27 May, 2021

आम्ही आंबेवाल्यांच्या लेकीसुना

आपल्या आडनावापुढे ब्रदर्स, बंधू, सन्स असं लिहिलेले कित्येक उद्योग आपण बघतो- चितळे बंधू, देसाई बंधू, जोशी अँड सन्स वगैरे.. मुली सासरी जाणार आणि सासरच्यांना आवडेल ते करणार (नोकरी, व्यवसाय, गृहिणी) ही मानसिकता व वस्तुस्थिती दोन्ही आहेच. त्यामुळे पेंडसे भगिनी, (किंवा बंधूभगिनी) जोशी अँड डॉटर्स असं कुठे ऐकलंय का हो कुणी??? मी तरी अपवाद म्हणून सुद्धा असं उदाहरण बघितलेलं नाही.

वास्तविक आम्हा आंबेवाल्यांच्या घराघरातून अगदी तीनचार वर्षांचे झाल्यापासूनच मुलामुलींना व्यावसायिक कामात सहभागी केलं जातं. यथावकाश लुडबुडीचं रूपांतर वाकबगार सफाईदार काम करणाऱ्या व करवून घेणाऱ्या जबाबदार व्यक्तीत कधी होतं ते घरात कुणाला कळतही नाही. शाळा कॉलेजच्या सुटीच्या काळातच आंब्याच्या कामांची धामधूम असल्यामुळे बरोबर कामाच्या वेळेत घरातली मुलं कामाला उपलब्ध होतात. मे महिन्याच्या सुटीत उशिरा उठणे, फिरायला जाणे, पत्ते खेळणे हे आंबेवाल्यांच्या पोरांना कधी जन्मात ठाऊक नाही!

काळ पुढे सरकत जातो.. मुलंमुली हळूहळू एकेक जबाबदाऱ्या घ्यायला शिकतात. आणि अचानक लग्नाची वयं येऊन ठेपतात. 20 किलोचा आंब्याने भरलेला क्रेट डोक्यावर घेण्यापासून ते समोरच्या पार्टीबरोबर/ ट्रान्सपोर्टवाल्याबरोबर फोनाफोनी करण्यापर्यंत.. आणि लादी पुसण्यापासून बँकेची कामे करण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या समान उचलणाऱ्या मुलगे व मुलींच्या वाटा इथे बदलायला लागतात.

मुलगे जर वडिलोपार्जित आंबा व्यवसायात येणार असं ठरलं, तर ह्या सगळ्या कष्टमय आयुष्यात साथ देणारी बायको भेटणार का, आणि भेटली तर ग्रामीण किंवा निमशहरी ठिकाणी टिकणार का... 

मुलींपुढे प्रश्न असतो- दुसऱ्या कोणत्या आंबेवाल्यांच्या मुलाशी लग्न करावं की हे कष्टमय आयुष्य आता ह्यापुढे आपल्या वाटेला येणार नाही असा महानगरातील मुलगा निवडावा.. ऑप्शन्स दोन्ही उपलब्ध असतात😄😄😄

कोणता ऑप्शन निवडावा हे मुलींच्या स्वभावावर आणि लहानपणापासून आपल्या आईला घरात मिळणाऱ्या वागणुकीवर आवलंबून असते. ऐन आंबा सिझन मध्ये नेहेमीची घरकामे, आलागेला, गडीमाणसे, पाहुणे, चहापाणी, स्वयंपाक हे सगळं सांभाळत दिवसभर व्यवसायात कष्ट करून वेळ पडली तर संध्याकाळी कामगार घरी निघून गेल्यावर आलेला आंब्याचा ट्रक लोड किंवा अनलोड करायलाही मागेपुढे न बघणारी आई- आणि ह्यावेळेच्या माहेरपणात वहिनीने सांदण काही करून घातले नाहीत आणि ताटावर पाटावर केलं नाही... म्हणून बोल लावणारी आत्या ज्यांना आहे त्या मुली करतील का आंबेवाल्या मुलाशी लग्न?

पण माहेरपणाला येऊन राहिल्यावर "वहिनी, घर व स्वयंपाक मी बघते- तू जा गडीमाणसांच्या पाठीवर बिनधास्त" असं आईला म्हणणारी आत्या ज्या मुलींना मिळते.. त्यांच्यासाठी हा आम्रमहोत्सव कष्टमय न वाटता खरोखर उत्सवच बनून जातो. त्यांना चालतो मग आंबेवाला नवरा😄 अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पिढीसाठी - की ज्यांना पालक विचारतात की कश्या प्रकारचा नवरा हवा तुला म्हणून! 

पूर्वी मुलींना चॉईस नव्हता, किंवा चॉईस विचारला तरी अति अटी घालायची परवानगी नव्हती तेव्हच्याही आंबेवाल्यांच्या लेकी- शहरात सासरी राहून माहेरच्या आंब्यांची विक्री करताना दिसतात.. गिरगावातील चाळीतल्या चिमुकल्या घरात माहेरहून आलेले गाडीभर आंबे विकणं ही काय गंमत नव्हे.. मुलांची सुट्टी संपण्यापूर्वी एकदा माहेरी जाऊन येऊ म्हणून पहाटे निघून दुपारला घरी पोचलेली माहेरवाशीण- घरामागच्या कारखान्यात ऐन रंगात आलेलं कॅनिंग आणि त्यात रंगलेले दादा वहिनी बघून हातपाय धुवून ताबडतोब गॅसच्या शेगडीचा ताबा घेते ती ह्याच संस्कारातून..

आताच्या काळात आम्ही 'हल्लीच्या मुलींमधून'- (बरेचदा शिवीसारखा वापरला जाणारा शब्द) एखादी मुलगी लग्न करताना जवळच्या शहरातील, नोकरी करणारा, आखीवरेखीव रुटीन असलेला, फ्लॅटमधला नवरा निवडते, त्यामागचं- आपला लहान भाऊ जाणता होऊन वडिलांच्या हाताशी येईपर्यंत दरवर्षी आंब्याच्या दिवसात माहेरी मदतीला जाता येईल- नवरा आला तिकडे मदतीला तर त्याच्यासह नाहीतर त्याच्याशिवाय😄 -  हे कारण असू शकतं. खरं वाटेल का हो कुणाला?

लग्न करून महानगरात गेलेल्या आंबेवाल्यांच्या लेकी- आंबे विकतात हे तर अगदी कॉमन.. पण परत जाणाऱ्या रिकाम्या ट्रकमधून काय काय परत पाठवलं जातं माहेरी? रिकाम्या बॉक्समधील उरलेला पेंढा- पुन्हा वापरायला होईल, आंबे संपले की तो पेंढा गुरं खातील, अगदीच काही नाही तर बंब पेटवायला होईल.. तीच गत नारळाच्या करवंट्या व शेंड्यांची! 

एकदा सरसकट झाले की फणसाला कुणी विचारत नाही कोकणात. "असतील तितके फणस पाठवा बाबा" असं आत्मविश्वासाने सांगणाऱ्या मुलीच्या अंगात कामाचा उरक किती असेल हे गरे विकत घेणाऱ्याना कळणार नाही. पहाटे साडेचारला उठून घरादाराचा चहा-नाष्टा, स्वयंपाक करून ही पुण्याच्या फ्लॅटमध्ये विळी मांडून फणस फोडायला बसते, आणि आठ वाजेपर्यंत काप्या गऱ्यांच्या 200 ग्रामच्या सुबक पिशव्या भरून तयार ठेवते.. कच्चे गरे चिरून उकडगऱ्याच्या भाजीसाठी विकते... उरल्या सुरल्या आंब्याचा मुरांबा, मावा, करून एकही आंबा फुकट जाऊ द्यायचा नाही हे सगळं सोपं नाही. हे कष्ट आणि वेळ व्यवस्थापन एकत्र आणायला कारणीभूत होतं आंबेवाल्यांच्या घरातले बालपण.

