06 December, 2018

बैलगाडी

एक खेडेगावात राहणारी, एका मोठ्या आणि परंपरा जपणाऱ्या एकत्र कुटुंबातली ती. लहान-मोठ्या, सख्ख्या-चुलत भावंडांबरोबर वाढणारी. आई काकवा आजी पणजी यांच्या तालमीत तयार होणारी. मुलीच्या 'जातीने' काय जे करायचं असतं(?) ते करायला शिकणारी. सोवळ्याओवळ्याचे नियम पाळणारी, लोक काय म्हणतील ह्याचा भरपूर विचार करणारी, शाळेत अमुक मार्क मिळालेच पाहिजेत म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करणारी. इकडेतिकडे न बघता नाकासमोर चालणारी शहाणी मुलगी.

खेडेगाव असलं तरी आजूबाजूचं जग बदलत होतं, पण ह्या कुटुंबाच्या गावी ते जरा कमीच होतं! तिच्या वर्गातल्या मुली युनिफॉर्म व्यतिरिक्त क्लासला वगैरे जाताना छानसे स्कर्ट-टॉप, जीन्स-टॉप घालत होत्या तर हिच्या नशिबात पाचवीपासूनच कॉटनचे पंजाबी ड्रेस- वर ओढणीची त्रिकोणी घडी पिनअप केलेले. इतर मुली फ्रॉक किंवा स्कर्टच्या आत गुढघ्याएव्हढी शॉर्ट घातली की हव्या तश्या हुंदडायला मोकळ्या होत, तेव्हा ही 'नीट बस' हा मंत्र ऐकत आवरून सावरून वावरून शालीनपणा गोळा करत होती. क्वचित बंडखोरी करून छानसे कपडे घेण्यासाठी हट्ट केलाच, तर "सासरी गेलात की नवऱ्यास चालत असेल तर करा ही थेरं" हे उत्तर मिळत असे.

तिच्या मैत्रिणी गणिताचा क्लास करून परस्पर सायकल हाणत गावाबाहेर लांबवर रपेट मारायला जात, तेव्हा ही आजी आई काकवांबरोबर घरच्या बैलगाडीतून कुठे देवदर्शनाला नाहीतर हळदीकुंकवाला जात असायची. त्यांची ती घरची बैलजोडी, बैलगाडी, ती हाकायला बसलेला धाकटा काका, आणि गाडीत बसून हळदीकुंकवाला जाणाऱ्या दागदागिन्यांनी मढलेल्या घरातल्या स्त्रिया हा त्यांच्या अभिमानाचा विषय होता, आणि हिच्या मैत्रिणींमध्ये थट्टेचा!

दहावीला भरपूर मार्क मिळाले. दूरदृष्टी असलेल्या मुंबईच्या आत्याने अकरावीला भाचीला आपल्या घरी नेलं. मुंबईचं वातावरण, अभ्यास, इंग्लिश ह्याच्याशी जुळवून घेताना तिची भयंकर दमछाक झाली. पण एकदा त्यातून बाहेर पडल्यावर रुळली ती. सुट्टीत घरी जाणं झालं की दोन्हीकडच्या वातावरणातील फरक स्पष्ट जाणवायचा तिला. आत्याकडे काकांची नोकरी बेतासबात असली तरी तिच्या आत्तेभावाची व वहिनीची उत्तम नोकरी होती. ते दादा वहिनी स्वतंत्र घरात पण आत्याच्या जवळच राहात आणि येऊन जाऊन असत.

दरम्यान घरी सर्वात मोठ्या चुलतभावासाठी स्थळं शोधणं सुरू होतं. "यमू वन्संच्या चुलत जावयाची धाकटी बहीण लग्नाची आहे, मागवायची का त्यांच्याकडे पत्रिका?" अश्या प्रश्नावर "छे छे ती मुलगी चांगली शिकलेली नि 'शहरात पडण्यासारखी सरस' आहे, कश्याला उगीच हात दाखवून अवलक्षण करायचं, आपल्या दाद्याला जरा बेताची शिकलेली नि साधीशी हवी हो मुलगी.. " हा निष्कर्ष तिच्या समोरच निघाला होता.

