17 June, 2016

गोदागौरव

गोदागौरव- कवी चंद्रशेखर (चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे)

जन्म : नाशिक, २९ जाने.१८७१ — मृत्यू : बडोदे, १७ मार्च १९३७

तुज हृदयंगम रवे विहंगम-भाट सकाळी आळविती,
तरू तीरींचे तुजवर वल्ली पल्लवचामार चाळविती;
तुझ्या प्रवाही कुंकुम वाही बालरवी जणू अरुणकरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी, ..१..

अवयव थिजले शरीर भिजले उठले रोम तृणांकुरसे,
सद्गद कंठी बुद्बुद करिते वचन घटोन्मुख नीर जसे;
अधर थरारे अश्रुमलिनमुख हो मतीसंकर मदन्तरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी ..२..

मधुमासामधि मधुर हवा ति, स्पर्श मधुर तव मधुर चवी,
सायंप्रात: सेवियली ती साखर वानिल केवि कवी?
किती कितिदा तरि तरंग तुझिये अवलोकीयले म्या नवले!
अभिनव तनुला जलकुंभ्यासम ताववगाहन मानवले..३..

अस्तोन्मुख रवि कुंकुम, केशर, चंदन वाहुनिया तुजला,
वसंतपूजा करिता तूझी तासावरुनी दिसे मजला;
करिती झुळझुळ विंझणवारे या समयी तुज त्या झुळकी,
संध्या करिता रमवि तुझे हे दर्शन देवि ! सुमंजुळ की ! ..४..

गंगे ! येत ग्रीष्म दिनान्ती पवनहि तव जलकेलि करी,
जे रवितेजो-ग्रहणे करपति, ते कर चंद्र तुझ्यात धरी;
मासे तळपति, तरंग झळकति, तुषार चमकति, जेवि हिरे !
या समयाला रूप तुझे ते दिसते रम्य किती गहिरे..५..

लंघुनि तट जे प्रावट्काली सैरावैरा धावतसे,
तवौदार्यते असीम होऊनि सलील वाहे सलिल नसे;
तल्लीलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनि ! कवि कवण तरी?
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी ..६..

वरि घन बरसतिधो धो, इकडे महापुराच्या घनगजरी
“कृष्ण कृष्ण” जण, “झन चक झन चक,” टाळ मृदंगहि दंग करी
अभंग- गंगा जणु शतधा ही वाहुनि मिसळे त्वदंतरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी ..७..

परिसर जलमय, वनकुसुमानी झाकुनि जाती कुंप, वया,
उभय तटीची हिरवी, चित्रित, शेते डोलती ज्या समया
तव तृण धान्ये, सुमने, सुफले, सुचविति चंगळ ही अगदी !
गंगथडीचे रंगुनि राहे मंगलरूपचि भाद्रपदी ..८..

सायंकाली स्फटिकविमल तव गंगे ! जल नहि वानवते
या समयाला सुधाकराचे वैभव त्यातून कालवते
नयनमनोरम तरंगतांडव रसरुपी शिव करूनि हंसे
स्वर्गंगेचे प्रतिबिंबचि जणु गंगा होऊन हे विलसे..९..

हिमऋतूमाजी प्रभातकाली बाष्प तवौघावर तरते,
सकरुण वरुणे शाल धवल ते भासे घातलि तुजवरते;
जणु म्हणुनिच जे सुखोष्ण लागे गे ! मज घे घे त्या उदरी            
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी..१०..

शिशिरामाजी गांगहि शिशिरचि, करी हिमाची बरोबरी,
ताप दुजे हिम हरिते परि ते भवतापाते काय करी?
तया गदावरि गदा बसे ह्या- ह्या अगदाची निरंतरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी..११..

******************************

जीवनदायीनी गोदावरी नदी, वेगवेगळ्या ऋतूमध्ये तसेच दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी दिसणारी तिची वेगवेगळी रूपं, तिच्यावर अवलंबून असलेलं लोकजीवन आणि लोकांच भावविश्व, ह्या सगळ्याच वर्णन करून शेवटी हि नदी आमची आई, हि नदी देवता, काठावरच्या लोकांच्या जगण्याची संजीवनी, आणि तिच सगळ्या व्यापातापातून आम्हाला तारून नेईल अश्या वर्णनाची हि कविता माझी खूप आवडती आहे.

