08 February, 2016

पैल तो गे उडून गेला (एकदाचा) काऊ

काल बाबांची रोजची ड्युटी माझ्यावर सोपवलेली होती, ती पार पाडून घरी यायला निघत होते. उन्हात वाळत ठेवलेले आंबा पोळी, म्हणजेच साठांचे ट्रे आत आणून झाले, झाक-पाक झाली, दारं लावून झाली, आणि निघण्यापूर्वी काही बाहेर राहिलं नाही ना, म्हणून मयादादाने पुन्हा साठं वाळत घालायच्या मोकळ्या जागेत नजर टाकली, तर तिथे एक कावळा दिसला.

वाळत घातलेले पदार्थ सुरक्षित राहावेत म्हणून चारी बाजुंनी जे जाळं लावलेलं आहे ते दिसलं नाही त्याला, आणि आंबा पोळी खाण्याच्या हेतूने उडत उडत येताना त्या जाळ्यात तो अडकला असा आमचा प्राथमिक अंदाज.
समोरच आमचा मामा कातकरी आणि कुटुंबीय, त्याचे सत्राशेसाठ पाहुणे, त्यांची चौतीसशेसाठ पोरं असे सगळे होते. त्या पोरांना सणकन उत्साह संचारला. हातातले उद्योग सोडून सगळी पोरं (वयवर्षं 2 ते 10च्या मधली)त्या कावळ्याभोवती जमली. एक काळाकुट्ट गलेलठ्ठ बोका- नुकतेच मासे फस्त करून लोळत होता- तो पण ताडकन उठून तिथे आला.
पोरांपैकी संजय नावाचा हिरो उडी मारून रिकाम्या हौदात उतरला, आणि त्याने कावळ्याला हातात घेतलं. मग त्या सगळ्या पोरांची एक गोलमेज परिषद सदृश्य गंभीर चर्चा झाली. त्यात विविध पर्याय, त्यातली शक्याशक्यता, व्यवहार्यता अश्या विविध पैलूंवर कावळा हातात धरून विचार विनिमय झाला. सगळं बोलणं कातकऱ्यांच्या बोलीभाषेत सुरु होतं. मराठीचीच बोली आहे ती, पण नीट लक्षपूर्वक ऐकलं तरच, मतीतार्थच फक्त कळेल इतकी वेगळी आहे.

बहुमत असं होतं कि त्या कावळ्याला अडकलेल्या स्थितीत तिथे तसाच सोडून आपण लांब जावं. म्हणजे जाड्या बोक्याला कावळा खायला मिळेल.
काही मुलांचं म्हणणं होतं कि पाय जाळ्यात अडकल्यामुळे आता बहुतेक त्याला उडता नाहीच येणार तर आपण त्याला पाळूया.
संजयचं म्हणणं होतं, काई नको, जहुंदे उडून बिचाऱ्याला.
अर्थात कातकरी समाजात कावळा हा 'अभक्षभक्षण' मानलेला आहे म्हणून हे प्रश्न उदभवले होते. तिथे कावळ्याच्या ऐवजी चिमणी, बुलबुल, कवडा वगैरे असते तर एव्हाना फोडणीत पडले असते.
तर "शेवटी ज्याच्या हातात कावळा त्याचा निर्णय फायनल" ह्या न्यायाने गोलमेज परिषदेचे अध्यक्ष माननीय संजय यांच्या शुभहस्ते कावळ्याची जाळ्यातून सुटका करण्यात आली.
दोन्ही हातात कावळा धरून तो हौदातून बाहेर आला, क्रिकेटमधील बॉलर जसा बॉल घेऊन धावत येतो तसा संजय कावळा घेऊन धावला.. आणि पतंग उडवतात तसा दोन्ही हातांना लयदार झोका देत त्याने त्या कावळ्याला हवेत उडवला!!
आणि मी इतका वेळ तोंडाचा आ उघडलेला तो मिटला!

 हि सगळी खरोखरच निसर्गाची लेकरं असतात. रानडुकरांचा पाठलाग करत अनवाणी पायांनी सुसाट वेगाने रात्रीच्या काळोखात धावण्याची क्षमता निसर्गाने त्यांना दिली आहे, आपले डाएटचे नितीनियम त्यांच्या कामाचे नाहीत!!

07 February, 2016

जावे त्या वंशा, आणि तरीही गावे!!😂

एकदा माझी आई बोलता बोलता म्हणाली कि माझा आवाज चांगला असता तर मी गायिका झाले असते. त्यावर बाबा म्हणाले "व्वा! मोठंच सांगत्येस.. हे म्हणजे तहान लागलेली असती तर आत्ता पाणी प्यायले असते असं म्हणण्यासारखं आहे!"
पण मला आईच्या म्हणण्याचा नीट अर्थ कळला. आमचे घरात सगळ्यांचे आवाज वाईट म्हणावे इतके भसाडे आहेत, पण आईचा अपवाद. एकतर तिला ऐकलेली चाल तशीच म्हणता येते आणि कुणाच्या बारश्यात पाळणा, मंगळागौरीत झिम्याची गाणी, लग्ना-मुंजीचे पापड करताना ओव्या इतपत ती गाऊ शकते, आणि बायका तिला आग्रहाने म्हणायला सांगतातही. म्हणून तिचं विधान खरंच खरं आहे, कि आवाज अजून खूप चांगला असता, तर ती व्यवस्थित शिकून गाऊ शकली असती.
पण मी आणि आदित म्हणजे कुठे गुणगुण करायला लागलो कि लोक एकतर स्वतः पळून जातील नाहीतर आम्हाला हाकलून लावतील, इतका आनंदीआनंद आहे. बाबा पण आमच्यासारखे नॉन गायक गटातच आहेत.
बरं गाण्याबद्दलच नॉलेज म्हणाल तर तेही अगाध! म्हणजे उदाहरणार्थ. समजा, आमच्या मिलिंद मामाच्या गाडीतून जाताना संगीताचा एखादा तुकडा वाजतो आहे, आणि मामा आम्हाला त्याबद्दल माहिती देतो आहे, तर, " 'किराणा' घराण्याचे 'तोडणकर'बुवा यांनी गायलेला 'जोग' राग " अश्या माहितीच्या ऐवजी, " 'भुसार' घराण्याचे 'खेडेकर' बुवा यांनी गायलेला 'केतकर' राग"  अशी माहिती पुरवली तरी आम्हाला खरं वाटू शकेल!

