Showing posts with label murdi. Show all posts
Showing posts with label murdi. Show all posts

13 October, 2015

आठवणीतला एक प्रवास


एखादा दिवस काही चांगल घडल्यामुळे लक्षात राहतो, पण हा दिवस आमच्या लक्षात राहिला त्याच कारण काही लौकिकार्थाने चांगल नव्हतं, तरी अनुभवांची श्रीमंती देणारा तो दिवस होता.
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत एक वेगळ्या प्रकारच्या कामाची संधी मिळाली. मी आणि आमच्या गावातली श्रुती काकू अश्या दोघींना एका ngo ने बोलावलं होत, लहान मुलांना क्राफ्ट, आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड वगेरे शिकवायला.
तसा तर शिकवणे हा आमच्या दोघींचाही प्रांत नव्हे, पण ह्या सगळ्या गोष्टींची हौस, आमचा दोघींचा व्यवसाय एकाच प्रकारचा, आणि चित्रकला, क्राफ्ट, भटकंती, सायकलिंग, पोहोणे, अश्या आमच्या कितीतरी आवडी सारख्या.. एवढाच नव्हे तर आमच्या दोघींची उंची, वजन, रास, ब्लड ग्रुप, गाडीचं मॉडेल सुद्धा सारखं! एकंदरीत आमच जाम पटतं. १२ – १४ वर्षांनी ती मोठी आहे माझ्याहून म्हणून फक्त काकू, नाहीतर मैत्रीणच ती! त्यामुळे हि कल्पना पण आम्हाला खूप आवडली. काहीतरी नवीन काम करायला मिळेल असा विचार केला. आमची मैत्रीण डॉ ललिता गोंधळेकरच्या एक  नातेवाईक त्या ngo चे काम करतात असे समजले, म्हणजे “चला आता नक्की जायला हरकत नाही, हे लोक ख्रिश्चनीकरण वाले नक्कीच नाहीत” अश्या विचाराने बेत पक्का केला.
हि संस्था दाभोळ गावात आहे. आम्हाला सलग ५ दिवस दाभोळ पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गावात जाऊन शिकवायचं होत. गरीब किंवा पालक नसलेली अशी ती मुलं होती. दाभोळ आमच्या मुर्डी पासून ५० किमी वर आहे. दोघींनी एक आड एक दिवस एकेकीची गाडी घेऊन जायचं ठरवलं. आम्ही जय्यत तयारी करून निघालो, हो.. शिकवणे हा प्रकार कधीही केलेला नाही, आणि शिक्षक मंडळीना काय सहन कराव लागत ते मात्र नीटच माहिती..त्यामुळे कोणी काय शिकवायच, जर त्या मुलांनी पटापट सगळ शिकून टाकल, आणि वेळ उरला तर अजून काय काय शिकवायचं ह्याचा भरपूर अभ्यास करून, शिवाय त्यांना दाखवायला आणखी काही कलाकृती बरोबर घेऊन आम्ही निघालो. पहिला दिवस तर मस्त गेला, तिथल्या सगळ्या लोकांशी ओळख झाली, आम्ही जे काय शिकवलं ते त्या लोकांना आणि मुलांना पण आवडलं ह्या आनंदात संध्याकाळी परत आलो. दुसऱ्या दिवशी आमचा आत्मविश्वास वाढला होता, आणि तिसऱ्या दिवशी तर आम्ही सगळ टेन्शन सोडून ट्रीपच्या मूड मध्येच पोचलो होतो.
त्या दिवशी श्रुतीकाकूची गाडी घेतली होती, आणि दाभोळ जवळच्या ओणनवसे ह्या गावात आम्हाला जायचा होत. तिथे ९ वाजता शिकवायला सुरुवात करायची असल्याने आम्ही सकाळी ७ च्या आधीच निघालो. आपल्याच तालुक्यातलं गाव असलं तरी आम्ही तिकडे पहिल्यांदाच जाणार होतो, आणि रस्ता अतिदिव्य असल्याचे आम्हाला कालच सांगण्यात आलं होत. बरोब्बर ३५ मिनिटात दापोली सोडून आम्ही दाभोळ रस्ता धरला, वारेबुवा तीठ्ठा आल्यावर डावीकडे वळलो आणि त्या अतिदिव्य रस्त्याची प्रतीची यायला लागली. आदल्या दिवशी संस्थेतल्या लोकांनी सांगितलेल्या खाणखुणा बघत आम्ही आगरवायंगणी गावावरून पुढे गेलो, आणि मग रस्त्यात कुठेही पाट्या, फलक दिसेनासे झाले. जाडे जाडे दगड सर्वत्र सारखे पसरून ठेवलेल्या त्या रस्त्यावरून अक्षरशः रांगत होती आमची गाडी. मग एका ठिकाणे दोन रस्ते फुटले तेव्हा आता कुठे वळाव ह्या विचारात आम्ही थांबलो. आगरवायंगणी सोडल्यापासून आम्हाला कुठेही मनुष्यप्राणी दिसला नव्हता, मोबाईल बघितला तर नेटवर्क होतं मग ngo मधल्या लोकांना फोन करून सांगितल कि आम्ही अश्या अश्या ठिकाणी आलो आहोत आता कुठे वळायच? त्यांनी सांगितला कि उजवीकडे वळां. तेवढयात ४-५ शाळकरी मुलं.. हातात बेचकी आणि मारलेला पक्षी अश्या अवतारात एका दाट जाळीतून बाहेर येताना दिसली. “ए बाबू.. ओणनवसे?” अस विचारल्यावर त्यांनी डाव्या बाजूच्या रस्त्याकडे मान उडवली. दोन जणांनी दोन रस्ते सांगितल्यावर जरा गोंधळ झाला, पण आम्ही त्या मुलाचं ऐकायचं ठरवलं, कारण प्रत्यक्ष कुठे वळायच ते बघून त्यांनी सांगितला होत, फोन वर बोलताना गैरसमज होऊ शकतो.
आम्ही गाडी काढून निघणार तेवढ्यात लक्षात आल कि मागचा टायर झकासपैकी पंक्चर झालेला दिसतोय. गाडी श्रुतीकाकुची असल्यामुळे तिच्या डिकीत सगळी आयुध तयार होती, हेच काल घडल असत तर माझी गाडी कुठली एवढी टकाटक असणार.. डिकीतून पंप बाहेर काढून हवा भरली आणि आता निदान पंक्चर वाल्यापर्यंत तरी जाऊया असा विचार करून निघालो खरे, पण काही फुटावरच टायर महाराज पुन्हा बसले. आता चाक काढून घेणे आणि मग पंक्चरवाला शोधणे आले. पण मग वाटल चाक काढून घेतलं तरी गाडी इथेच कशी ठेवायची? अनोळखी गावात?  