एक खेडेगावात राहणारी, एका मोठ्या आणि परंपरा जपणाऱ्या एकत्र कुटुंबातली ती. लहान-मोठ्या, सख्ख्या-चुलत भावंडांबरोबर वाढणारी. आई काकवा आजी पणजी यांच्या तालमीत तयार होणारी. मुलीच्या 'जातीने' काय जे करायचं असतं(?) ते करायला शिकणारी. सोवळ्याओवळ्याचे नियम पाळणारी, लोक काय म्हणतील ह्याचा भरपूर विचार करणारी, शाळेत अमुक मार्क मिळालेच पाहिजेत म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करणारी. इकडेतिकडे न बघता नाकासमोर चालणारी शहाणी मुलगी.
खेडेगाव असलं तरी आजूबाजूचं जग बदलत होतं, पण ह्या कुटुंबाच्या गावी ते जरा कमीच होतं! तिच्या वर्गातल्या मुली युनिफॉर्म व्यतिरिक्त क्लासला वगैरे जाताना छानसे स्कर्ट-टॉप, जीन्स-टॉप घालत होत्या तर हिच्या नशिबात पाचवीपासूनच कॉटनचे पंजाबी ड्रेस- वर ओढणीची त्रिकोणी घडी पिनअप केलेले. इतर मुली फ्रॉक किंवा स्कर्टच्या आत गुढघ्याएव्हढी शॉर्ट घातली की हव्या तश्या हुंदडायला मोकळ्या होत, तेव्हा ही 'नीट बस' हा मंत्र ऐकत आवरून सावरून वावरून शालीनपणा गोळा करत होती. क्वचित बंडखोरी करून छानसे कपडे घेण्यासाठी हट्ट केलाच, तर "सासरी गेलात की नवऱ्यास चालत असेल तर करा ही थेरं" हे उत्तर मिळत असे.
तिच्या मैत्रिणी गणिताचा क्लास करून परस्पर सायकल हाणत गावाबाहेर लांबवर रपेट मारायला जात, तेव्हा ही आजी आई काकवांबरोबर घरच्या बैलगाडीतून कुठे देवदर्शनाला नाहीतर हळदीकुंकवाला जात असायची. त्यांची ती घरची बैलजोडी, बैलगाडी, ती हाकायला बसलेला धाकटा काका, आणि गाडीत बसून हळदीकुंकवाला जाणाऱ्या दागदागिन्यांनी मढलेल्या घरातल्या स्त्रिया हा त्यांच्या अभिमानाचा विषय होता, आणि हिच्या मैत्रिणींमध्ये थट्टेचा!
दहावीला भरपूर मार्क मिळाले. दूरदृष्टी असलेल्या मुंबईच्या आत्याने अकरावीला भाचीला आपल्या घरी नेलं. मुंबईचं वातावरण, अभ्यास, इंग्लिश ह्याच्याशी जुळवून घेताना तिची भयंकर दमछाक झाली. पण एकदा त्यातून बाहेर पडल्यावर रुळली ती. सुट्टीत घरी जाणं झालं की दोन्हीकडच्या वातावरणातील फरक स्पष्ट जाणवायचा तिला. आत्याकडे काकांची नोकरी बेतासबात असली तरी तिच्या आत्तेभावाची व वहिनीची उत्तम नोकरी होती. ते दादा वहिनी स्वतंत्र घरात पण आत्याच्या जवळच राहात आणि येऊन जाऊन असत.
दरम्यान घरी सर्वात मोठ्या चुलतभावासाठी स्थळं शोधणं सुरू होतं. "यमू वन्संच्या चुलत जावयाची धाकटी बहीण लग्नाची आहे, मागवायची का त्यांच्याकडे पत्रिका?" अश्या प्रश्नावर "छे छे ती मुलगी चांगली शिकलेली नि 'शहरात पडण्यासारखी सरस' आहे, कश्याला उगीच हात दाखवून अवलक्षण करायचं, आपल्या दाद्याला जरा बेताची शिकलेली नि साधीशी हवी हो मुलगी.. " हा निष्कर्ष तिच्या समोरच निघाला होता.