शाळा कॉलेजच्या ट्रीपा, किंवा विविध गुणदर्शन हा जो प्रकार असतो, त्यात किंचित जरी गायक असलं किंवा बासरी, माऊथ ऑर्गन, गेलाबाजार शिट्टी असं काहीतरी वाजवता येत असेल त्यांना वेळ मारून न्यायला बरं पडतं. आम्हाला म्हणजे, अश्या ठिकाणी कुठल्या गुणाचं दर्शन घडवावं हा यक्षप्रश्न कॉम्प्लेक्समध्ये नेऊन टाकतो..
त्यामुळे अगदी गोड नको, पण थोडा ऍव्हरेज आवाज देवाने मला द्यायला हवा होता असं मला फार वाटतं.
गाणी ऐकायला खूप आवडतात, आणि ऐकलेलं गाणं गुणगुणायची भयंकर सुरसुरी येते. त्यावर मी काय काय उपाय शोधून काढले.
एकतर शेतावर किंवा कलमात गेल्यावर किती हव्या तेवढ्या मोठ्या आवाजात मनसोक्त गाणी म्हणायची,कारण तिथे दूरदूर पर्यंत ऐकायला कोणी नसतं.
दुसरा मार्ग म्हणजे गाडी चालवताना, तोंडाला कडेकोट स्कार्फ बांधून जोरात गाणी म्हणायची! ह्यात एक मोठा धोका असतो. गावातले जे लोक चेहेरा दिसला नाही तरी, गाडीवरून किंवा कपड्यांवरून मला ओळखू शकतील, त्यापैकी कुणीतरी नंतर विचारतात. "आज बायपासला क्रॉस झालीस तेव्हा मला काही म्हणालीस का तू?"

हॉस्टेलवर असताना एक मैत्रीण अशीच भसाड्या आवाजात गायची तेव्हा आम्ही तिला म्हणायचो, "अगं ए,, कुणी गुळखोबरं दिलाय?"
त्याच्यावर तीच म्हणणं असायचं कि,"गायक लोक दुसऱ्यांच्या आनंदासाठी गातात, आपण स्वतःच्या आनंदासाठी गायलं तर प्रॉब्लेम काय आहे!!"
हे तत्व अंगी बाणवून हि भसाडेगिरी आम्ही अंमलात आणतोच तरी!
******************************************

संध्याकाळी लाईट गेलेले असताना, फक्त देवांसमोर लावलेल्या निरांजनाचा उजेड माजघरात पसरलेला, बाकी सगळीकडे मिट्ट काळोख, आणि आम्ही चौघेजण झोपाळ्यावर बसलो असू, तर म्हणजे गाणी आणि कवितांची आमची आम्हालाच मेजवानी!!
ह्याची सुरुवात झाली ती आम्ही बहीणभाऊ लहान होतो तेव्हा आई बाबा आम्हाला खांद्यावर झोपवताना झोपाळ्यावर गाणी म्हणायचे तिथून. आदित खांद्यावर झोपयचा तेव्हा कितीही कंटाळून किरकिर करत असला तरी रडत रडतच म्हणायचा, "शिवरायांचं गाणं कर ना!!" आणि मग गोविंदाग्रज लिखित "शिवरायांचा पाळणा- गुणी बाळ असा जागसी का रे वाया" हे आई म्हणायची..

बाबा नॉन गायक गटातलेच, पण आम्ही लहान असताना आम्हाला खांद्यावर झोपवताना बाबा गाणी म्हणायचे ती जामच मनःपूर्वक!!
"ताई गुणाची माझी छकुली" आणि सोपानदेव चौधरींचे "सभोवती संतजन सुपुत्रांचा मेळा' हे त्यातले खास!!
ऐकून ऐकून अशी खूप गाणी कविता पाठ होत गेल्या, आणि मोठे होता होता आम्ही संध्याकाळी झोपाळ्यावर बसून म्हणू लागलो.

एरवी एखादं गाणं आवडण्यासाठी अर्थ, क्लासिकपणा ह्या कशाशी फार देणंघेणं असावं लागत नाही,(अर्थात एक किमान लेव्हल धरून हो!! म्हणजे साजूक तुपातल्या 'पोली'ची, रिक्षावाल्याची वगैरे गाणी आणि तत्सम प्रकार कधीच नाही आवडू शकत, पण कधीकधी "लडकी क्यूं न जाने क्यूं" सारखी गद्य धड्याला चाल लावलेली गाणी पण आवडून जातात)पण ह्या आमच्या खास मैफलीत जुन्या वृत्तबद्ध कविताना अग्रमानांकन!!

"सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण" हि अवाढव्य कविता पाठ झाली ती ह्या झोपाळ्यावरच्या गायनातूनच! गोदावरी नदीचं स्तोत्र म्हणजे "तुज हृदयंगम रवे विहंगम- अर्थात गोदागौरव" - म्हणता म्हणता कधीही न बघितलेल्या गोदावरी नदीशी काय नातं जुळलं कोण जाणे.. त्यातल्या
"तल्लिलेमधी तल्लीन न हो कल्लोलिनी कवी कवण तरी" हे म्हणताना जी काय बोबडी वळायची, कि हे म्हणतोय ते मराठी आहे का संस्कृत तेही कळत नसे! तीच गत महाराष्ट्र गीतातल्या "यन्नामा परीसुनि रिपु शमीतबल अहा!" ची!!
"आजीच्या जवळी घड्याळ कसले" म्हणता म्हणता, आम्ही आईबाबांच्या बालपणीचा काळ स्पष्ट अनुभवतो, तर "पडू आजारी मौज हीच वाटे भारी" म्हणताना ते आजारपणातले लाड सुखावून जायचे..
वर्षं पुढे पुढे सरकली, आणि आम्ही आजोबांना गाणी म्हणून दाखवू लागलो, त्यांचा कंटाळा जावा म्हणून.. त्यांना पुसटशी आठवत असलेली "येथे काय असे गडावर.." हि रायगडबद्दलची कविता शोधून काढून त्यांच्या बरोबर म्हटत त्यांच्या लहानपणात गेलो.
आमच्या आजोळच्या आजीकडून शिकलेलं "शिवरायांचा सिंह सिंहगडी पडला समरांगणी" हे तानाजींचं काव्यमय चरित्रच संपूर्ण म्हणताना एकदम शूरवीर वाटायला लागतं, तसं वसईच्या किल्ल्याची लढाई, "बेलाग दुर्ग जंजिरा" म्हणताना पण!
दरम्यान आम्ही शिबिरांना जाऊन वेगवेगळी गाणी(पद्य) शिकून आलो कि तीही सगळे मिळून मोठ्या आवाजात म्हणू लागलो. आई बाबाही आमच्यात अजूनही सामील होतात, आणि ह्या मैफलीची सुरुवात "आक्रमकांशी झुंजत झुंजत समरी विजयी होऊ" ने करायची हा अलिखित कायदा झाला,  चला निघूया सरसावोनी म्हणताना बिनदिक्कत आवाज टिपेला पोचवू लागलो, तर 'वसुंधरा हि कुटुंब अवघे" ह्या अतिकठिण चालीच्या गाण्याला पण सोडलं नाही. "रणी फडकती लाखो झेंडे" चा ठेका, एकदिलाची सिंहगर्जना, हि अनादी भरतभू, आम्ही डोंगरचे राहणार अशी कितीतरी..

काळोखात, वही हातात न घेता, तोंडपाठ- दोन अडीच तास नॉनस्टॉप म्हणत राहिलो तरी संपणार नाहीत एवढी आमची "माय फेव्हरिट" फोल्डरवाली प्ले लिस्ट आहे!! -  जुन्या कविता आणि संघगीते- गायक आमचे आम्हीच! ह्या नादात बऱ्यापैकी पाठांतर झालं!

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे,शेजारी पाजारी ऐकतील, रस्त्याने येणारे जाणारे हसतील हि धास्ती मनात असतेच! एरवी "अरे जरा गप्प बसा" हे सांगून आई दमते, पण आमची गाणी रंगात आलेली असताना जर विनोददादा, प्रणव किंवा अन्य सगळेच गायक लोक अश्या कुणाची रस्त्यावर चाहूल जरी लागली तरी आम्ही झटकन म्युट होतो!! (आता हि पोस्ट त्यांनी वाचली कि पितळ उघडं पडणारच आहे तरी!!)

 बलसागर भारत होवो हे फार पूर्वी केव्हातरी तळजाईच्या शिबिरातून पसरत आलेले, आणि ह्या चालीला भैरवी म्हणतात (त्या शिबिरात सुधीर फडके यांनी ते पद्य ह्या चालीत म्हटलेलं), हे माहिती झालेल आहे, त्यामुळे लाईट आले, आता उठून कामाला लागावे असं झालं कि आम्ही 'बलसागर भारत होवो..' ने कार्यक्रम संपवतो! ते सगळं ऐकायला अगदी बेसूर असणार, माझी खात्री आहे, पण ते शब्द, त्यांचा अर्थ, आणि त्या चालीतली आर्तता- जी आम्ही म्हणत असताना सुद्धा फक्त आमच्या का होईना मनाला भिडते..बास, अजून काय हवाय? झालीच कि गायनाची हौस वसूल!!

06 February, 2016

तो चहा आणि ती कॉफी

चहा हा 'तो'आणि कॉफी हि 'ती' म्हणून का काय कोण जाणे, पण चहा म्हणजे पुरुषी आणि कॉफी म्हणजे  बायकी अस समीकरणच झालेलं आहे. अर्थात व्यक्तिपरत्वे आणि त्या वेळेच्या मूडपरत्वे चहा कि कॉफी याचा निर्णय होतो. भयंकर कष्ट उपसून दमल्यावर आम्हा मुलींनासुद्धा चहाच लागतो, आणि रात्री बेरात्री सिनेमे बघताना मुलगेही कॉफी पितातच, पण तरी एकंदरीत चहा म्हणजे डॅशिंग, शूरवीर, मर्दानी, कष्टाळू (अर्थात मुलीसुद्धा हे असं सगळं असतातच) आणि कॉफी म्हणजे हळवी, भावनिक, कातर, खुशालचेंडू (मुलं हे सगळे प्रकार लोकांना दिसून न देता अमलात आणतात) अस आपलं उगीच ठरून गेलंय..

टीव्हीच्या मालिका आणि व्हॉट्स अँपचे मेसेज म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच.. कोणतीही सुरु असलेली बघा किंवा कोणताही ग्रुप उघडून वाचा.. सगळीकडे तेच तेच!! पण तरीही काही वेगळ्या सिरीयल आणि काही ठराविक मेसेज कायम लक्षात राहतात, वारंवार आठवण होते, आणि हळूच हसायला येतं..
"असंभव" हि सिरीयल - त्यातही, मुख्य कथानकापेक्षाही सगळ्यांच्या फारच आवडीचे झालेले आणि पटलेले ते प्रिया आणि विक्रांत,, यांचं उपकथानक असच कायमच स्मरणात राहिलेलं आहे

तसाच हा चहा-कॉफीचा व्हॉटसअँप मेसेज, अगदी पटलेला आणि लक्षात राहिलेला आहे!!

चहा…? की कॉफी…??
चहा म्हणजे उत्साह..,कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..,कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..,कॉफी अक्षरशः निवांत...!
चहा म्हणजे झकास..,कॉफी म्हणजे वाह मस्त...!!
चहा म्हणजे कथासंग्रह...,कॉफी म्हणजे कादंबरी...!
चहा नेहमी मंद दुपार नंतर...,कॉफी एक धुंद संध्याकाळी...!!
चहा चिंब भिजल्यावर...,कॉफी ढग दाटुन आल्यावर...!
चहा = discussion.., कॉफी = conversation...!!
चहा म्हणजे उस्फूर्तता...,कॉफी म्हणजे उत्कटता...!!
चहा = धडपडीचे दिवस...,कॉफी = धडधडीचे दिवस!...!
चहा वर्तमानात दमल्यावर...,कॉफी भविष्यात रमल्यावर...!!