वास्तविक पदवी सुद्धा घेण्याची इच्छा नसलेल्या तिच्या दाद्यासारख्या मुलांची गावांमधून कमी नसली तरी मुली मात्र गेलाबाजार ग्रॅज्युएशन नाहीतर एखादा व्यवसायाभिमुख कोर्स केल्याशिवाय शिक्षण पुरे करत नव्हत्या नि लग्नाला तयार त्याहून होत नव्हत्या. पण नशिबाने तिला मिळाली ग्रॅज्युएट असूनही तिच्या दाद्याशी लग्न करणारी वहिनी. वाचनाची आवड असलेली, गाण्याच्या परीक्षा देणारी.. तरीही गावात राहण्यासारखी, सालस, नम्र, परंपरा-सोवळंओवळ-कुळाचार पाळणारी,  वगैरे वगैरे वहिनी, साड्या दागदागिने खरेदी अश्या निमित्ताने घरी येऊ लागली होती. बारावीनंतरच्या दीर्घ सुट्टीत घरी आलेल्या तिचं होणाऱ्या वहिनीबरोबर पटकन मेतकूट जमलं. आवडीनिवडी, छंद, अभ्यास अश्या गप्पांबरोबर त्यांची गट्टी जमत गेली.

खरेदी, केळवणे, पापड फेण्या ह्यात करवलीबाई दंग होत्या. होणाऱ्या सूनबाईंना घेऊन दागिन्यांची मापे व डिझाइन द्यायला मंडळी तालुक्याच्या गावी त्यांच्या पिढीजात ठरलेल्या सोनारकडे गेली. ही होतीच बरोबर. मंगळसूत्र निवडताना नव्या वहिनीने निवडलेलं ट्रेंडी डिझाइन डावलून ज्येष्ठ महिलामंडळाने परस्परच दुसराच जुन्या पद्धतीचा नमुना फायनल करून टाकला, वर "कसली गो ती तुमची हल्लीची फ्याशन उगीच नाजूकसाजुक, आमच्या सुनेच मंगळसूत्र कसं आमच्या घराण्याला शोभेस ठसठशीत कराच्च" अशी टिप्पणी टाकून दिली. शिवाय "आपलं एवढं मोठ्ठ कुटुंब, नव्या सुनेला बघायला वर्षभर कोणी ना कोणी येतच राहणार, आल्यागेल्याला सांगावं लागता कामा नये नवी नवरी कोणती ते! त्यामुळे वर्षभर हेच्च मोठं मंगळसूत्र कायम वापरायचं" अशीही सूचना पाठोपाठ आली. वरकरणी हसून साजरं करणाऱ्या वहिनीच्या डोळ्यातल्या छटा अचूक टिपणाऱ्या तिला, तिची मुंबईची वहिनी आठवली. कायम ट्रेंडी आणि सुटसुटीत राहणारी.

लग्न झालं, वहिनी तिच्या नव्या संसारात आणि ती तिच्या पुढच्या शिक्षणात रमल्या. फोनवर गप्पा आणि सुट्टीतलाच काय तो सहवास. पण वर्षभरातच तिला कळून चुकलं- वडवते, गोपदमे, शिवामुठी, मंगळागौरी, महालक्ष्मी, सोमवार, शनिवार, चतुर्थी, एकादशी, सणवार, घरकाम, स्वयंपाक, जिनसांची बेगमी, वाळवणे, दिवाळीत गावभर एकमेकांचा फराळ बनवत राहणे, एकमेकांचे पापड लाटणे, नवी नवरी म्हणून शोभेच्या बाहुलीगत स्वतःला मिरवून घेणे, कळवून किंवा न कळवता आलेल्या पाहुण्यांची सरबराई करणे- फर्माईशी पुरवणे... ह्या सगळ्या व्यापात तिच्या वहिनीचं वाचन, गाण्याचा रियाज, हे सगळं इतिहासजमा झालंय. शिक्षणाचा उपयोग धाकट्या शाळकरी दीर-नणंदांना अभ्यासात मदत करण्यापूरता उरलाय. लग्नापूर्वी कसरीच्या किड्यासारखी लायब्ररी फस्त करणारी तिची वहिनी रोजचा पेपर वाचायला मोताद झालीय, आणि रमाबाई रानडे जेव्हा लिखित मजकूर वाचत असताना त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया जश्या बघत, तस्सचं तिच्या वहिनीकडे बघतात जेव्हा तिची वहिनी मोबाईलवर बोटं फिरवत असताना तिची आई काकू घरकाम करताना दिसत तेव्हा!

