02 December, 2015

सोमनाथाचं मंदीर आणि सड्यावरची रहाटी

सोमनाथाच मंदिर. अत्यंत ऐश्वर्यसंपन्न श्रीमंत देवस्थान. किती संपन्न? गझनीच्या महंमदाने १७ वेळा लुटून नेलं तरीही रिकामं न झालेलं. एक तर त्यात मुळचा खजिनाच तितका प्रचंड असणार, किंवा दोन लुटीच्या मधल्या काळात तो खजिना परत नव्याने भरत असणार. शब्दशः सुवर्णभूमी होता आपला देश त्या काळातली ती गोष्ट, पण महत्वाचा मुद्दा हा, कि १७ वेळा लुटलं जाऊन पण तो खजिना पुन्हा पुन्हा भरायची क्षमता असणाऱ्या त्या भक्तांना, त्या महंमदाला धडा शिकवायची इच्छा का नाही झाली?
हि गोष्ट आत्ता आठवायचं कारण म्हणजे सड्यावरची रहाटी.. रहाटी म्हणजे ना ना तऱ्हेची झाडं झुडूप वृक्ष वेली ह्याचं एकत्र नांदणार साम्राज्य. सोमनाथाच्या मंदिरा सारखंच ऐश्वर्यसंपन्न आणि श्रीमंत. अर्थात निसर्ग-संपन्न!
ह्या सड्यावरच्या रहाटीशी तसा आमचा काडीचाही संबंध नव्हता- नाही, अगदी आत्ता काही वर्षापूर्वी ह्या राहाटी मध्ये पाउल टाकायला दिवसा ढवळ्या भीती वाटावी इतकं घनदाट रान होतं. गीतरामायणातले भिल्लातक फलभारे लवले,, ना कधी त्यांना मानव शिवले,, ना कुठे लतांची सैल मिठी.. ह्या काव्याचे प्रत्यक्षातले दर्शन.. पावसाळ्यात त्यात भर म्हणून पाण्याचा घोंगावणारा प्रवाह. वर उभं राहून बघितलं तर खाली खोलवर पसरलेलं निसर्गच रौद्र-भीषण पण नितांत सुंदर रूप डोळ्यात न मावणारं. धो धो पावसात.. म्हातारा पाऊस पडतो त्यावेळेला त्या पर्ह्याचा आवाज आणि पाण्याच्या धारांनी तुषारांनी धुरकट झालेला आसमंत बघून सगळेजण म्हणायचे, “म्हातारा चिलीम ओढतोय खाली, त्याचा हा धूर..”
ह्या राहाटीचे मालक कित्येक वर्षापूर्वी गाव सोडून मुंबईला स्थायिक झालेले. त्यांना ना त्या राहाटीबद्दल जिव्हाळा, ना त्यात लक्ष घालून ते राखण्याचा उरक. साहजिकच, राहाटीतले आंबे, कोकम, सुखलेल्या फांद्या,कुटक्या ह्या चोरापोरीच जाण्यासाठी जन्माला येत होत्या. पण अनंतहस्ते देण्याचं निसर्गाचं काम सुरूच होत. त्याच्या आधाराने वांदर,कोल्हे,ससे,रानडुक्कर,बाउळ,मोर, आणि कित्येक प्रकारचे पक्षी सुखेनैव राहत होते.
आणि मध्येच कधीतरी ते परचक्र आलं. जमिनींना सोन्याचे भाव आलेले बघून भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. राहटी च्या मालकांनी रहाटी विकायचा निर्णय घेतला, पण पहिल्यांदा काय केल तर जमीन विकण्यापूर्वी त्याच्यावरची सगळी झाडं एका लाकूडतोड्याला विकली. त्याने इमाने इतबारे आपलं काम सुरु केलं, तेव्हा लौकिकार्थाने काहीही संबंध नसलेल्या आमच्या सारख्या स्थानिकांच्या मनाचा एक कोपरा दुखावला, पण उपयोग काय?
रहाटी साफ भुंडी करून झाल्यावर जमीन मालकांनी जमिनीसाठी गिऱ्हाईक शोधायला सुरुवात केली. ते काही लवकर मिळालं नाही, आणि त्यात पावसाचे चार महिने निघून गेले. नवरात्राचे दिवस संपले, तोपर्यंत निसर्गाने हे सोमनाथाच मंदिर पुन्हा भरून टाकलेलं होतं. रहाटी पुनश्च हिरवीगार झाली, तरी तिचा पहिला रुबाब परत यायला अजून काही पावसाळे जायला हवेत.
पण ह्या वर्षीचा पावसाळा बघायचं काही रहाटीच्या नशिबात नव्हतच. आता बारीकसारीक लुटपाट नाही, हा गझनीचा महम्मद. ल्यांड डेव्हलपर, इस्टेट एजंट, अश्या नावाने वावरणारा गझनीचा महम्मद. आता झाडं तोडली नाहीत,तर जेसीबीने उपटून टाकली. जिथे जेसीबी जाऊ शकत नव्हता तिथे उभ्या जिवंत जंगलाला आग लाऊन टाकली. पर्ह्या पर्यंत उतरत गेलेल्या उताराचे सपाटीकरण करून झाले. आता ४-५ गुंठे आकाराचे लंगोटी एवढाले प्लॉट पडून त्यात बंगले बांधायला घेतायत. त्यात हाय फाय लोक राहणार त्यान एसी तर हवेच. त्यांच्या आलिशान गाड्यांना डांबराचे रस्ते हवेत. आणि तोंड वरती करून ह्याला डेव्हलपमेंट म्हणायला मोकळे. आता सोमनाथाच हे मंदिर परत भरेल का? आणि कधी? का त्याच्या आधीच निसर्ग आपला हिसका दाखवणार?
जुनी लोकं म्हणतात, तुमच्याकडे नीट नेटक आवरलेल घर आहे, त्यात टीव्ही, फ्रीज, एसी, गाडी, किंवा तत्सम सगळं काही आहे, तर ती झाली संपत्ती.
पण तुमच्याकडे गुरं आहेत, पडवीत सुपारीची पोती आहेत, अंगण भरून कडधान्यांच्या राशी वाळत आहेत, मळणी काढून झाल्यावर लावलेली पेंढ्याची उडवी आहे. निसलेल्या नारळांच्या चोडांचा ढीग झालाय, आमसूल,साठ वाळतायत, आंबे फणसाचा तैगार आहे, आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्यात प्रत्येक पिढीचे लोक दोन्ही हातानी राबतायत. तर हे ऐश्वर्य आहे.
ह्यात फरक असा कि तुमच्याकडे पैसे असतील तर, किंवा नसल्यास कर्ज काढून- संपत्ती एका दिवसात निर्माण होऊ शकते. ऐश्वर्य हे फक्त पैशांनी बनत नाही, आणि पैसे असतील तरी एका दिवसात बनत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष काही वेळेला पिढ्यांपिढ्या खर्ची पडलेल्या असतात.

सड्यावरच्या रहाटीचं ऐश्वर्य, संपत्तीमध्ये रुपांतरीत होतं आहे.. चहुबाजूला सुरु झालेले संपदेचे थेर बघून सड्यावरच्या रहाटीचे माहेर जळत आहे.

No comments:

Post a Comment