हल्ली रिसेलिंगचे पेव फुटलेले आहे.. जो तो उठून whatsapp स्टेट्सला असंख्य फोटो चिकटवून ऑर्डर घेतात व वस्तू परस्पर पाठवायला सांगतात.. ते वाईट आहे असं मुळीच नव्हे.. पण एक साधारण निरीक्षण असं की नवरा भरपूर पगार कमवत असेल तर हे रिसेलिंग प्रकरण फार काळ टिकत नाही.. पण इथून कोकण प्रॉडक्टस st पार्सलने मागवा, स्कुटरवर लादून, हमाली करत घरी आणा, प्रत्येकाची चव घ्या, वैशिष्ट्ये सांगा.. लोकांची वर्दळ किंवा होम डिलिव्हरी पोचवणे.. लोकसंपर्क आलाच आहे तर अश्या काही सेवा ह्या मुली पुरवतात की जे शहरात वाढलेल्या मैत्रिणींना कठीण आहे, पण असमच्यासाठी हाताचा मळ आहे- जसे नारळ खरवडणे, नारळाचे दूध काढून सोलकढी, तांदुळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकऱ्या आणि उकडीचे मोदक😋...हे सगळं करत असताना घरातील ज्येष्ठ, लहान मुलं, आणि वर्क फ्रॉम होम वाला नवरा सांभाळणे हे सगळं ह्या लीलया जमवून आणतात. अर्थात ह्यासाठी घरभर जो काय देखावा बनतो तो फ्लॅटमध्ये सहन करणाऱ्या ह्या तायांच्या सासूसासऱ्यांना अभिवादन!

माहेरचे आंबे उशिरा आले, तोपर्यंत दर कोसळले.. प्रक्रिया करण्यासाठी मनुष्यबळ नाही.. अश्या स्थितीत एक मुलगी आपल्या इंजिनियर होऊन mba करत असलेल्या मुलाला कामाला लावते- आणि शहरातील मध्यवर्ती चौकात - जिथे खेडेगावातील लोक भाजीपाला फळे विकायला रस्त्यावर बसतात.. त्यांच्या रांगेत बसून हा सुशिक्षित हँडसम पोरगा आजोळचे आंबे विकून मोकळा होतो!  आता सोशल मीडिया हा विक्रीचे ठिकाण झाल्यावर इथे घेतलेल्या ऑर्डरी जरी बटणं दाबून मिळवल्या तरी कुरियर ऑफिसपर्यंत आंब्याची स्वतः हमाली करायला ही आंबेवाल्यांची नातवंडं लाजत नाहीत.

आंब्याच्या दिवसातील कामं हे कष्ट नसून उत्सव आहे असं मत असूनही कॅनिंगवाला नवरा नको ही अट सुद्धा ह्या कॅनिंगवाल्यांच्या पोरी घालतात ह्याला काय म्हणावं🤣🤣🤣 आता भलावण कुठल्या रसाची करावी मग अश्या  परिस्थितीत सांगा.. रायव्हलरी नावाचा प्रकार असतोच की हो. त्यापेक्षा ती भानगडच नको. माहेरचा ब्रँड जे पदार्थ बनवत नाही तेच पदार्थ सासरच्या ब्रँडमध्ये बनवायचे.. हा एक फंडा. सासर माहेर जवळच्या अंतरात असल्यामुळे  मुरंब्याची पूर्वतयारी सासरी करून माहेरी पाठवायची- मुरंबा तिकडे करतील.. सासरी पिंप/क्रेट/ट्रे कमी पडतायत- माहेरहून आणायचे-- हे ही प्रकार आंब्यांच्या लगीनघाईमध्ये होऊन जातात.

आंबेवाल्यांच्या सुना हेही असंच अजब रसायन असतं.. ह्या आंबेवाल्यांचा लेकीसुद्धा असतील तर ठीक, पण ह्या इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या पूर्वाश्रमीच्या शिक्षिका, काउन्सेलर, चित्रकार, विशेष मुलांच्या ट्रेनर अश्या विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या असतात.. कित्येकदा माहेरी संपूर्ण नोकरीपेशाचं वातावरण असतं. कित्येकीचं बालपण महानगरात गेलेलं असतं आणि इथे 12-14 तासांची अव्याहत ड्युटी करत असतात. 

कामगार मंडळींशी खेळीमेळीचे संबंध ठेवतानाच, "वैनी बघतायत" ह्या एवढ्या धाकाने पटापट कामे करवून घेतात. बरोबरीच्या मैत्रिणी उन्हाळा आला म्हणून नवरा आणि पोरांबरोबर थंड हवेच्या ठिकाणी जात असतात, आणि ह्या मात्र धगधगत्या चुलीजवळ रस आटवत नाहीतर गरे तळत उभ्या असतात नाहीतर कडक उन्हात साठं वाळत घालत असतात.. 

आता कोरोना आहे म्हणून सोडा, पण लग्नकार्याचे दिवस असताना लोक नटूनथटून समारंभाला जात असतात तेव्हा ह्या धुवट कॉटनचे कपडे घालून, केसांच्या बुचड्यावर कॅप चढवून कपड्यांवर आमरसाचे डाग मिरवत असतात.

मे महिन्यात माहेरी जाणे ही जनतेची कॉमन गोष्ट असताना- आंबेवाल्यांच्या सुना मात्र माहेरी तर राहोच, दीड महिना घराबाहेर सुद्धा पडू शकत नाहीत.. पार्लर, शॉपिंग हे तर कोसो दूर राहिलं.

 तरुणपणी हेच सगळं अनुभवलेल्या, आता घराची आघाडी व नातवंडं सांभाळणाऱ्या आणि संध्याकाळी दमून घरी आलेल्या मुलगासुनेला चहाचा कप देणाऱ्या सासूबाई सुद्धा मुळात आंबेवाल्यांची सूनच पण त्यांना ह्यात मुरून आता बराच काळ झालाय. पण आत्ताच्या पिढीतील जोडप्यालाही आंब्याच्या दिवसात संध्याकाळी एकत्र फिरायला बाहेर पडणे परवडत नाही.. आंबेवाल्यांच्या सुना हे चालवून घेतात.  कारण ह्या दिवसात सासूसासऱ्यांबरोबर बसून दिवसभराचा आढावा, लिखाण,गप्पा व उद्याचं नियोजन ह्यावर चर्चा करणं अतिशय गरजेचं असतं.. हे त्यांना पटलेलं असतं!

 ज्यांच्याकडे ह्या एवढ्या धामधुमीत सुद्धा रोजचा सोवळ्यात स्वयंपाक, नैवैद्य असतो त्यांचे तर आपण पाय धरावेत फक्त.. आणि ज्यांच्याकडे मे महिन्यात पाहुण्यांचा पाऊस पडतो, आणि सासुरवाशिणीने त्यांची बडदास्त ठेवावी अशी अपेक्षा असते त्यांच्यासाठी- "आता तरी सुधारा रे प्लिज!"