वास्तविक पदवी सुद्धा घेण्याची इच्छा नसलेल्या तिच्या दाद्यासारख्या मुलांची गावांमधून कमी नसली तरी मुली मात्र गेलाबाजार ग्रॅज्युएशन नाहीतर एखादा व्यवसायाभिमुख कोर्स केल्याशिवाय शिक्षण पुरे करत नव्हत्या नि लग्नाला तयार त्याहून होत नव्हत्या. पण नशिबाने तिला मिळाली ग्रॅज्युएट असूनही तिच्या दाद्याशी लग्न करणारी वहिनी. वाचनाची आवड असलेली, गाण्याच्या परीक्षा देणारी.. तरीही गावात राहण्यासारखी, सालस, नम्र, परंपरा-सोवळंओवळ-कुळाचार पाळणारी, वगैरे वगैरे वहिनी, साड्या दागदागिने खरेदी अश्या निमित्ताने घरी येऊ लागली होती. बारावीनंतरच्या दीर्घ सुट्टीत घरी आलेल्या तिचं होणाऱ्या वहिनीबरोबर पटकन मेतकूट जमलं. आवडीनिवडी, छंद, अभ्यास अश्या गप्पांबरोबर त्यांची गट्टी जमत गेली.
खरेदी, केळवणे, पापड फेण्या ह्यात करवलीबाई दंग होत्या. होणाऱ्या सूनबाईंना घेऊन दागिन्यांची मापे व डिझाइन द्यायला मंडळी तालुक्याच्या गावी त्यांच्या पिढीजात ठरलेल्या सोनारकडे गेली. ही होतीच बरोबर. मंगळसूत्र निवडताना नव्या वहिनीने निवडलेलं ट्रेंडी डिझाइन डावलून ज्येष्ठ महिलामंडळाने परस्परच दुसराच जुन्या पद्धतीचा नमुना फायनल करून टाकला, वर "कसली गो ती तुमची हल्लीची फ्याशन उगीच नाजूकसाजुक, आमच्या सुनेच मंगळसूत्र कसं आमच्या घराण्याला शोभेस ठसठशीत कराच्च" अशी टिप्पणी टाकून दिली. शिवाय "आपलं एवढं मोठ्ठ कुटुंब, नव्या सुनेला बघायला वर्षभर कोणी ना कोणी येतच राहणार, आल्यागेल्याला सांगावं लागता कामा नये नवी नवरी कोणती ते! त्यामुळे वर्षभर हेच्च मोठं मंगळसूत्र कायम वापरायचं" अशीही सूचना पाठोपाठ आली. वरकरणी हसून साजरं करणाऱ्या वहिनीच्या डोळ्यातल्या छटा अचूक टिपणाऱ्या तिला, तिची मुंबईची वहिनी आठवली. कायम ट्रेंडी आणि सुटसुटीत राहणारी.
लग्न झालं, वहिनी तिच्या नव्या संसारात आणि ती तिच्या पुढच्या शिक्षणात रमल्या. फोनवर गप्पा आणि सुट्टीतलाच काय तो सहवास. पण वर्षभरातच तिला कळून चुकलं- वडवते, गोपदमे, शिवामुठी, मंगळागौरी, महालक्ष्मी, सोमवार, शनिवार, चतुर्थी, एकादशी, सणवार, घरकाम, स्वयंपाक, जिनसांची बेगमी, वाळवणे, दिवाळीत गावभर एकमेकांचा फराळ बनवत राहणे, एकमेकांचे पापड लाटणे, नवी नवरी म्हणून शोभेच्या बाहुलीगत स्वतःला मिरवून घेणे, कळवून किंवा न कळवता आलेल्या पाहुण्यांची सरबराई करणे- फर्माईशी पुरवणे... ह्या सगळ्या व्यापात तिच्या वहिनीचं वाचन, गाण्याचा रियाज, हे सगळं इतिहासजमा झालंय. शिक्षणाचा उपयोग धाकट्या शाळकरी दीर-नणंदांना अभ्यासात मदत करण्यापूरता उरलाय. लग्नापूर्वी कसरीच्या किड्यासारखी लायब्ररी फस्त करणारी तिची वहिनी रोजचा पेपर वाचायला मोताद झालीय, आणि रमाबाई रानडे जेव्हा लिखित मजकूर वाचत असताना त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया जश्या बघत, तस्सचं तिच्या वहिनीकडे बघतात जेव्हा तिची वहिनी मोबाईलवर बोटं फिरवत असताना तिची आई काकू घरकाम करताना दिसत तेव्हा!
