कोकणातल्या गावागावातून होणारे उत्सव ही त्या त्या गावासाठी एक पर्वणी असते.. वर्षभरासाठी पुरेल इतकी ऊर्जा मिळवून देणारे.. आपापल्या गावातल्या उत्सवाबद्दल प्रत्येकाला विशेष आत्मीयता असते जिव्हाळा असतो.
मोठ्या वयात लग्न झालं की अचानक सासरच्या गावाला, उत्सवाला आपलं समजणं जरा कठीण किंवा वेळखाऊ ठरत असावं. वर्षानुवर्षे माहेरच्या उत्सवात, तिथल्या माहोलात आपण रममाण झालेलो असतो, ते सोडून दुसऱ्या वातावरणात सामावून जाणं हे मोठ्या वयात जर जडच जातं. यंदा पंचनदीला दत्तजयंती उत्सवात सहभागी होण्याचं माझं दुसरं वर्षं. पण यंदा हा उत्सव गेल्यावर्षीपेक्षा जिव्हाळ्याचा वाटू लागायला कदाचित कारणीभूत ठरला तो माहेरचा सख्खाशेजारी कीर्तनकार तेजसबुवा जोशी!
तेजसच्या किर्तनातल्या करियरला एक वर्ष होत आलं, तरी त्याचं कीर्तन ऐकायचा योग आला नव्हता. त्यामुळे यंदा दत्तजयंतीला मुर्डीच्या तेजसबुवांचं कीर्तन आहे हे ऐकल्यावर खूपच आनंद झाला. लहानपणापासून बघितलेला एवढासा तेजस, किर्तनकाराच्या भारदस्त लूकमध्ये बघून आधी मजा वाटली त्याचबरोबर, 'टाइम फ्लाईज' हे परत एकदा जाणवलं.
"तुला खडीसाखर, लवंग, गरम पाणी किंवा तत्सम काय काय लागेल?" असं विचारल्यावर "गरम पाणी चालेल थोडसं असलं तर" असं अत्यन्त विनोदी आणि तितकंच निरागस उत्तर बुवांकडून मिळालं😃
अतोनात उत्सुकतेपोटी अगदी पहिल्या सेकंदापासून कीर्तन अनुभवायला मिळावं म्हणून वेळेआधीच देवळात पोचलो आम्ही. नेहेमीची कवनं, पदं झाल्यावर विविध जयजयकार करताना भारतमाता, शिवाजीमहाराज यांचा समावेश असणार हे माहितीच होतं, तसंच झालंही! विमलेश्वराचा उल्लेख ऐकून क्षणभर मुर्डीच्याच उत्सवात आहोत का काय असाही भास झाला!.
दु आ तिवारींची जोशपूर्ण संग्रामगीते कीर्तनात उठाव आणत होती. 'एक काळ ऐसा होता' जेव्हा लोक एकत्र जमून देशाची चिंता करत होते. "ऐश्या वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, समर्थ सद्गुरू वाणी, दुमदुमली ती सर्वत्र, जयजयरघुवीर समर्थ" या सगळ्यामुळे फार चांगली वातावरणनिर्मिती झाली.
'मरावे परी किर्तीरूपे उरावे' हा श्लोक निरुपणाला घेतलेला ऐकताच खात्री पटली की कोणत्यातरी राष्ट्रपुरुषावर किंवा क्रांतिकारकावर आख्यान असणार. त्याचप्रमाणे उत्तररंगात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवन्त फडके यांचा जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा समोर उलगडत गेला.
कितीतरी नवीन गोष्टी, घटना यांची माहिती मिळाली. वासुदेव बळवंत यांच्या बालपणापासून ते एडन येथे त्यांनी भोगलेल्या शिक्षेपर्यंत.. तेजसने केलेले सखोल वाचन, मुद्यांची अचूक मांडणी, उदाहरणे देऊन झाल्यावर पुन्हा अलगद मुद्द्यावर येणे ह्या सगळ्यात कमालीची सफाई व प्रगल्भता जाणवत होती. मजकुराच्या भावार्थानुसार आवाजातले व देहबोलीतली बदल यातून त्याच्यातील अभिनेता दिसत होता.
अत्यन्त अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने बोलताना सुद्धा असं कुठेही जाणवत नव्हतं की 'अरे हा विशी पंचवीशीचा मुलगा काय हे बोलतोय उपदेशासारखं'.. उलट समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून किर्तनाकडे बघायला गेलं तर तेजसचे हे कीर्तन अगदी आयडियल म्हणायला हवं. वासुदेव बळवंतांच्या काळात जशी, "आज अमुक वाजता शनिवारवाड्यावर अमुक यांचे व्याख्यान आहे होssss" अशी दवंडी पिटली जात असे व लोक व्याख्याने ऐकायला जात असत, तशीच आज तेजससारख्या काळोचित किर्तनकाराच्या कीर्तनाची दवंडी पिटवून जाहिरात करायला हवी. (तीच सोशल मीडियावरून मी करत आहे असं समजायला हरकत नाही)😊
त्यानेच कीर्तनात उल्लेख केला, त्याप्रमाणे मेकॉलेच्या शिक्षणातून शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांचा चोर लुटारू म्हणून उल्लेख केला गेला होता, तरीही हे खोटं आहे असं बालमनावर ठसवणारी एक समांतर संस्था पूर्वी अस्तित्वात होती- ती म्हणजे आजीआजोबा. आज ही प्रेमळ संस्था प्रत्येकाच्या वाट्याला येत नसते(किंवा सिरीयल बघण्यात बिझी असते😓) हे खरं, पण आपल्याच पिढीचा एक मुलगा हे कीर्तनातून मांडतोय ते आवर्जून निदान ऐकण्याचे संस्कार आईवडिलांनी नक्की करायला हवेत. आपल्यासारखाच स्मार्टफोनच्या युगातील मुलगा अडीच तीन तास अभ्यासपूर्ण बोलतोय गातोय, ते निदान मांडी न हलवता बसून ऐकायची कुवत मुलांमध्ये निर्माण करायची अत्यन्त गरज वाटली, आणि ही आमच्यासारख्या नवपालकांची जबाबदारी आहे.
तर बुवा, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! अशीच तुमची उत्तमोत्तम कीर्तने आम्हाला ऐकायला मिळोत, आणि त्यातून काहीतरी शिकण्याची पुढच्या पिढीला बुद्धी मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना! --^--
©ऐश्वर्या पेंडसे जोशी