तुम्ही म्हणाल, काय मोठं कौतुक आलंय ह्यात.. स्वतःच्या चरितार्थासाठी तर कावळे चिमण्या पण कष्ट करतात.. खरं आहेच ते. पण- 
तुळशीचं आणि सब्जाचं बी मिक्स झालंय काय करू ?..
उपासाला वांग्याचे काप चालतील का ?..
उजव्या डोळ्याची पापणी दुखते,घरगुती उपाय सांगा...
अश्या गहन विचारात फेसबुकावर वेळ घालवणाऱ्या किंवा महागाई झाली आहे बेरोजगारी वाढली आहे असं आळवणाऱ्या लोकांना दुसरीही बाजू कळवी म्हणून हे लिहावंसं वाटलं..

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

11 March, 2020

शिमगोत्सव

संकासूराची बायको मेली,
सायाच्या पानात गुंडलून नेली,
सायाच्या पान फाटला,
म्हातारीचा डोस्का आपाटला!!!

आमच्या लहानपणी शिमग्याचे दिवस आले की हे 'अभिजात काव्य'😉 दिवसातून कित्येकवेळा ऐकायला यायचे! ते ऐकायला आले की "संकासूर आला, संकासूर आला असं ओरडत आम्ही तो संकासूर बघायला धावायचो. चित्रविचित्र- चिवटेबावटे कपडे घालून तोंडावर मुखवटा (मास्क) लावून येणारे संकासुर वरील गाणं म्हणत म्हणत घरोघरी नाचायचे.. मग लोक त्यांना काय ते पैसे वगैरे द्यायचे.

आमची आजी त्यांना म्हणायची की "दरवर्षी एकच कसलं रे तुमचं गाणं.. आणि प्रत्येकवेळी बायकोला मारता रे कश्याला??"😂... मग दुसरं काव्य यायचं..
पॅकपॅकपॅकपॅक बदक वराडतो
कोनाच्या घरी जातो...😃

आता हे सगळं अगदी पोरकट वाटतं.. वाढत्या आर्थिक सुबत्तेचा परिणाम म्हणून त्याचप्रमाणे ह्या पोराटकी संकासुरांना काही धार्मिक अधिष्ठान नसल्यामुळे हे संकासुर यायचं प्रमाण आता खूपच कमी झालं. पण त्या वयात व त्या काळात हा प्रकार खूपच मनोरंजक वाटायचा!

ह्याच दिवसात येणाऱ्या पालख्या मात्र अजूनही येतात.. त्यापैकी रेवली नावाच्या गावाची पालखी येते तिच्याबरोबर संकासुर असतो. विशेष म्हणजे हा संकासुर कुणी लहान पोरगा नसून अगदी मोठ्ठा बाप्या माणूस असतो.. त्याचे ते काळे काळे कपडे, उंचच उंच काळी टोपी.. सगळंच आम्हाला तेव्हा अद्भुतरम्य व किंचित भीतीदायक पण वाटायचं, तरी संकासुर बघण्यातली गंमत कधी कमी नाही झाली...

इथे पंचनदीला फक्त 40 किलोमीटर अंतराचा फरक, पण शिमग्याची पद्धत प्रथा थोडीफार वेगळी..इकडे  ह्या संकासुरसदृश सोंग घेऊन येणाऱ्यांना 'नकटा' म्हणतात.. तो बघायचा यंदा प्रथमच योग्य आला. तो नकटा म्हणजे अगदी भीतीदायक प्राणी.. लोकांना, लहान मुलांना घाबरवून सोडतो.. त्याला बघून लोक जोरजोरात किंचाळत पळत सुटतात आणि क्वचित तो नकटा पण लोकांच्या मागून पळत सुटतो, अशी एकूण सगळी गंमत.

नकट्याबरोबर नाच्या असतोच. म्हणजे नऊवारी साडी नेसलेला सालंकृत पुरुष. टीव्ही वर असले चाळे फार झाल्यामुळे ते अगदी डोक्यात जातात पण इथे तसं नसतं. लोकगीते म्हणत त्यावर नाच करणाऱ्या नाच्यांमध्ये लोक साक्षात देवाचं रूप बघतात. हळदीकुंकू लावून, आरती ओवाळून त्याचा सन्मान करतात. मागच्या वर्षी आमचं व नणंदेचं अशी दोन्ही मुलं लहान होती तर सा बा नी नाच्याची ओटी भरलेली- दोघींची बाळंतपणे सुखरूप झाली ह्याबद्दल देवाची कृतज्ञता व लेकरांचं सगळं व्यवस्थित होउदे म्हणून प्रार्थना अश्या अर्थाने. खरं तर नाच्या म्हणजे रोज तुमच्या आमच्यात वावरणारा, नॉर्मल नोकरी व्यवसाय करणारा, बायकोमुलं असलेला संसारी पुरुष. पण शिमग्यात हौसेनी व भक्तभावानी नाच्या म्हणून जातात.

भैरीचा झेंडा येऊन गेला, खेळ्यांचा नाच वगैरे झाले की वेध लागतात पालखीचे. मुर्डीसारखं इथे खूप खूप पालख्यांचे प्रस्थ नाहीये. एकमेव पालखी येते- तीही घरी नव्हे. घराच्या मागे सुपारीचे आगर, त्याच्यामागे नदी, नदीपलीकडे डोंगर चढून गेलं की कलमांची बाग, त्या बागेत असलेल्या वाड्यासमोर पालखी येते. ही आडी गावच्या सातमाय न्हावनकरीण देवीची पालखी.

धुळवडीच्या दिवशी संध्याकाळी तिन्हीसांजेला पालखीचे आगमन. मुर्डीला जसे ढाकुमाकूम ढाकुमाकूम असा साताईचा बाजा वाजतो, ताडीलचा भैरी धाताडधाडधाड  धाताडधाडधाड असा वाजतो, तशी ही सातमाय न्हावनकरीण येते तिच्या बरोबरच्या वाद्यांचे बोल असतात, "ढगाशी बसलाय" 😂😂😂

ते ढगाशी बसलाय ऐकू यायला लागलं की सर्व सरंजाम- ओट्या, पुजेचं साहित्य, प्रसाद, सतरंज्या, सोलर कंदील, पिण्याचे पाणी वगैरे घेऊन नदी ओलांडून डोंगर चढून कलमात जायचं. हळूहळू गावातील आबालवृद्ध स्त्रीपुरुष तिथे यायला लागतात. ज्येष्ठ मंडळी, प्रौढ महिला मंडळ सतरंजीवर बसून घेतं आणि तरुण मंडळी  अजून डोंगर चढून रस्त्यापर्यंत जातात --- पालखीत बसून आपल्याला भेटायला येणाऱ्या देवतेला आणायला म्हणून. आपण पाहुण्यांना आणायला कसे कौतुकाने, प्रेमाने स्टेशनवर जातो, तसेच!

कालही असेच आम्ही पालखीच्या स्वागताला म्हणून डोंगर चढून गेलो. हळूहळू काळोख व्हायला लागला, आणि 'ढगाशी बसलाय' असा आवाज करत, बॅटरीच्या उजेडात पालखी आलीच. झटकन पुढे होऊन अजय- पुष्करने (नवरा आणि दिर) पालखी खांद्यावर घेतली व आम्ही चालत बरोबर निघालो. बिनचप्पलानी काळोखातून दगडधोंड्यातून चालायच्या ह्या प्रथा- माणसाचा कणखरपणा टिकवण्यासाठी आजही तितक्याच उपयोगाच्या वाटतात मला.

