28 May, 2016

विनाशकाले विपरीत बुद्धी

सकाळी रोजच्याप्रमाणे कलमांच्या बागेत गेले. आंब्यांवर आपल्या आधीचा हक्क वांदरांचा हे तर नक्कीच, पण ह्यावर्षी वांदरांचा मूड काही वेगळाच आहे. एकतर मनुष्यजातीला घाबरणे त्यांनी सोडून दिलंय. कशालाही न भिता इतके बेरकी नजरेने बघत राहतात, आणि आरडाओरडा केला तरी बिनदिक्कत आपल्याच रोखाने पुढे पुढे येत राहतात कि सर्ऱर्ऱकन काटा येतो अंगावर.

भूक हि जित्या जीवाला कुठल्याही थराला घेऊन जाऊ शकते. आजूबाजूच्या तुटत चाललेल्या जंगलांमुळे वांदरांवर उपासमारीची वेळ आली आहे, जिथे थोडीफार झाडी दिसेल तिथे ते प्रचंड संख्येने एकवटत आहेत.. त्यामुळे आमच्या झाडांवर आंबे दिसत असताना ते आम्ही त्यांना खाऊ देत नाही हे त्यांना का म्हणून आवडेल?

बरं, एकेक वांदर म्हणजे एवढं मोठं धूड कि बकोट धरून अख्खा माणूस उचलून नेऊ शकतील सहज.. आपल्याच कलमात आपल्याला कधी कुणाची भीती वाटेल हे मला बापजन्मात शक्य वाटत नव्हतं ते आता घडत आहे..

त्यातच मामी- आमची राखणदार म्हणाली, "ताई पाणी आटला, आता रोज येताना आमच्यासाठी घरून पाणी घेऊन येत जा"
"पूर्वी रानातील पाणी आटलं" म्हणजे पाऊस 2 दिवसांवर आला अशी खूण पटायची. आता अजून महिना आहे पाऊस यायला आणि पाणी आटलं. जमीन तर एवढी शुष्क झाली आहे कि नवीन लागवड करून ती जगवणं म्हणजे कर्मकठीण झालंय.
डोळ्यादेखत जिवंत झाडं मरू कशी देणार?? म्हणून पेट्रोल जाळून, गाडीवरून पाणी घेऊन जातोय, रक्त आटवून- वाटेवर शब्दशः घाम सांडवत झाडांपर्यंत पाणी पोचवतोय रोज...

मला महित्येय दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील दुःखापुढे माझ्या ह्या रडगाण्याला "सुख दुखतंय" असं म्हणतील वाचणारे, कारण आम्हाला प्यायला पोटभर विहिरीचं पाणी आहे, पेट्रोल जाळून झाडांची कौतुकं करायची चैन आहे,.. पण हे सगळं अशासाठी चाललंय कि,आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेला ठेवा जपणं हि आमची जबाबदारी आहे. हे नाही केलं, तर आम्ही पण मराठवाड्यासारखे रखरखीत होऊन बसू.

मुळात हि वेळ का आली? इथे पोटभर पाऊस पडूनसुद्धा जमीन का शुष्क झाली? 20 वर्षांपूर्वी आमचे आईवडील आम्हाला, "तो बघितलास का हुप्प्या?" असं म्हणून ज्या वांदरांकडे कौतुकाने बोटं दाखवत होते ते निवांत वांदरं एवढे हिंस्त्र का झालेत?

जमिनी खरेदी करून, त्याच्यावरच हिरवेपण नष्ट करण्याची हौस घेऊन शहरातली विकृत माणसं इथे आली, ह्या टोळधाडीने हे वाटोळं केलय. आईइतकी आदरणीय अशी जमीन विकायचं पाप जे करत आहेत त्यांनी हि दुर्दशा केली आहे.
शहरातले लँडडेव्हलपर इथे जमिनी घेतायत, हिरव्यागर्द रानांची बेताल कत्तल करतायत-शेकडो वर्षांपूर्वीचे अजस्त्र वृक्ष क्षणात भुईसपाट करतायत, डोंगराचे उतार सपाट करून टाकतायत. त्याचावर आलिशान रिसॉर्ट किंवा सेकण्ड होम बांधतायत,सिमेंटच्या जंगलाची गर्दी उभी करतायत, इथलं पाणी नासून स्वामींग पूल बनवतायत.. तिथे पर्यटक येतायत, रान उजाड केल्यामुळे हॉटेलांतून थेट समुद्र दिसतोय त्याच्याकडे बघत बघत दारू पितायत..कचरा फेकतायत..
आमचं जगणं दिवसेंदिवस कठीण करून टाकतायत.

आत्ता ह्या सगळ्यांना मजा वाटत असेल, पण इथल्या पूर्वजांचे, त्यांनी लावलेल्या आणि आता तुटून गेलेल्या झाडांचे, त्यातल्या घरटी मोडून गेलेल्या पशुपक्षांचे, इथल्या जमिनीचे, रानावनात वसलेल्या ग्रामदेवतांचे, सृष्टीच्या चक्राशी चाळे केल्यामुळे बिथरलेल्या पंचमहाभूतांचे-- सगळ्यांचे शाप ह्या लोकांना भोवतील.. ह्या सगळ्या विनाशामुळे त्रस्त झालेल्या आमच्यासारख्या इथल्या भूमीपुत्रांचे तळतळाट लागतील ह्या लँड डेव्हलपर आणि तत्सम लोकांना.. वाटोळं होईल त्यांच्या भव्य-दिव्य प्रोजेक्ट्सचं.. असे पैसे खरोखर लाभणार नाहीत कधीच (अश्या गोष्टी घडल्याची उदाहरणं आहेत सुद्धा!! हे कारभार करणाऱ्या पूर्ण कुटुंबीयांवर अनाकलनीय संकटं आल्याचं लोकांनी बघितलं आहे..)
नंतर परत निसर्ग आपले रंग दाखवील, आणि त्यांच्या भुईसपाट झालेल्या इस्टेटींवर घनदाट रान माजेल.. पशुपक्षी सुखी होतील, पाणी आटायचं थांबेल.पण...तोपर्यंत आमची पिढी जिवंत असली तर हे सगळं पुन्हा बघायचं भाग्य मिळेल!
पटत असेल तर शेयर करा.. ह्या विनाशाला कारणीभूत होणाऱ्यांना वाचूदेत, जमीन विकणारे, विकत घेणारे, एजंटगिरी करणाऱ्यांना वाचूदेत, इथल्या निसर्गाच्या प्रेतावर स्वतःच्या हौशीचे चोचले पुरविणाऱ्याना वाचूदेत.. कोणाच्या तरी टाळक्यात उजेड पडला तरी पुरे!

No comments:

Post a Comment