Showing posts with label Chaha. Show all posts
Showing posts with label Chaha. Show all posts

06 February, 2016

तो चहा आणि ती कॉफी

चहा हा 'तो'आणि कॉफी हि 'ती' म्हणून का काय कोण जाणे, पण चहा म्हणजे पुरुषी आणि कॉफी म्हणजे  बायकी अस समीकरणच झालेलं आहे. अर्थात व्यक्तिपरत्वे आणि त्या वेळेच्या मूडपरत्वे चहा कि कॉफी याचा निर्णय होतो. भयंकर कष्ट उपसून दमल्यावर आम्हा मुलींनासुद्धा चहाच लागतो, आणि रात्री बेरात्री सिनेमे बघताना मुलगेही कॉफी पितातच, पण तरी एकंदरीत चहा म्हणजे डॅशिंग, शूरवीर, मर्दानी, कष्टाळू (अर्थात मुलीसुद्धा हे असं सगळं असतातच) आणि कॉफी म्हणजे हळवी, भावनिक, कातर, खुशालचेंडू (मुलं हे सगळे प्रकार लोकांना दिसून न देता अमलात आणतात) अस आपलं उगीच ठरून गेलंय..

टीव्हीच्या मालिका आणि व्हॉट्स अँपचे मेसेज म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच.. कोणतीही सुरु असलेली बघा किंवा कोणताही ग्रुप उघडून वाचा.. सगळीकडे तेच तेच!! पण तरीही काही वेगळ्या सिरीयल आणि काही ठराविक मेसेज कायम लक्षात राहतात, वारंवार आठवण होते, आणि हळूच हसायला येतं..
"असंभव" हि सिरीयल - त्यातही, मुख्य कथानकापेक्षाही सगळ्यांच्या फारच आवडीचे झालेले आणि पटलेले ते प्रिया आणि विक्रांत,, यांचं उपकथानक असच कायमच स्मरणात राहिलेलं आहे

तसाच हा चहा-कॉफीचा व्हॉटसअँप मेसेज, अगदी पटलेला आणि लक्षात राहिलेला आहे!!

चहा…? की कॉफी…??
चहा म्हणजे उत्साह..,कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..,कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..,कॉफी अक्षरशः निवांत...!
चहा म्हणजे झकास..,कॉफी म्हणजे वाह मस्त...!!
चहा म्हणजे कथासंग्रह...,कॉफी म्हणजे कादंबरी...!
चहा नेहमी मंद दुपार नंतर...,कॉफी एक धुंद संध्याकाळी...!!
चहा चिंब भिजल्यावर...,कॉफी ढग दाटुन आल्यावर...!
चहा = discussion.., कॉफी = conversation...!!
चहा म्हणजे उस्फूर्तता...,कॉफी म्हणजे उत्कटता...!!
चहा = धडपडीचे दिवस...,कॉफी = धडधडीचे दिवस!...!
चहा वर्तमानात दमल्यावर...,कॉफी भविष्यात रमल्यावर...!!

असंभव सिरीयल हल्ली पुन्हा युट्युबवर बघत असताना त्यातल्या काही प्रसंगाचे तुकडे आणि हा चहा कॉफीचा व्हॉट्सअँप मेसेज ह्यांची माझ्या मनात एकत्र सांगड घातली गेली... ह्या प्रसंगांमध्ये चहा आणि कॉफीचा अगदी ओझरता उल्लेख झालाय, पण ते बघताना तिथे  हा फॉर्वर्डेड मेसेज घिसापिटा असला तरी तंतोतंत फिट होतोय!

प्रिया शास्त्री, मोठ्या कुटुंबातली सगळ्यात लहान मुलगी, दोन मोठे भाऊ-वहिन्या, आईबाबा, आत्या, काकाकाकू, आजोबा, भरपूर मित्रमैत्रिणी..असं आपुलकीचं घनदाट कव्हर..

विक्रांत भोसले, अगदीच एकटा, नावापुरती लाजिरवाणी बहीण, दोनमेव मित्र, पालनकर्ता सरंजामे.