वहिनीने कधी तालुक्याच्या गावी जाऊन हौशीने काही खरेदी करावी, दादाबरोबर नाटक-सिनेमा बघावा तर लगेच काय ही उधळमाधळ हा शेरा मारायचा अधिकार गावातल्या प्रत्येक स्त्रीला अलिखित प्राप्त झालेला, आणि चार बायका जमून गप्पा मारू लागल्या की कोण किती तारखेला 'बाजूला बसली' ह्याचे हिशोब सुरू... कुणाचे अनारसे कसे नेहेमीच हसतात नि करंज्या फसतात असली टिंगल सुरू...

काही वर्षे निघून गेली, तिच्या पाठच्या सख्ख्या चुलत बहिणी शिक्षणाच्या निमित्ताने गावाबाहेर पडल्या. एखादा अपवाद वगळता भावांनी पदवीच्या वाटेला न जाता शेती बागायती गुरांकडे मोर्चे वळवले. कुणी टेम्पो घेतला, कुणी पर्यटकांना निवास-न्याहरी सुरू केली, कुणी गरे-साठं-अमृतकोकमाकडे वळले

हिचं शिक्षण पूर्ण झालं आणि वरसंशोधनाच्या हालचाली सुरू झाल्या. रितीनुसार थोडे आढेवेढे घेऊन झाल्यावर हिने अपेक्षा सांगायला घेतल्या- आणि तेच प्रसिद्ध , लोकप्रिय तरीही वादग्रस्त वाक्य उच्चारलं- "पुण्यात किंवा मुंबईत स्थायिक असावा!"

वरकरणी रोषाने पण अंतरीच्या समाधानाने "हल्लीच्या मुलींना नकोच मुळी खेडेगाव!" हे वाक्य उच्चारून मंडळी मोहीम सुरू करती झाली.

वेळेवारी लग्न ठरलं आणि झालं, आत्याच्याच ओळखीतला मुंबईचा मुलगा. आता ती अधिकृत मुंबईकर झाली. मुंबईच्या घरात जागा क्षेत्रफळदृष्ट्या माहेरपेक्षा खूपच कमी होती, पण 'स्पेस' भरपूर होती... माहेरी खंडीनी भात होते, पण त्याची कांडण-पाखडणे वगैरे व्याप होते, तर मुंबईच्या सासरी तांदूळ-पोहे किलो किलो येत, पण ते एका फोनकॉलवर दारात हजर होत. माहेरी नारळ शेकड्यात मोजले जात, पण इथे एक जिना उतरला की खरवडलेल्या खोबऱ्याचं पाकीट मिळत होतं. सोवळेओवळे हा प्रकार अस्तित्वात नव्हता, तुम्ही काय करता, काय खाता ह्याच्याशी शेजारच्यालोकांना देणंघेणं नव्हतं..पाहुणे आले की हॉटेलात नेण्याची किंवा पार्सल आणायची सोय व पद्धत होती.. माहेरी ज्याला 'नवऱ्याला चालत असतील तर करा ही थेरं' म्हंटलं जायचं ते कपडे, केस कापणे सहज करता येत होतं..

वर्षभराचे सणवार कोकणातल्या माहेरी हौशीने झाले, मुंबईच्या सासरच्यांनीही ते सगळं कूल आणि वंडरफुल म्हणत एन्जॉय केलं. एकुणात सगळं छान सुरू झालं..

यथावकाश तिला मुलंबाळं झाली, ती मोठी होऊ लागली, मग मामाच्या गावाला एन्जॉय करायला काय कमतरता! अश्याच एका मे महिन्यात तिच्या मुलांनी धाकट्या काकाआजोबांकडे हट्ट धरला-- "आम्हाला बुलक्कार्ट राईड हवी!" कामांची घणाघाई असूनही लाडक्या नातवंडांसाठी बैल जोडले गेले, ती नवरा व मुलांसह बैलगाडीत बसली.. मुलांनी, नवऱ्याने खूप एन्जॉय केलं, तिनेही सेल्फी काढून फेसबुकवर टाकला- कॅप्शन लिहिली- गावाकडची मजा!

©ऐश्वर्या पेंडसे-जोशी

02 September, 2018

सुंदर बोअर श्रावण आला⛅️⛈️🌦️☔️🌈🤽

पावसाळा व त्यातल्यात्यात श्रावण हा सगळ्या कवी लोकांचा, भाविक लोकांचा, उत्सवप्रिय लोकांचा, भटकंतीप्रिय लोकांचा, आणि नुसताच पाऊस आवडणाऱ्यालोकांचा आवडीचा काळ..