दुतर्फा असलेल्या आम्रवृक्षांच्या कमानीतून पालखीने वाड्याच्या आवारात प्रवेश केला. "जय बोला डबुल्या"- असं म्हणतात तिथे😀 बहुतेक पालखी उचलणाऱ्यांना जोर यावा म्हणून वापरला जाणारा शब्दप्रयोग असावा. पालखीच्या खुरांवर दूध पाणी घालून प्रसादकाकांनी पालखीचे स्वागत केलं. सतरंजीवर पालखी विराजमान झाली. मग सासऱ्यानी, प्रसादकाकांनी पूजा केली. घरातील महिलामंडळीनी(म्हणजे आम्हीच) देवतेची ओटी भरून झाली. घरातील सर्वांचे दर्शन घेऊन झाले. मग जमलेल्या सर्व पुरुष मंडळींनी रांगेत दर्शन घेतले आणि महिला वर्गाने तसेच रांगेत येऊन ओट्या भरल्या.

सर्व मंडळींचे दर्शन होईपर्यंत सुरू झाला परत नाचाचा कार्यक्रम. तिथेही नाच्ये आले होते. देवादिकांच्या भक्तीगीतांपासून ते काही वात्रट म्हणावे असे आशय असलेली ती गाणी आजच्या काळातही जमलेल्या गर्दीचे मनोरंजन करत होती. ती कुणी रचली असावीत हा एक कुतूहलाचा विषय आहे. एक नवविवाहित मनुष्य तिथे आल्यावर सुरू झालेल्या गाण्याचे शब्द होते -'" घेऊन चला पतीराज मजला चौपाटीला"😂😂😂  तर "मुंबईची बायको, कोकणचा नवरा, हिला पसंत येईल काय" ह्यात काय ते सामाजिक वास्तव का कायसं दाखवलं असावं🤣🤣🤣 "फ्याशनवाला पती मिळाला फ्याशन मी करते" - असली इंग्रजीप्रचुर गाणी पण त्यात होती..फक्त त्यात नॉयलॉनची साडी हा लेटेस्ट ट्रेंड उल्लेखिला असल्याने त्या गाण्याचा काळ सहज कळून येत होता🤣🤣🤣 एकूण हसून हसून लोकांची भरपूर करमणूक चालली होती. एरव्ही शर्ट-पॅन्ट ची सवय असलेले ते नर्तक नऊवारीसाडी सारखा बोजड प्रकार अंगात असताना जे काय भयंकर चपळ नाचतात की त्यांची पावले जमिनीवर कमी नि अधांतरी जास्त असावीत!

सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर नाचाचा कार्यक्रम संपला. मग खेळ्यांमधील मुख्य असलेल्या एकांनी सर्व भक्तांच्या भल्यासाठी प्रार्थना केली, कुणाचे नवस होते ते देवीला सांगितले. प्रसाद वाटप झाले. पालखीतील नारळ तांदूळ वगैरे नीट आवरून ठेवले गेले.

एव्हाना तरुण मंडळींचे हातपाय सज्ज व्हायला लागलेच होते.. तसेच वादकही सज्ज झाले होते. परत अजय-पुष्कर दोघांनी पालखी उचलली आणि पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग आळीपाळीने एकेकानी पुढे येत बऱ्याच मंडळींनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. अबीरच्या दोन आजोबांनी एका कडेवर अबीर आणि एका खांद्यावर पालखी असे घेऊन नाचवले तेव्हा अबीर तर कमालीचा खुश झाला😍 

बघणारे व नाचणारे ह्या दोघांसाठी हा कार्यक्रम संपूच नये असे वाटणारा! पण वेळेची मर्यादा देवालाही आहेच. त्यामुळे वादन बंद होताच जड मनाने नाचणे थांबले. पालखीला निरोप द्यायला अजय-पुष्कर पालखी खांद्यावर घेऊन काही अंतर चालून गेले व मग पालखी मार्गस्थ झाली.

एव्हाना रात्र बरीच झाली होती. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रप्रकाशात घनदाट झाडीतून परतीच्या वाटेला लागलेल्या पालखीकडे वळून वळून बघत आम्हीही परत फिरलो. पुन्हा पाण्यातून नदी ओलांडून घराच्या दिशेनी निघालो ,तेव्हा अगदी उदास होऊन अबीर मला विचारू लागला, "आई ग, बाप्पा कुठे गेला?" बाकीच्यांच्या मनाची अवस्था मुळीच वेगळी नव्हती

©ऐश्वर्या पेंडसे जोशी




01 February, 2020

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच एका देवळात जाऊन आलो. देऊळ म्हटलं की चकचकीत किंवा बकाल आवार, भाविकांची गर्दी, पूजा साहित्याची दुकाने, प्रसाद-अभिषेक वगैरेंच्या पावत्या, तासन्तास रांगेत उभे राहिलेले भाविक(?) हा असा सगळा माहोल उभा राहतो- तो मला आणि सुदैवाने अजयला सुद्धा नको वाटतो.

पंचनदीच्या जवळच असलेल्या दुमदेव नावाच्या गावात एक गणपतीचं देऊळ आहे. माघातील पहिल्या चतुर्थीला तिथला छोटासा उत्सव. आमचं लग्न झालं त्यानंतर तीनच दिवसांनी हा उत्सव होता, पण तेव्हा घरात पाहुणे पूजा वगैरे असल्यामुळे गेलो नव्हतो. नंतर मग दरवर्षी अजय तिथे आवर्तने करायला जातो. पण माझी वेळ आली नव्हती देवळात जाण्याची. म्हणून मग यंदा लग्नाच्या वाढदिवशी दुमदेव गणपतीला जाण्याचं ठरवलं. तसंही दोघांचीही व्यवसायिक कामं आणि तोंडावर आलेलं दिराचं लग्न यामुळे फिरायला जाण्यासाठी जेमतेम 2-3 तासांचा वेळ हातात होता मोकळा.

मुळात गावच मुख्य रस्ता सोडून आड बाजूला. गावात काही बंद असलेली किंवा काही मोजकी माणसे राहत असलेली घरं आहेत. घरं संपली की गर्द रानातून उतरत जाणारी पाखाडी आणि पाखाडी संपली की छोटंसं कौलारू देऊळ. देवळाच्या गाभाऱ्यात मिट्ट काळोखच होता त्यामुळे गणपती काही दिसला नाही स्पष्ट, पण तिथे असलेली गर्द झाडी, खालच्या बाजूला नदीपर्यंत पसरलेले आगर आणि निरव शांतता ह्यातच खरा देव भेटल्यासारखा वाटला.