शब्दांना एक मस्त लय आहे, आणि उपमा दिलेल्या पण एकदम भारी.
सकाळी सकाळी पक्षी आवाज करतायत ते तुझी स्तुती करतायत, काठावरची झाडं चौऱ्या ढाळतायत, लाल लाल छोटासा सूर्य तुझ्या प्रवाहात कुंकू वाहतोय, अशी सुरुवात वाचूनच अगदी प्रसन्न वाटत.

पाण्यात मडकं बुडवताना येणाऱ्या बुडबुड आवाजाचा एवढा सुंदर वापर करायला कसा सुचला असेल.. गोदावरी दर्शनाने सदग्दित झालेल्या कवीचे शब्द अडकलेत जसे काही बुडबुड आवाज करत भांड्यात शिरणारे पाणी!

साखरेइतकीच  गोडी असलेल पाणी, अस्ताला जाणारा सूर्य, संध्या करताना कवीला दिसणार नदीपात्राच दृश्य, जेव्हा सूर्य अस्ताला जायला निघतो तेव्हा पुन्हा सकाळसारखाच लाल रंग धारण करतं, जसे काही केशर आणि चंदन मिसळले पाण्यात..

सूर्याच्या प्रखरतेनी करपलेले हात चक्क चंद्राने ह्या गोदावरीच्या पाण्यात बुडवलेत. काय कल्पना आहे मस्त! पाण्यातले मासे, उठणारे तरंग उडणारे तुषार म्हणजे जणू हिरे..

भर पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर पाणी सर्वदूर पसरलं तेव्हा जणू हि नदी उदार होऊन सर्वत्र निघाली अश्या ह्या दृश्यात तल्लीन होणार नाही असा कवी कुणी तरी असेल का?
नुसतं म्हणून बघताना सुद्धा एखाद्याची बोबडी वळणारा अनुप्रास अगदीच गोड वाटतोय ह्या ओळीत..
"तल्लीलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनि ! कवि कवण तरी?"

ह्या महापुराच्याच काळात- आषाढ श्रावणात- सुरु असणारे भजन किर्तनातल्या टाळ मृदूंगांचे निनाद पाण्याच्या धोधोकाराशी एकरूप झालेत. 
काठावरची हिरवीगार शेतं, फळाफुलांची, धान्याची चंगळ, ह्या जीवनदायिनीने काठावरच जगणं समृद्ध केलंय. अश्या वेळी तिचं रूपही मंगलमय दिसतंय.
संध्याकाळी दिसणारी नदी, चांदण्यात दिसणारी नदी, आणि त्या चांदण्यात शंकराची गंगाच ह्या गोदावरीत मिसळायला आलेली, थंडीच्या पहाटे नदीपात्रावर पांघरलेली धुक्याची पांढरी शुभ्र शाल, त्या शालीमुळे थंडीत पण उबदार झालेलं नदीच पाणी, अगदी कुडकुडणार्या पहाटे आई कुशीत घेते तसच!

शेवटी सगळी ऐहिक सुखं नदीवर अवलंबून आहेत आणि ती देत आहे. पण आपल्याकडे लोक मुक्ती मिळवणे हे अंतिम ध्येय समजतात. शेवटी कवीला वाटतंय कि, थंडीच्या दिवसात पाणी बर्फाची बरोबरी करतं आणि तुझा तप्तपणा संपून जातो, तसाच तू भवतापातून सुद्धा आम्हाला पार करशील ना?

अचूक आणि तेचतेच शब्द येऊन न देता प्रत्येक ठिकाणी साधलेलं यमक, ओळीओळीतून दिसणाऱ्या यथार्थ उपमा, आणि जबरदस्त अनुप्रास ह्याच्यात दिसतात. हल्ली काही वाक्य आपण वारंवार वापरून गुळगुळीत करून टाकली आहेत त्यातीलच एक वाक्य- "डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं"
पण ते वाक्य ह्या कवितेसाठी खरोखर चपखल आहे. आजवर कधीही न बघितलेल्या गोदावरी ला मी ह्या कवितेतून बघून येते.

No comments:

Post a Comment