14 November, 2015

दिवली


कालचा दिवाळीचा शेवटचा दिवस. संध्याकाळी काळोख होयला लागल्यावर बाहेर गडग्यावर दिवल्या नेऊन रांगेत लावुन ठेवल्या आणि तिथेच जरावेळ बसून राहिले. दिवलीच्या जळत्या ज्योतिकडे बघताबघता तंद्री लावून.

टेराकोटाच्या 6 पणत्या.. चांदणीच्या आकाराच्या.. ह्या आमच्याकडे गेली सुमारे 12-15 वर्ष तरी आहेत. तेव्हा ह्या फॅशनेबल पणत्यांचं लोण जरा जरा नुकतंच यायला लागलेलं. तोपर्यंत आमच्याकडे फक्त स्थानिक कुंभारांनी केलेल्या साध्या मातीच्या दिवल्या असायच्या. दरवर्षी 2 तरी नविन घ्यायच्याच् असं असे. अजुनही ही पद्धत आहे. त्यामुळे रोवळीभर त्या पारंपारिक दिवल्या घरात आहेत. कितीतरी प्रकारच्या नवनवीन पणत्या असल्यामुळे ह्या जुन्या दिवल्यांची वर्णी आता अंगणात गडग्यावर न लागता वाडयात, जिन्यात, विहिरीवर अशी लागते. आणि फॅशनेबल पणत्या दर्शनी भागात पुढच्या अंगणात..

खरं म्हणजे ह्या रंगीत चमकीवाल्या पणत्यांमध्ये गोडंतेल घालत असणार लोक.. पण खायची वस्तू जळायला वापरायची म्हणजे कोकणस्थी बाणा आड़ येतोच. शिवाय "कडुतेलाच्या दिवल्या हवा शुद्ध करतात" हे ऐकीव नॉलेज आहेच! कडुतेल वर्षानुवर्ष वापरत आलोय तेच बरं! पण त्यामुळे ह्या देखण्या पणत्या काळ्या होतात, कायमच्या. जुन्या दिवल्या कश्या, काळ्या होतातच.. मग एक घमेलंभर शेणखळा करून त्यात भिजत घातल्या की झाल्या पूर्ववत्..

उगीच मनात आलं, सालं ह्या कडुतेलानी काळ्या झालेल्या आधुनिक पणत्यांसारखं झालंय आपलं! जग बदलत चाललाय तसे आपण पण  बाह्यतः बदलतोय- पण कडुतेलाची काहीकाही काळी पुटं आपल्याला सोडत नाहीयेत आणि आपल्याला ती सुटावी असं वाटत पण नाहीये.

म्हणजे इथल्या अनेक परंपरा टोकाला जाउन जपणाऱ्याना आम्ही फुकट जाण्याइतके वहावलेले वाटतोय,, आणि आत्याधुनिक शहरी लोकांना आम्ही परकोटीचे मागास वाटतोय..
आंघोळ न करता पोळ्या केल्या म्हणून पण आम्ही फुकट गेलोय,,, आणि अभक्ष्यभक्षण - अपेयपान नाही म्हणून बॅकवर्ड पण ठरवले जातोय!..
साध्या बोलण्यात एखाद्याचा केलेला " माझा मित्र" असा उल्लेख ऐकून लोक आम्हाला अगोचर ठरवून टाकतायत,,, आणि पहिल्यांदा ओळख करुन दिली जात असलेल्या मुलाला शेकहॅंड न करता नमस्कार म्हणाल्याबद्दल लोक आम्हाला मॅनरलेस ठरवून टाकतायत!
आधुनिक पणती गोडयातेलाचीच आणि मातीची दिवाली कडुतेलाचीच असायला हवी असं घट्ट समीकरण! टेराकोटाच्या पणतीत कडुतेल हे काय पटत नाही कोणाला!

जाउंदे.. शेवटी काय दिवली मुख्यतः उजेड पाडण्यासाठी असते, एकंदरीत "उजेड पाडणे" हे खुपच कठीण काम.. तेव्हा जास्त विचार न करता यथाशक्ति उजेड पाडायला जमला तरी चिक्कार झालं..
नाहीतरी कुणी तरी थोरमोठ्यांनी व्हॉट्सऍपवर म्हणून ठेवलंच आहे की, "लोक काय म्हणतील ह्याचा विचार पण आपणच केला तर मग लोकांना काम काय?"󾰀󾰀󾰀

-ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे@मुर्डी.

No comments:

Post a Comment