असंभव सिरीयल हल्ली पुन्हा युट्युबवर बघत असताना त्यातल्या काही प्रसंगाचे तुकडे आणि हा चहा कॉफीचा व्हॉट्सअँप मेसेज ह्यांची माझ्या मनात एकत्र सांगड घातली गेली... ह्या प्रसंगांमध्ये चहा आणि कॉफीचा अगदी ओझरता उल्लेख झालाय, पण ते बघताना तिथे  हा फॉर्वर्डेड मेसेज घिसापिटा असला तरी तंतोतंत फिट होतोय!

प्रिया शास्त्री, मोठ्या कुटुंबातली सगळ्यात लहान मुलगी, दोन मोठे भाऊ-वहिन्या, आईबाबा, आत्या, काकाकाकू, आजोबा, भरपूर मित्रमैत्रिणी..असं आपुलकीचं घनदाट कव्हर..

विक्रांत भोसले, अगदीच एकटा, नावापुरती लाजिरवाणी बहीण, दोनमेव मित्र, पालनकर्ता सरंजामे.

प्रियासाठी, सुलेखा म्हणजे मोठ्या भावाची माजी काळातली भावी बायको, उर्फ काकूची लहान बहीण
विक्रांतसाठी सुलेखा म्हणजे जिवलग मित्राची- पालनकर्त्याचा मुलगा अभिमान सरंजामेची होणारी बायको


ह्या गुन्हेगार सुलेखाचा पर्दाफाश करणे हीच विक्रांत भोसले आणि प्रिया शास्त्री यांच्यातली एकमेव कॉमन गोष्ट..
त्यात प्रियाच्या घरच्यांचा तिच्यावर अजिबात विश्वास नाही, तिने सुलेखावर केलेले आरोप ऐकून ते प्रियालाच वेड्यात काढत राहतात.
पोलिसात असल्यामुळे नजरेतच एक्सरे मशीन फिट झालेल्या इन्सपेक्टर विक्रांतला पहिल्या भेटीपासूनच सुलेखावर संशय आहे! आणि असा संशय घेतल्याबद्दल त्याने जिवलग मित्राचा- अभिमानचा रोष ओढवून घेतलाय.. अर्थात हा सगळा रहस्यभेद त्यांना अगदी सावधपणे आणि कोणालाच कळून न देता करायचाय.
प्रियाला, तिच्या चुलतभावाला- ज्याला सुलेखाने मारून टाकला- त्याला न्याय मिळवून द्यायचाय, आणि विक्रांत अभिमानला सुलेखाच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवाचं रान करतोय...

भरीसभर म्हणजे सरंजामे आणि शास्त्री यांचे घनघोर हाडवैर आहे!

"पोलीस तपास" ह्याव्यतिरिक्त पण ते दोघे बाहेर भेटायला लागतात, ओळख वाढते, मैत्री होते.. विक्रांतबद्दल अभिमानला काहीतरी कुणकुण लागते, कि हल्ली तू एका मुलीबरोबर फिरत असतोस, आणि तो विक्रांतला चिडवायला लागतो.
एकदा विक्रांत आणि प्रिया रस्त्यात बोलत उभे असताना, अचानक योगायोगाने अभिमान तिथे येतो, आणि त्या दोघांचं "काहीतरी आहे" अश्या अर्थी चेष्टामस्करी करतो.
खरं तर "तसं" काहीच नसतं.. निदान तेव्हा तरी!! त्याचं ते सगळं बोलणं प्रियाला अगदीच अनाठायी आणि असभ्य वाटतं, आणि दुसऱ्या दिवशी ती विक्रांतला सांगते कि आपण नको भेटत जाऊया.

हा प्रसंग दाखवलाय चहाच्या टपरीवर!! टपरीभोवतीच ते विशिष्ट वातावरण, चहावाला ढवळून ढवळून चहा करतोय, लोक चहा पितायत, तिथे हे दोघेजण बसलेत,चहावाला काचेच्या ग्लासांतून चहा आणतो, प्रिया नको म्हणते, विक्रांत हातात चहाचा ग्लास धरून तिचं बोलणं ऐकून घेत असतो,
"तुमचा तो मित्र, काय तो बोलत होता? आपण आपल्या कामासाठी भेटतो, राईट?"
"हो, पण अभिमान थोडा मूडी आहे, त्याचं बोलणं तुला आवडलं नसेल तर त्याच्या वतीने आय अँम सॉरी! परत नाही होणार असं!"- अगदी "उत्स्फूर्त" माफी..
"पण तरीही मला आता विचार करावा लागेल, आपण भेटावं कि नाही ते ठरवायला आणि विचार करून झाला कि मी स्वतः तुम्हाला फोन करीन"
आणि त्याचं पुढे काहीही ऐकून न घेता उठून तरातरा निघूनही जाते.
चहाचा घोट घेत विक्रांत ती गेलेल्या दिशेकडे बघत राहतो..
"डिस्कशन" समाप्त.. "वर्तमानातली मानसिक दमणुक".. हा सगळा गुंता सोडवण्याच्या.. "धडपडीचे दिवस.."