आणि शिवाय किती अंतर अजून बाकी आहे त्याची काहीच कल्पना येत नव्हती. नकोच ते. मग गाडी ढकलत चालायची मोहीम सुरु झाली. अतिशय वाईट रस्ता, ज्याच्यावर कोणे एके काळी डांबर असावं असं वाटत होत. वेडीवाकडी वळणे आणि तीव्र चढ उतार ह्यातून सर्कस करत निघालो. उन वाढायला लागल, दगड आणि लाल माती तुडवत गाडी ढकलताना सकाळी ऐटीत चढवलेल्या स्वेटर आणि स्कार्फची आता अडगळ व्हायला लागली. एका वळणावर वळून समोर बघितला तर खोलवर दाभोळ खाडी, बंदरातल्या बोटी, उसगाव, खाडीच्या पुढे समुद्र असं सगळ दिसायला लागल! तिसरीच्या भूगोलाच्या पुस्तकात वाचून तालासुरात केलेलं पाठांतर.. वासिष्ठी नदीsssss.. दाभोळची खाडीsssss असं अचानकपणे समोर आल. त्या पाठांतराच्या चाली इतकच सुंदर! पण ते सगळ बघत बसायची हि वेळ नव्हती. आता सारख घड्याळाकडे लक्ष जायला लागल, कारण दिलेली वेळ पाळण्याची वाईट खोड! ते ओणनवसे गाव अजून कुठे नजरेच्या टप्प्यात पण नव्हत आणि पावणे नऊ वाजत आले होते. मग आम्ही चालता चालताच त्या लोकांना फोन करून सगळा प्रकार सांगितला. दिलगिरी व्यक्त करून उशीर होत असल्याच सांगितलं आणि आम्ही येई पर्यंत सगळ्या मुलांना कागद वाटून चौरसाकार तुकडे करून ठेवायला सांगा म्हणजे आल्या आल्या लगेच ओरिगामी सुरु होईल असं सुचवलं. जास्तीत जास्त वेगाने गाडी ढकलत आम्ही अजून अर्धा तास चाललो असू. तिथे एका गुर चरवत बसलेल्या आजीला बघून गाव जवळ आल्याच लक्षात आल. तिच्याकडून दोन बहुमूल्य बातम्या मिळाल्या. एक म्हणजे ओणनवसे शाळा जिथे आम्हाला जायचं होत ती आता अगदी जवळ आली आहे. आणि दुसर म्हणजे इथून सगळ्यात जवळचा पंक्चरवाला दाभोळला आहे. म्हणजे ८ किमी! हरे राम म्हणत आम्ही शाळेत पोचलो, आणि बघितलं तर कुलुपबंद शाळेभोवती हुंदडत असलेली मुलं सोडली तर तिथे कुणीच नव्हत. मग मात्र आम्ही ठरवलं कि आता चाक काढून एकीने  मिळेल ते वाहन पकडून दाभोळला जायचं आणि पंक्चर काढून परत यायचं तोपर्यंत शिकवण्याच काम आज एकटीनेच करायचं. त्या निर्मनुष्य रस्त्यावर वाहन मिळेल कि नाही शंकाच होती. नाहीतर ८ किमी चालायची मानसिक तयारी झालीच होती. आता एवढ गाडी ढकलत आल्यावर नुसतंच चालणं किती सोपं वाटायला लागल होत!
प्लेजरच चाक काढण काही अतिकठीण नाही, पण श्रुतीकाकुच्या गाडीची हि पंक्चर व्हायची आणि चाक काढायची पहिलीच वेळ होती, त्यात आमचे हात घामाने आणि धुळीने ओलेचिंब झालेले. काही केल्या नट हलेनात. आमचा हा खटाटोप सुरु असताना युनिकोर्न किंवा तत्सम भली मोठी बाईक घेऊन तिकडे एक हिरो साहेब दाखल झाले. सगळ्या हत्यारांची तपासणी करून त्याने जेव्हा चाकाच्या मध्याबिंदुवर असणारा जाडा नट काढायला घेतला तेव्हा अक्षरशः घाबरून आम्ही त्याच्या हातातून हत्यार काढून घेतली. आता चाक निघालेलं असत तर ह्या मनुष्याच्या गाडीवरून दाभोळ गाठता आल असतं. पण तस काही व्हायचं नव्हत.
तेवढयात एका सिक्स सीटर मधून एक मध्यमवयीन काका डोकावत विचारायला लागले कि काय झालाय? सगळा प्रकार कळल्यावर त्यांनी तातडीने खाली उतरून चाक काढाल! त्याचबरोबर कळल कि ते जातिवंत मेकानिक आहेत. मग त्यांनी सगळी चौकशी केली, आम्ही कुठून कुठे कशासाठी चाललो आहोत त्याची. डॉ गोंधळेकरांच नाव ऐकल्यावर तर त्यांच्या दृष्टीने विषय संपला होता “अरे वा. ते तर आमच्या भाजपचे, म्हणजे तुम्ही आमच्या घरचीच माणस काळजी सोडा तुम्ही  ४ वाजता संपणार ना तुमचा क्लास, त्याच्या आत चाक पाठवतो” असं म्हणून त्यांच्या गाडीत बसून चाक घेऊन गेले पण.
सगळेच प्रश्न एकदम निकालात निघाल्यामुळे आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि हे ngo वाले अजून आले कसे नाहीत असा प्रश्न आत्ता आम्हाला पडला. त्यांना फोन केला तेव्हा कळल कि त्यांची पण गाडी पंक्चर झाली आहे! चला म्हणजे आम्हाला उशीर झाल्याच गिल्ट पण संपल.
आत्ता कुठे आम्ही शांतपणे एकमेकींच्या अवताराकडे बघितलं, तर सकाळच्या इस्त्रीच्या कपडयांची अवस्था आता अशी झाली होती कि किती वर्ष कपडे धुतले नसावेत. टाचेखाली अडकून अडकून फाटलेली माझी सलवार तिथेच दगडावर बसल्या बसल्या हातशिलाईने शिवायला मी सुरुवात केली (सुईदोरा हि श्रुतीकाकुच्या पर्सची कृपा) आणि आम्ही दोघीही प्रचंड हसत सुटलो! तेवढयात बोलेरो मधून ngo वाली मंडळी उतरली ती चिंतातूर चेहेऱ्याने. घाईघाईने शिवणकाम आटपून आम्ही उठलो तेव्हा आम्हाला हसताना बघून ते सगळे अवाकच झाले. मग रोजच्याप्रमाणे आमचा क्लास पार पडला.
आमचं शिकवण झाल कि त्या मुलांना जादूचे प्रयोग दाखवले जाणार होते. जादुगार दाभोळ हून आले ते आमच्या गाडीच चाक घेऊनच. आम्ही शिकवणी संपवून बाहेर आलो तेव्हा गाडी चाक जोडून तयार होती! आमच्यासाठी एवढे कष्ट घेतल्याबद्दल सगळ्या मंडळींचे परत परत आभार मानले. मगाचच्या मेकानिक काकांना द्यायला पैसे देऊन आम्ही गाडीजवळ आलो. “ चल बायो.. निघायचं ना?” गाडीच्या सीट वर थाप मारून श्रुतीकाकू लाडाने गाडीला म्हणाली. गाडी सुद्धा मनातल्या मनात माय प्लेजर असं म्हणाली असेल! मग त्याच दिव्य रस्त्याने ५० किमी अंतर कापून आम्ही घरी पोचलो, संध्याकाळचा निरश्या दुधाच्या चहाचा कप हातात देत आईने विचारलंन “कसा गेला आजचा दिवस?” मी आणि श्रुतीकाकू एकमेकीना टाळी देत एका सुरात ओरडलो,, “मस्त!”