प्रियासाठी, सुलेखा म्हणजे मोठ्या भावाची माजी काळातली भावी बायको, उर्फ काकूची लहान बहीण
विक्रांतसाठी सुलेखा म्हणजे जिवलग मित्राची- पालनकर्त्याचा मुलगा अभिमान सरंजामेची होणारी बायको


ह्या गुन्हेगार सुलेखाचा पर्दाफाश करणे हीच विक्रांत भोसले आणि प्रिया शास्त्री यांच्यातली एकमेव कॉमन गोष्ट..
त्यात प्रियाच्या घरच्यांचा तिच्यावर अजिबात विश्वास नाही, तिने सुलेखावर केलेले आरोप ऐकून ते प्रियालाच वेड्यात काढत राहतात.
पोलिसात असल्यामुळे नजरेतच एक्सरे मशीन फिट झालेल्या इन्सपेक्टर विक्रांतला पहिल्या भेटीपासूनच सुलेखावर संशय आहे! आणि असा संशय घेतल्याबद्दल त्याने जिवलग मित्राचा- अभिमानचा रोष ओढवून घेतलाय.. अर्थात हा सगळा रहस्यभेद त्यांना अगदी सावधपणे आणि कोणालाच कळून न देता करायचाय.
प्रियाला, तिच्या चुलतभावाला- ज्याला सुलेखाने मारून टाकला- त्याला न्याय मिळवून द्यायचाय, आणि विक्रांत अभिमानला सुलेखाच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवाचं रान करतोय...

भरीसभर म्हणजे सरंजामे आणि शास्त्री यांचे घनघोर हाडवैर आहे!

"पोलीस तपास" ह्याव्यतिरिक्त पण ते दोघे बाहेर भेटायला लागतात, ओळख वाढते, मैत्री होते.. विक्रांतबद्दल अभिमानला काहीतरी कुणकुण लागते, कि हल्ली तू एका मुलीबरोबर फिरत असतोस, आणि तो विक्रांतला चिडवायला लागतो.
एकदा विक्रांत आणि प्रिया रस्त्यात बोलत उभे असताना, अचानक योगायोगाने अभिमान तिथे येतो, आणि त्या दोघांचं "काहीतरी आहे" अश्या अर्थी चेष्टामस्करी करतो.
खरं तर "तसं" काहीच नसतं.. निदान तेव्हा तरी!! त्याचं ते सगळं बोलणं प्रियाला अगदीच अनाठायी आणि असभ्य वाटतं, आणि दुसऱ्या दिवशी ती विक्रांतला सांगते कि आपण नको भेटत जाऊया.

हा प्रसंग दाखवलाय चहाच्या टपरीवर!! टपरीभोवतीच ते विशिष्ट वातावरण, चहावाला ढवळून ढवळून चहा करतोय, लोक चहा पितायत, तिथे हे दोघेजण बसलेत,चहावाला काचेच्या ग्लासांतून चहा आणतो, प्रिया नको म्हणते, विक्रांत हातात चहाचा ग्लास धरून तिचं बोलणं ऐकून घेत असतो,
"तुमचा तो मित्र, काय तो बोलत होता? आपण आपल्या कामासाठी भेटतो, राईट?"
"हो, पण अभिमान थोडा मूडी आहे, त्याचं बोलणं तुला आवडलं नसेल तर त्याच्या वतीने आय अँम सॉरी! परत नाही होणार असं!"- अगदी "उत्स्फूर्त" माफी..
"पण तरीही मला आता विचार करावा लागेल, आपण भेटावं कि नाही ते ठरवायला आणि विचार करून झाला कि मी स्वतः तुम्हाला फोन करीन"
आणि त्याचं पुढे काहीही ऐकून न घेता उठून तरातरा निघूनही जाते.
चहाचा घोट घेत विक्रांत ती गेलेल्या दिशेकडे बघत राहतो..
"डिस्कशन" समाप्त.. "वर्तमानातली मानसिक दमणुक".. हा सगळा गुंता सोडवण्याच्या.. "धडपडीचे दिवस.."