वरील वर्गवारीत कवी आणि भाविक नसले तरी भटके आणि नुसताच पाऊस आवडणारे असल्यामुळे अस्मादिकांस गेल्या वर्षीपर्यंत पाऊस व श्रावण परमप्रियच होते..

तुफान पावसात हेडलाईट सुरू ठेवून भिजत भिजत गाडी चालवत उंडारणे..
तुडुंब भरलेल्या तळ्यात मनसोक्त पोहोणे...
एकदा भिजलेली जीन्स वाळायला किती आठवडे लागतील ह्याची पर्वा न करता- रेनकोटचा फक्त कोट जीन्सवर घालून सायकल दामटवणे...
धुव्वाधार पावसात एकामागून एक चहा पिणे, चिखल तुडवत कंपोंडात(आमच्या आंब्याच्या बागेत) फिरणे... ढोपरभर चिखलात भात लावायला जाणे...
नदीला हौर आला की भिजत भिजत पाणी बघायला जाणे...
रात्रीच्या वेळी पत्र्यावर ताड ताड वाजणारा पावसाचा ताशा ऐकत पुस्तक वाचण्यात गढून जाऊन पहाटे ते पुस्तक संपवूनच झोपणे...
ताया, वहिन्या, मैत्रिणी यांच्या मंगळागौरीत फक्त धटिंगण खेळांचा का होईना पण धुडगूस घालणे... आणि गोपाळकाल्याला त्या ढाकुमाकूम ढाकुमाकूम आवाजाने नादावून जाणे....

असा अगदी मस्त फकिरी पावसाळा होता गेल्या वर्षीपर्यंत... पण यंदा अबीरबाबूचे आगमन काय झाले आणि पाऊस अगदी नकोसा वाटायला लागला. 50 लंगोटांची चळत घड्या करून कपाटात ठेवली तरी एक क्षण असा यावा की एकही सुख्खा लंगोट उपलब्ध नाही.. मग इस्त्री करा... ह्याच्यात 50%पावसाळा संपला आणि श्रावण आल्यावर जरा जरासं उन्ह दिसू लागल्यावर किंचित हायसं वाटलं. उन्ह आलं म्हणून जरा कुठे कपड्यांचा स्टँड उन्हात सरकवावा तोच आला पाऊस सणसण करत!
जल्लामेला तो काय तो " क्षणात येते सरसर शिरवे.."

"च्यायला त्या पावसाच्या" असं म्हणत धावत जाऊन स्टँड पागोळीच्या आत ओढला, तर नवरा म्हणायला लागला, "च्यायला काय त्यात? पावसाळ्यात पाऊस तर येणारच.. तू आणि काकू (म्हणजे माझी चुलत सासू) नॉर्वेला जा बघू राहायला.. मनसोक्त कपडे वाळवा, वाळवण सुद्धा करा हवं तरी!"😂

अबीरला घेऊन फिरायला जावे तरीही वेळीअवेळी येणारा पाऊस आता पूर्वीसारखा एन्जॉय करता येत नाही हे लक्षात आलं.. अशीच आमची मंगळागौर पण यंदा पावसाने त्रस्त असल्यामुळे कुणी बोलावलं तरीही तेव्हा पाऊस किती असेल? त्या दिवशी अबीर किती वाजता उठेल? त्याचा मूड कसा असेल? असे प्रश्न पडायला लागलेत..

त्यामुळे आज घरातल्या घरात मंगळागौर पूजा 10 मिनिटात- ट्रॅकपॅन्ट व विटका टीशर्ट घालून साग्रसंगीत पार पडली😂 माझ्या ट्रॅकपॅन्टला सासूबाई म्हणाल्या, " छानच आहे तुझी ही कोमोफ्लाज डिझाईनची साडी😜😜😜.. आणि आमची देवी पण बघा कशी मॉडर्न झाली आहे.. उगाच भारंभार फुलांचा पसारा नाही. एकच जास्वंदीचं फुल आणि एकच बेलाचं पान. डिसेंट एकदम😂😂😂😃😃😃"

एकदम मला पूर्वीच्या बायकांची सर्वार्थाने कमालच वाटायला लागली. एकतर त्यांना भरपूर मुलं. वीज नाही, वीज आल्यावर सुद्धा वॉशिंग मशीन नाही- एवढया पोरांचे कपडे हाताने धुवा, पिळा, तव्यावर वगैरे वाळवा... चारीठाव स्वयंपाक करा, लोकांना वाढा, आवराआवर करा, भरीला सगळे सणवार, व्रतवैकल्ये करा, उपास करा, आणि हे सगळं करून वर बालसंगोपन करा. हे सगळं करताना सासुरवास असणं हे तसं सामान्यच असेल, साडीशिवाय दुसऱ्या पोशाखाचा पर्याय उपलब्ध नसेल आणि त्याकाळचे बाबालोक तान्ह्या बाळाच्या संगोपनात काय मदत करत असतील हा एक वेगळाच विषय....