परतीच्या वाटेवर एका भग्न घराकडे लक्ष वेधलं गेलं. ऐकीव माहितीनुसार हे त्या गावातील एकमेव ब्राह्मणाचे घर असावे. भिंती, दरवाजे पडझडीला लागलेल्या अवस्थेत, पण त्यामुळे घराच्या आतील रचना स्पष्ट दिसू शकत होती. लाकडी गज, माजघरातून वर जाणारा जिना, मागच्या-पुढच्या पडव्या, कौलारू छप्पर...
अशी घरं बघितलं की नेहेमीच पोटात काहीतरी ढवळून निघतं. कोणे एके काळी हेच घर कदाचित नांदतं जागतं असेल, झोपाळ्यावर ओव्या, अंगाई, पाढे म्हटले जात असतील.. गणपतीत आरत्यानी माजघर दुमदुमत असेल, दारात शिमग्याची पालखी बसत असेल. लग्नकार्ये, बाळंतपणे झाली असतील... 
जर शाळेतल्या निबंधासारखं निर्जीव वास्तूंना मन असेल, तर आपल्याला बघून त्या घराला त्यांच्या मुला-लेकरांची आठवण येत असेल...असा विचार नेहेमी मनात चमकून जातो..परंतु आपण गलबलतोय तेवढे त्या घराचे मालक घराबद्दल विचार तरी करत असतील की नाही कोण जाणे... 
त्यामुळे हे विचार झटकून टाकायचे आणि आपण आपल्या पूर्वजांनी जुनी घरं जतन करता येतील इतकंच बघायचं, बास! 

परतीच्या प्रवासात तिथे भेटलेला देव तेवढा मनात धरून मुख्य रस्त्याला लागलो!
©ऐश्वर्या पेंडसे जोशी


08 November, 2019

कोण आवडे अधिक तुला

सध्या आमच्याकडे कथाकथन व गायन हे दोन प्रकार सतत सुरू असतात. त्यात आता अबीरला शिंगं फुटायला लागल्यामुळे हे गाणं नको ते म्हण किंवा ही गोष्ट नको ती सांग असल्या फर्माईशी पण चालतात. 

हल्ली तर त्याने काढलेली नवीन थीम म्हणजे- मामाचं गाणं म्हण, दादाचं गाणं म्हण, हम्माचं गाणं म्हण... वगैरे

तर मग जरा डोक्याला ताण देऊन व गुगलची मदत घेऊन त्याला हव्या त्या थीमवर आधारित गाणी आठवली जातात. त्यामुळे परवाच त्याने "बाबाचं गाणं म्हण" अशी फर्माईश केल्यावर "आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला" हे गाणं आठवलं. ते पूर्ण येत नव्हतं म्हणून गुगल करून शोधून काढलं.

लहानपणी आईने म्हटलेलं हे गाणं ऐकलेलं आहे, पण तेव्हा त्यातले संदर्भ नीट कळत नव्हते. आताही ह्या गाण्याची चाल, शब्द, गोडवा हे सगळं खासच आहे, ज्या काळात ग दि माडगूळकरांनी हे गाणं लिहिलं त्या काळाचा विचार करता त्यातील वर्णन सुद्धा कमालीचे चपखल आहे. पण तरीही आता स्वतःच्या मुलाला हे गाणं म्हणून दाखवताना वाटतं की आजच्या काळात किती बदललेत सगळे संदर्भ. 

आणि नेमका ह्याच मुद्द्याला धरून एक लेख फेसबुकवर नुकताच वाचनात आला की, घटस्फोटाच्या वाटेवर असलेल्या आईवडिलांच्या मुलाला वकील विचारतायत की तुला आई आवडते का बाबा... हे अगदीच गलबलवून टाकणारं चित्र!

तरीही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुटुंबात- जिथे आईवडील नीट एकत्र राहातायत, अश्या कुटुंबात चित्र किती आमूलाग्र बदललंय! 

आणि विचार करता करता झटकन लक्षात आलं की चित्रातले आई बाबा दोघेही बदललेत हे खरं, पण बाबा लोकांना अजून बराच वाव आहे बदलायला..

म्हणजे गंमत बघा- ह्या गाण्यात बाबांचे जे प्लस पॉइंट्स सांगितलेत ते आता उरलेच नाहीयेत. कारण ते सगळं आयासुद्धा करू लागल्यात. आता आई भित्री भागूबाई नाही, आता आई सुद्धा मुलांना खाऊ विकत घेऊन देऊ शकते. रिबिनीलाच काय ऍडमिशनला सुद्धा पुरतील इतके पैसे आईही कमावते, आणि घरात बसल्या आईला पैसा दिडकी कुणी देत नाही असं राहिलेलं नाही..  वयाने जरा मोठा असला तरी बाबाला काही आई नमस्कार करत नाही, आणि बाबा घरात आल्यावर भिऊन पदर(?) सावरायला आधी पदर नसतोच उलट, "आलास का? ह्याला घे आता जरा.. मस्ती करून पाय आणि बोलून तोंड दुखतंय माझं." असं म्हणून आया जरा रिलॅक्स होऊ शकतात!!

बाबा लोक सुद्धा पूर्वीपेक्षा खूपच खूप बदलत चाललेत ह्यात वाद नाही. पण सुंदर गाणी गाणारे बाबा घरोघरी असायला लागले तरी बाबा लोकांना तऱ्हेतऱ्हेचे खाऊ सहज बनवता येणं जरा दुर्मिळ आहे अजून.. सुंदर कपडे अमेझॉनवरून मागवताना बाबा लोक साईजच्या अंदाजात तरबेज झालेत हे नक्की.. पण पावडर तिट्टी आणि रिबीन बांधून वेण्या घालणे बाबांना जमते का हा संशोधनाचा विषय आहे😁😁😁 

बाकी "आईचे मऊ साईचे हात" आणि "बाबाच्या मिश्या चिमुकल्या करती गुदगुल्या" ह्यातल्या भूमिकांची अदलाबदल अशक्य आहे🤣 त्यासाठी काहीतरी उत्क्रांती वगैरे झाली तरच, ते जाऊंदे!

तर पॉईंटाचा मुद्दा काये- 
धडा शिक रे तू बैलोबा-- आई जसं मल्टीटास्किंग करून सगळंच जमवते तसंच भविष्यात बाबालोकांना पण जमायला हवंय.. तरच आया तयार होतील बाबासंगे लग्नाला!!!

म्हणजे थोडक्यात काय तर आत्ता ज्यांना लहान मुलगे आहेत त्यांनी आपापल्या मुलांना घरकाम, स्वयंपाक, वगैरे निगुतीने करायच्या गोष्टींमध्ये तरबेज करून ठेवायला हवंय.. म्हणजे ही मुलं बाबा होतील तेव्हा पुढच्या पिढीत तरी आई व बाबा दोघांनाही गाण्यातील प्रत्येक कडवं अवगत झालेलं बघायला मिळेल.. आणि आपण म्हातारपणी जमेल तितकी मदत करूच नातवंड सांभाळायला🤣🤣🤣

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

सांग मला रे सांग मला (ग दि माडगुुुळकर)

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !

27 September, 2019

वाघ

कधी कधी आपल्या हातून इतक्या विनोदी घटना घडतात की स्वतःच्या फजितीवर राहून राहून हसू येत राहतं! आणि ह्या घडामोडीला कुणी साक्षीदार असेल तर बघायलाच नको🤦

इकडे आमच्या परिसरात वर्षातल्या ठराविक काळात बिबट्याचा संचार असतो.  हा पट्टेरी वाघ नसतोच, पण त्याला इमानदारीत त्याच्या "बिबट्या" ह्या खऱ्या नावाने न संबोधता बहुतेक लोक त्याला वाघ म्हणतात😁 तर गोष्टींच्या सोयीसाठी आपण पण त्याला वाघ म्हणू!

