पुन्हा कॅनिंगच्या धुमधडाक्यात ह्या पावसाबिवसाचा पूर्ण विसर पडला.. टरर्र, खर्रर्र, फस्सस, चर्रर्र, ए- गप्पा नंतर मारा आत्ता काम चालूंदे, 5 नंबर मध्ये साखर, 48 किलोची पावती, 26 तारखेची आढी, नळ बारीक करा, पटपट आटपा, क्रेट धुवून झाले का? चला चपला घालून साली-बाठी टाकायला--- हे असे असंख्य काय काय काय काय आवाज करत दिवस संपला....
संध्याकाळी कित्येक दिवसांनी 7 च्या आत घरात येणं झालं, येताना वाटेवर पुन्हा तो अदृश्य पाऊस दिसला.. आणि तारखेचं, ऋतूचं, वेळ-काळाचं भान आलं!!
सूर्य तर स्पष्ट होता--अजून काम संपायला अवकाश आहे.. बरंच काम शिल्लक आहे..
पण काळे ढग त्यांचं अस्तित्व ठळक करून दाखवत होते-- आता पटपट आटपा, आम्ही आलोय!!
कुणाच्या शेतातून उठलेले भाजवणीच्या धुराचे लोट,, एखादीच अलगद गिरकी घेऊन निश्चल तरंगत होते--- शेतीचे दिवस जवळ येतायत, लक्षात आहे ना??
समुद्र धीरगंभीर आणि शांत-- हालचालीपूर्वीची स्तब्धता...आता पाऊस येईल, शेतीची कामं, कॉलेजं सुरु होतील, कामगार तिकडे मोर्चे वळवतील, एकूण मुडच बदलेल, आत्ता रुटीन बनलंय ते बदलेल, आता समुद्र खवळेल, माणसांनी शांत व्हा, काम आवरा भरभर!!!
सगळ्या आसमंतात पिवळं,सोनेरी,हिरवं,काळं,धुरकट,चमकदार असं संमिश्र वातावरण भरलेलं...
तुरुतुरु धावत पाणकोंबड्या दिसायला लागल्यायत, आणि हि पोस्ट लिहिताना कोल्हे जोरात आरडाओरडा करतायत!! पाऊस जवळ जवळ येतोय!!!
दरवर्षीचचं चक्र,पण पुन्हापुन्हा तेच अप्रूप, पुन्हा पुन्हा तेच कौतुक!