08 October, 2015

गणपती उत्सव 2015

गावभर हिंडून फिरून झाड़ून सगळे गणपती बघुन घरी परत आल्यावरची संध्याकाळ.. मित्रमंडळी.. गणगोतांची वर्दळ.. चहा कॉफी चे एकावरएक राउंड...
धुपाचे खड़े घालून सुगंधित झालेली धुरी..माजघरभरून पसरलेली सतरंजी. संध्याकाळची पूजा. पेटीतबले टाळ घेऊन यंगष्टर्सचे आगमन. पेटीचे सुरेल सूर आणि पाठोपाठ उंच आवाजात सुरु झालेलं "सुखकर्ता..."
1..2..3..करत एकामागुन एक आरत्या.. सगळ्या देवांबरोबर भगवद्गीता,शिवजीमहाराज यांच्या आरत्या.. तालासूरात घुमवलेलं येई हो विठ्ठले..वाढत जाणाऱ्या आरत्यांच्या संख्येबरोबर चढत जाणारे आवाज.. खणखणीत वाजणाऱ्या टाळांच्या लयीबरोबर तल्लीन होऊन डुलणारी पोरं आणि दादा लोक्स... 5वर पंखा असताना पण कपाळावर चमकलेले घामाचे थेंब.. अच्युतम केशवम् झाल्यावर मोरया हो बाप्पा मोरया हो चा गजर...
एकीकडे आईने केलेल्या चहाचा दरवळ.. धिरगंभीर आवजातले देवे.. सुरु असतानाच मनात दाटून येणारं गांभीर्य.. आपोआप जोडले गेलेले हात.. सुखकर्त्या विघ्नहर्त्याची मनात केलेली आर्त प्रार्थना.... मंत्रपुष्पांजली झाल्यावर चहा आणि प्रसाद... गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला हा क्षण..1894 च्या सुमारास सुरु झालेली ही परंपरा.. पूर्वजांनी दिलेला ठेवा...

पटापट सगळी वाद्य घेऊन मूलं पुढच्या घरी पोचली सुद्धा.. चहाचे कप विसळताना मनात साठलेले विचार.. शेजारच्या घरात चाललेलं भजन आमच्या पडवीत बसून ऐकताऐकता टाइप केलेत. तिथल्या वाद्यांचा ठेका इथे कीपॅडवर आपटणाऱ्या बोटांना पण जाणवतोय... "पावन झाली चंद्रभागा झाला कृतार्थ पांडुरंग" सुरु झालं आणि पाठीमागून म्हणणारे बाल तरुण आवाज ऐकताना खरोखर असंच मनात येताय .. कळसावरती नवी पताका..तेज नवे आले..