***********************************
तिकडे प्रिया 'भेटूया नको' म्हणून निघून जाते,आणि "तुला भेटली नाही का दुसरी कोणी? माझ्या बापाच्या शत्रूच्या मुलीशिवाय?" असं म्हणून अभिमान उखडतो.
असेच काही दिवस मध्ये संपतात, आणि प्रिया आपणहून विक्रांतला फोन करून "ह्या प्रकरणात मदत कराल ना?" विचारते. भेटल्यावर केसबद्दल सविस्तर बोलणं होऊन, नक्की काहीतरी मार्ग निघेल ह्या मुद्द्यावर चर्चा समारोपाकडे वळते.. "निघूया?" प्रिया विचारते..
"या,शुअर!" म्हणून निघणार तेवढ्यात पटकन विक्रांत विचारतो "कॉफी??.. .. इफ यू डोन्ट माईंड..!!" समोरच्याला नाही म्हणताच येऊ नये इतक्या खोलवर, "उत्कटपणे" केलेली रिक्वेस्ट!!
प्रिया ओके म्हणेपर्यंत प्रेक्षकांची पण विक्रांतइतकीच घालमेल होते! आणि ती ओके म्हणते, ते दोघे कॉफीशॉपकडे वळतात, तेव्हा त्या दोघांइतकंच हसू प्रेक्षकांच्या चेहेऱ्यावर असतं, प्रेक्षक पण कथानकाच्या रम्य "भविष्यात रमतात".. 'कॉनव्हर्सेशन' सुरु. "धडधडीचे दिवस!!"