मुर्डी-आंजर्ले-सुकोंडी परिसरात देवदिवाळीच्या दरम्यान कुणी ना कुणी सांगतोच की- अमुक ठिकाणी वाघ बघितला. इथे पंचनदी परिसरात पितृपक्ष- नवरात्र ह्या दरम्यान वाघ फिरतो. कुणाला त्याचा वास येतो तर कुणाला त्याच्या पावलांचे ठसे दिसतात. कुणाचा कुत्रा नेलन म्हणून बातमी येते तर कुणाला याची देही याची डोळा दर्शन घडते.

तर सालाबादप्रमाणे यंदाही वाघ फिरायला लागल्याची चर्चा असमंतात सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी अशीच चर्चा सुरू होती, तेव्हा नुकतेच लग्न झाल्यामुळे मी नवीन होते पंचनदी गावात. घरात वाघाबद्दल गप्पा रंगात आलेल्या- सगळे पडवीत बसून.

अजयचे काका सांगायला लागले- "असाच मी नुकताच कसलीशी मिटिंग संपून रात्री घरात येऊन इथे आडवा झालेला! एकदम कुत्र्यांचा आरडाओरडा ऐकायला आला, म्हणून दार उघडून तुळशी अंगणात आलो तर असा तुळशीच्या समोरून वाघ धावता बागेत गेला!"

मुर्डीला साप, विंचू, काळमांजर, मुंगूस, कोल्हा वगैरे घराच्या आजूबाजूला वावरण्याची सवय असली तरी वाघ नक्कीच आवाक्याबाहेरचा वाटला. कारण मुर्डीला घराला घर खेटून असल्यामुळे तशी काहीच भीती नसते.   माझी तर मनातल्या मनात घाबरघाबर झाली ही ष्टोरी ऐकून, एकतर इथे संडास-बाथरूम घराच्या बाहेर, म्हणून ठरवून टाकलं की एकदा रात्री नऊच्या दरम्यान बाथरूमला जाऊन यायचं ते परत पहाटेशिवाय बाहेर पडायचं नाही घराच्या🤦पण हा निश्चय फार काही टिकला नाही. लेकरू झाल्यावर त्याला रात्री बेरात्री शी-शु होणं किंवा उत्सवाच्या काळात खूप उशिरा देवळातून घरी येणं ह्या निमित्ताने वाघ प्रकरण जरा मनातून मागे पडलं.

यंदा लेकरू थोडं मोठं झालं, आजीजवळ राहू शकण्याइतकं- त्यामुळे मी व अजयने थोडे थोडे शेतीचे प्रयोग, आंबा काजू लागवड वगैरे सुरू केली. पहाटे लवकर उठून तासभर शेतात काम करून यायचं असं रुटीन सुरू केलं. पाऊस उताराला लागला तसं सड्यावर भरभर गवत वाढायला लागलं नि गवताने सुंदर पिवळा रंग धारण केला. नवरात्र व पाठोपाठ दिवाळीच्या आगमनाची चाहुलच ती!  बघता बघता आमच्या डोक्याच्या वर उंच गवत वाढलं. प्रत्येकवेळी शेतात निघालो की काका बजावायला लागले- "दोघांच्याही हातात प्रत्येकी एक काठी नि एक कोयती घेऊन जा! एवढाल्या गवतात बसलेला असला तर अगदी जवळ पोचेपर्यंत वाघ दिसायचाही नाही!"

त्यातच इथे गावात राहून रोज दापोली येऊन जाऊन करणाऱ्या एका काकांना परवाच रात्री दापोलीहून परत येताना अगदी डांबरी रस्त्यावर वाघ दिसला असं ऐकलं. आणि मनातून पुसलं गेलेलं वाघ प्रकरण परत थोडंस जागृत झालं कदाचित.

झालं असं की मी आणि अजय प्लेजरवरून जात असताना एका पुलावरून जात होतो. पूल म्हणजे काय, पर्ह्यावर साकव असावा तसाच! त्या पर्ह्यावर पाणी अडवण्यासाठी एक बंधारा आहे, सध्या त्या बंधाऱ्यावरून ओसंडून पाणी वाहत आहे. त्याचा सभोवार गर्द हिरवी झाडी. गाडीवरून जाताना सहज लक्ष गेलं तर तिथे बंधाऱ्यात पाणी अडून झालेल्या जलाशयात काठावर काहीतरी पिवळं पिवळं दिसलं!

"अजय थांबव गाडी, तो बघ वाघ पाणी पितोय!" आता वाघ दिसतोय म्हटल्यावर तर्राट गाडी मारून लांब जावं की नाही? पण अस्मादिकांची हायपर होऊन दिलेली सूचना वजा ऑर्डर शिरसावंद्य मानून नवऱ्याने तात्काळ गाडी उभी केली आणि गाडीवरून उतरून आम्ही भरभर चालत पुलावर आलो- वाघ बघायला😁 एवढे जिम कॉर्बेटच्या जंगलातही वाघ दिसणं नशिबात नव्हतं , तो आता इथे दिसतोय की काय!! आणि बघतो तर काय🤦 पिवळ्या रंगाचा चिवटाबावटा टीशर्ट घातलेले एक सद्गृहस्थ तिथे ढोपरभर खोल पाण्यात उभे राहून - ओणवे होऊन मासे पकडायचा खटाटोप करत होते! चेहेरा जवळपास पाण्याच्या पृष्ठभागाला टेकलेलाच🤣🤣🤣

स्वतःच्याच फजितीवर खोखो हसत आम्ही परत गाडीकडे गेलो आणि ही सगळी गंमत बघत उभे असलेले दुसरे एक सद्गृहस्थ आम्हाला सांगायला लागले, "आरं, तो गरवायला(मासे पकडायला) गेलाय तिथे पाण्यात"

"अजय ते रस्त्यात भेटलेले आजोबा हसत असतील आपल्याला, कायतरी चर्चा पण होईल त्यांची" असं मी म्हणत होते तितक्यात अजय म्हणला, "श्या, पण वाघ दिसायला हवा होता आपल्याला, म्हणजे जंगलात वाघांच्या गावात पण चर्चा झाली असती की ,"आज आम्हाला माणसं दिसली!"

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

25 August, 2019

हरितालिकेची कहाणी

.ऐका हरितालिके तुमची कहाणी
एक आटपाट नगर होतं, तिथे गणेशोत्सव ऐन तोंडावर आला होता व लोक त्याच तयारीत लगबगीत होते. बाल गणेश आपल्या उंदरावर बसून प्रवासाला मार्गस्थ झाल्यावर इकडे कैलास पर्वतावर शंकर व पार्वती माता यांना घर ओकेबोके वाटू लागले. त्यांनी कलियुगात पृथ्वीतलावर कायकाय सुरू आहे हे पहाण्यास जाण्याचा निर्णय घेतला व तेही प्रवासाला मार्गस्थ झाले.

पृथ्वीतलावरील प्रवासाचा योग भगवान शंकर व पर्वतीमातेचा बऱ्याच कालावधीनंतर येत असल्याने त्यांना इथे फार फार बदल झाल्याचे जाणवत होते, व त्याबद्दलक चर्चा करत उभयतांच्या प्रवास मोठ्या मजेत सुरू होता.