ह्या परंपरा चिरंतन ठेवण्याची शक्ति-बुद्धि दे आम्हाला रे बाप्पा.,,  मोरया...

05 October, 2015

शांतता

सकाळी 11 च्या सुमारास मुंबईचे काका काकू घरी येऊन पोचतात. या या वगेरे होतं, पाणी बिणी पिउन काकू मागच्या पडवीतल्या झोपाळ्यावर ऐसपैस बसते आणि म्हणते "अहाहा किती शांतता आहे ना इथे! व्वा!"
आणि मी विचित्र नजरेनी तिच्याकडे बघते. हा नेहेमीचा कार्यक्रम. कारण मला त्या वेळी कुठल्याही प्रकारे शांतता वाटत नसते. झोपाळ्याची कुरकुर, एखादा ओरडणारा पक्षी, आई ताक करत असेल तर तो घुसळण्याचा आवाज, वॉशिंग मशीन सुरु असेल तर त्याचा घुर्रर्र आवाज, कुत्री मांजरं वासरं असले आवाज ह्यात हिला काय शांतता वाटत्ये असा मला कायम प्रश्न पडतो. तसं बोलून दाखवल्यावर काकूच म्हणणं असं की मुंबईच्या तुलनेत तिला इथे शांतता वाटते.
असेल ब्वॉ..
मध्यंतरी आजोळी "निवांतपणे" जाण्याचा खुप वर्षानी योग आला. पूर्वी 9वी पर्यन्त नेहमीच निवांत राहायला जायचो तेव्हा आयुष्यात कसलाच स्ट्रेस नसयचा. ते काय असतं तेहि माहिती नसण्याचे रम्य दिवस होते ते. तेव्हा त्याची किंमत कळायचा प्रश्नच नव्हता. ह्यावेळी दोन दिवस तिथे मजेत घालवून झाले. गप्पा टप्पा आणि भावंडांशी दंगा मस्ती करुन झाली. रामाच्या देवळात दर्शन घेऊन तिथल्या कट्टयावर बसल्यावर अचानक मला पण साक्षात्कार झाला "आहाहा किती शांत वाटतंय.." वास्तविक तिथे पण आमच्या घरासारखेच विविध आवाज येत होते मग ही शांतता कुठली?
तिथे काही आवाज पूर्ण बंद झालेले होते काही काळासाठी तरी.. आज किती काम झाल, त्याचे किती पैसे मिळतील, ह्या बॅगला किती कापड लागताय, कुणाची ऑर्डर कधी संपवायची आहे, कुणाला कुठलं डिझाइन हवं आहे, आणि एवढं करून ह्या स्ट्रगलमधून काहीतरी चांगली पोझिशन आपली कधीतरी येणार आहे का..हे सगळ कशासाठी करतोय आपण... हे  सगळे मनातले आवाज.. पूर्ण थांबलेले..
मग कळलं शांतता ही कधीकधी आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते.. काकूला पण मुंबईहुन मुर्डीला आल्यावर असंच होत असणार.
रारंगढांगात त्या विश्वनाथला जसा हिमालयात "शांततेचा आवाज" ऐकायला आला तसंच काहीतरी. मुंबई-पुणे-मुंबई मध्ये सिंहगडावर मुक्ता बर्वे म्हणते "अश्या ठिकाणी आपण स्वतःविषयी जरा निवांत विचार करतो" तसच काहीतरी..

