05 October, 2015

शांतता

सकाळी 11 च्या सुमारास मुंबईचे काका काकू घरी येऊन पोचतात. या या वगेरे होतं, पाणी बिणी पिउन काकू मागच्या पडवीतल्या झोपाळ्यावर ऐसपैस बसते आणि म्हणते "अहाहा किती शांतता आहे ना इथे! व्वा!"
आणि मी विचित्र नजरेनी तिच्याकडे बघते. हा नेहेमीचा कार्यक्रम. कारण मला त्या वेळी कुठल्याही प्रकारे शांतता वाटत नसते. झोपाळ्याची कुरकुर, एखादा ओरडणारा पक्षी, आई ताक करत असेल तर तो घुसळण्याचा आवाज, वॉशिंग मशीन सुरु असेल तर त्याचा घुर्रर्र आवाज, कुत्री मांजरं वासरं असले आवाज ह्यात हिला काय शांतता वाटत्ये असा मला कायम प्रश्न पडतो. तसं बोलून दाखवल्यावर काकूच म्हणणं असं की मुंबईच्या तुलनेत तिला इथे शांतता वाटते.
असेल ब्वॉ..
मध्यंतरी आजोळी "निवांतपणे" जाण्याचा खुप वर्षानी योग आला. पूर्वी 9वी पर्यन्त नेहमीच निवांत राहायला जायचो तेव्हा आयुष्यात कसलाच स्ट्रेस नसयचा. ते काय असतं तेहि माहिती नसण्याचे रम्य दिवस होते ते. तेव्हा त्याची किंमत कळायचा प्रश्नच नव्हता. ह्यावेळी दोन दिवस तिथे मजेत घालवून झाले. गप्पा टप्पा आणि भावंडांशी दंगा मस्ती करुन झाली. रामाच्या देवळात दर्शन घेऊन तिथल्या कट्टयावर बसल्यावर अचानक मला पण साक्षात्कार झाला "आहाहा किती शांत वाटतंय.." वास्तविक तिथे पण आमच्या घरासारखेच विविध आवाज येत होते मग ही शांतता कुठली?
तिथे काही आवाज पूर्ण बंद झालेले होते काही काळासाठी तरी.. आज किती काम झाल, त्याचे किती पैसे मिळतील, ह्या बॅगला किती कापड लागताय, कुणाची ऑर्डर कधी संपवायची आहे, कुणाला कुठलं डिझाइन हवं आहे, आणि एवढं करून ह्या स्ट्रगलमधून काहीतरी चांगली पोझिशन आपली कधीतरी येणार आहे का..हे सगळ कशासाठी करतोय आपण... हे  सगळे मनातले आवाज.. पूर्ण थांबलेले..
मग कळलं शांतता ही कधीकधी आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते.. काकूला पण मुंबईहुन मुर्डीला आल्यावर असंच होत असणार.
रारंगढांगात त्या विश्वनाथला जसा हिमालयात "शांततेचा आवाज" ऐकायला आला तसंच काहीतरी. मुंबई-पुणे-मुंबई मध्ये सिंहगडावर मुक्ता बर्वे म्हणते "अश्या ठिकाणी आपण स्वतःविषयी जरा निवांत विचार करतो" तसच काहीतरी..

No comments:

Post a Comment