***********************************
तिकडे प्रिया 'भेटूया नको' म्हणून निघून जाते,आणि "तुला भेटली नाही का दुसरी कोणी? माझ्या बापाच्या शत्रूच्या मुलीशिवाय?" असं म्हणून अभिमान उखडतो.
असेच काही दिवस मध्ये संपतात, आणि प्रिया आपणहून विक्रांतला फोन करून "ह्या प्रकरणात मदत कराल ना?" विचारते. भेटल्यावर केसबद्दल सविस्तर बोलणं होऊन, नक्की काहीतरी मार्ग निघेल ह्या मुद्द्यावर चर्चा समारोपाकडे वळते.. "निघूया?" प्रिया विचारते..
"या,शुअर!" म्हणून निघणार तेवढ्यात पटकन विक्रांत विचारतो "कॉफी??.. .. इफ यू डोन्ट माईंड..!!" समोरच्याला नाही म्हणताच येऊ नये इतक्या खोलवर, "उत्कटपणे" केलेली रिक्वेस्ट!!
प्रिया ओके म्हणेपर्यंत प्रेक्षकांची पण विक्रांतइतकीच घालमेल होते! आणि ती ओके म्हणते, ते दोघे कॉफीशॉपकडे वळतात, तेव्हा त्या दोघांइतकंच हसू प्रेक्षकांच्या चेहेऱ्यावर असतं, प्रेक्षक पण कथानकाच्या रम्य "भविष्यात रमतात".. 'कॉनव्हर्सेशन' सुरु. "धडधडीचे दिवस!!"

01 February, 2016

देखणे ते हात

परवा सहज व्हाट्सऍप चाळताना संदीपचा डीपी आणि स्टेटस बघून, थबकायला झालं. त्याचा स्वतःचा तळहात, त्याच्यावर प्राजक्ताचा त्याहून किंचित लहान तळहात, आणि त्याच्यावर 'स्पृ'चा अगदीच छोटुकला तळहात.. असा डीपी, आणि 'कट्यार' मधले "तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कोणी" हे स्टेटस!!
मस्तच वाटलं..
हि सगळी फॅमिली म्हणजे रोजच्या व्यावहारिक कामांमध्ये एकदम आर्टिस्ट आणि परफेक्शनिस्ट लोक- चित्र काढण्यापासून ते केरसुणी बांधण्यापर्यंत, आणि डिझेल इंजिन खोलून जोडण्यापासून ते भजनात टाळ वाजवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या लांबसडक बोटांनी कमाल निटनेटक्या करणे... अगदी स्पृ सुद्धा  5 महिने वयात चिमुकल्या हातांच्या लांबसडक बोटांनी पायातले मोजे हुसकून काढायचा उद्योग शिताफीने करुन टाकते! त्यामुळे हे स्टेट्स आणि डीपी अगदीच समर्पक!

कुणाच्याही हाताची लांब बोटं मला भारी आवडतात, कुणी म्हणेल त्यात काय आवडायचाय. पण अस प्रत्येकालाच काहीतरी आवडत असतं, कुणाला डोळ्यांचा/त्वचेचा विशिष्ठ रंग, कुणाला सडसडीतपणा, कुरळे किंवा सरळ केस, असं काही ना काही..
कबूल आहे, हे सगळं कोणाच्याच हातात नसतं, देव प्रत्येकाला काही गोष्टी देतो तर काही देत नाही, आणि हे आवडणं / नावडणं सापेक्ष सुद्धा आहे,,  पण तरी 'आपल्या मनाचं वाटणं' काही थांबत नाही ना!
कौशल्याचं कोणतंहि काम लांब बोटांच्या लोकांना छान जमतं असं मला वाटत. माझी बोटं अगदीच बुटकी नाहीत ह्याबद्दल देवाला थँक्यू म्हणतानाच, "अजून किंचित लांब चालली असती" असं मनात आल्याशिवाय राहत नाही!

तळहाताच्या रेषांचा-नशिबाचा- भाग आपल्या उत्कर्ष होण्यात, न होण्यात खूप मोठा असतो. लांबसडक बोटं मिळणं देवाच्या हातात असतं, तसंच!  पण आपली हुन्नर किती तेही महत्वाचं आहेच ना.. नुसतंच त्या हातांना वापराशिवाय राहून दिलं, तर त्या रेषा बिचाऱ्या काय करतील? "तुला दिली रं देवानं दोन हात दहा बोटं.." अशी जाणीव बहिणाबाईंनी करून दिली आहे ती सतत जागी तर राहायलाच हवी..

मागे मोदींजींच्या भाषणात गोष्ट ऐकलेली, एक डबल ग्रॅज्युएट माणूस एका ठिकाणी काम मागायला जातो, तिथे त्याला विचारलं जातं, कि तुला काय येतं?
त्यावर त्याचं उत्तर असतं, "मी एम ए झालोय"
"हो, पण तुला येतं काय?"
"म्हणालो ना, मी एम ए झालोय."
"अरे हो पण तुला काय करता येतं?"
पुढे ती गोष्ट मेक इन इंडिया कडे वळली!
किती खरं आहे हे.. कसल्याही निर्मितीत व्यग्र असलेले हात..
बा.भ.बोरकरांच्या
"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळॆ ॥"
ह्या कवितेसारखे...
मग भले त्या हातांवर तव्याचा चटका लागून डाग पडला असेल, सुरीचा घाव लागून चरे पडले असतील, शेतातला चिखल बरबटला असेल, काळंकुट्ट ग्रीस लागलं असेल, घामाने- धुळीने राप बसला असेल, कष्ट करून घट्टे पडले असतील, सतत काही ना काही घडवण्यात, बनवण्यात, जोडण्यात, निर्माण करण्यात धडपडत असतील... थोडक्यात लौकिकार्थाने त्या हातांचे सौंदर्य बिघडून गेले असेल, पण तरीही स्वच्छ नितळ, कोरीव, रंगवलेल्या नखांच्या, दागिने घातलेल्या हातांइतकेच, किंबहुना काही वेळेला कणभर जास्तच हे असे हात सुंदर दिसतात!
दिवसभर हात असे धडपड करत राहिले कि संध्याकाळी जसं समाधानाने मन भरून जातं- आपल्यापुरतं का असेना ते समाधान- तसं आयुष्यभर कार्यमग्न राहता यावं, आणि शेवटच्या क्षणाला आपल्याचबद्दल आपल्याच मनात यावं कि,
"देखणी ती जीवने जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे शुभ्र पार्‍यासारखे ॥"
... हे एवढं म्हणणं मात्र ऐकच हो देवा!

30 December, 2015

"अग्निहोत्र"च्या आठवणी!