02 April, 2015

माझं एकमेव व्यसन

एक वर्ष बंद केलेला चहा प्यायला सुरुवात केली, आणि चहाबद्दलच्या आठवणी आठवल्या. असं म्हणतात कि आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर अशी एखादी गोष्ट वर्ज्य करावी कि ज्यामुळे त्या व्यक्तीची रोज आठवण होईल. काही जण असं पण म्हणतात कि त्या व्यक्तीला आवडणारी गोष्ट आपण वर्ज्य करायची. गुरुजी जन्मशताब्दीच्या वेळी संघाचे कुणीतरी काका म्हणत होते कि गुरुजीना आवडायचा म्हणून मी चहा सोडलाय, त्यावर एक मित्र “चहा”टळ पणे म्हणाला होता “गुरुजीना आवडायची म्हणून मी शाखा सोडली आहे”
जे काय असेल ते असो, मी आजोबांसाठी चहा सोडला होता. त्यांना आवडणारा हे तर आहेच, पण मला हे बघायचं होत कि मी चहा शिवाय राहू शकते का? म्हणजे चहा पिणे टाळायचे म्हणजे आजोबांची आठवण रोज आलीच.
कोणे एके काळी तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचा भाग म्हणून चहा पिणे हे देशद्रोहाचे लक्षण मानले जायचे. त्याच काळात बहुतेक चहाला “व्यसन” म्हणजे पर्यायाने वाईट गोष्ट समजले जात असणार. नंतर ह्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरीही लहान मुलांनी चहा पिऊ नये हा कायदा होताच. एकंदरीत चहा वाईट असतो हे पटवून देण्यासाठी; चहा पिऊन पिऊन माणूस काळा होतो, एकदा चहाच्या आहारी गेलं कि मग चहा शिवाय पान हलत नाही, आणि वेळेवर चहा मिळाला नाही तर लोकांची डोकी दुखतात इथपर्यंत वाट्टेल ती विधाने मोठी माणसे करत असायची! म्हणूनच कि काय कोण जाणे पण माझी आई आणि मावशी ह्यांनी अजून चहाची चव सुद्धा घेतलेली नाही. त्या दोघी कॉफी टीम मध्ये! साहजिकच मी चहा पिऊ नये असेच माझ्या आईचे पूर्वी मत होते, आणि इयत्ता सहावीपर्यंत मीही चहाला स्पर्श केला नव्हता.
ह्याच्या अगदी उलट म्हणजे बाबा दिवसाला असंख्य कप चहा पीत असतात. आजी तर रागारागाने बाबांना म्हणायची “उद्यापासून मी एक कळशीभर चहा करून ठेवणारे.. त्यात कप बुचकळून भरून घ्यायचा आणि प्यायचा. माझ्या कामात लुडबुड करून एकसारखा चहा करायला सांगत जाऊ नकोस”
आजोबा सांगायचे, चहा प्यायला हवा, कारण आपण कोणाच्या घरी गेलो तर चहा हे सगळ्या थरातल्या लोकांचे पेय आहे, त्यामुळे तेच आपण पीत असू तर आपले आतिथ्य करणे समोरच्याला अडचणीचे वाटत नाही. हीच गोष्ट प्रत्यक्षात घडली आणि माझी चहाशी पहिली ओळख झाली. सहावीत असताना एका मैत्रिणीच्या घरी तिची आई चहा पिण्याचा अतिआग्रह करत होती, आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन असणं शक्य नाही हे तेव्हाही मला स्पष्ट कळत होतं. शिवाय जर अट्टहासाने नको म्हटलं तर मी ब्राह्मण असल्याने तिच्या घरी काही घेत नाहीये असा गैरसमज सहजगत्या तेव्हा तरी नक्कीच झाला असता, आणि ते मला कुठल्याही परीस्थित नको होतं. त्यामुळे “पण अगदी अर्धा कपच दे काय” असं म्हणत कबुल झाले. मनात हजारो वेळा आईला सॉरी म्हटलं, आणि अर्धा कप कोरा गोड चहा नॉर्मल हावभाव करत पिऊन टाकला. घरी आईला भीत भीत सगळ सांगितलं पण मला वाटल होतं तशी आई रागावली वगेरे मुळीच नाही.
त्यानंतर फक्त अश्याच प्रसंगात चहा प्यायला काही वाटेनासं झालं.
अकरावीला पुण्याला गेल्यावर रोज सकाळी चहा प्यायची सवय लागली ती मात्र कायमची. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना चहाची खरी किंमत कळली. दिवसभर कॉलेजमध्ये राब राब राबून झाल्यावर मग रूमवर जायच्या आधी टपरीवरच्या चहाच्या एकेका घोटाबरोबर दमलेला मेंदू तरतरीत होताना जाणवला कि कळायचं कि चहाला उत्तेजक पेय म्हणतात म्हणजे नक्की काय ते.
अश्याप्रकारे पुणे सोडून परत घरी येईपर्यंत मी पूर्ण चहाबाज झालेली होते. बाहेर राहत असताना साहजिकच घरासारखे खाण्यापिण्याचे नखरे चालत नाहीत, आणि मग ज्या ज्या खाद्य वस्तू आहेत त्या न कुरकुरता खाण्याची सवय लागून जाते, खास आवडी निवडी अश्या उरतच नाहीत. पण घरी परत आल्यावर निराश्या दुधाचा चहा हा मात्र अगदी विकपॉइंट बनला. संध्याकाळी सगळी काम आटपली, घरचे सगळेजण घरी आले, कि निराश्या दुधाचा फेसाळ गोड चहा सगळ्यांनी एकत्र पिणे, त्याबरोबर दिवसभराच्या घडामोडी एकमेकांना सांगणे, आणि त्यावेळेला देवासमोरचे निरांजन, उदबत्तीचा वास, घरभर पसरलेला धुपयुक्त धूर हा संपूर्ण दिवसात माझ्या अगदी आवडीचा क्षण.. रोज अनुभवण्याचा..
आमच्या मुर्डीमध्ये तर जणू काही आपले अधिकृत राष्ट्रीय पेय असल्याच्या भक्तिभावाने सगळेजण चहा पितात, आणि लोकांना पाजतात.
ह्या सगळ्या चित्रात आता आजोबा नाहीत, तेव्हा चहा सोडायचा प्रयोग केला, आणि खरोखरच वर्षभरात एकदाही चहा प्यायला नाही. डोकेदुखी, रेस्टलेसपणा असल्या काहीही प्रकारांशिवाय निश्चय पार पडला. ज्यासाठी मुळात चहा प्यायला सुरुवात केली त्याच्यासारखे सामाजिक अडचणीचे प्रसंग क्वचित आले, पण आजोबांसाठी चहा पीत नाही हे कारण पुरेसं संयुक्तिक वाटल्याने कुणी फोर्स केला नाही. एका वर्षानंतर मी पुन्हा चहावाल्यांच्या गोटात प्रवेश केला आहे, माझ हे एकमेव व्यसन पूर्णपणे माझ्या ताब्यात आहे ह्या खात्रीसह!