विविध गावे शहरे न्याहाळत मार्गक्रमण करीत असता  शंकर म्हणाले, "पार्वती देवी!, आज हरितालिका तृतीया.. तुम्ही वस्तुपाठ घालून दिल्याप्रमाणे कुमारिकांनी करण्याच्या व्रताचा दिवस. पण इथे कुठे त्याचा काही मागमूस दिसेना! लग्न झालेल्या मोठाल्या स्त्रियाच तुमची पूजा करून हे व्रत आचरीत आहेत! आणि उपवर मुली मात्र घराबाहेर फिरताना दिसताहेत"

"अहो! असं काय म्हणता, उपवर मुली बाहेर फिरताहेत म्हणे! त्यांना त्यांची शाळा-महाविद्यालये, शिकवणी वर्ग, नोकरी- व्यवसाय, हे सर्व बघावे लागते आजकाल. अर्थात हे सर्व लग्न झालेल्या स्त्रियांनाही लागतेच हो बघावे, पण जबाबदारी पडली की त्या नेतात सर्व निभावून असे दिसते!"- पार्वती माता

"पार्वती देवी, हे सर्व आपणास कसे माहिती? आणि हे सर्व पुरुषी उद्योग ह्या स्त्रिया कशाकरिता करीत आहेत?"

"अहो काळ बदलतो आहे! आता आपल्या काळात आम्हीही हाच पती असावा म्हणून आपणासाठी हट्ट धरला होताच की! अगदी तपश्चर्या ही केली होती! पण आजकालच्या मुलींसाठी ही तपश्चर्या सुद्धा निराळी आहे बरं. मुलगी उत्तम शिकली आहे ना, स्वतःच्या पायावर उभी आहे ना, अर्थार्जन उत्तम करते ना, सुसंस्कारित आहे ना, तिचे चारित्र्य उत्तम आहे ना, तिला स्वयंपाक येतो ना, घरकाम येते ना, शिवाय दिसण्यात सुंदर व वागण्यात चटपटीत आहे ना .... ह्या सगळ्या प्रश्नावलीत उत्तीर्ण व्हावयाचे म्हणजे अपार कष्ट आलेच- एक प्रकारे तपश्चर्याच की! आता हे सर्व करण्याच्या नादात जर ह्या लेकी-बाळींनी जर नाही केला हरतालिकेचा निर्जली उपवास तर आम्ही काही त्यांच्यावर रागावणार नाही हो!"

"खरं आहे तुमचं म्हणणं पार्वती देवी! पण ह्या अश्या बदलत्या काळात हल्ली इथे लग्न न टिकण्याचे प्रमाण किती वाढले आहे, ह्याची कल्पना आहे का आपणास?

"होय तर.. खरी गोष्ट आहे. पण पूर्वीही स्त्रिया कठोर उपासतापास करूनही मनासारखा नवरा मिळेलच असे नव्हते बरं, आहे तोच चांगला मानून घेत असत त्याकाळी! हल्ली मुली सहन करणाऱ्यातल्या नाहीत!"

"पण मग आत्ताच्या ह्या लेकीबाळीना काय सांगाल तुम्ही?"

हे व्रत फक्त मुलींनीच नव्हे तर मुलांनीही आचारावे असे आहे.

हे काय भलतंच? पार्वतीदेवी! असं कुठे झालं होतं का? म्हणजे तुम्ही काय म्हणताय की चांगली बायको मिळावी म्हणून पुरुषांनीही व्रते करावीत?"

अर्थात! आजकाल मुलींचे लग्न जमणे ही समस्या नाही बरं..  मुलग्यांचे लग्न जमणे ही मोठी समस्या आहे! वर्षानुवर्षांची मानसिकता मुलग्यांनी व त्यांच्या मातापित्यांनी सोडायला हवी.. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण हल्ली लग्न जमवताना वरपिते विचारणा करतात की, " काय हो तुमची मुलगी निर्व्यसनी आहे ना?"--- आता बोला!

काय सांगता काय पार्वती देवी? पण मग ह्या मुलामुलींना तुम्ही व्रत म्हणून सांगाल तरी काय?

ऐका सांगते आजच्या काळात हे व्रत कसं करावं-
हे व्रत एकच दिवस करण्याचे नसून आयुष्यभराचे आहे हे प्रथम लक्षात घ्यावे!

मुलामुलींना बालवयात आईवडील सांगतात ते आपल्या भल्याचे आहे मनात ठसवावे. उत्तम अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे, स्वावलंबनाने स्वतःच्या पायावर उभे राहावे. जमतील तितकी जीवनोपयोगी कौशल्ये शिकून घ्यावीत.

तरुणपणी जोडीदार निवडताना तारतम्य बाळगावे, आईवडिलांना विश्वासात घ्यावे. स्वप्नरंजनापेक्षा वास्तविकतेवर भर द्यावा. नीट विचार करून, एकमेकांना वेळ देऊन आयुष्यभराचा निर्णय घ्यावा. एकदा आपले म्हटल्यावर गुणदोषांसहित स्वीकार करावा. एकमेकांसाठी स्वभावाचे टोकदार कंगोरे दोघांनीही बोथट करावे. एकमेकांच्या कुटुंबियांना दोघानीही आपले म्हणावे, सुखदुःखात सोबत असावे.

एकमेकांचे आरोग्य, एकमेकांचे मनःस्वास्थ्य उत्तम राहावे ह्यासाठी प्रयत्नशील असावे. आपापल्या जोडीदाराच्या वैद्यकीय तपासण्या वेळेवर होतात ना हे पाहावे. जोडीदाराला व्यसनांपासून दूर ठेवावे व स्वतः दूर राहावे. आधुनिकतेच्या नावाखाली वाढीस लागलेला स्वैराचार आपल्या जवळपास फिरकू देऊ नये. एकमेकांना सन्मानाने तसेच मित्रत्वाने वागावे

मनाला प्रसन्नता वाटणार असेल तर पारंपरिक पद्धतीने व्रत जरूर करावे, पण त्याची सक्ती नसावी. आजच्या दिवशी बायकांनी जरी काही खाल्लं तरी त्यांच्या आयुष्यात काही वाईट घडणार नाही... उलट वेळच्यावेळी पोषक व उत्तम आहार घेणाऱ्या स्त्रियाच उत्तम आरोग्य मिळवतील, घरादाराची जबाबदारी सक्षमपणे पेलतील व त्यांची मुलेबाळेसुद्धा तोच वारसा चालवतील. सर्वांची आयुष्य सुखासमाधानाने भरून राहतील.

व्रतानिमित्त एक दिवस वाण द्यायचे तर यथाशक्ती द्या, पण त्याहून महत्वाचे म्हणजे कायमच माणसांशी माणुसकीने वागावे. केवळ सवाष्णच नव्हे तर सर्वच स्त्रियांशी सन्मानाची वागणूक ठेवावी. हे व्रत कधीही विसर्जन न करता आयुष्यभर सुरू ठेवावं  ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

04 July, 2019

सुमारे 12-15 वर्षे लोटली असतील, आमच्या ओळखीत एकांच्या घरी नवजात बालकाचे आगमन झाले व बायाबापड्या निघाल्या बाळांतविडे व ओट्या घेऊन. जनरीतच ती, जाणारच. पण नव्या बाबाचे मित्र, समवयीन परिचित पुरुष मंडळीही हौसेनी 'बाळ बघायला' जाणं हे खेडेगावात तरी जरा नवीन होतं तेव्हा.