22 April, 2015

भाग २
मी केलेली हापूसची कलमे
गेल्या वर्षी एकदा आंबे काढणीच्या दिवसात, संध्याकाळी, वाड्याच्या भिंतीला टेकून उभं राहून खाली बघितलं, आडवे तिडवे हात पसरून वर्षानुवर्ष उन पाऊस झेलत असलेली हि अजस्त्र कलम. लांब सावल्या पडल्यामुळे अजूनच मोठमोठी दिसत होती. कुणी लावली असतील? आजोबांच्या पण आठवणीच्या अगोदर. ह्या झाडांकडे आठवणी आहेत तेवढ्या आजघडीला दुसऱ्या कुणाकडे नाहीत, पण त्या आपल्याला कळणार नाहीत कधीच. तिसरी पिढी इथे आल्याच बघून ह्या कलमांना काय वाटत असेल? कौतुक वाटत असेल कि आयते आंबे न्यायला आले असं वाटत असेल? एक एक विचार मनात येत गेले. काळोख पडत चाललेला आणि समोर शतकभराची साक्षीदार असलेली कलम. सर्रकन काटाच आला एकदम. आपणही जमतील तशी कलम लावायला हवीत असा विचार पण चमकून गेला मनात.
आणि मग पावसाळा सुरु झाल्यावर कलमं भरायची मोहीम सुरु केली. लहानपणी गावातले काकालोक प्रचंड प्रमाणावर कलमं भरायचे ते आठवल, पण ताडपत्रीची शेड आणि त्यात ठेवलेली कलमं ह्याशिवाय डोळ्यासमोर काही येईना. म्हणजे कलमं भरायचं तंत्र आणि पद्धत आठवेना. तेव्हा अगदीच शाळकरी वयात ते काही एवढ बारकाईने बघितलेलं पण नव्हतं.
आंब्याची बाठ मातीत टाकून दिल्यावर त्यातून रोप रुजत, त्याला मोठेपणी जे आंबे येतात, ते मुळच्या जातीचे नसतात. ते सगळे रायवळ. वेगवेगळ्या चवींचे. विशिष्ठ जातीच्या आंब्याचे झाड बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक पद्धतींपैकी एक म्हणजे स्टोन ग्राफटिंग. त्याला बोलीभाषेत कलमे भरणे असे म्हटले जाते. आंब्याच्या रोपावर(माड्यावर) हव्या त्या जातीच्या आंब्याची फांदी(खुंटी) जोडली कि त्या झाडाला येणारे आंबे हे खुंटी ज्या झाडाची आहे तसेच होतात.
आंब्यांचा अख्खा सिझनभर टाकलेल्या बाठा पाऊस पडल्यावर रुजायला लागल्या. कोवळे आणि मऊ तांबूस रंगाचे कोंब बाठीतून वर डोकावले आणि बघता बघता वितभर उंचीचे माडे दिसायला लागले. जून जाड आणि टरटरीत डोळे असलेल्या चांगल्या खुंट्या. धारदार सुरी, ब्लेड, कोरी प्लास्टिकची पिशवी असं सगळ साहित्य जमा केलं. आणि सुरुवात केली. दुसऱ्याला कलम भरताना बघताना ते जितक सोप वाटत तितकं ते सोप नाही ह्याची जाणीव पहिल्या दोन तीन प्रयत्नात झाली. कधी चीर तिरकी पडून माडा फुकट जायचा तर कधी तासून तासून खुंटी संपूनच जायची. कधी गाठ सैल पडून कलम ताठच राहीना.
हि सगळी धडपड बघून दीपकदादाला दया आली बहुतेक, आणि म्हणाला मी दाखवतो ते बघ नीट एकदा. कमीतकमी हालचाल करत आणि माडा, खुंटीला कमीतकमी हाताळत त्याने सफाईने कलम भरले ते इतके झटकन कि काही कळायच्या आत! अमुक नंबरला अमक्याचा नंबर मेसेजने पाठवायचा कसा ते दाखव असं बाबांनी म्हटल्यावर, मी फटाफट बटण दाबून तो मेसेज पाठवून पण दिला, तेव्हा बाबा वैतागून म्हणाले, “अगो जरा सावकाश दाखवा हा. भरभर बटण दाबून काय करता ते कळतसुद्धा नाही” तेव्हा त्यांना कस वाटत असेल ते मला आत्ता कळल.
नंतर प्रयत्न आणि निरीक्षणाने हळूहळू जमायला लागल. वितभर उंच माडा, बाठीसकट, बऱ्यापैकी जाड झालेला, पण कोवळा, तांबूस रंगाची जागा हिरवा रंग घेण्याच्या आधी, असा निवडून धारदार ब्लेडनी सपकन अर्ध्यात कापला कि हातावर चिकाची बारीकशी चिळकांडी उडते. पालवीचा भाग टाकून देऊन बाठीकडच्या भागाला बरोबर मध्यावर उभा छेद देताना सुरुवातीला भयंकर तारांबळ उडायची. नंतर खुंटीला खालच्या बाजूने सुरीने तासून निमुळता पण चपटा आणि टोकेरी आकार दिला कि शाळेतल्या सवयीप्रमाणे पेन्सिल तासल्यावर जस हातावर टोचून टोक तपासायचो, तसा तासलेल्या खुंटीला हात लावायचा हटकून मोह व्हायचा. तो टाळायचा. कारण आपल्या हाताने इन्फेक्शन झाल तर कलम जगत नाही. तासलेली खुंटी उभ्या चिरलेल्या माड्यात अलगद अडकवून प्लास्टिकच्या पिशवीची पट्टी कापून घट्ट बांधून टाकायची. पिशवीत माती भरून त्यात कलम लावायचं. सांधा होतो त्याला पाणी लागू न देता फुलपात्राने  अलगद पाणी घालायचं. आडोश्याला, उन पाऊस लागणार नाही असं ठेवायचं.
एकदा तंत्र जमल आणि मग वेडच लागलं. सारखा तोच उद्योग. पण खरी चिंता पुढेच होती. हि कलम जगतात का नाही हे बघण्याची. रोज सकाळी उठल कि दात घासता घासताच कलमांच निरिक्षण. पहिले चार पाच दिवस झाले तरी काही ढिम्म लक्षण दिसेना तेव्हा निराशाच वाटायला लागली, पण अजून एक दोन दिवसांनी बघितलं तर खुंटीच्या डोळ्यातून एक पोपटी रंगाचा थेंब दिसायला लागला होता, पूर्णविराम असतो तितका बारीक. आश्चर्य, आनंद, उत्सुकता, काळजी, असं सगळ एकदमच वाटायला लागलं. परवापर्यंत हा माडा आगरात होता, आणि खुंटी ४ किमीवर असलेल्या एका प्रचंड मोठ्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर. नुसतं प्लास्टिकच्या पिशवीने त्यांना एकत्र बांधायला आपण निमित्त झालो, आणि आता एक नवीन हापूसच झाड तयार होतंय. मातीतून मिळणारा जीवनरस त्या माड्यामार्फत खुंटीच्या टोकापर्यंत पोचला होता. पुढच्या २-३ दिवसात त्या पूर्णविरामाएवढ्या पोपटी थेंबाची जागा लुसलुशीत पानांनी घेतली. बघता बघता त्या पानांचा रंग गुलाबी, तांबूस, मातकट, पोपटी, हिरवा, कळपट हिरवा असा बदलत गेला. दोन तीन आठवड्यात उंची आणि पानांची संख्या वाढली.
आता त्या कलमांना मोकळ्या आकाशाखाली, उन पाऊस दिसायला पाहिजे, त्यामुळे सगळ्याची रवानगी अंगणात झाली. रांगेने ५०-६०  कलम मांडून ठेवल्यावर, शेजारची मेघनाकाकू कौतुकाने म्हणाली,”ऐश्वर्या कपौंड झकास झालाय हो तुझ” तेव्हा जाम म्हणजे जामच भारी वाटल!