वहिनीने कधी तालुक्याच्या गावी जाऊन हौशीने काही खरेदी करावी, दादाबरोबर नाटक-सिनेमा बघावा तर लगेच काय ही उधळमाधळ हा शेरा मारायचा अधिकार गावातल्या प्रत्येक स्त्रीला अलिखित प्राप्त झालेला, आणि चार बायका जमून गप्पा मारू लागल्या की कोण किती तारखेला 'बाजूला बसली' ह्याचे हिशोब सुरू... कुणाचे अनारसे कसे नेहेमीच हसतात नि करंज्या फसतात असली टिंगल सुरू...
काही वर्षे निघून गेली, तिच्या पाठच्या सख्ख्या चुलत बहिणी शिक्षणाच्या निमित्ताने गावाबाहेर पडल्या. एखादा अपवाद वगळता भावांनी पदवीच्या वाटेला न जाता शेती बागायती गुरांकडे मोर्चे वळवले. कुणी टेम्पो घेतला, कुणी पर्यटकांना निवास-न्याहरी सुरू केली, कुणी गरे-साठं-अमृतकोकमाकडे वळले
हिचं शिक्षण पूर्ण झालं आणि वरसंशोधनाच्या हालचाली सुरू झाल्या. रितीनुसार थोडे आढेवेढे घेऊन झाल्यावर हिने अपेक्षा सांगायला घेतल्या- आणि तेच प्रसिद्ध , लोकप्रिय तरीही वादग्रस्त वाक्य उच्चारलं- "पुण्यात किंवा मुंबईत स्थायिक असावा!"
वरकरणी रोषाने पण अंतरीच्या समाधानाने "हल्लीच्या मुलींना नकोच मुळी खेडेगाव!" हे वाक्य उच्चारून मंडळी मोहीम सुरू करती झाली.
वेळेवारी लग्न ठरलं आणि झालं, आत्याच्याच ओळखीतला मुंबईचा मुलगा. आता ती अधिकृत मुंबईकर झाली. मुंबईच्या घरात जागा क्षेत्रफळदृष्ट्या माहेरपेक्षा खूपच कमी होती, पण 'स्पेस' भरपूर होती... माहेरी खंडीनी भात होते, पण त्याची कांडण-पाखडणे वगैरे व्याप होते, तर मुंबईच्या सासरी तांदूळ-पोहे किलो किलो येत, पण ते एका फोनकॉलवर दारात हजर होत. माहेरी नारळ शेकड्यात मोजले जात, पण इथे एक जिना उतरला की खरवडलेल्या खोबऱ्याचं पाकीट मिळत होतं. सोवळेओवळे हा प्रकार अस्तित्वात नव्हता, तुम्ही काय करता, काय खाता ह्याच्याशी शेजारच्यालोकांना देणंघेणं नव्हतं..पाहुणे आले की हॉटेलात नेण्याची किंवा पार्सल आणायची सोय व पद्धत होती.. माहेरी ज्याला 'नवऱ्याला चालत असतील तर करा ही थेरं' म्हंटलं जायचं ते कपडे, केस कापणे सहज करता येत होतं..
वर्षभराचे सणवार कोकणातल्या माहेरी हौशीने झाले, मुंबईच्या सासरच्यांनीही ते सगळं कूल आणि वंडरफुल म्हणत एन्जॉय केलं. एकुणात सगळं छान सुरू झालं..
यथावकाश तिला मुलंबाळं झाली, ती मोठी होऊ लागली, मग मामाच्या गावाला एन्जॉय करायला काय कमतरता! अश्याच एका मे महिन्यात तिच्या मुलांनी धाकट्या काकाआजोबांकडे हट्ट धरला-- "आम्हाला बुलक्कार्ट राईड हवी!" कामांची घणाघाई असूनही लाडक्या नातवंडांसाठी बैल जोडले गेले, ती नवरा व मुलांसह बैलगाडीत बसली.. मुलांनी, नवऱ्याने खूप एन्जॉय केलं, तिनेही सेल्फी काढून फेसबुकवर टाकला- कॅप्शन लिहिली- गावाकडची मजा!
©ऐश्वर्या पेंडसे-जोशी
No comments:
Post a Comment