तरीही त्या सगळे सणवार भयंकर उत्साहाने करत होत्या.. किंवा उत्साहाने करतोय असं दाखवत होत्या,  किंवा कदाचित त्याकाळी व्रतवैकल्ये ही बाळांच्या लसीकरणाईतकी आत्यावश्यक मानत असतील... कितीही पाऊस असला तरी ठराविक महिन्यात करायचीच असतात अशी...  किंवा त्याकाळी पोरांच्या मूडला विशेष महत्व देत नसतील.. किंवा दर दोन वर्षांनी पुन्हापुन्हा नवीन पोर होणारच तर मग किती वर्षं   त्यातच जात असतील आणि मग त्यातलं नावीन्य स्वारस्य वगैरे काय म्हणतात ते उरतच नसेल😓

काय असेल ते असो.. पुढच्या पावसाळ्यात मी माझ्या सगळ्या वेड्या हौसा- भिजणे, सायकल चालवणे, पोहोणे, पुस्तकं वाचणे वगैरे वगैरे सगळं पूर्वीसारखच करत राहणारे. नवरा आणि मुलगा बरोबर आले, तर त्यांना घेऊन नाहीतर त्यांना टुकटुक करून!😜😜😜

©ऐश्वर्या पेंडसे-जोशी

05 May, 2018

जीन्स

लहान बाळाला बघितलं की बघणारे नातेवाईक लग्गेच तर्क सुरू करतात.. बाबाकडच्या व आईकडच्या दोघाही बाजूंच्या नातेवाईकांना वाटत असतं की बाळ त्यांच्या त्यांच्या कुटुंबातल्या कुणासारखं तरी दिसतं😂 आजोळच्या लोकांना बाळाचे मामा किंवा मावशी लहानपणी तस्सेच दिसायचे असं वाटतं, तर बाबाकडच्या नातेवाईकांना बाळाला बघून बाळाच्या आत्या किंवा काकाचं बालपण आठवायला लागतं..

प्रत्यक्षात आपण सगळेच आपल्या इतक्या पिढ्यांचे गुणधर्म घेऊन आलेलो असतो की असं एका वाक्यात निष्कर्ष काढणं अगदीच विनोदी आहे..

हे बालपणीचे निष्कर्ष फक्त दिसण्यावरून झाले.. मोठेपणी वागण्यातले गुण दिसायला लागतात, तेव्हापण अशीच लेबले लावली जातात.. की अगदी अमक्याच्या वळणावर गेलाय... वगैरे!

अस्मादिकांच्या बारश्यात आई-बाबा दोघांच्या बाजूचे नातेवाईक जमले असताना.. बाबांकडची एक वयस्कर आजी वारंवार उद्गारू लागली, "अगदी अस्साच गोरा होता आमचा अनिल लहानपणी!!" चारपाच वेळा हे ऐकून घेतल्यावर आईच्या बाजूच्या नातेवाईकांपैकी अशीच एक खमकी आजी म्हणाली, "आग्गोबाई! खरं म्हणता की काय? म्हणजे मग आता मला नातीच्या रंगाची काळजीच वाटायला लागल्ये हो! कारण जावईबापूंच्यात आता कुठे त्या गोरेपणाचा मागमूसही दिसेना! म्हणून म्हणत्ये हो!"😂😂😂 अर्थात गोऱ्या कातडीचं कौतुक तितपतच असल्यामुळे, उन्हात फिरून कामं करून मीही माझ्या बाबांसारखी रापलेल्या रंगाची झाले ह्याचाच मला आता आनंद वाटतो तो भाग वेगळा!