धो धो पावसाच्या धारा झेलताना, जी दुर्बल होती त्यांनी तिथेच राम म्हटला. बाकीची जोरात वाढायला लागली. पूर्ण एक वर्ष त्यांना पाणी लागेल असं बघून पुढचा पाऊस आला (यंदाचा) तेव्हा काही कलम तर कंबरभर उंचीची झालेली. लगेच त्यातली काही प्लेजरवर घेतली, कमपोंडात नेली, आणि खड्डे खणून लागवड झाली सुद्धा! आजोबांच्या कलमांसमोर हि कलम म्हणजे अगदी आजोबांचं बोट धरून चालायला शिकणारी मीच वाटत होते मलाच. ह्या कलमांकडे बघताना अगदी वाकून बघायला लागतंय, काही वर्षांनी मान उंच करून बघव लागेल, आजोबांच्या कलमांसारखीच हि पण कलम मोठी मोठी होतील. त्यांच्यावर चढायला पण कसबी मनुष्य लागतील. मग तेव्हा मी ह्या जगात असेन किंवा नसेन, पण इतकी वर्ष जे भरमसाठ आंबे खाल्ले त्याची परतफेड निसर्गाला आपण काही अंशी तरी करत आहोत ह्याच समाधान झाल. बुंध्यात हाताने माती चेपताना मनात म्हटलं, लवकर आणि भरपूर लागायला लागा रे बाबानो.

19 April, 2015

भाग १ 
आमच्या कलामांच्या बागेशी निगडीत असलेल्या माझ्या आठवणी तीन वर्षे वयापासुनच्या आहेत. तेव्हा घरापासून तिथपर्यंत जायचं तर तीन चार किमी. चालत जाणे हा एकच मार्ग होता. घरातून बाहेर पडल कि लगेचच जी चढण सुरु व्हायची ती शेवटपर्यंत. त्यामुळे चालताना दम लागला कि बाबा कडेवर बसवून घेऊन जायचे. एखाद्या सहलीला निघाल्यासारखा खाऊचा डबा बरोबर घेतलेला असायचा. वरती पोचल कि आधी तो खाऊ खाणे. मग ‘कोल्ह्याच्या पाण्यावर’ जाऊन पाणी पिणे असा कार्यक्रम असायचा. मग बाबांना सगळीकडे फिरून कलमांकडे लक्ष द्यायचं असायचं, आणि आमचं त्राण आधीच संपलेलं असल्यामुळे तिथे वाड्यातच देवजी नानाच्या इथे मला आणि आदितला बसवून बाबा त्यांची काम करायला जायचे. परत येताना बोरं, चिंचा, आवळे, बिया, कोकम, फणस, बिब्बे, हरडे, उंड्या, लिंब, रामफळ ह्यातील ज्याच सिझन असेल ते घरी घेऊन जायचं. आंबे काढणी हा एक स्वतंत्र सोहळा!
हि कलमांची बाग आजोबांच्या अति जिव्हाळ्याची, कारण त्यांनी स्वतः ती घेतलेली. पहिल्यापासूनच त्या जागेला कमपोंड असं नाव पडल! म्हणजे कम्पाउंड. घेतली तेव्हाच त्यातील काही कलमे ५०-६० वर्षाची होती म्हणतात. म्हणजे आज त्याचं वय नक्कीच १०० च्या वर आहे. शिवाय प्रत्यक्ष ज्यापासून काही आर्थिक फायदा होत नाही पण उपयुक्त अशी वड, कळकी, आईन, यासारखी झाडं चिक्कार असल्याने दिवसासुद्धा घनदाटपणा असतो. त्याकाळी झाडं तोडणे म्हणजे डेव्हलपमेंट हि संकल्पना उगवलेली नव्हती. जमीन एका लेव्हलची नाही तर सतत चढ उतार असल्यामुळे सगळा भाग नजरेच्या टप्प्यात येत नाही आणि जास्तच गूढ वाटत. रात्रीच्या वेळी बाऊळ, रानडुक्कर ह्यांचा नेहेमी आणि क्वचित बिबट्याचा वावर चालतो. काळाबरोबर काहीकाही बदल झाले, बऱ्यापैकी अंतरापर्यंत कशीबशी तरी गाडी जाईल असा रस्ता झाला. मोठे झाल्यामुळे कुणाच्याही सोबतीशिवाय एकटच तिथे जाणं हि नेहेमीची गोष्ट झाली.
पावसाळ्यात अनावश्यक रान भयंकर माजत आणि धो धो धो पडणाऱ्या पावसाच्या घनघोर आवाजात सगळ कमपोंड किर्रर्र झालेलं असतं. आधीच पावसाची काळोखी, त्यात वाढलेलं रान. माजत चाललेल्या वेली आणि झुडपं कलमांना वेढून टाकतात, आणि मग सुरु होतो रान तोडणीचा कार्यक्रम. कोल्ह्याच पाणी धोधो वाहायला लागतं. सगळीकडे बारीक बारीक प्रवाह असतात त्यांना ओलांडत कमपोंडात शिरलं, कि कुठल्या भागात काम सुरु आहे हे कळण्यासाठी हुऊऊउ अश्यासारखा आवाज करायचा, प्रत्युत्तर आल कि त्या रोखानी जायचं. आईबरोबर गेल असेल तर काम करणाऱ्या सगळ्यांसाठी आई गोळ्या, किंवा काहीतरी खाऊ देते.
ह्या आमच्या कमपोंडाला लागुनच ग्रामदेवतेच देऊळ आहे. दगडांनी बांधलेल्या सुबक पाखाडीवरून चढून गेल कि घनदाट झाडीत कौलारू दगडी देऊळ दिसत. रायवळ आंबे, कोकम, बकुळ, सुरंगी, अश्यांच्या अजस्त्र वृक्षानी अक्षरशः वेढलेलं. यायच्या जायच्या वाटेला अगदी लागून असलेल भुवन. म्हणजे नागाच वारूळ. रान तोडणी, गवत काढणी, आंबे काढणी ह्या सगळ्याला सुरुवात करताना, ग्रामदेवतेला नारळ न चुकता देणे ह्याच्यावर सगळ्याचा कटाक्ष असतो.
उन्हाळा जवळ आला कि सगळ्या वातावरणाला कायमचाच एक सुगंध व्यापून टाकतो. आठवणीतल्या कवितांमधल्या कवी माधव यांच्या ‘कोकणवर्णन’ ह्या कवितेच्या ओळी प्रत्यक्षात दिसायला लागतात. आंब्याने चिंचेवर सावली धरली म्हणून कोपलेली रातांबी(कोकम), नवयुवतींच्या कोमल गालांसारखे काजू, रानोरानी पिकलेली करवंदे-तोरणे, भुळूभूळू फळे गाळणाऱ्या जांभळी, आणि पोटात साखरगोटे आणि बाहेरून कंटक घेऊन झुलणारा पुरातन रहिवासी फणस. ह्या सगळ्याच्या लोभाने सगळ्याच झाडावर झोके घेणारे वांदर.
हाच उन्हाळा माणसांना निरुत्साही बनवतो म्हणतात, पण इथे घरोघरी सगळ्यांच्याच कार्यक्षमतेत अचानक इतकी वाढ होते कशी हे एक कोडंच आहे. दिवस उगवतो केव्हा आणि भरभर काम उरकताना संपतो केव्हा ते काळातच नाही. बारीक बारीक कैऱ्या दिसायला लागल्यापासूनच कमपोंडातल्या खेपा वाढतात. चोर, माकडं, नैसर्गिक अडचणी ह्यातून पार पडून आंबे उतरवून झाले पाहिजेत हाच विचार. गेल्या वर्षी एकदा आंबे काढणीच्या दिवसात, संध्याकाळी, वाड्याच्या भिंतीला टेकून उभं राहून खाली बघितलं, आडवे तिडवे हात पसरून वर्षानुवर्ष उन पाऊस झेलत असलेली हि अजस्त्र कलम. लांब सावल्या पडल्यामुळे अजूनच मोठमोठी दिसत होती. कुणी लावली असतील? आजोबांच्या पण आठवणीच्या अगोदर. ह्या झाडांकडे आठवणी आहेत तेवढ्या आजघडीला दुसऱ्या कुणाकडे नाहीत, पण त्या आपल्याला कळणार नाहीत कधीच. आत्ता तिसरी पिढी इथे आल्याच बघून ह्या कलमांना काय वाटत असेल? कौतुक वाटत असेल कि आयते आंबे न्यायला आले असं वाटत असेल? एक एक विचार मनात येत गेले. काळोख पडत चाललेला आणि समोर शतकभराची साक्षीदार असलेली कलम. सर्रकन काटाच आला एकदम. आपणही जमतील तशी कलम लावायला हवीत असा विचार पण चमकून गेला मनात.