काही बुजुर्ग मंडळींची सहज प्रतिक्रिया होती-"त्यात काय बघायला जायचाय, पाय फुटले की ते पोर का घरात बसणारे? दिसेलच की मग इकडे तिकडे धावताना!😄"

बाळ आणि आई एकमेकांबरोबर रुळण्याच्या कार्यात पुरुष व्हिजिटर्स अडचणीचे ठरू शकतात म्हणून पुरुषांनी बाळ बघायला जाण्याची पूर्वी पद्धत नसावी हा एक मुद्दा रास्त वाटतो खरा, पण एकंदरीत बाळ आणि हगोली-मुतोली हे बायकी काम, त्यात लक्ष घालणं हे पुरुषीपणात बसणारं नाही, हाही दृष्टिकोन भरपूर असे.

अर्थात ह्या प्रवृत्तीला खणखणीत अपवाद आमच्या घरातच आहे. माझ्या बाबांनी आम्हा भावंडांचे दात घासणे, जेवण भरवणे, खांद्याशी घेऊन ओव्या/अंगाई म्हणत झोपवणे, पुढे आंघोळ घालून तयाऱ्या करून शाळेत पाठवणे असे सगळे उद्योग हौसेनी केले. पण असे बाबा त्यावेळी अपवाद असत. आमच्या बाबांनाही डॉक्टर किंवा कपडे दुकानदार यांना स्वतःच्या मुलांबद्दल तब्येतीचे, कपड्याच्या मापाचे तपशील  देताना आईला विचारावे लागे ते एक सोडून द्या🤣

बघता बघता एवढी वर्षं निघून गेली. तेव्हा शाळा कॉलेजात असणाऱ्या आमच्यासारख्याना आता मुलं झाली, आणि जाणवलं की पुलाखालून किती पाणी वाहून गेलंय आणि काळ किती बदललाय!

आजच आमच्या दुकानात एक आजोबा आले होते- त्यांच्या नातीसाठी डायपर विकत घ्यायला. हाही एक चांगला बदल. (हे मी खेडेगावाच्या दृष्टींतून लिहीत आहे.) साईज कुठला लागेल हे मात्र त्या आजोबांना माहिती नव्हतं. सूनबाईंना फोन करून विचारायचं तर त्या आजोबांना मोबाईल नंबर पाठ नव्हता. नातीचं वजन किती ते माहिती नव्हतं.

आता हगोली मुतोली ह्या विषयात एक्सपर्ट झाल्यामुळे अजयने पटकन हिशोब करून, ह्या मनुष्याची नात चार महिन्याची आहे म्हणजे 4 ते 8 किलो वजनासाठी असलेला डायपर लागेल हे ओळखून त्यांना दिले.

आमचं पोरगं अगदी बारकं - 2 दिवसाचं-असताना माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये आम्हाला भेटायला आला. तेव्हा तिथे मी, बाळ आणि काकू(सासूबाई) एवढेच होतो. पोग्गुने शी शू चा सगळा रबरबाट करून ठेवलेला तो काकू निस्तरत होत्या. लगेच आमचे बंधुराज पुढे सरसावले, आणि भराभर काकूंना लागेल ती मदत करू लागले. त्या हात धुवायला गेल्यावर ह्याने लगेच कापडाची त्रिकोणी घडी करून त्यात ते गोड गाठोडं पुडी करून बांधलं नि बोबड्या गप्पा सुरु झाल्या मामाभाच्याच्या😍 त्याचं पोरगं तेव्हा 23 दिवसाचं झालेलं आणि हा तब्बल 21 दिवसांचा अनुभव त्याला सिनियर करून मोकळा झाला होता!

पुढे माझी नणंद तिचं बाळ घेऊन 'बाळंतपणा'साठी आली तेव्हा अनुभवी मामा आणि त्याचा भाचा अशी अजून एक जोडी आम्हाला बघायला मिळाली😍 माझा मामा पण मला चमच्याने दूध पाजण्यापासून ते स्वतः माझ्यासाठी दुपट शिवण्यापर्यंत खूप काय काय करत असायचा😍

ह्या सगळ्या बदलाचे चांगले परिणाम ही दिसतायतच- की पूर्वी लोक वडिलांसमोर चळचळ कापत असत म्हणे🙄, मग पुढच्या काळात जरा धाक उरला, आता तर बाबांशी मैत्री आमचीही आहेच, आणि आमच्या पोरांना तर त्यांचा बाबा कुल ड्युड का काय तो असणारे हे नक्की😄

त्याचबरोबर आधी कश्या, "मूल झालं नि सगळं हिंडणेफिरणं, छंद, मित्रमैत्रिणी मागेच पडले" हा सर्रास बायकांचा अनुभव असे. तोही काही प्रमाणात मागे पडतोय. सुरुवातीचे काही महिने पार पडले की पोरं आणि बाबा एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घेतात (ज्यांच्याकडे आजी आजोबा मदतीला- मार्गदर्शनाला  असतात त्यांना तर फारच बरं.) आणि आया त्यांची कामं, उनाडक्या, छंद, पब्लिक रिलेशन्स वगैरे अगदी नीट पार पाडून येतात- हा माझ्यासकट बऱ्याच मैत्रिणी-बहिणी यांचा अनुभव आहे. त्याने जरा बदल मिळतो त्यामुळे मेंदू तरतरीत झाला की बरं वाटतच, शिवाय पोरगं जरावेळ लांब राहून परत भेटलं की नंतर जास्त दर्जेदार वेळ पोरांना दिला जातो हे एक निरीक्षण.

'नवबाबा' असलेले दोन मित्र एकमेकांना भेटले की, क्रिकेट/ राजकारण ह्यांच्या बरोबरीने "तुमचा सोनू काय काय खायला लागला आता? आमचा बाळू अमुक अमुक खातो" किंवा "तुमचा सोनू किती शब्द बोलतो रे? आमचा अजून बाबा काका ह्याच्यापुढे काहीच बोलत नाही" असे संवाद होतात.

सुट्टीच्या दिवशी ही नवबाबा जमात तंगड्या पसरून लोळण्याऐवजी पोराचं कपाट आवरून लहान होणारे कपडे बाहेर काढणे, "चड्ड्या संपत आल्यायत ग पोरग्याच्या आणायला हव्यात, अजून काही कपडे लागतील का आत्ता घ्यायला त्याला" असे सर्व्हे करतात. ट्रीमरने पोरांचे केस कापतात,बेबी नेलकटरने नखं काढतात.. तेवढाच आत्ताच्या आयांना पूर्वीच्या आयांपेक्षा रिलीफ मिळतो. तो रिलीफ आपण घ्यावा आणि बाबा-मुलांना एकमेकांची कंपनी साजरी करायला संधीही द्यावी.

आता हे सगळं चित्र खरं तर घरोघरी दिसत असेल. पण अलीकडेच एक मैत्रीण भेटली, रात्रीबेरात्री बाळ रडताना, बाळाची दुपटी बदलताना नवऱ्याची झोपमोड होते म्हणून गिल्ट घेऊन वावरत असलेली. "अजूनही असं का वाटावं?" असं मनात आलं आणि त्यामुळे हे सगळं लिहावंसं वाटलं.. मी लिहीत असतानाच लेकरू पेंगुळलं आहेच. त्याचा बाबा त्याला खांद्याशी घेऊन झोपाळ्यावर बसलाय- लेकरू त्याला "कोकिळेचा गाना" म्हण म्हणून हट्ट करतंय, आणि बाबा गातोय😍

©ऐश्वर्या पेंडसे जोशी