(दोन वर्षांपूर्वी, 2013 संपताना- स्टार प्रवाहवर अग्निहोत्र सिरीयल दुसऱ्यांदा दाखवायला लागले होते,,दुपारची 2ची वेळ गैरसोयीची होती पण तरी वेळात वेळ काढून बघितल्याशिवाय राहवत नव्हतं! त्यावेळी पहिल्यांदा अग्निहोत्र लागायचं तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या आणि फेसबुकवर पोस्ट लिहिली होती, त्या rerun ला पण आता दोन वर्ष झाली, तरी अजून अग्निहोत्र आठवणीत आहे! दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या आठवणींची हि आठवण!)

30-12-2013
स्टार प्रवाह वर पुन्हा एकदा अग्निहोत्र सिरीयल सुरु झाली आहे. ‘कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ..’ असे टायटल सॉंग परत एकदा दिसले आणि मन झर्रकन ४-५ वर्षापूर्वीच्या काळात जाऊन पोचले. रटाळ टी व्ही सिरीयलच्या जंजाळात आवर्जून बघावी अशी हि एकमेव होती.
तेव्हा होस्टेलमध्ये राहत असल्यामुळे सगळे एपिसोड बघता आले नाहीत, पण अमृताकडे राहायला गेल्यावर हमखास बघणं व्हायचं. त्यात परीक्षा सुरु असेल तर आम्ही दिवसभर हातात वही घेऊन चिक्कार गप्पा मारलेल्या असायच्या, आणि मग मात्र अधिकृतपणे अभ्यास बाजूला ठेऊन सिरीयल बघायची म्हणजे अपराधी वाटायचं. मग नेमका त्या वेळेत अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आल्यावर जेवता जेवता बघायचो. तेही जमल नसेल, तर अपूर्वा म्हणायची “काल अग्निहोत्र कसल भारी होत माहित्येय,,(रोजच भारीच होतं म्हणा!) तुम्ही उगाच मिस केलत..” आणि मग स्टोरी सांगायची.. (त्यात अगदी डायलॉग,बॅकग्राउंड म्युझिक आणि सगळ्या पात्रांच्या हावभाव आणि कपड्यांपर्यंत तपशील आम्हाला कळायला हवे असायचे!😉)

रोजच्या जगण्यात एखादा माणूस अत्यंत पाताळयंत्री आहे असं म्हणायचं असेल तर “तनाने काळा मनाने काळा” असं म्हणणे, कुणाला फोन न वाजताच वाजल्यासारखा वाटला तर “भासेस” होतायत तुला असं म्हणणे असल्या सवयी लागल्या होत्या. एवढच कशाला, गावोगावी असलेल्या नातेवाईकांना आवर्जून शोधायची, भेटायची जुनी सवय असल्यामुळे माझ्या बाबांना ‘आमच्या कुटुंबातला हा निळ्या आहे’ असा किताब घरातल्या आज्यांकडून मिळायला लागला!

नील, वैदू, सई, मंदिरा, अभिमन्यू, मंजुळा, उमा बंड, सगळे लोक जाम भारी वाटायचे. महादेव काका तर सगळ्यात बेस्ट. त्याच्या त्या भाडेकरू बाई आणि त्यांचा पोरगा, ‘तनाने काळा, मनाने काळा’ कृष्णा, बाप्पा आणि त्याची बायको, सगळे एकाहून एक नग होते.
रोज काय घडतंय ह्याची उत्सुकता असायची. फक्त चित्रपटात घडू शकतात अश्याच घटना, पण संवाद आणि वातावरण ह्यामुळे सगळ काही अगदी तुमच्या आमच्या घरातलं वाटायचं.

खर तर, दोन मैत्रिणींची नातवंड ओळख देख नसताना भेटणं आणि त्यांच्या दोघांच्या बाबांचं आपसात हाडवैर, परागंदा होऊन सिनेमात काम करायला गेलेला काका, नाचणाऱ्या बायकांच्यात लहानाची मोठी झालेली चुलत बहिण, नक्षलवाद्याबरोबर राहणारी आत्या हे असलं काहीही तुमच्या आमच्या घरात घडत नसत.

पण वर्षानुवर्ष वाड्यात राहून सगळ्या इतिहासाचा सक्षिदार झालेला महादेव काका, सगळ्या कुटुंबियांना एकत्र आणण्यासाठी आणि गणपतींचा शोध लावण्यासाठी धडपड करणारा निळ्या, शून्यातून विश्व उभं केलेले चिंतामणी आणि सदानंदराव, तुमच्या आमच्या आयांसारख्या सोज्वळ मृणाल आणि रोहिणी सगळे एकदम वास्तवातले वाटायचे. प्रभा आणि लक्ष्मीची मैत्री पण सॉलिड आणि त्या काळात त्यांना सपोर्ट करणारे आप्पा तर ग्रेट!

पूर्वजांच्या इतिहासाच्या मुळापर्यंत जाण्याची कोकणस्थी हौस(खाज खरं तर😉) आणि त्याच वेळी काळाच्या पुढचे विचार, बंडखोरपणा, व्यवहारी- काटकोनी- सणकीपणा आणि कोकण सोडून कितीही पिढ्या गेल्या तरी जीन्समधून वहात आलेली ध्येयवेडी वृत्ती हे सगळे गुणविशेष सर्वदूर आहेच पण ते मालिकेत बघणं खूपच मोहक, भुरळ घालणारं होतं! आप्पांसारखे द्रष्टे, धीरोदात्त कुटुंबप्रमुख, मोरूकाकासारखा आधारवड आणि धर्मा गुरवांसारखा हितचिंतक प्रत्येकाच्या घराला असावा...

शेवट गोड झाला- सगळ्या भावंडांचा शोध लागला, सगळ्यांची गोडी झाली, दिनेशचा राग निवळल्यामुळे नील-सई, अभि-मंदिराचं मार्गी लागलं हे एक खूप छान झालं.

डे1 पासून अदृश्य असूनही, प्रत्येक एपिसोडमध्ये सतत दिसत राहिलेले दिग्दर्शक सतीश राजवाडे इन्सपेक्टर दुष्यंत बनून दिसले तेव्हा म्हणजे... विक्रांत भोसलेच्या अचानक एक्झिटमुळे झालेल्या आमच्या निराशेवर उतारा झाला होता...  फक्त,, फक्त शेवटी मोरू काकाचा आशीर्वाद घ्यायला, उमा बंडबरोबर अग्निहोत्रींचा भाचेजावई म्हणून दुष्यंत वाड्यावर असला असता तर खूपच जास्त आवडलं असतं!