सिझन संपत असताना झाडबाकी झाली, आणि शेवटचे आंबे घरी आणायचे होते. योगायोगाने आत्या आलेली होती. मी निघाल्यावर म्हणाली चल ग मी पण येते, मग तिच्याच गाडीने आम्ही आंबे आणायला गेलो. क्रेट गाडीत ठेवले आणि देवळात जायला म्हणून पाखाडी चढून वर गेलो. गणपती विसर्जनाच्या नंतर जसं उदास वाटत, तसच वाटत होत, देवळाजवळ पोचलो आणि दाराची कडी काढून आता शिरणार तोच आत कसली तरी चाहूल लागली. देवतांच्या दगडी मूर्तींच्या मागून एक लांबलचक जनावर देवळाची भिंत चढून देवळाबाहेर गेलं. तिथे बाजूला काढून ठेवलेल्या घंटांना त्याचा धक्का लागला आणि एक बारीकसा नाद काही क्षण जाणवत राहिला. जागेवरच थांबून आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो होतो, ते पुढे जाऊन देवाला नमस्कार केला आणि शांतपणे पाखाडी उतरलो. पुढच्या सिझन पर्यंत आणि कायमच दरवर्षीच हा राखण्या आपल्या कंपोडाची राखण करील, असा शांत विचार मनात घेऊन घरी येण्यासाठी गाडीत बसलो.
©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे@मुर्डी