मला जेव्हा सगळेजण म्हणतात की "तू अगदी मालघरच्या(आजोळच्या) आजीसारखी दिसतेस आता.." तेव्हा मला खूप छान वाटतं.. पण त्याचवेळी हे पण जाणवतं की तिच्यासारखं सतत कार्यमग्न राहणं, सहनशील बनणं मला कधीच शक्य नाही होणार कितीही प्रयत्न केले तरीही... गंमत म्हणजे माझा स्वभाव बऱ्यापैकी दांडगट, उर्मट असूनही अत्यन्त सोशिक, सात्विक, सोज्वळ स्वभावाच्या आजीच्या व माझ्या दिसण्यात काहीतरी साम्य नक्की आहे!
असे कित्येक पिढ्यांचे गुणधर्म आपल्यात येत असणार.. फक्त जर दोन्ही व्यक्तींना आपण वारंवार बघितलेले असते त्यांच्यातली साम्यस्थळे आपल्या लक्षात येतात.

जोशी आडनावाचा माझा मुलगा- हा मी आणि अजय, आमचे दोघांचे आई-बाबा, आमचे दोघांचेही दोन्हीकडचे आजी-आजोबा, दोघांचे दोन्हीकडचे पणजी-पणजोबा असे मिळून पेंडसे, साठे,आगाशे, करंदीकर, देवधर, जोशी........ आणि जोशी, वैद्य, पेंडसे, सोमण, घांगुर्डे, दांडेकर... इतक्या आडनावाच्या लोकांचे गुणधर्म घेऊन आला असणार!!! त्यात पुन्हा माझी एक पणजी माहेरची जोशी, आणि अजयची एक पणजी माहेरची पेंडसे! म्हणजे अजूनच गुंतागुंत! आणि ही फक्त ज्ञात आडनावे! ह्यापुर्वीच्या पिढ्यांची आडनावे काय होती कुणास ठाऊक.. तर त्या माणसांना बघण्याचा-ओळखण्याचा प्रश्नच येत नाही..

परवा सहजच माझ्या लक्षात आलं- जन्मल्या क्षणापासून सर्वानुमते सेम माझ्यासारखा दिसणारा माझा मुलगा एका मूडमध्ये माझ्या आत्तेबहिणीच्या मुलासारखा- अजिंक्य गोखलेसारखा दिसला! ह्या दोघांचे पणजी-पणजोबा कॉमन. त्यामुळे एखाद्या लूकमध्ये त्या दोघांच्यात साम्य असू शकते. अर्थात ह्या दोघांना जवळून ओळखणाऱ्यांनाच ते जाणवणार. असेच एखादे साम्य जोश्यांच्या मागच्या पिढीतल्या कुणा व्यक्तिमध्येही आढळेल ते मला माहिती नसणार.

थोडक्यात काय तर आडनाव ही एक सामाजिक सोय आहे फक्त! कधी बऱ्या वाईट दिसण्या-वागण्यावरून अमुक आडनावावर गेलाय/गेलीय हे लेबल अगदी निरर्थकच म्हणायचं.
©ऐश्वर्या पेंडसे-जोशी.

21 November, 2017

जगी या खास वेड्यांचा..

आम्ही कोकणस्थ ब्राह्मण लोक नीटनेटकेपणासाठी प्रसिद्ध आहोत खरं म्हणजे.. पण नीटनेटकेपणा ह्याचा अर्थ असा पण नसतो आमच्यात, कि एखाद्या हायफाय हॉटेलात बसल्यासारखं स्वतःच्या घरात आदबशीरपणे पुतळ्यासारखं बसावं😏

त्यामुळे घर हे घर वाटावं आणि हॉटेल वाटू नये इतपत पसारा घालायची जबाबदारी मी कळायला लागल्यापासून घेत आले आहे.("कळायला" लागलंय का अजूनही हा अनेकांना प्रश्न असेलच,, पण तो असुदे बापडा😜)

त्यातून जे लोक घराबाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करतात त्यांची घरं जरा तरी आवरलेली राहू शकत असावीत बहुतेक, पण आमच्या घरातच व्यवसाय असल्यामुळे अगदी टापटीप घर असणं शक्यच नाही..

आजोबांच्या काळात घरात सुपारीचे गोण, नंतर मग फळप्रक्रिया सुरु झाल्यावर माजघरात पॅकिंग, अर्जंट ऑर्डरी आल्या की तिथेच पार्सले पॅक करणे, पूर्वी घरातच कॅनिंग असायचं तेव्हा घरभर पसरलेले आंबे, असं सगळं बघतच आम्ही मोठे झालो.. नंतर आंबे आणि कॅनिंग हा विषय स्वतंत्र जागेत शिफ्ट झाला, तरी आजी आणि आईचे आंबा वडी, सरबतं, मुरांबे, लोणची ह्यांचे व्यवसाय घरातच चालल्यामुळे तिच परंपरा अजूनही चालूच राहिली..