12 December, 2015

किती टाकू?

एक जुनीपुराणी वयस्कर एक्टिवा, काळ्या रंगाची की जेणेकरून मळलेली पटकन कळायची नाही.. घर वापराचे सामान, भाजी अश्या बऱ्याच पिशव्या अड़कवलेली.गॉगल डायरी वॉलेट पेन मोबाईल फायली कागदपत्रे ह्या आणि अश्या असंख्य प्रकारच्या उपयुक्त आणि कामाच्या वस्तुनी ठासुन भरलेली एक सॅक अंगावर वागवणारी.

एक ब्रॅन्डन्यू करकरीत शाइन. कसकसले असंख्य भडक रंगीत स्टिकर चिकटवुन अजुनच लक्षवेधी करायचा प्रयत्न केलेली. नंबर प्लेटीवर नंबरातुन काहीतरी दादागिरी टाइप अक्षरे चितारलेली. फॅन्सी सिटकव्हर, फॅशनेबल आरसे, असा सगळा थाट केलेली.

दोन्ही गाड्या एकाच रस्त्याने एकाच दिशेला निघालेल्या.. काम संपवून आपापल्या घरी जायची संध्याकाळची वेळ. करकरीत तिन्हीसांजा.. कामाच्या शहरापासून राहायच्या गावाकडे जाणारा रस्ता,,अक्टिवाच्या डोक्यात घाई लवकर घरी पोचायची. शाइनच्या डोक्यात गती धूम सारखी शायनिंग मारायची.

शाइन एक्टिवाच्या खुप पुढे जाते. आणि शाइनच्या लक्ष्यात येतं एक्टिवा मागे राहिल्याचं. एक्टिवाच्या मात्र वशिवर्गी सुद्धा नाही त्या शाइनचं अस्तित्व. मग शाइनचा वेग कमी होतो. तिला एक्टिवा गाठते. शाइन एक्टिवाला पुढे जाऊन देते. काही वेळाने सुसाट वेगाने येऊन शाइन एक्टिवाला ओव्हरटेक करुन पुढे जाते. पुन्हा  एक्टिवा मागे पड़ते. पुन्हा शाइनचा वेग कमी होतो. पुन्हा एक्टिवा शाइनला ओव्हरटेक करते.

आता शाइनचं अस्तित्व एक्टिवाने मनात नोंद केलं आहे. पण एक्टिवा आपल्या ठरलेल्या वेगाने पुढे जात राहिली आहे. आणि शाइनचा हाच उद्योग सुरु -पुढे जाण्याचा.. मागे पडण्याचा..

एका वळणावर शाइन सुसाट पुढे जाते. आणि मग एक्टिवा मागून येईल म्हणून स्लो होते. कितीतरी वेळ झाला तरी एक्टिवा मागून येत नाही म्हणून शाइन यू टर्न घेऊन वळून मागे येते. थोड्याच् अंतरावर समोरून ती एक्टिवा येते. तिच्या मागच्या सिटवर आता दोन दप्तरे आणि त्या दप्तरांचे दोन मालक बसलेत. शाइन पुन्हा यू टर्न घेते आणि पुन्हा पकडापकडीचा मुर्खपणाचा खेळ सुरु होतो.

आता एक्टिवा पुढे आहे. चिंचोळया रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घनदाट वस्तीत वहानं खोळंबलेली. वस्तीतले लोक उत्साहाने कसलीतरी मिरवणूक नाचवतायत. मागून आलेली शाइन नेमकी अक्टिवाच्या शेजारी उभी रहाते. एक्टिवाची चिड़चिड उशीर होतोय म्हणून.. शाइनचं शायनिंग मारणं त्या वहातुक कोंडीत पण सुरूच. इंच इंच लढवत एकेक वाहन रस्ता मिळवत मार्गस्थ होताय.

तेवढ्यात एक्टिवाने कुणालातरी फोनवरून "प्लीज कुकर लावायची" सूचना केली आहे. शाइनची कुणालातरी फोन लावून रात्री अमुकअमुक बिच रिसॉर्टला "बसुया का?" म्हणून चौकशी चालल्ये.

तेवढ्यात गर्दी मोकळी होते. एक्टिवा पुढे जाते. शाइन भूम भूम आवाज करत अक्टिवाला गाठते. दोन्ही गाड्या पेट्रोल पंपात येतात.
एक्टिवाला पंपावरचा माणूस विचारतो "किती टाकू?" उत्तर मिळतं-"फुल्ल करा दादा."
पेट्रोल भरून, पैसे देऊन, होइस्तो शाइनच्या टाकीचं झाकण उघडून झालय. पंपवाला विचारतोय "किती टाकू?"
उत्तर मिळताय-"50 चं टाक रे!"