02 April, 2015

माझं एकमेव व्यसन

एक वर्ष बंद केलेला चहा प्यायला सुरुवात केली, आणि चहाबद्दलच्या आठवणी आठवल्या. असं म्हणतात कि आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर अशी एखादी गोष्ट वर्ज्य करावी कि ज्यामुळे त्या व्यक्तीची रोज आठवण होईल. काही जण असं पण म्हणतात कि त्या व्यक्तीला आवडणारी गोष्ट आपण वर्ज्य करायची. गुरुजी जन्मशताब्दीच्या वेळी संघाचे कुणीतरी काका म्हणत होते कि गुरुजीना आवडायचा म्हणून मी चहा सोडलाय, त्यावर एक मित्र “चहा”टळ पणे म्हणाला होता “गुरुजीना आवडायची म्हणून मी शाखा सोडली आहे”
जे काय असेल ते असो, मी आजोबांसाठी चहा सोडला होता. त्यांना आवडणारा हे तर आहेच, पण मला हे बघायचं होत कि मी चहा शिवाय राहू शकते का? म्हणजे चहा पिणे टाळायचे म्हणजे आजोबांची आठवण रोज आलीच.
कोणे एके काळी तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचा भाग म्हणून चहा पिणे हे देशद्रोहाचे लक्षण मानले जायचे. त्याच काळात बहुतेक चहाला “व्यसन” म्हणजे पर्यायाने वाईट गोष्ट समजले जात असणार. नंतर ह्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरीही लहान मुलांनी चहा पिऊ नये हा कायदा होताच. एकंदरीत चहा वाईट असतो हे पटवून देण्यासाठी; चहा पिऊन पिऊन माणूस काळा होतो, एकदा चहाच्या आहारी गेलं कि मग चहा शिवाय पान हलत नाही, आणि वेळेवर चहा मिळाला नाही तर लोकांची डोकी दुखतात इथपर्यंत वाट्टेल ती विधाने मोठी माणसे करत असायची! म्हणूनच कि काय कोण जाणे पण माझी आई आणि मावशी ह्यांनी अजून चहाची चव सुद्धा घेतलेली नाही. त्या दोघी कॉफी टीम मध्ये! साहजिकच मी चहा पिऊ नये असेच माझ्या आईचे पूर्वी मत होते, आणि इयत्ता सहावीपर्यंत मीही चहाला स्पर्श केला नव्हता.
ह्याच्या अगदी उलट म्हणजे बाबा दिवसाला असंख्य कप चहा पीत असतात. आजी तर रागारागाने बाबांना म्हणायची “उद्यापासून मी एक कळशीभर चहा करून ठेवणारे.. त्यात कप बुचकळून भरून घ्यायचा आणि प्यायचा. माझ्या कामात लुडबुड करून एकसारखा चहा करायला सांगत जाऊ नकोस”
आजोबा सांगायचे, चहा प्यायला हवा, कारण आपण कोणाच्या घरी गेलो तर चहा हे सगळ्या थरातल्या लोकांचे पेय आहे, त्यामुळे तेच आपण पीत असू तर आपले आतिथ्य करणे समोरच्याला अडचणीचे वाटत नाही. हीच गोष्ट प्रत्यक्षात घडली आणि माझी चहाशी पहिली ओळख झाली. सहावीत असताना एका मैत्रिणीच्या घरी तिची आई चहा पिण्याचा अतिआग्रह करत होती, आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन असणं शक्य नाही हे तेव्हाही मला स्पष्ट कळत होतं. शिवाय जर अट्टहासाने नको म्हटलं तर मी ब्राह्मण असल्याने तिच्या घरी काही घेत नाहीये असा गैरसमज सहजगत्या तेव्हा तरी नक्कीच झाला असता, आणि ते मला कुठल्याही परीस्थित नको होतं. त्यामुळे “पण अगदी अर्धा कपच दे काय” असं म्हणत कबुल झाले. मनात हजारो वेळा आईला सॉरी म्हटलं, आणि अर्धा कप कोरा गोड चहा नॉर्मल हावभाव करत पिऊन टाकला. घरी आईला भीत भीत सगळ सांगितलं पण मला वाटल होतं तशी आई रागावली वगेरे मुळीच नाही.
त्यानंतर फक्त अश्याच प्रसंगात चहा प्यायला काही वाटेनासं झालं.
अकरावीला पुण्याला गेल्यावर रोज सकाळी चहा प्यायची सवय लागली ती मात्र कायमची. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना चहाची खरी किंमत कळली. दिवसभर कॉलेजमध्ये राब राब राबून झाल्यावर मग रूमवर जायच्या आधी टपरीवरच्या चहाच्या एकेका घोटाबरोबर दमलेला मेंदू तरतरीत होताना जाणवला कि कळायचं कि चहाला उत्तेजक पेय म्हणतात म्हणजे नक्की काय ते.
अश्याप्रकारे पुणे सोडून परत घरी येईपर्यंत मी पूर्ण चहाबाज झालेली होते. बाहेर राहत असताना साहजिकच घरासारखे खाण्यापिण्याचे नखरे चालत नाहीत, आणि मग ज्या ज्या खाद्य वस्तू आहेत त्या न कुरकुरता खाण्याची सवय लागून जाते, खास आवडी निवडी अश्या उरतच नाहीत. पण घरी परत आल्यावर निराश्या दुधाचा चहा हा मात्र अगदी विकपॉइंट बनला. संध्याकाळी सगळी काम आटपली, घरचे सगळेजण घरी आले, कि निराश्या दुधाचा फेसाळ गोड चहा सगळ्यांनी एकत्र पिणे, त्याबरोबर दिवसभराच्या घडामोडी एकमेकांना सांगणे, आणि त्यावेळेला देवासमोरचे निरांजन, उदबत्तीचा वास, घरभर पसरलेला धुपयुक्त धूर हा संपूर्ण दिवसात माझ्या अगदी आवडीचा क्षण.. रोज अनुभवण्याचा..
आमच्या मुर्डीमध्ये तर जणू काही आपले अधिकृत राष्ट्रीय पेय असल्याच्या भक्तिभावाने सगळेजण चहा पितात, आणि लोकांना पाजतात.
ह्या सगळ्या चित्रात आता आजोबा नाहीत, तेव्हा चहा सोडायचा प्रयोग केला, आणि खरोखरच वर्षभरात एकदाही चहा प्यायला नाही. डोकेदुखी, रेस्टलेसपणा असल्या काहीही प्रकारांशिवाय निश्चय पार पडला. ज्यासाठी मुळात चहा प्यायला सुरुवात केली त्याच्यासारखे सामाजिक अडचणीचे प्रसंग क्वचित आले, पण आजोबांसाठी चहा पीत नाही हे कारण पुरेसं संयुक्तिक वाटल्याने कुणी फोर्स केला नाही. एका वर्षानंतर मी पुन्हा चहावाल्यांच्या गोटात प्रवेश केला आहे, माझ हे एकमेव व्यसन पूर्णपणे माझ्या ताब्यात आहे ह्या खात्रीसह!