आणखी एक पसारा आमच्या घरात प्रचंड असतो तो पुस्तकांचा.. आठवणीतल्या कवितांपासून ते मुघल रियासती पर्यँत, आणि दासबोधापासून ते चेतन भगत पर्यँत कोणतीही पुस्तके कुठेही पडलेली सापडतात.. प्रत्येकाच्या आवडी आणि मूडनुसार.. त्यात इंटरनेट असूनसुद्धा, पेपरवाल्याला वाईट वाटू नये म्हणून पेपर घेण्याची आमच्या बाबांना कोण हौस!! म्हणून तो एक पसारा घरातले दोन्ही झोपाळे व्यापून बसलेला असतो.. पण तो कागदी पसारा इतका स्पेशल आहे कि आमच्या मातोश्रीनी तेव्हा आमच्या पिताश्रीच्या स्थळाला खेडेगावात असून सुद्धा होकार देताना- "एवढी पुस्तकं घरात आहेत म्हणजे लोक बरे असावेत विचारांनी" असा विचार केला होता😍

पण तरीही तेव्हा सुद्धा घरी कुणी येणार असेल तर आई आवर्जून पसारा आवरायची खबरदारी घेणार म्हणजे घेणार! अस्मादिक ह्या बाबतीत जरा मागे पडल्यामुळे मग ह्या चिंटूसारखे प्रेमळ सुखसंवाद आमच्याकडेही सुरु झाले!

मुळात वस्तू आवरून ठेवल्या कि त्या झटकन हाताशी येत नाहीत, उलट पसरलेल्या असल्या कि एका दृष्टीक्षेपात पटकन सापडतात- हा एक माझ्या आवडीचा सिद्धांत! भरीला कॉलेजनिमित्त हॉस्टेलवर सात वर्षे राहून राहून मी पसारा घालणे ह्या विषयात सुद्धा एक डिग्री मिळवून आणली😜😜😜

घरी परत आल्यावर घरातच अजून एक व्यवसाय- एम्ब्रॉयडरी, पेंटिंग, बॅगा बनवणे- सुरु केला आणि मग रंगीबेरंगी कापडे, चिंध्या, दोरे, रंग, ब्रश, अश्या पसाऱ्याने घर भरून गेलं! बरं आमचे कामाचे तास हे 24 तासातले कोणतेही असल्यामुळे- काम बंद केल्यावर पसारा आवरणे हा विषयच नाही.. मुडवर आधारित- म्हणजे रात्री 3 वाजेस्तो सुद्धा काम केल्यावर मग आवराआवर करायची तरी केव्हा??

एकेकदा तर घरातल्या सगळ्या खुर्च्यांवर निळ्या रंगाचा अगडबंब थैल्या विराजमान झालेल्या असत.. एकदा बाबा चिडून म्हणाले- "आता कुणी आलं आपल्याकडे तर तुझ्या त्या निळ्या थैल्यांवर बसायला सांगतो! तिथेच चहापाणी द्या लोकांना!"

आणि एकदा खरोखरच एक काका आला तेव्हा बसायला सुद्धा जागा नव्हती. शिवणमशीनच्या जवळ असलेलं माझं बसायचं स्टूल रिकामं होतं चक्क.. त्याच्यावर तो कसाबसा बसला आणि मशीनवरून खाली घरंगळलेला बेल्ट(बॅगांना लावायचा बेल्ट) गुंडाळत गुंडाळत गप्पा मारायला लागला..

हे चित्र बघून हताशपणे का कौतुकाने कुणास ठाऊक.. आई म्हणाली-"माझे उपाय थकले हो आता पसारा आवरायचे.. माझ्या आवाक्यात होतं तोपर्यंत मी घर आवरायचा प्रयत्न करत होते.. आता ही मुलं कर्तबगार झाल्यावर सगळं हाताबाहेर गेलंय माझ्या!"

ह्याच्यावर मात्र त्या काकासकट सगळे गडगडाटी हसत सुटले..