02 December, 2015

सोमनाथाचं मंदीर आणि सड्यावरची रहाटी

सोमनाथाच मंदिर. अत्यंत ऐश्वर्यसंपन्न श्रीमंत देवस्थान. किती संपन्न? गझनीच्या महंमदाने १७ वेळा लुटून नेलं तरीही रिकामं न झालेलं. एक तर त्यात मुळचा खजिनाच तितका प्रचंड असणार, किंवा दोन लुटीच्या मधल्या काळात तो खजिना परत नव्याने भरत असणार. शब्दशः सुवर्णभूमी होता आपला देश त्या काळातली ती गोष्ट, पण महत्वाचा मुद्दा हा, कि १७ वेळा लुटलं जाऊन पण तो खजिना पुन्हा पुन्हा भरायची क्षमता असणाऱ्या त्या भक्तांना, त्या महंमदाला धडा शिकवायची इच्छा का नाही झाली?
हि गोष्ट आत्ता आठवायचं कारण म्हणजे सड्यावरची रहाटी.. रहाटी म्हणजे ना ना तऱ्हेची झाडं झुडूप वृक्ष वेली ह्याचं एकत्र नांदणार साम्राज्य. सोमनाथाच्या मंदिरा सारखंच ऐश्वर्यसंपन्न आणि श्रीमंत. अर्थात निसर्ग-संपन्न!
ह्या सड्यावरच्या रहाटीशी तसा आमचा काडीचाही संबंध नव्हता- नाही, अगदी आत्ता काही वर्षापूर्वी ह्या राहाटी मध्ये पाउल टाकायला दिवसा ढवळ्या भीती वाटावी इतकं घनदाट रान होतं. गीतरामायणातले भिल्लातक फलभारे लवले,, ना कधी त्यांना मानव शिवले,, ना कुठे लतांची सैल मिठी.. ह्या काव्याचे प्रत्यक्षातले दर्शन.. पावसाळ्यात त्यात भर म्हणून पाण्याचा घोंगावणारा प्रवाह. वर उभं राहून बघितलं तर खाली खोलवर पसरलेलं निसर्गच रौद्र-भीषण पण नितांत सुंदर रूप डोळ्यात न मावणारं. धो धो पावसात.. म्हातारा पाऊस पडतो त्यावेळेला त्या पर्ह्याचा आवाज आणि पाण्याच्या धारांनी तुषारांनी धुरकट झालेला आसमंत बघून सगळेजण म्हणायचे, “म्हातारा चिलीम ओढतोय खाली, त्याचा हा धूर..”
ह्या राहाटीचे मालक कित्येक वर्षापूर्वी गाव सोडून मुंबईला स्थायिक झालेले. त्यांना ना त्या राहाटीबद्दल जिव्हाळा, ना त्यात लक्ष घालून ते राखण्याचा उरक. साहजिकच, राहाटीतले आंबे, कोकम, सुखलेल्या फांद्या,कुटक्या ह्या चोरापोरीच जाण्यासाठी जन्माला येत होत्या. पण अनंतहस्ते देण्याचं निसर्गाचं काम सुरूच होत. त्याच्या आधाराने वांदर,कोल्हे,ससे,रानडुक्कर,बाउळ,मोर, आणि कित्येक प्रकारचे पक्षी सुखेनैव राहत होते.
आणि मध्येच कधीतरी ते परचक्र आलं. जमिनींना सोन्याचे भाव आलेले बघून भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. राहटी च्या मालकांनी रहाटी विकायचा निर्णय घेतला, पण पहिल्यांदा काय केल तर जमीन विकण्यापूर्वी त्याच्यावरची सगळी झाडं एका लाकूडतोड्याला विकली. त्याने इमाने इतबारे आपलं काम सुरु केलं, तेव्हा लौकिकार्थाने काहीही संबंध नसलेल्या आमच्या सारख्या स्थानिकांच्या मनाचा एक कोपरा दुखावला, पण उपयोग काय?
रहाटी साफ भुंडी करून झाल्यावर जमीन मालकांनी जमिनीसाठी गिऱ्हाईक शोधायला सुरुवात केली. ते काही लवकर मिळालं नाही, आणि त्यात पावसाचे चार महिने निघून गेले. नवरात्राचे दिवस संपले, तोपर्यंत निसर्गाने हे सोमनाथाच मंदिर पुन्हा भरून टाकलेलं होतं. रहाटी पुनश्च हिरवीगार झाली, तरी तिचा पहिला रुबाब परत यायला अजून काही पावसाळे जायला हवेत.
पण ह्या वर्षीचा पावसाळा बघायचं काही रहाटीच्या नशिबात नव्हतच. आता बारीकसारीक लुटपाट नाही, हा गझनीचा महम्मद. ल्यांड डेव्हलपर, इस्टेट एजंट, अश्या नावाने वावरणारा गझनीचा महम्मद. आता झाडं तोडली नाहीत,तर जेसीबीने उपटून टाकली. जिथे जेसीबी जाऊ शकत नव्हता तिथे उभ्या जिवंत जंगलाला आग लाऊन टाकली. पर्ह्या पर्यंत उतरत गेलेल्या उताराचे सपाटीकरण करून झाले. आता ४-५ गुंठे आकाराचे लंगोटी एवढाले प्लॉट पडून त्यात बंगले बांधायला घेतायत. त्यात हाय फाय लोक राहणार त्यान एसी तर हवेच. त्यांच्या आलिशान गाड्यांना डांबराचे रस्ते हवेत. आणि तोंड वरती करून ह्याला डेव्हलपमेंट म्हणायला मोकळे. आता सोमनाथाच हे मंदिर परत भरेल का? आणि कधी? का त्याच्या आधीच निसर्ग आपला हिसका दाखवणार?
जुनी लोकं म्हणतात, तुमच्याकडे नीट नेटक आवरलेल घर आहे, त्यात टीव्ही, फ्रीज, एसी, गाडी, किंवा तत्सम सगळं काही आहे, तर ती झाली संपत्ती.
पण तुमच्याकडे गुरं आहेत, पडवीत सुपारीची पोती आहेत, अंगण भरून कडधान्यांच्या राशी वाळत आहेत, मळणी काढून झाल्यावर लावलेली पेंढ्याची उडवी आहे. निसलेल्या नारळांच्या चोडांचा ढीग झालाय, आमसूल,साठ वाळतायत, आंबे फणसाचा तैगार आहे, आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्यात प्रत्येक पिढीचे लोक दोन्ही हातानी राबतायत. तर हे ऐश्वर्य आहे.
ह्यात फरक असा कि तुमच्याकडे पैसे असतील तर, किंवा नसल्यास कर्ज काढून- संपत्ती एका दिवसात निर्माण होऊ शकते. ऐश्वर्य हे फक्त पैशांनी बनत नाही, आणि पैसे असतील तरी एका दिवसात बनत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष काही वेळेला पिढ्यांपिढ्या खर्ची पडलेल्या असतात.

सड्यावरच्या रहाटीचं ऐश्वर्य, संपत्तीमध्ये रुपांतरीत होतं आहे.. चहुबाजूला सुरु झालेले संपदेचे थेर बघून सड्यावरच्या रहाटीचे माहेर जळत आहे.