आता माझ्याबरोबरच सगळा पसारा पण मशीनसकट सासरी आलाय😂 पण बहुतेक पसारा कमी झाल्यावर करमत नाही घरी कुणाला..(कुणी कबूल नाही करणार कदाचित😜) कारण आईचा मधूनच मेसेज येतो, "स्क्रॅप कापडं साठली असतील, तर येशील तेव्हा घेऊन ये.. माझ्या पॅचवर्कची (त्याला आम्ही 'चिंध्याजोड प्रकल्प' असं नाव दिलंय. त्यातून आई एकाहून एक डिझाईनं बनवून काय काय मस्त मस्त गोष्टी बनवते) कापडं संपत आलीयत😍😍😍

©ऐश्वर्या पेंडसे-जोशी

17 September, 2017

तुझा साबण स्लो आहे का

काही ठराविक वेळी ठराविक प्रसंग आपोआप आठवतातच.. जसे फेसबुकवर काही वर्षांपूर्वी आजच्या तारखेला आपण काय काय पोस्ट केलं हे मेमरी मध्ये दाखवतात, तश्या आपल्या काही मेमऱ्या कुठल्याही अँपशिवाय आपोआप त्या त्या दिवशी आठवतात.. अशीच एक मेमरी, बहुतेक 5-6 वर्षांपूर्वी---

मी घरात निवांत काहीतरी करत, कॉम्प्युटरच्या समोर बसून टाईमपास करत होते.. दुपारच्या जेवायची वेळ होत आली होती.. आईची पण सगळी कामं आटपून ती पण वाचन वगैरे करत असणार.. आता बाबा आले की जेवायला बसायचं.. म्हणून आम्ही बाबांची वाट बघत होतो..

नेहेमीप्रमाणे बारा वाजायच्या दरम्यान बाबा काम संपवून जेवायला घरी आले, त्यांच्या बरोबर त्यांचा एक मित्र होता.. म्हणजे आंजर्ल्याचाच एक मनुष्य.. बाबांच्याच वयाचा असेल, अगदी रोजच्या भेटण्यातला, पिढ्यानपिढ्या ओळखीच्या असलेल्या कुटुंबातला माणूस..

बाबा आणि तो काका दोघे आले, जरा इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा, किंवा वाटेत येताना त्यांचा जो काय विषय सुरु असेल ते बोलणं वगैरे झालं, मग तो म्हणाला की,"चल, निघतो मी"

त्यावर बाबा: "बस रे, चहा घेऊ घोटभर" (आमच्याकडे दिवसाच्या कुठल्याही वेळेला लोक चहा पितात, ते एक जाऊदेच😂)

तो काका: छे रे बाबा!! जेवायची वेळ झाली,, आता काही नको, वेळेवर जेवायला घरी पोचायला हवं.. आजी आजोबा वाट बघत असतील"

बाबा: हो हो, बरोबर आहे, बराय मग!

तो काका बाहेर पडून गेला, आम्ही जेवायला बसलो, आणि माझ्या डोक्यात भयंकर वेगाने विचारचक्र फिरायला लागली..

हा माणूस पन्नाशी उलटून गेलेला आहे, त्याचे आईवडील ऐशीच्या पुढे वयाचे आहेत, आणि ह्याचे आजी आजोबा जेवायला वाट बघतायत म्हणतो हा.. हे कोण आजी आजोबा आहेत ते आपल्याला इतक्या दिवसात कधीच कसे दिसले नाहीत??? आणि दुसरीकडे कुठे असतील तर मग त्यांचं वय तरी किती असेल😥😲🙆

विचार करून करून डोस्कं दमलं.. न राहवून बाबांना विचारलं की, "बाबा ह्या काकाच्या आजीआजोबांचं वय तरी काय असेल? नक्कीच 110 वर्षाच्या वर असणार"

बाबा तर माझ्याकडे असे विचित्रपणे बघायला लागले की मी अजूनच बुचकळ्यात...

मग एकदाचं शिरलं डोक्यात.. कि त्यादिवशी सर्वपित्री अमावस्या होती..साधारण कोणत्याही विशेष दिवशी, सणाला(हा सण नव्हे म्हणा!) सगळ्यांनी वेळेवर आणि एकत्र जेवावं हा साधारण संकेत..

ह्या दिवशी पूर्वज जेवायला येतात, असं म्हटलं जातं म्हणून तो गृहस्थ म्हणत होता की, "आजी आजोबा वाट बघत असतील!"

"आवरा!!" म्हणत अक्षरशः डोक्याला हात लावला मी फक्त😂😂😂

आणि ,"तुझा साबण स्लो आहे का?" अश्या नजरेनी घरातले सगळे माझ्याकडे बघायला लागले!

©ऐश्वर्या पेंडसे जोशी @मुर्डी/ @पंचनदी